सध्या मी कुटुंबासोबत इंग्लंडमध्ये आहे. दर आठवडा पंधरा दिवसांनी पत्नीसोबत खरेदीसाठी जवळच्या टाऊनला मी जात असतो.
असंच एक दिवस निघालो. जाताना पहात होतो, सगळं कसं यांत्रिक दिसत होतं. चाॅकलेटी रंगाची एका ओळीत जमीनीला चिकटवलेली बसकी घरं, त्याच्या भोवतालची शिस्तीत उभी गार्डन्स, काचेच्या तावदानात बंद, उंचच उंच कमर्शियल बिल्डिंगा, काळा रंगही आकर्षक दिसेल असे, लांबच लांब रस्ते, ट्रॅफिकला नियंत्रण करणारे पोलीस नसतानाही, रांगेत धावणारी वाहने…
इतकंच काय आत्ताच घोटून दाढी केल्यासारखी दिसणारी स्वच्छ झाडं; वाऱ्याबरोबर त्यांची पानेही हालताना ती काॅम्युटरच्या हलत्या चित्रागत.

आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (कृत्रिम बुध्दीमत्ता) आज सगळीकडं बोलबाला चाल्लाय. ए.आय. हे लवकरच माणसाची सगळी कामं सुलभ करताना, माणसाची जागा घेत असल्याचं बोललं जातं. या ए.आय.नं अनेक क्षेत्रांत प्रतिसृष्टी निर्माण केली आहे.याच्या सुरस कथा, व्हिडिओ आपण पहातो.
या प्रवासात मला प्रत्येक गोष्ट ए.आय. सारखीच दिसत होती. बस वेगाने जात होती. खिडकीतून दिसणारे सारे दृश्य ए.आय. चे व्हिडिओ वाटत होते. रस्त्याच्या कडेला फूटपाथवरून जाणारी माणसंही ए.आय. प्रमाणे हातपाय हलवत होते. एका घराच्या दर्शनी भागावर शिडीवरून एक रंगारी रंग देत होता. तेही मला यंत्रवत वाटत होते. बुध्दी, कौशल्य, वेग इ.त ए.आय. ने माणसावर मात केली असून याच्या फायद्याबरोबरच तोटेही खूप आहेत. एक विचार असा पुढे येतोय की, ‘जगाचा विनाश होईल की नाही ?’ हा प्रश्न आता विचारण्यापेक्षा, ‘तो कधी होईल ?’ एवढंच आपल्या हातात आहे.
हा विचार आणि डोळ्यांना दिसणारे तसेच. थकून डोळे कधी मिटले गेले ते कळलंच नाही. जाग आली, पत्नीच्या आवाजाने, “आला स्टॉप आपला”. बसमध्ये फारशी गर्दी नव्हती. सोबत आणलेली ट्राॅली घेऊन उतरताना, सहज मागे लक्ष गेलं. एका सीटवर एक वयस्कर इंग्लिश स्त्री बसली होती. कौटुंबिक आणि इतर सामाजिक कटकटी तिच्या कपाळावरच्या आठ्यांत प्रतिबिंबित झाल्या होत्या. तिचे पांढरे केस भकास वाटत होते. निस्तेज चेहर्यावरच्या बोळक्यातून एक खिन्न हसू फुटले. मला एक वाचलेली गोष्ट आठवली. एका श्रीमंत माणसाला डाॅक्टरकडून समजतं की, त्याचं आयुष्य काही दिवसांचंच असून लवकरच तो मरणार आहे.
यावर तो उपाय शोधतो. स्वतःसारखा एक मेणाचा पुतळा बनवतो. ज्या दिवशी त्याचा मृत्यू येणार असं सांगितलेलं असतं, त्या दिवशी तो बेडवर झोपतो; जवळ मेणाचा पुतळा. त्याला न्यायला यम येतो. मात्र सारखेच दोघे पाहून क्षणभर तोही गोंधळून जातो. मात्र चाणाक्षपणे तो त्यावर उपाय शोधून काढतो. दोन्ही कमरेवर हात ठेवून, तो काळाकभिन्न यम दोन्ही पुतळ्यासमोर उभं राहून आपल्या डोळ्यांतून आग ओतू लागतो. हे पहाताच, जीवंत माणूस घाबरून भितीच्या भावना त्याच्या चेहर्यावर दिसू लागतात. ते ओळखून यम त्याला उचलून घेऊन जातो.
ए.आय. ने विकसित केलेला रोबोट हा कितीही बलशाली असला तरी इलेक्ट्रिक प्लगने त्याला चार्ज करावं लागतं. जैविक रचना आणि आनंद, दु:ख, प्रेम, वैषम्य अशा भावभावना यांचा त्यांच्यात अभाव असतो.त्या दिवशीच्या प्रवासातमध्ये मला सगळं काही ए.आय. च्या रुपात दिसलं होतं. अगदी माणसंही दुरून तशीच भासली होती. बसमधल्या त्या स्त्रीच्या चेहर्यावरच्या भावना पाहून ती ‘माणूस’आहे हे जाणवलं.
२०१६ मध्ये विकासित झालेल्या “सोफिया” रोबोटला तशा भावभावना नसतील. उद्या रोबोट कितीही शक्तिशाली झाला तरी, त्याच्याकडून संहारक आणि विनाशक कामं होत जाऊन मानवी संस्कृती आणि जनजीवन संकटात आली तर, त्यापासून मुक्तता भावभावना आणि विवेकबुद्धी असलेला माणूसच देऊ शकेल या आशावादाने मनाला उभारी आली.

— लेखन : प्रा डॉ सतीश शिरसाठ. लंडन
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
अगदी 100% खरं आहे. कारण शेवटी रोबोट मानवाचीच निर्मिती आहे. 👌👌👌👌छान लेख
सतीश शिरसाठ यांचा लेख छान