अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे १४ फेब्रुवारी १९४२ रोजी जन्म झालेले शंकरबाबा एकेकाळी रस्त्याच्या कडेला टेबल ठेवत त्यावर लोकांच्या कपड्यांना इस्त्री करण्याचे काम करायचे. हे काम करता करताच ते कविता गुणगुणायचे. सुरेश भटांची गझल आणि मीरेपासून गालिब पर्यंतचे सगळे गझलनवाज त्यांना मुखोद्गत आहेत. कविता-शेर म्हणता म्हणता ते दारिद्य्र, कष्ट आणि घाम अशा सार्या अनुभवांवर लिहू लागले. पुढे ‘देवकीनंदन गोपाला’ या नावाचे साप्ताहिक काढले. त्याचे ते संपादक झाले. त्यांच्या नियतकालिकावर गाडगेबाबांच्या विचारांचा प्रभाव होता.
बेवारस मृतदेहाची ओळख पटू न शकल्यास संबंधित महापालिका किंवा स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने पोलीस अंतिम संस्कार करतात. एकदा एका हॉस्पिटलमध्ये बेवारस प्रेत होतं. त्याला कुणी घ्यायला तयार नव्हतं. ही घटना शंकरबाबा पापळकर यांनी पाहिली. ती त्यांच्या मनात खोलवर रुतली आणि त्यांनी अनाथांसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. आजच्या घडीला डॉ. शंकरबाबा पुंडलिकराव पापळकर हे एक असे व्यक्तिमत्व आहे ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजातील दिव्यांग आणि निराधार मुलांसाठी समर्पित केले आहे. त्यांच्या कार्याचा उचित गौरव भारत सरकारने त्यांना २०२४ मध्ये पद्मश्री पुरस्कार प्रदान करून केला.
अनेक अनाथ मुले आहेत. त्यांच्यासाठी आश्रम आहेत पण अनाथ, दिव्यांग, निराधार मुलांची जबाबदारी घ्यायला कोणी पुढे येत नाही ही परिस्थिती त्यांच्या लक्षांत येऊन त्यांनी याच मुलांसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. १९९० मध्ये, त्यांना अमरावती जिल्ह्यातील परतवाडा- चिखलदरा रोडवर वझ्झर फाटा येथे २५ एकर पडीक जमीन मिळाली. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांनी त्यांना या ठिकाणी आश्रम उभारण्यास मदत केली, असे ते आवर्जून सांगतात. त्यांनी या ओसाड जमिनीवर दिव्यांग आणि निराधार मुलांसाठी स्वर्गीय अनाथाश्रम सुरू केला आणि या नंदनवनाचे नांव ठेवले, “स्व. अंबासपंत वैद्य अंध, अपंग, मतिमंद, बेवारस मुलांचा आश्रम”.
सुरुवातीला या आश्रमात फक्त चार अपंग मुली होत्या ज्यांना देशाच्या विविध भागातून आणून त्यांच्याकडे सोपवण्यात आले. त्यांनी या मुलींना आश्रमात स्वीकारले आणि तेव्हापासून समाजकल्याणाचे हे अलौकिक कार्य सुरू झाले. १९९१ साली नाशिकच्या कुंभमेळ्यामध्ये त्यांना एक मुलगी सापडली. त्यांनी तिला आश्रमात आणले. गोरीपान होती, म्हणून कांती असे नांव ठेवले. पुढे धनंजय डोळसकर या तरुणाशी अकोल्यात कांतीचे लग्न करून दिले.
अशीच एक दुसरी घटना आहे शैलजा या मूकबधिर मुलीची. खरे तर आई-वडिलांनी तिला फेकून दिले. भंडार्यातील एका नालीत ती पडून होती. बाबांनी तिला आश्रमात आणले. कु. शैलजा शंकर पापळकर हे नाव दिले. आज शैलजा विद्यालयात नोकरीला आहे. तिचेही लग्न लावून दिले.
एसटी स्टॅंड, रुग्णालय, मुंबईच्या रेल्वे फलाटावर, अकोल्याच्या स्टेशनलगतच्या नाल्यात किंवा कचरापेटीत फेकून दिलेली अशी येथील मुले आहेत. काही तर चक्क सरकारनेच स्वत: होऊन त्यांच्याकडे पाठवली आहेत. कोठेही जर कुणी ‘बेवारस’ बालक सापडलं तर त्या बालकाचं एक हक्काचं घर आहे ही जाणीव त्यांच्यामुळे देशभरात रूजली आणि अशा मुलांना आश्रमांत प्रवेश देऊन हक्काचे घर त्यांनी दिले. स्वतःच्या सर्वसाधारण मुलांना सांभाळतांना पालक जेरीला येतात. कधी कधी त्यांच्या लीलांनी वैतागतातही आणि येथे एक नाही, दोन नाही तब्बल १२३ मुले आजमितीस बाबाच्या आश्रमात आहेत. त्यात, पोलिओग्रस्त, मूकबधिर, दृष्टीहीन, अपंग अशी सारी आहेत. ती सर्व बेवारस आहेत. या सर्वांना बाबानी स्वतःचे नांव दिले. प्रत्येक मूल आपल्या नावापुढे शंकरबाबा पापळकर असे नांव लावते. बाबांनी त्यांची आधारकार्डेही बनविली आहेत. या आधारामुळे मुलांची मानसिकता बदलली.
बाबांनी एक नूतन प्रोजेक्टच बनविला आणि नांव दिले, वझ्झर मॉडेल! आश्रम वझ्झर गांवातील म्हणून वझ्झर मॉडेल! यांत ही दिव्यांग मुले एकमेकांना मदत करतात. एकमेकांची काळजी घेतात आणि स्वतंत्रपणे जगायला शिकतात. मूकबधिर असणाऱ्या मोठ्या मुली या आश्रमातील सर्व मुला -मुलींसाठी स्वयंपाक बनवतात. चूल पेटवणं, गॅस शेगडी सुरू करणं हे सारं काही त्या स्वतः करतात. एक मूकबधिर युवती सर्व भाजीपाला चिरून देते हे तिचे नित्याच आणि आवडीच काम. दोघी-तिघी मतिमंद आणि मूकबधिर असणाऱ्या मुलींना सर्वांचे ताट वाटी धुणे, लहान मुलांना अंघोळ घालणे इ. कामे करतात. दोन मतिमंद मुली या एकमेकीं शिवाय जेवणच करत नाहीत. लहान मुलांना भरविण्याचे काम काही मुले करतात.
येथे असणाऱ्या १६ मतिमंद मुलांना फिटचा गंभीर आजार आहे. फीट आल्यामुळं काय त्रास होतो याची जाणीव या मतिमंद मुलांनादेखील झाली आहे. यामुळं ते स्वतःच फीट येऊ नये यासाठी त्यांना दिलेले औषध गोळ्या नित्यनेमानं घेतात. या पडीक जमिनीत झाडे लावून त्याला पाणी घालणे या मुलांना शिकविले. किती झाडे असतील आज इथे असे तुम्हांला वाटते ? अहो, तब्बल १५ हजार झाडे बाबांनी या मुलांना शिकवून रुजविली आणि वाढविली. आपण तिथे एकदा तरी भेट द्याच, तेही आपल्या मुलांना घेऊन आणि बघा एका पडीक जमिनीचा दिव्यांग मुलांनी केलेला कायापालट ! आलेले अनेकजण हे कार्य पाहून भारावून जातात.थोड्या मोठ्या मुली सर्वांसाठी जेवण बनवितात.
सुरुवातीपासूनच या मुलांचे पुनर्वसन हे ध्येय होते आणि त्याप्रमाणे या मुलांना स्वावलंबी बनवून आत्तापर्यंत त्यांच्या २१ मुली आणि ३ मुलांचे लग्न जनतेच्या सहभागाने मोठ्या उत्साहाने झाले आहे. “मला १२३ मुले आहेतच पण आता ३० नातवंडे असून ती नॉर्मल आहेत, समाजातील इतर मुलांप्रमाणे, हेच पुनर्वसन”, हे सांगतांना बाबांचे डोळे आनंदाने चमकतात. १२ मुलांना वेगवेगळ्या सरकारी नोकऱ्या मिळाल्या आहेत. आश्रमातील सर्व मुले पंतप्रधान जनधन योजनेचे लाभार्थी आहेत. रेल्वे बोर्डाने नुकत्याच घेतलेल्या परीक्षेत १८ वा प्रश्न त्यांच्यावर पुढीप्रमाणे होता…. डॉ. शंकरबाबा पुंडलिकराव पापळकर हे लोकांचे जीवन सुधारण्यासाठी ते त्यांच्या—- समर्पणासाठी ओळखले जातात.
या प्रश्नाच्या उत्तरात, बहुपर्यायी पद्धतीने चार पर्याय देण्यात आले: अ – अपंग आणि निराधार मुले,
ब – शिक्षण घेणारे,
क – शेतकरी आणि
ड – ज्येष्ठ नागरिक.
अर्थात, पहिला पर्याय योग्य उत्तर होता.
रेल्वे बोर्डाने घेतलेल्या परीक्षेत स्वतःबद्दल विचारलेल्या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना पद्मश्री डॉ. शंकरबाबा पापळकर यांनी याबद्दल आनंद व्यक्त केला आणि सांगितले की, या माध्यमातून रेल्वे बोर्डाने वझ्झर आश्रमाचा आणि आश्रमात राहणाऱ्या अपंग मुलांचा सन्मान केला आहे.
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने शंकरबाबा यांना मानद डी.लिट. पदवी देऊन त्यांचा सन्मान केला आहे. सर्वच पत्रकारांनी आपले कार्य जनमानसापर्यंत पोहोचविले, असे बाबा आवर्जून सांगतात. ८१ वर्षाचे बाबा खरोखर साध्यासुध्या व्यक्तिमत्त्वाचे. त्यांना ध्यास आहे तो अठरा वर्षानंतर अनाथ मुलांना अनाथालयातून बाहेर जाणे भाग पडते आणि मग अशी मुले कुठे गेली, काय करतात हे कोणीच बघत नाही. यासाठी सरकारने कायदा करणे आवश्यक आहे की, अठरा वर्षांनंतरसुद्धा त्यांना उपजीविकेचे साधन मिळेपर्यंत आश्रमातच किंवा संस्थेतच रहायला मिळावे. गेली कित्येक वर्षे ते याचा पाठपुरावा करीत आहेत. २०२४ मध्ये त्यांना गृह मंत्रालयातून फोन आला की यावर्षी तरी पद्मश्री पुरस्कार स्वीकारणार का ? कामाच्या ध्यासासाठी त्यांनी ३ वर्षे हा पुरस्कार नाकारला होता यातच त्यांची महनीयता सिद्ध होते आणि हे कोणाला माहितही नाही. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आपली मागणी मान्य करून असा कायदा करतील असा विश्वास व्यक्त करून त्यांनी २०२४ मध्ये पद्मश्री पुरस्कार स्वीकारण्यास अनुमती दिली आणि पुरस्कार घेतल्यावर मोदीजींची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना हा कायदा करण्यासाठी विनंती करण्याचा मनसुबा जाहीर केला. अजूनही हा कायदा झाला नाही आणि त्यांची सर्व जनतेला विनंती आहे की त्यांनीही आपल्याला याविषयी पाठिंबा देऊन सरकारदरबारी याचा पाठपुरावा करावा.
‘आईना देखा तो क्या कमाल किया खुद बनो आईना की दुनिया चेहरा देखे’. अशा आशयाची पाटी शंकरबाबा पापडकर यांच्या आश्रमात लागली आहे.त्यांचे म्हणणे, “आपण काहीतरी बोलू आगळं-वेगळं करावं जेणेकरून जग आपल्याकडं पाहताना जगाला आपण आरशात पाहिल्यासारखं वाटावं आणि त्यांनी देखील प्रेरणा घ्यावी असं शंकरबाबा पापळकर सांगतात. त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर होताच अमरावती जिल्ह्यासह राज्यभरातून त्यांना शुभेच्छांचे संदेश आले. त्यांना शुभेच्छा देणारे फलक अचलपूर-परतवाडा या जुळ्या गावांसह मेळघाटच्या पायथ्याशी असणाऱ्या सर्वच गावांमध्ये झळकत होते कित्येक दिवस! “एकाच दिवशी मला आठ हजार लोक भेटायला आले. मी तर लोकांना भेटून थकून गेलो, आजारीच पडलो”.. कधी न थकणारे बाबा सांगतात
दिव्यांग म्हणून जन्माला येऊन दुर्दैव तिथेच न थांबता बेवारस म्हणून शिक्का मिळणं आणि कुठेतरी रस्त्यावर पडणं, अशा मुलांना हक्काचे घर मिळाले, पितृछाया मिळाली आणि त्या छायेमध्ये मुलांना आनंदाने जगताना पाहिले की आपण बाबांसमोर नतमस्तक होतो. ८१ वर्षाचे बाबा पण उत्साह १८ वर्षाच्या तरुणाचाच. आपल्या देहाच्या शेवटच्या अंशावरदेखील आपल्या याच मुलांचा अधिकार राहील, असे त्यांनी लिहून ठेवले आहे.
आपल्याला ते शेर सुनावितात,
“आग लग गई घरमें
तो बचा क्या है
बच गया मैं तो
जल ही क्या गया है
अपने कोशिशका मतलब है मुकद्दर अपना
वरना हाथों की लकीरोमें लिखा ही क्या है ?”
अनाथांचे नाथ, दिव्यांग मुलांचे आधारवड आहेत शंकरबाबा पापळकर !
वाचकहो, १४ फेब्रुवारीला जन्म झालेले शंकरबाबा आयुष्यभर प्रेम वाटत व्हॅलेंटाईन डे साजरा करीत आहेत आणि असे प्रेम की मला वाटते यापुढे १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे न म्हणता शंकरबाबा दिन म्हणावे. तुम्हांला काय वाटते ?
— लेखन : नीला बर्वे. सिंगापूर
— स्रोत : आंतरजाल.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
दिव्यत्वाची जिथं प्रचिती तेथे कर माझे जुळती
डॉक्टर शंकर बाबा पापळकर यांच्या विषयी मला काहीच माहिती नव्हती पण निला बर्वे यांनी आपल्या ओघवत्या मराठी भाषेत त्यांच्याविषयी भरपूर माहिती ह्या लेखातून मला वाचायला पाठवली आहे त्यांनी यासाठी बरीच मेहनत घेऊन माहिती गोळा करून हा लेख दिला आहे त्याबद्दल त्यांचे कौतुकच खरोखर डॉक्टर शंकर बाबा हे महानच होते समाजातील अनाथ अपंग मतिमंद मुलांचा सांभाळ करून अनाथाश्रमत त्यांना निवारा देऊन त्यांचे पालन पोषण केले एवढेच नव्हे तर पालक म्हणून आपले नावही त्यांना लावले गाडगे महाराज विद्यापीठाने त्यांना याबद्दल डिलीट पदवी दिली आहे अशा व्यक्तीला पद्मश्री पुरस्कार मिळाला हे वाचूनही खूप बरे वाटले असा हा खूप माहितीपूर्ण लेख लीहून मला बर्वे यांनी दिला याबद्दल त्यांचे कौतुक आणि त्यांना धन्यवाद🙏🙏🙏
सन्माननीय पद्मश्री शंकरबाबा पापळकर ह्यांच्या कार्याला सलाम! अपंग, मतिमंद मुलांसाठी आश्रम चालवून त्यांना जीवनदान देण्याचे पुण्यकर्म करणारा हा थोर पुरुष नक्कीच ईश्वरी अवतार असणार, कारण “जगी ज्यास कोणी नाही, त्यास देव आहे!” …. तोच देव शंकरबाबांच्या रुपाने समाजात वावरत आहे.त्यांचे कार्य खरोखरच अभिमानास्पद आहे. १८ वर्षांवरील स्वतःची उपजीविका करण्यास सक्षम झाली नसल्यास त्यांना आश्रमात राहू द्यावे, ही शंकरबाबांची रास्त मागणी शासनमान्य व्हावी, हीच अपेक्षा आहे. कारण पालकांनी आपल्या मुलांना मरण्यासाठीच रस्त्यावर आणून सोडले होते, त्या मुलांना आश्रमात आणून त्यांचे रक्षण, पालनपोषण केल्यावर आता वयाच्या १८ व्या वर्षी स्वतःच्या पायावर उभे राहू शकत नाही म्हणून पुन्हा रस्त्यावर नेऊन सोडण्याइतके क्रूरकर्म कोणतेच नाही! अशा मुलांच्या पुनर्वसनाची सोय शासनाने केली नसेल, तर त्यांना आश्रमात राहू देणे हाच माणुसकीचा धर्म आहे. म्हणूनच शंकरबाबांच्या ह्या मागणीचा पाठपुरावा करून त्याला शासनमान्यता मिळवून देण्यासाठी मिडियाने जनजागृती व इतर सहकार्य करायला हवे.
सन्माननीय पद्मश्री शंकरबाबा ह्यांना विनम्र अभिवादन आणि ह्या लेखाच्या लेखिका नीला बर्वे ह्यांचे हार्दिक अभिनंदन 🙏💐
शंकरबाबा खरे हिरो.