अहमदाबाद येथे गुरुवारी झालेल्या विमान दुर्घटनेने मन सुन्न झाले असतानाच व्हॉट्स ॲपवर, नेहमीप्रमाणे येणारे काही जल्लोशाचे तर काही शुभ सकाळ चे, संदेश पाहून मन अधिकच विषण्ण झाले.
खरोखर कालची, आजची सकाळ शुभ होती का ? जणू काही हे संदेश पाठवणारे लोक दुसऱ्या कोणत्या तरी ग्रहावर राहात आहेत, असेच मला वाटू लागले. जणु काही त्यांचे या पृथ्वीवरील माणसांशी काही देणेघेणेच नाहीय. कदाचित “जे झाले, ते झाले” पण आपण आपले चिअरअप करावे असे त्यांना वाटत असेल का ?. जगात एका ठिकाणी असे काही घडले की दुसरीकडे कामे चालू राहतात, जग काही थांबत नाही पण निदान आपण ज्या देशात राहतो, जिथे इतकी भयानक दुर्घटना घडलेली आहे, सर्व देशवासीयांना दुखः झालेले आहे, त्या देशातील, म्हणजेच भारतातील सर्वच सोशल मीडिया वीरांनी थोडी तरी संयमशीलता दाखवावी. नाही का ?
खरं म्हणजे त्या विमानात बसलेल्या सर्व प्रवाशांची स्वप्नं अगदी काही सेकंदातच जळून खाक झाली. सगळं काही होत्याचे नव्हते झाले. “आयुष्य क्षणभंगुर आहे”, असे आपण म्हणतो पण ते अशा तऱ्हेने समोर पहायला मिळेल यावर विश्वास बसत नाही. क्षणापूर्वी हसत खेळत सेल्फी घेणारे कुटुंब आपल्या कच्च्या बच्च्यांसकट फक्त कोळसा होऊन मागे उरले. आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन जाणारी नात स्वतःचे मरण कोरून घेऊन अशा तर्हेने कायमची निघून गेली. त्या आजीला झालेल्या दुःखापेक्षा भयंकर काय असू शकेल ? त्या विमानात बसलेल्या प्रत्येकाची एक वेगळी कहाणी असेल ! तशी ती असतेच. आपण मनाशी काय काय योजना करत असतो आणि इकडे नियती अक्षरशः खदाखदा हसत असते आपल्याला. नियतीच्या या क्रूर थट्टेला काय म्हणावे ?
माणसाचे आपल्या श्वासावर नियंत्रण नाही तरी तो इतका कशाचा गर्व करतो हेसुद्धा लक्षात येत नाही. आज जगात जे काही राजकारण, सत्ताकारण चालले आहे त्यात आधी रशिया युक्रेनचे युद्ध आणि आता इस्रायल इराण युद्धाची भर पडली आहे आणि दहशतवाद तर जणू काही भारतीयांच्या पाचवीलाच पुजलेला आहे. हे सर्व काही भयंकर आहे. यावरून तर माणसाच्या जगण्याची किंमत माणसानेच इतकी कमी करून ‘टाकली’ आहे असे वाटते.
एक लेखिका म्हणून माझ्या लक्षात आले की माझ्या आगामी पुस्तकाचे नाव “टेक ऑफ” आहे. आता हे नाव मला कसे सुचले आणि या अहमदाबाद येथील दुर्घटनेला ते कसे चपखल बसते या योगायोगावर मला काय बोलावे सुचत नाही. या पुस्तकात मी आयुष्यात ट्विस्ट आणणारे अनेक टेक ऑफ दाखवले आहेत पण असा हा दारुण टेकऑफ कल्पनेतही मी दाखवू शकणार नाही आणि दाखवला असता तरी त्याची प्रत्यक्ष झळ कोणालाच पोचली नसती. इथे मात्र ‘नियती’ ने हे भयानक नाट्य लिहून त्यात जिवंत पात्रांना अक्षरशः जाळून, पोळून कोळसा बनवले.
अशा या दुःखद प्रसंगात असं वाटतं, प्रत्येकाचे आनंदाचे क्षण वेगळे असतात हे मान्य आहे. पण अशा दुर्दैवी प्रसंगात आपल्या वैयक्तिक आनंदाची उधळण स्वतः पुरती मर्यादित ठेवावी. ती अशावेळी तरी जाहीरपणे करु नये. असो…
हे माझे विचार आहेत. माझ्या डोळ्यासमोर मी यापूर्वी केलेले किती तरी विमान प्रवास तरळत राहताहेत ! असे वाटते, आपले नशीब चांगले म्हणून प्रत्येक विमान प्रवास सुखरूप पार पडला. मिस्टर कारखानिसांना तर कामासाठी जगभर फिरावे लागते. त्यांच्या प्रत्येक ‘टेक ऑफ’ मागे माझी हृदयाची धडधड आणि परत ‘लॅंड’ होईपर्यंतची ‘हुरहूर’ फक्त माझी मीच समजू शकते. त्यांच्यासारखे अनेक प्रवासी आणि विमानातील कर्मचारी – क्रू यांच्या घरी ‘विमान टेक ऑफ आणि लँड’ होईपर्यंत’चा प्रवास त्या त्या व्यक्तीच्या घरातील जवळची व्यक्तीही कुठेही न जाता करत असते.
जगातून दहशतवाद कायमचा कधी नष्ट होईल, कोण जाणे पण आपल्या सामान्य माणसाच्या हृदयातील ओलावा आणि माणुसकी मात्र कायम तेवत राहावी हीच सदिच्छा. हे लिहितानाच अहमदाबाद येथील अनेक लोकांनी उत्स्फूर्तपणे देऊ केलेल्या मदती विषयी बातम्यात ऐकले. म्हणूनच असे म्हणावेसे वाटते … एक मात्र खरे की … आहे अजूनही माणुसकीचा ओलावा झिरपत आहे. या अपघातात सापडलेल्या विमानातील आणि खाली जमिनीवर मृत्यूच्या या भयानक तांडवात सापडलेल्या दुर्देवी जीवांना भावपूर्ण श्रद्धांजली ! आणि त्याचबरोबर… अपघातानंतर अहोरात्र सेवारत असलेल्या वैद्यकीय सेवा कर्मचाऱ्यांना, तंत्रज्ञांना आणि विमानतळावरील कर्मचाऱ्यांना मनःपूर्वक अभिवादन !— खरंच, म्हणावेसे वाटते, तेथे कर आमुचे जुळती !!!
— लेखन : मोहना कारखानीस. सिंगापूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800