Tuesday, June 17, 2025
Homeलेख"नातीगोती" : "सुधाकर वाणी"

“नातीगोती” : “सुधाकर वाणी”

काल सहज एका मित्राशी बोलता बोलता कळलं की आपल्या गावातले, त्यांच्या कुटुंबातले मोठे भाऊ सुधाकर तांडेल अचानक हृदयविकाराच्या झटक्याने गेले.

मी आता माझ्या भारतातल्या वास्तव्यापेक्षा जास्त काळ बाहेर वास्तव्यास असल्याने गावातल्या जुन्या लोकांची नावं, चेहरे जवळपास विसरलोय. पण माझ्या बालपणीच्या आठवणी मात्र काल परवाच्या असल्यासारख्या ताज्या आहेत. जरा खोलात चौकशी केली तर तो म्हटला, अरे आपला सुधाकर वाणी रे !. आणि माझ्या डोक्यात आठवणींचा रीळ एकदम भरभर मागे फिरून कुठेतरी सैल झाल्यामुळे एका विशिष्ट ठिकाणी हलकासा झटका लागून अडकावा तसा तो तिथे अडकला.

सुधाकर वाणी, आमच्या गावातल्या जुन्या घरापासून वरच्या आळीत जाताना गल्लीत लागणाऱ्या सुधाकर किराणा स्टोर चा मालक, काश्या वाण्याच्या मुलगा. आणि गावातल्या घरातून खालच्या आळीत जाताना गल्लीत लागणारं त्याच्याच छोट्या भावाचं मनोहर किराणा स्टोर. ‘सुधाकर वाणी’, सगळे त्याच नावाने हाक मारायचे त्यांना. आमचा मात्र तो सुधाकर मामा होता. रक्ताने नातं किती जवळच ते माहीत नाही. पण सुधाकर वाणी गेला, हे समजलं तेव्हा काळजात चर्र झालं, डोळयात पाणी तरळलं ते त्याच्या साधेपणीच्या आठवणींनी. “कोवळ्या वयात पोटातल्या भुकेला खाऊ घालेल, तोच माणूस शेवटपर्यंत देव बनून राहतो” – श्री अम्याबाबा.

१९८० चा दशक, आम्ही वाशीला शहरात राहायचो. परिस्थिती तशी बेताचीच. गणपती, दिवाळी, जत्रेत, लग्नसमारंभात, उन्हाळ्याच्या सुट्टीत आमच्या करावे गावात हमखास जाणं व्हायचं. बहुतेक वेळेस आम्ही पोरं एकट्यानेच गावात जायचो. मुक्काम ठरलेला असायचा, गावातल्या जुन्या वडिलोपार्जित माडीच्या घरात, धाकट्या काकांकडे. काकांकडे मनोरंजनासाठी समवयस्क चुलत भाऊ होते, त्यांच्याबरोबर गावात, शेतात, रानात (हो, तेव्हा करावे गावात, नवी मुंबईत शेतं, रान होते) समुद्रकिनारी फिरायला जाणं व्हायचं. शिवाय गावात आणखीही चुलत काका, आत्या, मामा राहत असल्याने दिवसभराच्या मनोरंजनाची कमतरता नसायची. सकाळी लवकर उठून आंघोळी उरकून चहाची वेळ झाली की काकू हातात चार आठ आणे/रुपया देऊन वाण्याच्या दुकानातून खारी, बटर आणायला पाठवायची. मी मुद्दाम सुधाकर वाण्याच्या दुकानात जायचो. सकाळची वेळ म्हणजे त्याच्या दुकानात दूध, तेलपाणी, कांदा, लसून, डाळी, पाव, खारी, बिस्कीट वगैरे दिवसभराच्या खुल्या जिनसासाठी गर्दी असायची. मी मात्र गर्दी कमी व्हायची वाट बघत खालच्या पायरीवर संकोचून उभा राहायचो. तेव्हढ्या गर्दीतही हाफ पॅन्ट, बनियन वरचा फिरत्या जुनाट ओरिएंट फॅनच्या वाऱ्यातही घामाघूम झालेल्या सुधाकर वाण्याची नजर माझ्यावर पडताच, तो मला हलकेच प्रेमाने हसून हाक मारायचा.

आमीत, कुसुम बायचा ना रे तू ? कधी आलास ?. काय पायजे बाबु ?. मी हलकेच, “मामा रुपयाची खारी न बटर पाहिजे”. मामा- “अरे मग तू खाली कशाला उभा ?” घे काय पायजे ते. आणि तो बाकीच्या गिऱ्हाईकांना बाजूला करून मला हवं त्याच्या भराभर पुड्या बांधायला लागायचा. खारी बटर सोबत तो मला हलकेच एखादी गाठयांची (शेवेची) पुडी बांधून द्यायचा. मी लाजून नको म्हणायचो, कारण माझ्याकडे तेव्हढे पैसे नसायचे. पण मग सुधाकर वाणी, अरे मी तुझा मामा आहे, घे गप्प आणि घरी जा बोलून पुन्हा त्याच्या गिर्हाईकांमध्ये रममाण होऊन जायचा.

आम्हाला चौघा भावंडाना एक सवय वडिलोपार्जित मिळाली होती, ती म्हणजे कुणाकडून एकदम जवळचा असल्याशिवाय, अगदीच निकड असल्याशिवाय काहीही न मागण्याची आणि कुणी स्वतःहून दिलं तर दिल्यापेक्षा आणखी जास्तीचा हव्यास न करणं. आमचा हा स्वभाव आम्हाला बऱ्याच वेळा चार घरच्या पाहुण्यासारखा उपाशी राहायला भाग पाडायचा.
जसजशी दुपार व्हायला लागायची, तशी कोवळ्या पोटातली भूक सुद्धा वाढू लागायची. तोपर्यंत मी दोन चार चुलत काका, आत्यांच्या घरून फिरून आलेलो असायचो. आणि प्रत्येक ठिकाणी जेवणार का ?प्रश्नावर, नको, नंतर जेवीन बोलून निघायचो. कारण स्वभाव असा की न विचारता कोणी ताट वाढलं तरच असेल ते जेवायचं. आणि काकू जेवण बनवणार हे नक्की असायचं, ते फुकट कसं घालवायच ?. असं करता करता लक्षात यायचं की आपण सगळ्याच घरी नको बोलून बसलोय. नेमकं त्याच वेळेस काकू मुलांना शाळेच्या बस थांब्यावर आणायला, बाजारात किंवा आणखी कोणत्या कामासाठी बाहेर गेली असेल तर माझी मोठी पंचाईत व्हायची.

अश्यात फक्त सुधाकर वाणी आणि आमची गावातली मोठी आत्या हे दोनच पर्याय उरायचे. मग मी सुधाकर वाण्याच्या दुकानाकडे मोर्चा वळवायचो. कारण तो पर्याय अंतराने जवळचा आणि हमखास असायचा. दुपारच्या वेळेस त्याच्या दुकानात गर्दी कमी असायची.
तो त्याच्या कामात मग्न असायचा, मग मी हलकेच हाक मारायचो, ‘मामा’ आणि पुढे जाण्याचं नाटक करायचो. तेव्हढ्यात मामा ओरडायचा, “आमीत एव्हढ्या उन्हात कुठे चाललास ?.

मी -खालच्या वलीत चाललोय मामा, अरविंद मामांकडे.
मामा- इथे ये जरा,जेवलास बाबू ?.
मी- नाय मामा, अजून नाय, वेळ आहे.
माझ्या उत्तराआधीच मामाने माझ्या डोळ्यात माझी भूक वाचलेली असायची, बोलता बोलता त्याने एक शेवेची आणि एक चण्याची पुडी बांधलेली असायची. तो त्या पुड्या माझ्या हातात देण्यासाठी हात पुढे करायचा. मी संकोचून, लाजून हलकेच  “मामा नको” म्हणायचो. पण पोटातली भूक मात्र मला तिथेच रेंगाळून ठेवायची. खरं तर सुधाकर वाण्याच्या दुकानाच्या उजव्या बाजूला विनायक म्हात्रें च्या घरासमोर चव्हाट्या देव आणि डाव्या बाजूला देवीचं छोटेखानी देऊळ होतं. पण माझ्यातल्या कोवळ्या जीवाला मात्र सुधाकर वाणीच देव वाटायचा तो त्याच्या सरळ, साध्या, प्रेमळ, उदार स्वभावामुळे.

माझ्या एव्हढ्या वर्षांच्या देशोदेशीच्या स्थलांतरणात मी गावापासून, जुन्या लोकांपासून त्यांच्या सहवासापासून दूर आलो पण त्यांचं प्रेम, आठवणी मात्र मी कायम जपल्यात. सुधाकर वाणी (मामा) आणि त्याच्या प्रेमळ आठवणींना उजाळा देण्याचा हा माझा तोकडा प्रयत्न.
(ता. क.- सुधाकर वाणी किव्वा मामाचा मी एकेरी उल्लेख केलाय, कारण आमच्या आगरी संस्कृतीत नात्यातल्या औपचारिकतेपेक्षा त्यातल्या घट्ट प्रेमाला जवळीकतेला जास्त महत्व दिले जाते)

अमित भोईर

– लेखन : अमित भोईर. कॅनडा
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️+919869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

उज्ज्वला केळकर on पाऊस : काही कविता…
उज्ज्वला केळकर on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on कथा
सौ. सुनीता फडणीस on विमान “अपघात” की “घातपात” ?
सौ. सुनीता फडणीस on हे असं कां होतं ?