वैद्यकीय उत्कृष्टता, मानवतावादी भावना आणि लोकसेवेसाठी अढळ समर्पण यांचे मिश्रण असलेल्या नागपूर येथील डॉक्टर विलास डांगरे यांच्या षष्ठ्यब्दीपूर्तीनिमित्त आयोजित सत्कार समारंभात सरसंघचालक डॉ. भागवत म्हणाले की, “मनुष्यत्व, मुमुक्षत्व आणि महापुरुषांचे सान्निध्य केवळ परमेश्वर कृपेनेच साध्य होते. डॉ. विलास डांगरे हे असेच अलौकिकत्व प्राप्त केलेले व्यक्ती आहेत. त्यांचे सान्निध्य आपल्याला मिळाले ही परमेश्वराची कृपाच आहे. त्यांच्याकडे अलौकिक शक्ती असली तरीही त्यांनी माणसांना जवळ केले.”
याच समारंभात बोलतांना केंद्रीय भूपृष्ठ परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, “डॉ. विलासजी डांगरे यांना मी त्यांच्या प्रॅक्टिसच्या पहिल्या दिवसापासून ओळखतो. त्यांनी डॉ. भोयर यांच्याकडून होमिओपॅथीचे शिक्षण प्राप्त केले आणि नंतर जेव्हा प्रॅक्टिस सुरू करायची वेळ आली तेव्हा त्यांनी असे सांगितले की, मी अशाच ठिकाणी प्रॅक्टिस सुरू करीन की जिथे मला कोणीही ओळखत नाही आणि त्याप्रमाणे त्यांनी घरापासून दूर असलेल्या तात्या टोपे हॉल जवळ प्रॅक्टिस सुरू केली आणि तीही अतिशय प्रतिकूल परिस्थितीत. एका छोट्याशा मध्यमवर्गीय घरातील एका छोट्या खोलीमध्ये त्यांनी प्रॅक्टिस सुरू केली आणि त्यामध्ये ते इतके यशस्वी झाले, लोकांचा विश्वास जिंकला की त्यांच्या हॉस्पिटलमध्ये लोकांची कायम रांग लागलेली असते उपचारासाठी”. ते पुढे म्हणाले की, “डॉक्टर जी होमिओपॅथी औषधे देत होते त्याचा परिणाम उत्तम होत होता. होमिओपॅथी औषधांमध्ये प्रचंड ताकद आहे असाध्य रोग बरे करण्याची. हजारो लोक डॉक्टर विलासजी यांच्याकडून औषधे नियमितपणे औषधे घेतात. लता मंगेशकर, बाळासाहेब ठाकरे अशा महनीय व्यक्तींना उपचार करण्यासाठी मी डॉ. ना त्यांच्याकडे घेऊन गेलो. तेही सातत्याने त्यांची औषधे घेत होते.”
असे हे समाजसेवी डॉ विलास गजानन डांगरे यांचा जन्म ४ नोव्हेंबर १९५४ रोजी अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार येथे झाला. बालपणापासूनच त्यांचा ओढा समाजसेवा आणि अध्यात्माकडे होता. सातव्या वर्षीच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सामील झाले. तिथे त्यांनी गोळवलकर गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली सेवा आणि शिस्तीचे मूल्य आत्मसात केले. किशोरावस्थेत रामकृष्ण मठाशी असलेल्या त्यांच्या सहवासामुळे त्यांच्या आध्यात्मिक आणि सामाजिक दृष्टिकोनाला आणखी आकार मिळाला.त्यांनी १९७५ मध्ये मुंबईतील होमिओपॅथी आणि बायोकेमिक बोर्ड मधून डीएचबी पदवी संपादन करून आपल्या रुग्णसेवेला प्रारंभ केला. त्यांचे मेहुणे, आरएसएसचे कट्टर स्वयंसेवक डॉ. प्रभाकर भोयर स्वतः एक उत्कृष्ट होमिओपॅथ होते आणि अयाचित मंदिराजवळ एक क्लिनिक चालवत होते.
डॉ. डांगरे यांनी डॉ.भोयर यांच्या क्लिनिकमध्ये त्यांच्या मार्गदशनाखाली प्रॅक्टिस सुरु केली. देशातील १९७६ मध्ये आणीबाणीच्या काळात डॉ. प्रभाकर भोयर यांना तत्कालीन सरकारने तुरुंगात टाकले. त्यावेळी डॉ.डांगरे यांनी त्यांचे क्लिनिक सुरु ठेवले आणि त्यानंतर स्वतःचे क्लिनिक सुरु करायचे ठरविले.
अत्यंत शिस्तबद्ध आणि समर्पित जीवन जगणारे डॉक्टर म्हणून डॉ. डांगरे यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने माजी विद्यार्थी म्हणून अभिमानाने गौरविले.
७० वर्षीय मानवतावादी होमिओपॅथ डॉ. डांगरे त्यांच्या नाडी परीक्षेसाठी प्रसिद्ध आहेत. त्यायोगे रोगाचे झटकन अनुमान लावून त्यानुसार उपचार करतात. डॉ. डांगरे यांनी नागपूरमधील त्यांच्या डॉ. विलास डांगरे होमिओपॅथी क्लिनिकमध्ये आर्थिकदृष्ट्या कमकुवत रुग्णांवर उपचार करण्यासाठी ५० वर्षांहून अधिक काळ समर्पित केला आहे. त्वचा आणि मानसिक आजारांवरही उपचार करीत त्यांनी आजवर १ लाखांहून अधिक रुग्णांवर नाममात्र खर्चात उपचार केले आहेत. पैसे नाहीत म्हणून त्यांच्या क्लिनिकमधून आजवर कोणीही उपचाराविना परत गेलेले नाही.पहिल्या दिवसापासून त्यांनी कधीही आपला व्यवसाय पैसे कमविण्याशी जोडला नाही आणि विलासिता सोडून साधे जीवन जगले. रुग्णांना बरे करणे हाच आनंद त्यामुळेच कुटुंबांच्या पिढ्यानपिढ्या त्यांच्याकडे निदान आणि उपचारांसाठी येतात आणि एकदा त्यांना औषध मिळाले की ते आनंदी आणि निरोगी जीवन जगतात.
डॉ. डांगरे यांच्याशी प्रत्येक रुग्णाचे वैयक्तिक नाते निर्माण होते. त्यांच्या क्लिनिकचे रिव्ह्यू वाचलेत तर लक्षांत येते की, दादा, मामा, काका, भाऊ अशा नात्यांनी सुरुवात करीत भरभरून लिहिले गेले आहे. ते वाचतानांही लक्षांत येते की ही कोणती जाहिरात नाही तर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हृदयापासून लिहिले गेलेले आहे. एकीकडे रुग्णसेवा करीत असतांना त्यांनी नवख्या डॉक्टरांना मोलाचे मार्गदर्शन करीत उत्तम डॉक्टर घडविण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे, आजही देत आहेत.
डॉ. डांगरे यांनी शिवसेनेचे जनक, प्रमुख बाळासाहेब ठाकरे, भारतरत्न लता मंगेशकर, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, भारताच्या पूर्व परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांसारख्या दिग्गजांवर उपचार केले आहेत.
भाजपचे दिग्गज नेते लालकृष्ण अडवाणी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी खासदार विलास मुत्तेमवार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक सरसंघचालक आणि इतर अनेक दिग्गज त्यांच्याकडून औषधोपचार घेत आहेत.
विशेषतः डॉ. डांगरे यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उपचार करून इतिहासात आपले स्थान कोरले. नागपूरमधील कस्तुरचंद पार्क येथे झालेल्या सभेनंतर पंतप्रधान मोदींच्या आवाजावर परिणाम झाला. त्यांना बोलण्यास त्रास होऊ लागला. पुढे ब्रह्मपुरी येथे होणाऱ्या सभेला ते संबोधित करू शकतील की नाही ? अशी शंका निर्माण झाली. डॉ. डांगरे यांचे होमिओपॅथिक उपचार एक चमत्कार ठरला. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या आश्वासनानंतर, मोदींनी औषध घेतले आणि त्यांचा आवाज जवळजवळ लगेचच पूर्ववत झाला. यामुळे प्रभावित झालेल्या पंतप्रधानांनी नंतर तेच औषध नवी दिल्लीला पाठविण्याची विनंती केली.

मात्र कोणत्याही गोष्टीने हुरळून जाण्याचा स्वभाव नसलेल्या या कर्मयोग्याचे क्लिनिक सर्वांसाठी खुले असून अत्यंत गरिबालाही उपचार मिळतात, पैसा असो वा नसो, तेही अविरत गेली ५० वर्षे ! तसेच त्यांनी त्यांच्या कमाईचा बराचसा भाग सामाजिक कार्यासाठी दान केला आहे.
डॉ. डांगरे यांना सेरेब्रल इन्फेक्शन झाल्यामुळे २०१४ मधील काही महिने वगळता क्लिनिक कधीच बंद झाले नाही. त्याचवर्षी त्यांनी दृष्टी गमावली. हे फारच मोठे संकट ! कोसळलेल्या आपत्तीतून बाहेर येण्यासाठी परिवारातील सर्वांनीच खूप प्रयत्न केले परंतु ते सर्व विफल होत असतांनाही सकारात्मक वृत्ती ठेवून या सर्व परिस्थितीमध्ये निराश न होता, त्यांच्या कामावरील श्रद्धा आणि आत्मविश्वास कमी होऊ दिला नाही आणि त्यानंतरही ते आजमितीपर्यंत रुग्णसेवा करीत आहेत. देवदूतच !

डॉ डोंगरे यांच्या या योगदानाचा गौरव भारत सरकारने त्यांना २०२५ मध्ये पदमश्री हा पुरस्कार देऊन केला. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना हे महान पण विनम्र कर्मयोगी म्हणतात, “अध्यात्म आणि सामाजिक मूल्ये लहानपणापासूनच माझ्यात रुजली आहेत. माझे जीवन हे सर्वशक्तिमान देवाकडून मिळालेली देणगी आहे. मी बक्षिसाची अपेक्षा न करता मानवतेची सेवा करण्यावर दृढ विश्वास ठेवतो. राजकारणात मला आकर्षित करण्याचे अनेक प्रयत्न होऊनही, मी जाणीवपूर्वक दूर राहण्याचा निर्णय घेतला, केवळ रुग्णांना बरे करणे आणि सेवा करणे या माझ्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले आहे. मी अपघात आणि गंभीर आरोग्य समस्येपासून देवाच्या कृपेने वाचलेले, एक बोनस जीवन जगत आहे. मी शक्य तितके सेवा करत राहीन आणि एक मात्र खरे की या पुरस्कारामुळे अधिक काम करण्यास प्रोत्साहन मिळेल.”

डॉ डोंगरे यांनी अनेक वर्षे आरएसएसमध्ये जबाबदाऱ्या सांभाळल्या. सध्या ते ‘तरुण भारत’ हे वृत्तपत्र चालवणाऱ्या श्री नरकेसरी प्रकाशनाचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक कार्य असो, कौटुंबिक कर्तव्य असो किंवा संघटनात्मक जबाबदाऱ्या असोत, ते कधीही कोणत्याही कामात मागे सरत नाहीत.
त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांच्या सर्व रुग्णांना अपरिमित आनंद झालाच, तसेच त्यांचे चांदूर बाजार, नागपूर शहर…. सारेच आनंदाने मोहरले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडवणीस यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या सत्कार केला. तसेच ठिकठिकाणी त्यांचे अनेक सत्कार सोहळे झाले.

नुकताच एक खास असा समारंभ, रविवार, दिनांक ८ जून २०२५ रोजी, संध्याकाळी मोहता सन्मित्र परिवार, १९६९ – ७० च्या बॅचने अंध विद्यालय नागपूर येथे उत्साहात साजरा केला. आपल्या मित्राला मोठा सन्मान मिळाल्याचा आनंद सर्वांच्या बोलण्यातून, वागण्यातून व चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता.
डॉक्टर विलास डांगरे : केवळ पंचक्रोशीतच नव्हे तर संपूर्ण भारतभर त्यांचे रुग्ण व चाहते पसरलेले. एक वर्षभर ते या मित्रांसोबत सायन्स कॉलेजमध्ये होते की ज्या आठवणींचा सुगंध आजही सर्वांच्या आयुष्यात दरवळत आहे. ज्येष्ठ कवी श्री अनिल शेंडे यांनी लिहिलेले मानपत्र व डॉक्टर सुधीर मंगरूळकर यांच्या सहाय्याने तयार केलेले मानचिन्ह, शाल व श्रीफळ त्यांना प्रेमाने देण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून कौटुंबिक न्यायालयाच्या ज्येष्ठ न्यायमूर्ती माननीय मीराताई कंडक्टर उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर गणेश पुरी जयस्वाल उपस्थित होते. पद्मश्री मिळाल्यानंतरही जणू काही झालेच नाही अशाच पद्धतीचे डॉक्टर विलास डांगरे यांचे वागणे होते. सर्वांशी ते मिळून मिसळून हसत खेळत बोलत होते. आपल्या यशाचे श्रेया त्यांनी त्यांची आई, रामकृष्ण मिशन वा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दिले.

श्री बाळासाहेब देवरस यांच्या प्रेरित करणाऱ्या आठवणी डॉक्टर साहेबांनी सांगितल्या. आपला जीवन प्रवास उलगडताना आणीबाणीत लोकांकडून पैसे जमा करून तुरुंगात गेलेल्या लोकांच्या कुटुंबियांना कशी मदत केली ते सांगितले. रुग्णसेवेच्या बाबतीत शिवाने जीवाला केलेली मदत, ही तर ईश्वर इच्छा; धर्म, कर्म व देश यासाठीच सारे काही.. अशा भावना व्यक्त केल्या. सर्वांची नावे घेत अधूनमधून अनेक कवितेच्या ओळी व शेर उधृत करत, ऐकतच रहावे असे सुंदर भाषण डॉक्टर विलास डांगरे यांनी केले. आपली पद्मश्री त्यांनी जनताजनार्दनाला समर्पित केली.
‘झाले बहु, होतील बहु, परंतु या समची हा’ या ओळी डॉक्टर साहेबांना तंतोतंत लागू होतात. श्री अनिल शेंडे यांनी मित्र प्रेमाची महती सांगणारे प्रास्ताविक केले. प्रा. विठ्ठल डंभारे यांनी कार्यक्रमाचे अतिशय सुंदर, समर्पक संचालन केले. माजी एसीपी श्री विनोद येसकडे यांनी डॉक्टर विलास डांगरे यांचा परिचय करून देताना अनेक आठवणी सांगितल्या. त्यात डॉक्टर गुप्ता यांनी भर घातली. आपले मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ न्यायमूर्ती मीराताई कंडक्टर भावविभोर झाल्या. डॉक्टर साहेबांना त्यांनी मनापासून आशीर्वाद दिले व कार्यक्रमाची प्रशंसा केली. श्रीधर चव्हाण, प्रदीप सराफ, श्रीधर लुटे, साधना बनसोड, चित्रा जोशी व अनेक मित्रांनी आयोजक श्री. अनिल शेंडे यांना मनापासून मदत केली. डॉक्टर सुधीर मंगरुळकर यांनी आभार व्यक्त केले. यानिमित्ताने अनेक उच्चपदस्थ, चांगल्या विचारांची मंडळी एकत्र आली होती.
वाचकहो, श्री रामकृष्ण परमहंस, माँ शारदा देवी आणि स्वामी विवेकानंद यांच्या जीवनाने प्रेरित होऊन, डॉ. डांगरे यांनी त्यांच्या मूल्यांना स्वतःच्या जीवनात आणण्याचा प्रयत्न केला. देश, समाज आणि रुग्णांची सेवा करण्याच्या त्यांच्या श्रद्धा आणि समर्पित भाव यामुळे त्यांना ब्रह्मचर्य जीवन निवडण्यास प्रवृत्त केले. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हा मंत्र जगणारे हे आजच्या काळातील ऋषिवर्य आहेत असेच मला वाटते.
प्रणाम ऋषिवर्य !!

— स्रोत : आंतरजाल.
— लेखन : नीला बर्वे. सिंगापूर.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800