Sunday, June 1, 2025
Homeलेखशुभ मंगलम् सावधान !

शुभ मंगलम् सावधान !

अवघे नऊ महिन्याचे लहान बाळ असलेल्या पुणे येथील सौ वैष्णवी हगवणे या भगिनीने सासरच्या छळाला कंटाळून केलेल्या आत्महत्येमुळे समाज मन चांगलेच ढवळून निघत आहे. या अनुषंगाने प्राप्त झालेली ही एक बोलकी प्रतिक्रिया….
— संपादक

खूप पूर्वी पासून असे बीज समाजात रोवले गेले आहे की मुलगी सासरी गेली की ती सुखीच झाली पाहिजे. नाहीतर तिची आणि तिच्या घरच्यांची नामोशी. पण तिचे सुखी राहणे फक्त तिच्यावर किंवा तिच्या घरच्यांवर अवलंबून असते का ? हे एकतर्फी थोपले जाणारे समाजाचे विचार, मानसिक दबाव देणारे नाही का ?

लहानपणापासूनच मुलीला मर्यादा शिकवल्या जातात. अमुकतमुक उपवास केल्याने चांगला नवरा मिळतो. अमुकतमुक खाल्ल्याने श्रीमंत सासर मिळते वगैरे वगैरे.
पण ‘संसाराची गाडी तर दोन चाकांनी चालते’. ‘टाळी दोन हातांनी वाजते’ .. हे तिने सांगायची टाप नाही.

मुलीचा साखरपुडा, लग्न सगळे थाटामाटात करून देणे, सासरकडच्यांना व्यवहार करून मानपान करणे, हे कर्तव्य मुलींच्या घरच्यांचेच असते असा आदेश करणारे अजुनही आहेत. जे काही घालायचे ते मुलीला द्या आम्ही काही मागत नाही म्हणणारी हुशार पिढीही आहे. नंतर अमुकतमुक प्रसंगाला भेटवस्तू तुझ्या माहेरहून घेऊन ये, असेही हक्काच्या गोष्टीवर छान पट्टी पढवणारे उच्चवर्ग याच समाजात आहे.
लग्नानंतरच्या रीतीभाती, माहेरच्यांशी कसे वागायचे, आपली हक्काची गोष्ट कशी करायची, भावाबहिणीशी बरोबरी आणि बरंच काही शिकवणारे याच समाजात आहेत.

श्रीमंत सासर मिळाल्याचे कौतुक जगभर पसरवल्याने समाजात दर्जा वाढतो. हा गैरसमज असून मुलीच्या घरच्यांची कशीही आर्थिक परिस्थिती असली तरीही मोठ्या मनाने जे जे काही करावं लागतं ते ते सगळं करायला मुलीचे आईवडील तयार असतात. हा आपलाच समाज कितीही शिकला सवरलेला असला तरी खोट्या व्यवहारात फसलेला असा अशिक्षित, लापरवाह, निर्लज्ज आणि खोटा अधिकार गाजवणारा आहे हे दुर्दैवच.

वैष्णवी सारख्या अनेक मुली अशा वाईट अवस्थेच्या बळी गेल्या आहेत हे आपल्या ऐकण्या वाचण्यात सहज येते आणि आपण काही करू शकत नाही.

आजही समाजात असा वर्ग आहे, जो म्हणतो ‘मुलींना शिकवले की त्यांची डिमांड वाढते’ त्यामुळेच डिवोर्स होतात. ‘मुलींना अक्कल आलेली कामाची नसते. भांडण होतात.’
‘तिने प्रश्न केला तर संस्कारांवर बोट जातं.’
‘हो ला हो केलं..
की ती गरीब गाय ! (म्हणजे काय हवा तसा दबाव टाकता येतो.)
अशावेळी सहनशक्तीच्या टोकाला जाऊन त्यांच्याकडे आत्महत्याशिवाय काही पर्याय उरत नाही. किती वाईट वाटते की त्या मानसिक दबावाखाली केलेला प्राणघातक हमला करणाऱ्यांवर कोणी बोट दाखवत नाहीत. जर दाखवले तर चर्चेत अधिक प्रमाणात मानहानी होऊन यांचे जगणे अवघड होऊन जाते.

चांगल्या वेळी – प्रसंगी चारचौघात तर कधी मोठ्या प्रमाणात सत्यनारायणाची पूजा करणारे, करवून घेणारे जसे आपल्या समाजात आहेत, तेव्हा या समाजाकडून सत्यासाठी लढण्याची ताकद मिळेल असे वाटते. पण ‘सगळा सत्यानाश झाला’ चेहेरे वाकडे करून फक्त दोष देणारे शिष्टाचारीच दिसले की खरंच घृणा येते !

— लेखन : दिपाली वझे. बेंगळूरू
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माधव गोगावले : कोरेगाव बुद्रुक ते शिकागो !
Shashikant Oak on कथा : २
उज्ज्वला केळकर on काही कविता
उज्ज्वला केळकर on काही कविता
उज्ज्वला केळकर on ‘स्नेहाची रेसिपी’ – १७
सौ. वर्षा महेंद्र भाबल. on स्वातंत्र्यवीर सावरकर जीवनक्रम