मुंबई दूरदर्शन केंद्रातून १७ वर्षांपूर्वी निवृत्त झाल्यानंतर अजूनही कार्यक्रम निर्मिती आणि विविध साहित्यिक, सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सक्रिय असलेल्या डॉ किरण चित्रे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने लवकरच प्रसिद्ध होत असलेल्या माध्यम भूषण या पुस्तकातील त्यांची यशकथा पुढे देत आहे.
डॉ किरण चित्रे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
— संपादक
मुंबई दूरदर्शन केंद्रात मी १९८६ ते १९९१ असा जवळपास ६ वर्षे कार्यरत होतो. या कालावधीत ज्या व्यक्तींशी संपर्क आला आणि जो आजतागायत कायम आहे, त्यापैकी एक अजोड व्यक्तिमत्व म्हणजे डॉ किरण चित्रे होय.
आपल्या कामाशी पूर्णपणे समर्पित, सौंदर्यवान असूनही, सौंदर्याला असलेली शालीनतेची, सौजन्याची, नम्रपणाची जोड पण वेळ प्रसंगी खंबीर भूमिका घेण्यास मागेपुढे न पाहणाऱ्या अशा डॉ किरण चित्रे यांचे व्यक्तिमत्व मला नेहमीच भावत आले आहे. त्यातही गेली तीन वर्षे त्यांनी ज्या धीरोदात्तपणे कर्करोगाला तोंड देऊन, त्यावर मात केली आहे, ती तर खरोखरच अतिशय कौतुकास्पद आणि अनुकरणीय आहे. पाहू या त्यांच्या जीवनावर टाकलेली ही काही किरणे
मुंबई दूरदर्शन केंद्रात किरण चित्रे यांचा प्रवेश झाला तो श्री. गोपीनाथ तळवलकर यांच्या सांगण्यावरून. त्यावेळी त्या नुकत्याच एम ए झाल्या होत्या. दूरदर्शन मध्ये ऑडीशन झाल्यावर त्यांनी निवेदिका म्हणून उत्कृष्ट काम केले; त्यामुळे थोड्याच कालावधीत जनमानसात ओळख निर्माण झाली.
दूरदर्शनध्ये निवेदनाबरोबरच नवीन काही शिकण्यासाठी किरण चित्रे यांनी वृत्त विभागात प्रॉडक्शन असिस्टंट (कॅज्युअल) म्हणून काम करण्यास सुरुवात केली. पण तात्पुरत्या सेवाशर्तीमुळे सेवा खंडित झाली; म्हणून त्यांना एअर इंडियामध्ये सेवा करावी लागली. कविता करणेही चालूच असायचे. मात्र एअर इंडिया मधील लोकांना हे आवडत नसे; म्हणून त्यांनी महिना भरात ती नोकरी सोडली.
अर्थात किरण चित्रे दूरदर्शनमध्ये संपर्क ठेवून असल्याने त्यांना पुन्हा तिथे नोकरी मिळाली. त्यांची शालेय चित्रवाणी विभागात नेमणूक झाली. तिथे समाज मंदिराकडून येणारे लेखन असायचे. त्याची निर्मिती करावी लागायची. त्यावेळी त्या विभागात स्मिता गोदरेज, मरियम जयपूरवाला, विनय धुमाळे, अरुण काकतकर ही मंडळीही कार्यरत होती. तेव्हा प्रमुख असलेले श्री. आकाशनंद हे बीबीसीला प्रशिक्षणासाठी गेले होते. त्यांच्याविषयी खूप उत्सुकता होती, नंतर त्यांची भेट झाली. त्यानंतर दूरदर्शन निर्मितीचे खरे धडे किरण चित्रेना त्यांच्याकडूनच मिळाले. काही मनोरंजक प्रसंग म्हणजे काही कार्यक्रमांमध्ये शेत, कुत्रा असे दृश्य होते; पण मुंबईत शेत कुठे मिळणार ? म्हणून शेत शोधत शोधत चित्रीकरण पथक बोरीवलीपर्यंत गेले, तेव्हा तिथे शेत मिळाले. विशिष्ट झाडे वगैरेचा उल्लेख लेखनामध्ये आला की अशीच पंचाईत व्हायची.
शालेय चित्रवाणीत त्यावेळी किरण चित्रे यांनी अलादिन आणि जादूचा दिवा असे मनोरंजक कार्यक्रम केले. त्यावेळी त्यांना छोटे छोटे संगीताचे तुकडे हवे होते आणि अचानक जयसिंग भोईर यांची गाठ पडली. त्यांनी उत्तम संगीताचे छोटे तुकडे कार्यक्रमासाठी दिले; त्यामुळे कार्यक्रमाची निर्मिती अतिशय परिणामकारक झाली. त्यावेळी युमॅटिक कॅमेरा नव्हता. १६ एमएम फिल्म आणि सेप मॅगवर रेकॉर्डिंग करावे लागायचे. आणि ते खूप काटेकोरपणे करावे लागायचे. त्या मानाने आताचे तंत्र खूपच सुटसुटीत झाले आहे. अर्थात मल्टिट्रॅक रेकॉर्डिंगमुळे वेगवेगळे आवाजाचे परिणाम वापरता यायचे. त्यामुळे तेव्हा नाटकेसुध्दा खूप चांगली व्हायची. श्री. विश्वास मेहेंदळे, टी. पी. जैन, विरेंद्र शर्मा ही मंडळी नाटकाची निर्मिती करायचे. सर्वच जण मनोभावे काम करीत. त्यावेळी संध्याकाळी ७ ते रात्री १० असे प्रसारण असायचे.
बीबीसी चे ट्रेनिंग घेऊन आल्यावर आकाशानंद यांनी ‘ऐसी अक्षरे’ हा कार्यक्रम सुरू केला. त्याचा फॉर्मेट प्रत्येक वेळी वेगवेगळा असायचा. “ज्ञानदीप” कार्यक्रमाची निर्मिती त्याचवेळी होत होती. वेगवेगळ्या समाजोपयोगी कार्यक्रमांचा अंर्तभाव त्यात असे. समाज प्रबोधन हा मुख्य हेतू असे.
शालेय चित्रवाणीसाठी आधी पाचवीसाठी इंग्रजीचे पाठ असायचे. नंतर आठवीसाठी विज्ञानपाठ चालू झाले. सकाळी १०.४० ते ११ व दुपारी २ ते २.३० अशी प्रसारणाची वेळ असायची. सर्व शाळांतून त्याला प्रतिसाद मिळायचा. कम्युनिटी सेंटरमध्ये दूरदर्शन संच ठेवलेले असायचे; त्यामुळे कार्यक्रमांचा प्रतिसाद कळायचा; त्यानुसार पुढच्या कार्यक्रमामध्ये सुधारणा करण्यात येत असे.
किरण चित्रे यांची १९७६ मध्ये रीतसर मुलाखत होऊन कायम स्वरुपी पदावर नेमणूक झाली. साहाय्यक केंद्र संचालक असलेल्या श्री. अंडीअप्पन या दाक्षिणात्य अधिकाऱ्याने अधिकाधिक मराठी माणसांना संधी दिली, हे किरण चित्रे आवर्जून नमूद करतात.पुढे १९७८ मध्ये त्यांना फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये ट्रेनिंगला पाठविण्यात आले. तिथे त्यांना दूरदर्शन कार्यक्रम निर्मितीविषयक शास्त्रोक्तपणे अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यावेळी टरेट कॅमेऱ्याला ३-४ लेन्स असायची. प्रत्येक वेगवेगळ्या शॉटनुसार लेन्स बदलावी लागायची. ट्रेनिंगवरून आल्यावर त्यांना स्वतंत्रपणे निर्मितीसाठी ‘मुलखावेगळी माणसं’ हा कार्यक्रम देण्यात आला. पहिला कार्यक्रम पुण्याजवळच्या एका बेटावर राहणाऱ्या श्री. नाईक यांच्यावर करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला बेट, अवतीभवतीचा निसर्ग दाखवून व त्याला निवेदन देऊन नंतर मुलाखत घेतली. या कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. पत्रांचा पाऊस पडला. प्रथम कार्यक्रमालाच इतका चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे पुढे खूप हुरूप आला.
दुरदर्शन या माध्यमातून आपण समाजाला काय देऊ शकतो याचा विचार त्यांच्या मनात रुजला, तो ही आकाशानंद यांच्यामुळेच. तसेच आपला कार्यक्रम अधिकाधिक पाहिला जावा यासाठी विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता त्यांच्या लक्षात आली.
‘मुलखावेगळी माणसं’ या कार्यक्रमासाठी प्रत्येक वेळी माणसं शोधणे हे एक आव्हानच असायचे. एक हात व पाय नसूनही पोहणाऱ्या व इतर अनेक उपक्रम करणाऱ्या मुलावरचा कार्यक्रम गाजला. त्या मुलाची आर्थिक परिस्थितीही बेताचीच होती; पण त्या कार्यक्रमानंतर त्याला बरीच आर्थिक मदत मिळाली. त्याचे एस्. एस्. सी., बी. कॉम. झाल्यावर आवर्जून पत्र आले. पुढे लग्न झाल्यावर त्याने छायाचित्रही पाठवून ऋणानुबंध जपला. तसेच येरवड्याच्या तुरुंगात फाशी देणाऱ्याची मुलाखत अशीच आगळीवेगळी ठरली.
ज्येष्ठ निर्मात्या सुहासिनी मुळगांवकर या १९८२च्या एशियाडसाठी दिल्लीला गेल्या होत्या; म्हणून त्यांच्या अनुपस्थितीत किरण चित्रेनी श्रीमती ज्योत्स्ना भोळे यांचा कार्यक्रम राष्ट्रीय प्रसारणासाठी चित्रीत केला. सुहासिनी मुळगांवकर मॅडम परत आल्या, त्याच दिवशी हा कार्यक्रम प्रसारित होणार होता. पण तरीही त्या म्हणाल्या, “कार्यक्रम पाहिल्याशिवाय प्रसारित करणार नाही” एका ज्युनियरने एवढ्या मोठ्या कलाकाराचे चित्रण कसे केले ? हे पाहणे त्यांच्या चोखंदळ स्वभावाला धरूनच होते; पण विशेष म्हणजे तो कार्यक्रम त्यांना आवडला आणि त्यांनी मनापासून दाद दिली. तेव्हापासून किरण चित्रे यांच्यावर संगीत कार्यक्रमांची निर्मिती सोपविण्यात आली.
दरम्यान १९८३ मध्ये किरण चित्रे निर्मात्या झाल्या आणि त्यांच्यावरील कार्यक्रम निर्मितीची जबाबदारी आणखी वाढली. त्याचवेळी चारुशीला साबळे एका कार्यक्रमासाठी काही गाणी घेऊन आल्या. ती पाहिल्यावर त्यावर मालिकाच सादर करता येईल असे किरण चित्रे यांनी तत्कालीन केंद्र संचालक श्री. ए. एस. तातारी यांना सुचविले. त्यांनाही कल्पना आवडली आणि राष्ट्रीय प्रसारणात ‘महाराष्ट्र की लोकधारा’ ही बहुधा पहिलीच १३ भागांची संगीत मालिका सुरू झाली. अशा प्रकारे राष्ट्रीय स्तरावर “आरोही” व “महाराष्ट्र की लोकधारा” है कार्यक्रम प्रसारित होऊ लागले आणि ते कार्यक्रम लोकप्रियही झाले.
किरण चित्रे आरोहीमध्ये एकाच स्वरूपाच्या गाण्याऐवजी वेगवेगळ्या धर्तीची गाणी घेत. त्यामुळे कार्यक्रम एकरंगी न होता वैविध्यपूर्ण होत असे; त्यामुळे आरोहीलाही खूपच चांगला प्रतिसाद मिळू लागला. आरोही व लोकधारेच्या निर्मितीमुळे त्यांना खूप समाधान लाभले; आणि संगीत कार्यक्रमाबरोबर त्यांचे नाव जोडले गेले. आरोहीमध्ये त्या दोन नामवंत तर एक तरी नवोदित कलाकार राहील याची दक्षता घेऊन नवोदितांना संधी देत.
त्यानंतर किरण चित्रे यांनी काही काळ ‘मुखवटे आणि चेहरे’ हा कार्यक्रम केल्यावर ‘शास्त्रीय संगीत’, ‘शब्दांच्या पलीकडचे’ हे कार्यक्रम त्यांच्याकडे आले. ‘शब्दांच्या पलीकडचे’ या कार्यक्रमामध्ये काव्याला व प्रासंगिकतेला महत्त्व दिल्यामुळे तो कार्यक्रम लोकप्रिय ठरला. त्यापैकी अष्टविनायक, वर्षा गीते हे कार्यक्रम प्रेक्षकांना अजूनही आठवतात व दूरदर्शनवरूनही पुन्हा पुन्हा दाखविले जातात. सुंदर माझे घर, कामगार विश्व, फुल खिले गुलशन गुलशन, किलबिल असेही कार्यक्रम त्यांनी केले आहेत. प्रत्येक कार्यक्रमात वेगळे काही देण्याचा त्या सतत प्रयत्न करायच्या. त्या अंतर्गत महाराष्ट्रातील आनंदीबाई जोशी, पार्वतीबाई आठवले, बाया कर्वे अशा महान १२ स्त्रियांवर वर्षभर कार्यक्रम सादर केले. सुंदर माझं घरमध्येच ‘कष्टकरी’ हे सदर चालू केले आणि विविध कष्टकरी स्त्रियांचे जीवन त्यातून पुढे आले. अर्थात कार्यक्रमाची व्याप्ती वाढती ठेवावी ही स्फूर्ती त्यांना आकाशनंदानी दिली हे किरण चित्रे अभिमानाने सांगतात.
अशा विविध नियमित कार्यक्रमांबरोबरच त्यांनी वेळोवेळी महत्त्वपूर्ण विशेष कार्यक्रमांची निर्मिती केली.

एम्.ए. झाल्यावर पी एचडी करायचे जे ठरविले होते, ते आठवून किरण चित्रे अस्वस्थ व्हायच्या. शेवटी या सर्व धबगड्यातून पी एचडी करायचेच म्हणून साधारणतः १९८० च्या सुमारास पी एचडी करण्यासाठी त्यांनी पुणे विद्यापीठात नोंदणी केली.
डॉ. भालचंद्र फडके हे त्यांचे मार्गदर्शक होते. “सन १८०० ते १९२० या कालावधीतील मराठी कादंबरी-प्रेरणा, प्रकृती, स्वरूप” हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. विषयाचा आवाका पाहून ते पूर्ण करणे हे अत्यंत आव्हानात्मक होते; पण घर आणि दूरदर्शन सारखी वेळेची निश्चिती नसलेली नोकरी सांभाळून त्यांनी पी एचडी मिळविण्यासाठी प्रबंध लेखनाला सुरुवात केली. वेळप्रसंगी रजा घेऊन हा शोधप्रबंध त्यांनी १९८७ साली विद्यापीठाला सादर केला आणि त्यांना डॉक्टरेट मिळाली.

आज मागे वळून पाहताना डॉ किरण चित्रे यांनाही आश्चर्य वाटते; कारण त्या एसएससी झाल्या आणि त्यांचे लग्न झाले. लग्नानंतर शिकल्या त्या सासरच्या प्रोत्साहनामुळे आणि पतीच्या सहकार्यामुळेच हे त्या आवर्जून सांगतात.
निवृत्तीनंतर बारा वर्षांनी दूरदर्शन केंद्रात त्यावेळी संचालकपदी असलेल्या श्री आगरवाल यांच्या आग्रहाखातर किरण चित्रे यांनी काही माहितीपटांची निर्मिती केली. पं. राम मराठे, ज्येष्ठ नाट्यकर्मी भालचंद्र पेन्ढारकर, संगीत दिग्दर्शक अशोक पत्की, यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरवपूर्ण आलेख या माहितीपटातून त्यांनी रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला. सन २०२३ – २०२४ हे संगीत नाट्यलेखक विद्याधर गोखले यांचं जन्मशताब्दी वर्ष ! ओजस्वी वक्तृत्व, उत्कृष्ट पत्रकारिता, गोखले यांची साहित्य क्षेत्रातली मुशाफिरी, उत्तमोत्तम संगीत नाट्यकृतींचे लेखन, अभिनय निपुणता, अशा अनेकविध कलागुणांचा कलात्मक मेळ घालत डाॅ. किरण चित्रे यांनी ‘रसिकराज विद्याधर’ हा अतिशय रंजक असा माहितीपट मुंबई दूरदर्शन साठी घडविला आणि रसिकांनी त्याला उदंड प्रतिसाद देत पसंतीची मोहोर उमटवली.

साधारण ४० /४५ वर्षांपूर्वी दूरदर्शनसारख्या आधुनिक माध्यमात महिलांचे प्रमाण हाताच्या बोटावर मोजण्याइतके होते. पण आज प्रसार माध्यमांमध्ये महिलांची वाढत चाललेली संख्या पाहून डॉ किरण चित्रे यांना फार समाधान वाटते. आजच्या मुलींना शिकण्यासाठी शासनाने अनेक सवलती दिल्या आहेत. नोकऱ्यांमध्येही आरक्षण दिले आहे. या सर्व परिस्थितीचा मुलींनी अधिकाधिक लाभ घेऊन सक्षम बनले पाहिजे, असे मनोगत त्या व्यक्त करतात.

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
डाॅ. किरण चित्रेना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा..💐❤️🎂…. देवेंद्र भुजबळ तुम्ही लेख खुप छान लिहीला आहे…
आमच्या सेक्शन मध्ये आल्यावर खेळीमेळीने, नम्रता, शालीनता, ह्या सगळ्याचा अनुभव आम्ही घेतला आहे. आणि तुम्हीही हुबेहुब वर्णन केलं आहे. आणखी एक खासियत किरणताई सि.के.पी. होत्या. एकतरी रेसिपी आम्हा मुलींना शिकवून जायच्या. पुन्हा एकदा शुभेच्छा व तुम्हाला धन्यवाद 🙏 …….
किरण ताई वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🎂💐🙏🤝 तुम्हाला उदंड आयुष्य लाभो 🙏हसतमुख, हुशार,,गोड,कणखर अश्या आमच्या किरण ताईंचे व्यक्तिमत्त्व तुमच्या लिखाणातून अनुभवताना पुन्हा त्यांच्या बरोबर काम करतानाचा अनुभव डोळ्यासमोर आला सर 🙏
डॉ. किरण चित्रे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रथम खूप शुभेच्छा !
त्यांच्या जीवनावरील किरणमय लेख भुजबळ सरांनी सविस्तरपणे मांडला आहे.
जणू डॉ. किरण चित्रे यांचा लघुपट पाहत आहोत, इतका सुंदररित्या लिहिला आहे.
सौ. वर्षा महेंद्र भाबल.
डॉ. किरण चित्रे यांच्यावरील माहिती पूर्ण लेख खूप चांगला झाला आहे.
वाह , खूपच छान…!
चित्राताईंचे वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन आणि आगामी जीवनासाठी गुरुकृपा संस्थेच्या सर्व सभासदांच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा…!
… प्रशान्त थोरात, पुणे कार्यवाह, गुरुकृपा संस्था.
9921447007
डॉ. किरण चित्रे यांच्या वाढ दिवसा निमित्त त्यांचा दिलेला व्यक्ती परिचय माध्यम आणि साहित्य समाज सांस्कृतिक क्षेत्रांचा ओघवता इतिहास यांचाही समकालीन परिचय देणारा आहे.
डॉ. किरण चित्रे यांना वाढदिवसाच्या सहृदय शुभेच्छा !!