Friday, May 30, 2025
Homeलेखमाझी जडणघडण : ५०

माझी जडणघडण : ५०

“पप्पा”

मी लहान असतानाची एक गोष्ट.त्या दिवशी रविवार होता. पप्पा सकाळी दूध घेऊन राजाभाऊ भागवतांकडे थीआॉसाॅफीच्य मीटिंगला गेले.

पपा गेले अन् काही वेळाने आईने दूधाचं भांडं पुन्हा काढलं आणि ती एकदम ओरडली. आम्ही सारे आईभोवती जमलो तेव्हां कळलं, दूधात पाल पडली होती. मी तशीच धावत रा. स. भागवतांकडे गेले. तिथे विचारवंतांची चर्चा बरीच रंगली होती. मी दरवाजातून डोकावून पाहिले. मला पप्पा दिसले. पप्पांनीही मला पाहिले अन् ते थोडे त्रासिक वाटले. मी त्यांना तरीही खुणावलं तेव्हां ते बाहेर आले. “पपा तुम्ही दूध घेतलं त्या भांड्यात पाल पडली होती. तुम्ही बरे आहात ना ?”
पपा शांतच होते.
“हे बघ, मृत्यु यायचा असेल तर तो येईलच पण आता इथे ही सारी विद्वान मंडळी बसली आहेत. एका गहन विषयावर चर्चा रंगलेली आहे. तेव्हां तू घरी जा. नंतर पाहू..”
मी निमुट घरी आले. आम्ही सारे इतके अस्वस्थ होतो ! पपा नेहमीच्या वेळेवर घरी आले. अमंगल, अशुभ असं काही घडलं नाही. पप्पांनीही त्या गोष्टीला फारसे महत्व दिले नाही. कदाचित दैवयोगाने दूधात पाल पडण्यापूर्वीच पप्पा दूध प्यायले असतील !.

असे बेडर, मृत्युला न घाबरणारे पप्पा. सतत कार्यरत राहणारे, कामात रमणारे, कष्टांत आनंद मानणारे.
आळशी माणसं त्यांना अजिबात आवडायची नाहीत. उगीचच गॅलरीत कुणी नखं कुरतडत उभी असलेली व्यक्ती पाहिली की ते विनोदाने म्हणत,
“या माणसाने निदान समोर पसरलेले डोंगर तरी पहावेत. आकाशातले तारे मोजावेत. डोळे असून
ही माणसं डोळे उघडे ठेवून पहात नाहीत.
नुसता नखं कुरतडत बसलाय !”
पपांची हळहळ अगदी आंतरिक असायची. असे आमचे पपा, श्री.ज. ना. ढगे. गाढे तत्त्वचिंतक, कलाप्रेमी, रसिक व्यासंगी. हाडाचे शिक्षक.
ढगे मास्तर ही त्यांची जनमानसातली आदरणीय ओळख. आम्ही त्यांच्या पाच मुली. मुलगा नाही म्हणून त्यांना कधी दु:खी कष्टी झालेलं पाह्यलं नाही. आम्ही मात्र खूप शिकावं असं त्यांना वाटायचं. त्याकरिता ते स्वत: कष्ट घेत. नानातर्‍हेची पुस्तकं आम्हाला वाचायला लावत.

एकदा आठवतंय्, पाठ्यपुस्तकातल्या मोरोपंतांच्या आर्यांचा अर्थ मी विचारला. तर ते संपूर्ण मोरोपंत घेऊन माझ्याजवळ बसले. त्यातले पृथ्वीवृत्त, यमकं, अवघड अलंकार त्यांनी मला शिकवले. “परीक्षेपुरताच अभ्यास करु नकोस. संपूर्ण मोरोपंत वाच कधीतरी. त्यातली गोडी अवीट आहे.”
त्यांना असा तेव्हढ्यापुरताच गाईड वापरून, मार्कांसाठी केलेला अभ्यास आवडायचा नाही. त्यांचा अभ्यास, व्यासंग खूप होता आणि आम्हीही कुठलाही विषय खोलात जाउन आत्मसात करावा अशी त्यांची इच्छा असायची.

पपाना जीवनाबद्दल अपार श्रद्धा होती. ते सारं जीवनच तन्मयतेनं जगले. आयुष्यातला प्रत्येक क्षण त्यांनी रसिकतेनं टिपला. खरं म्हणजे तसं एकरंगी आयुष्य नव्हतंच त्यांचं.. इंद्रधनुष्यासारखं सात रंगी जीवन होतं त्यांचं. ते उत्तम उद्योजक होते, गणितज्ञ, संगीतप्रेमी निसर्गप्रेमी, कवी, लेखक, उत्कृष्ट वक्ते होते. अभ्यासक आणि बुद्धीवादी होते पण रुक्षता त्यांच्यात नव्हतीच. साहित्य हा नुसता छंदच नव्हता तर उत्तम साहित्यिक म्हणून त्यांची प्रतिमा होती. ते हाडाचे शिक्षक होते. इंग्रजी आणि संस्कृतवर त्यांचं प्रभुत्व होतं. त्यांना ज्योतिष विद्या अवगत होती. गणित या विषयाचा त्यांचा गाढा अभ्यास होता. ”जरा डोके चालवा” आणि “मेंदुला खुराक” ही त्यांची पुस्तके आजही उत्कृष्ट पुस्तके म्हणून उल्लेखली जातात.

पप्पा विद्यार्थ्यांमधे खूप रमायचे. हुशार विद्यार्थ्यांना ते नेहमी अहो जाहो संबोधायचे.
मात्र बुद्धीमंद मुलाला गंमतीने म्हणायचे, “तुला टांगा तरी हाकता येईल का रे.?” पण तरीही शिक्षणाच्या प्रवाहात त्याला आणण्यासाठी त्यांची धडपड असायची. त्यांच्या व्यक्तिमत्वात जशी विविधता होती तसे काही विरोधाभासही होते. त्यांना पुस्तकं वाचताना टीपणं करायची सवय होती. आम्हालाही ते काही नाविन्यपूर्ण वाचलं की लिहून ठेवायला सांगत. त्यांच्याजवळ ज्ञानाचा असा मौलीकसाठा होता पण व्यावहारिक दृष्टीने ते संचयी वृत्तीचे नव्हते. हिशोब ठेवणे, आलेला पैसा काटकसरीने वापरुन गंगाजळी साठवून ठेवणे वगैरे गोष्टीत त्यांना मनापासून रस नसायचा. ते नेहमी म्हणत, “गेली ती गंगा अन् राहिलं ते तीर्थ…”
काही हरवलं फुटलं तर म्हणत,
“आनंद आहे ! आपल्याला दुसरे नवे मिळेल…”
आता आठवलं की मनात येतं, पपा प्रपंचातही विरक्त वृत्तीने वावरले. फारसं गुंतवून नाही घेतलं त्यांनी. आमच्यावर त्यांनी सुंदर संस्कार केले.

पप्पा पहाटे लवकर उठत. ज्ञानेश्वरीतल्या ओव्या गात. त्यांचा आवाज मधुर होता. वाणी स्पष्ट होती. संत तुकारामाचे अभंग ते लयीत गात. लहानपणापासून आमच्या कानावर पडलेल्या या संतवाणीने कळत नकळत आमची वृत्तीप्रवृत्ती घडवली. ते आम्हाला बायबल, कुराणातल्या गोष्टी सांगत. शेवटी म्हणत,
“धर्माची शिकवण एकच असते. संपूर्ण मानवजातीचा धर्म म्हणजे सत्य. तुम्ही सत्याची चाड राखा. म्हणजे जीवनात निर्भय व्हाल.” आणि आता वाटतं, खरोखरच आमच्या अंगी जी निर्भीडता, जो आत्मविश्वास, आवश्यक असलेला बेडरपणा आहे तो केवळ पपांच्या शिकवणीमुळेच !

पप्पा

अंधश्रद्धाळु माणसांचा पपाना फार तिटकारा होता. मनुष्यानेच निर्माण केलेल्या, वर्णभेदांवर ते संतापाने बोलत. त्यांना स्वत:लाही कुणी, “तुमची जात कोणती ?” हे विचारलं तर मनस्वी चीड यायची. ते ताडकन् उत्तर द्यायचे,
“या देहाला मानव म्हणतात.
माझी जात माणूस….”
पपा जितके रागीट, परखड बोलणारे होते, तितकेच ते हळवेही होते. त्यांचं मन फार संवेदनशील अन् कोमल होतं. रामायण, महाभारतातल्या कथा सांगताना ते कधीकधी अक्षरश: गहिवरुन जात.
सीता त्यागाचा प्रसंग सांगताना त्यांच्या डोळ्यात आसवांची नदी वहायची. कृष्ण हे त्यांचं आवडतं कॅरॅक्टर होते.
आम्ही माहेरी आलो की त्यांना विलक्षण आनंद होई. पण परततांना त्यांचे डोळे डबडबायचे.
“चिमण्या आल्या चिमण्या गेल्या.” असं म्हणायचे.
प्राण्यांवरही ते प्रेम करत. आमच्याकडे एक मांजर होतं. आम्ही ते पाळलेलं नव्हतं तरीही त्याचं वास्तव्य आमच्याकडेच असायचं. पपा ऑफीसमधून आले की, ते त्यांच्या पायात घुटमळायचं. पप्पाही पायानेच त्याला हलके हलके गोंजारायचे. ते मांजर चोरुन दूध प्यायचं पण पप्पांनी कधीही त्याच्या पाठीत काठी घातली नाही.
झाडापानांचही त्यांना विलक्षण वेड होतं. १९७० साली पप्पांनी ठाण्यात बंगला बांधला. बंगल्यात रहायला गेल्यावर आम्ही सारे तर्‍हेतर्‍हेचे फर्निचर करुन बंगला सजवण्याचा विचार करत असू पण पप्पांनी मात्र नवीन बंगल्यात रहायला गेल्यावर प्रथम खरेदी केली ती, कुदळ, फावड, खुरपणी, नानातर्‍हेची खत यांची.
अनेक झाडांच्या फांद्या जमवल्या. ते स्वत: कुदळीने खड्डे खणून झाडे लावत. आईचा अन् त्यांचा त्यावरुन खूप वाद व्हायचा. आईचे म्हणणे, पप्पांनी स्वत: कष्ट न करता माळ्या कडून ही कामं करुन घ्यावीत..
पण पप्पा म्हणायचे,
“माझी बाग मीच फुलवेन.” त्यांना कष्टाचं वावडं नव्हतच. तो तर त्यांचा महान आनंद होता. शिवाय ज्या विषयात रस घेतला, त्याचा शास्त्रोक्त अभ्यास करण्याकडे कल होता. स्वत:ची बाग सुंदर असावी म्हणून त्यांनी झाडे लावण्यावरची अनेक पुस्तकं विकत घेऊन वाचली. बागायतीचं तंत्र शिस्त मात्र त्यांना फारसं नाही जमलं तरी त्यांतूनही त्यांना मिळालेला आनंद खूप मोठा होता. त्यांनी लावलेल्या जांभुळ, फणसाची मधुर फळे जेव्हां आम्ही खात असू तेव्हा, घामाने निथळलेले हाफ पँटमधले, मातीने पाय लडबडलेले उघडेबंब पपा नजरेसमोर येत. पण त्यांनी लावलेल्या प्रत्येक झाडांनी भरपूर फुलं,फळं दिली. तो त्यांचा परमानंद होता. एक प्रकारे निसर्गाशी जडलेलं ते नातं होतं.

पप्पा गेले तेव्हां बागेतलं प्रत्येक झाड फळाफुलांनी बहरलं होतं. जणू त्या वृक्षवल्लींनी आपल्या कष्टाळु माळ्याला दिलेली ती भावपूर्ण श्रद्धांजली होती.

पप्पां बरोबर आम्ही अनेक प्रवास केले. त्यांच्याबरोबर प्रवास करणे म्हणजे पर्वणीच असायची. त्यांनी कथन केलेल्या कथा, किस्से, विनोद कोट्या सहप्रवाशांची मनं रमवत. शिवाय जिथे जाऊ तिथे नैसर्गिक सौंदर्याचा आकंठ उपभोग घेण्याची त्यांची वृत्ती होती. त्यांना मंदीरात जाऊन रांगेत उभं राहून, काही ठिकाणी तर ड्रेसकोडही असायचा. अशा पद्धतीनं देवदर्शन घेणं कधीच मान्य नव्हतं. त्याऐवजी ते भोवतालच्या परिसरांत रमत. देवळाच्या बाहेर बसलेल्या शहाळी विक्रेत्याशी गप्पा मारण्यात आणि भरपूर शहाळी पिण्यात त्यांना आनंद वाटायचा. डोंगर माथ्यावरुन पलीकडच्या क्षितीजावर डुबणार्‍या सूर्याच्या दर्शनात त्यांना त्यांचा देव दिसायचा. मंदीरातल्या देवापेक्षा त्यांना या नैसर्गिक शक्ती अधिक प्रबल अधिक पवित्र, मंगलमय वाटायच्या. त्यांच्याबरोबर आम्हीही धुक्यातून चाललो. आकाशातले अगणित तारे पाहिले. अनेक सूर्योदय, अनेक सूर्यास्त पाहिले. प्रत्येक सूर्योदय नवा असतो हा विचार त्यांनीच आमच्यात रुजवला.
खळखळत्या धबधब्यात भिजलो. कश्मीरसारख्या ठिकाणी फेसाळ, अथांग वाहणार्‍या नद्यांत पाय डुंबून बसलो. जीवनात पप्पांनी आम्हाला अपार सौंदर्यदृष्टी दिली. निसर्ग हा माणसाचा खरा सोबती असतो. ढोंगी, व्यवहारी जगापासून सावरणारा हा भोवतालचा अफाट निसर्गच खराखुरा परमेश्वर आहे हे त्यांनी आमच्यावर फार लहानपणीच बिंबवल.

आता निळ्याशार आकाशात विरत जाणारे ढग पाहिले की, पप्पांची आठवण येते. ते अनंतात विलीन झाले. ते आमचे पिता होते, गुरु होते. ते आमचे मित्र होते. ते मित्रत्वाच्या नात्याने आमच्याशी गप्पा मारत. आमच्या अडीअडचणी, आमची विवीध प्रकारची सुखदु:ख ते आस्थेवाईकपणे ऐकत. त्यांत समरस होत.
आमच्या सुखात ते हसले. आमच्या दु:खात त्यांनी सोबत केली. आमच्या चुका त्यांनी सांभाळून घेतल्या. त्याबद्दल त्यांनी पितृत्वाच्या अधिकाराने शिक्षा केल्या नाहीत.
पपा जे. कृष्णमूर्तींचे अनुयायी होते. त्यांच्या तत्वज्ञानाचा पप्पांच्या मनावर पगडा होता. त्यामुळेच असेल, पप्पांनी त्यांची मते आमच्यावर कधीच लादली नाहीत. उलट भरपूर स्वातंत्र्य देऊन चांगलं वाईट स्वत:च ठरवण्याच एक आत्मिक बळ आमच्यात निर्माण केलं..

पप्पांची थोर शिकवण हीच आमची शिदोरी.
आणि त्याचा योग्य वापर हीच त्यांना वाहिलेली
खरीखुरी श्रद्धांजली……!!!!!

३१ मे १९८२ रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. आमच्या जगण्यातल्या एकेका क्षणावर त्यांच्या अस्तित्वाचा ठसा मात्र कधीही न पुसून जाणारा आहे.
क्रमशः

राधिका भांडारकर

— लेखन : राधिका भांडारकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. राधिकाताई, वडिलांची ओळख तुम्ही खूप छान शब्दांत करून दिली आहे. त्यांचा स्वभाव, त्यांनी तुमच्यावर केलेले संस्कार हे सर्व ओघावत्या शैलीत लिहिले आहे.

  2. राधिका भांडारकरांनी आपल्या ‘ पप्पाचा परिचय अतिशय नेटकेपणाने आणि वेधकपणे करून दिला आहे. त्यांचं दिसण आणि असणं दोन्ही गोष्टी सांगताना आवश्यक तेवढा तपशील दिला आहे., त्याच वेळी कंटाळावाणे पणा येणार नाही, हेही पहिले आहे. त्यांचं स्वभाव, वैचारिक दृष्टिकोन, त्यांनी केलेले संस्कार, हे सगळं अशा पद्धतीने लिहिले आहे की आपण व्यक्ती प्रत्यक्ष पाहतो, असं वाटतं. एक सुरेख व्यक्तिचित्र वाचल्याचा आनंद मिळतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

उज्ज्वला केळकर on काही कविता
उज्ज्वला केळकर on ‘स्नेहाची रेसिपी’ – १७
सौ. वर्षा महेंद्र भाबल. on स्वातंत्र्यवीर सावरकर जीवनक्रम
उज्ज्वला केळकर on वि दा सावकर : चित्र कथा
अरविंद विनायक ढवळे on पद्मश्री डॉ. शंकरबाबा पापळकर