ज्योतीष क्षेत्रातले पितामह, महाराष्ट्र ज्योतीष परिषदेचे अनेक वर्षे अध्यक्ष राहिलेले ज्येष्ठ ज्योतिर्विद श्रीकृष्ण श्रीपाद भट उर्फ श्री. श्री. भट यांचे दिनांक 25 जुलै 2020 रोजी सायंकाळी डोंबिवली येथे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 87 वर्षांचे होते.
श्री श्री भट यांनी 1994 पासून धनुर्धारी मासिकासाठी ज्योतीष लेखन केले होते. विशेषत: धनुर्धारी दिवाळी अंकासाठी त्यांनी लिहिलेल्या वार्षिक भविष्याचा मोठा चाहतावर्ग होता. महाराष्ट्रात मुंबई, नाशिक, पुणे,अमरावती,औरंगाबाद, सातारा, सोलापूर या ठिकाणी आयोजित झालेल्या ज्योतीष अधिवेशनाचे प्रमुख कार्यवाह म्हणून त्यांनी यशस्वीपणे धुरा सांभाळली होती.
नागपूरच्या 1997 साली झालेल्या ज्योतीष संमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष होते.महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ज्योतीष संस्था स्थापन करण्यास त्यांनी चालना दिली. राज्यातल्या अनेक जिल्ह्यात दौरे करून ज्योतीष शास्राचा त्यांनी प्रचार व प्रसार केला. 2002 साली प्रकाशित झालेले “वैदिक कालविधान शास्र” हे त्यांचे ज्योतीष क्षेत्रातील एका वेगळ्या पैलूवर प्रकाश टाकणारे पुस्तक होते. ज्योतीष सोबती (1977-2004 या काळात 7 आवृत्त्या) ज्योतिषाच्या गाभाऱ्यात (1992) ज्योतीष थोतांड नव्हे, शास्रच(1993), भाग्याचे दीपस्तंभ(1997), सर्व सुखाचे आगारू (1997), श्रीचिंतन (भाग 1व2) ही त्यांची ज्योतीष विचारसरणीची पुस्तके खूप गाजली. ज्योतीष क्षेत्रात एक स्वतंत्र विचार मांडणारे “चिंतनशील ज्योतीषी” म्हणून त्यांची ओळख आहे. ज्योतीष नियतकालिकात 250हून अधिक लेख त्यांनी लिहिले होते. तसेच मराठीच्या आघाडीच्या दैनिकात त्यांचे लेख प्रसिध्द झाले होते.
1995 साली माझ्या राशीचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले होते. मी लिहिलेल्या “ज्योतीष सुभाष्य” या पुस्तकासाठी त्यांनी सुंदर प्रस्तावना लिहिली होती.
अशा महान ज्योतिर्विद्या वाचस्पती, होरा मार्तंड, पराशर सन्मानित, ज्योतीष महामहोपाध्याय यांना भावपूर्ण आदरांजली.
– प्रा. डाँ. सुभाष पवार, 9869551661.