Monday, June 16, 2025
Homeयशकथा"सर्वोत्कृष्ट लोककलावंत : प्रा डॉ गणेश चंदनशिवे"

“सर्वोत्कृष्ट लोककलावंत : प्रा डॉ गणेश चंदनशिवे”

अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वतीने १४ जून २०२५ रोजी सांस्कृतिक कार्य मंत्री श्री आशिष शेलार यांच्याहस्ते, मान्यवरांच्या आणि रसिकांनी भरगच्च भरलेल्या मुंबईतील यशवंत नाट्यगृहात नाट्यक्षेत्रातील कलाकारांना त्यांच्या कामगिरीबद्दल विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यातील “सर्वोत्कृष्ट लोककलावंत” हा पुरस्कार माझे मित्र तथा मुंबई विद्यापीठाच्या लोककला विभागाचे प्रमुख प्रा डॉ गणेश चंदनशिवे यांना प्रदान करण्यात आला. या निमित्ताने त्यांच्या जीवनाचा आणि कलेचा घेतलेला हा वेध.
प्रा डॉ गणेश चंदनशिवे यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
— संपादक

सांस्कृतिक कार्य मंत्री श्री आशिष शेलार पुरस्कार देताना

बऱ्याचशा व्यक्ती एखाद्या विशिष्ट पदावर पोहोचल्या की, आपल्यातील कला जाहीरपणे सादर करण्यास कचरतात. कारण त्यांना बहुधा असे वाटत असावे की, मी आता कलाकारापेक्षा वरच्या श्रेणीत आलो आहे, त्यामुळे कला सादर करण्याची त्यांना लाज वाटत असावी. इथे मी संचालक राहिलेल्या आमच्या माहिती खात्याचेही उदाहरण देता येईल. पूर्वाश्रमीचे पत्रकार राहिलेले बरेच जण “अधिकारी” झाले की, त्यांना बातम्या, लेख लिहिणे हे जणू कमीपणाचे काम वाटते. तर दूरचित्रवाणी वाहिन्यांतून अनुभव घेऊन आलेल्यांना, ते वाहिनीत जे काम करायचे ते काम म्हणजे वृत्त चित्रकथा तयार करण्याचे, तर ते काम करण्याची “अधिकारी” झाले की इच्छाच रहात नाही ! खरं म्हणजे,त्यांच्या अनुभवांमुळे, गुणवत्तेमुळेच त्यांची निवड करण्यात आलेली असते. आणि तसेच काम ते माहिती खात्यात आले की, अजून जोमाने करतील, अशी अपेक्षा असते. पण ते बऱ्याचदा होताना दिसत नाही आणि म्हणूनच अशा या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाच्या लोककला विभागाचे प्रमुख प्रा डॉ गणेश चंदनशिवे हे विद्यापीठाच्या पारंपरिक प्राध्यापकाच्या प्रतिमेला छेद देत सतत स्वतःची कला सादर करण्याबरोबर ईतर लोक कलावतांना पुढे आणण्यात, त्यांना मदत करण्यात नेहमी पुढे असतात, ही बाब अत्यंत मला अत्यंत कौतुकास्पद वाटते.

जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथे ५ जुलै १९७७ रोजी एका शेतकरी कुटुंबात गणेश चंदनशिवे यांचा जन्म झाला. तेथीलच सिद्धार्थ महाविद्यालयातुन ते बी ए झाले. त्यानंतर त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून नाट्यशास्त्र पदवी प्राप्त केली. त्यांचा ऐच्छिक विषय होता “लोककला साहित्य.” तर “लोक रंगभूमीवरील तमाशा सादरीकरणाचं बदलतं स्वरूप: एक चिकित्सक अभ्यास” या विषयावर त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथून पीएचडी मिळवली. त्यानंतर त्यांची २००३ साली जळगाव येथील एम जे कॉलेज मधील नाट्यशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक पदी तर २००४ साली बीडच्या के.एस.के. महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागात हंगामी सहाय्यक प्राध्यापक पदी नियुक्ती झाली. तिथे २ वर्षे राहून ते जानेवारी २००६ मध्ये मुंबई विद्यापीठ लोककला अकादमीत सहाय्यक प्राध्यापक म्हणून रुजू झाले. यथावकाश ते विभाग प्रमुखही झाले.

प्रा डॉ गणेश चंदनशिवें यांनी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर अनेक शोध प्रबंध सादर केले आहेत. विविध कार्यशाळेत भाग घेतला आहे. “स्वातंत्र्यपूर्व तमाशा रंगभूमी वाटचाल : एक चिकित्सक अभ्यास” हा संशोधन प्रकल्प त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सादर केला.
भारत सरकारच्या नागपूर येथील दक्षिण-मध्य सांस्कृतिक केंद्रात “तमाशा वगनाट्य” हा संशोधन प्रकल्प पूर्ण केला. २००८ साली झालेल्या अखिल भारतीय लोककला संमेलनात “संत साहित्यात महिलांचे योगदान” राज्यस्तरीय संशोधन परिषद, दयानंद महाविद्यालय, लातूर येथे “लोककलेचे अंतरंग” हा शोधनिबंध, अण्णासाहेब वर्तक महाविद्यालय आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रात शोधनिबंध, ऑगस्ट २०१२ मध्ये अखिल भारतीय महिला लोककला संमेलनात “लोककलेत महिलांचे योगदान” हा शोध निबंध, एस पी विद्यापीठ, गुजरात आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रात भारतीय लोकनाट्य या विषयात शोधनिबंध, २०१४ साली गुजराती लोक साहित्य विभाग यांनी एन.एस. पटेल आर्ट्स कॉलेज आनंद गुजरात येथे आयोजित केलेल्या भारतीय लोकसाहित्य परिषदेत शोधनिबंध, आय.आय. ए .एस. सिमला आयोजित “मिथक एक अनुशीलन” या विषयावर राष्ट्रीय शोधनिबंध, जून २०१६ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय परिषदेत शोध निबंध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, नाट्यशास्त्र विभाग आयोजित राष्ट्रीय परिषदेत “फंडामेंटल हुक आर्ट्स” या विषयावर शोध निबंध, ऑक्सफोर्ड विद्यापीठ, लंडन येथे २०१६ साली “लोककलेच्या माध्यमातून आदिवासी जनजाती शिक्षणाचे महत्त्व” या विषयावर शोधनिबंध, त्याच वर्षी एन.आय.एस.एस. आणि लोक साहित्य संशोधन केंद्र, भारत सरकार आयोजित आंतरशाखीय संस्कृती संशोधन परिषदेत शोधनिबंध, जानेवारी २०१८ मध्ये “तमाशा-एक रांगडा खेळ” डिंपल प्रकाशन, मुंबई प्रकाशित हा संशोधनपर ग्रंथ, संगीत नाटक अकादमी, या शिवाय नवी दिल्ली आयोजित भक्ती समर्पण राष्ट्रीय परिषदेतही त्यांनी शोधनिबंध सादर केला आहे. आदिवासी रंग महोत्सव अंतर्गत राष्ट्रीय परिषदेत “आदिवासी समाजाचे वर्तमान” या विषयावर २०१८ मध्ये शोध निबंध असं त्यांचं सातत्याने संशोधन कार्य सुरू आहे.

राजस्थानचे राज्यपाल श्री हरिभाऊ बागडे यांची नुकतीच जयपूर येथे सदिच्छा भेट घेतली तेव्हाचे छायाचित्र.

महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील गावांना एकत्र आणण्यासाठी त्यांनी कानडी मराठी मध्ये तमाशा सादर केला. राजस्थान इंटरनॅशनल सेंटर मध्ये नुकताच त्यांनी तमाशा सादर केला. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले राजस्थान चे महामहिम राज्यपाल श्री हरीभाऊ बागडे यांनी त्यांचे भरभरून कौतुक केले. लवकरच “महाराष्ट्राची लोककला” सातसमुद्रापलीकडे, अमेरिकेत पोहोचविण्यासाठी आघाडीचे गायक शंकर महादेवन यांच्या समवेत डॉ. चंदनशिवे यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. त्याबद्दल सर्व लोक कलावंत आणि विविध स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

स्वतः खरेखुरे लोक कलावंत असलेले प्रा डॉ चंदनशिवे यांनी केवळ स्वतःची कला, व्याख्याने, कार्यशाळा यातूनच लोक कलावंत घडावेत यासाठी स्वतःला मर्यादित ठेवलेले नाही तर लोक कलावंत घडावेत, ते उभे रहावेत यासाठी ते हर प्रकारे झटत असतात. कोरोनाच्या भयंकर काळात लोक कलावंतांना विविध प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागत होते. अशा कठीण परिस्थितीत त्यांना केवळ शाब्दिक धीर देण्याचंच काम न करता वेळ प्रसंगी स्वतः पदरमोड करून त्यांनी अनेक या कलावंतांना मदत केली, यावरूनच त्यांची या कलावंतांविषयीची आत्यंतिक तळमळ दिसून येते. त्यांची ही तळमळ बघून तर माझा त्यांच्या विषयीचा आदर शतपटीने वाढला.

चंदनशिवे सर विविध विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर आहेत. मध्य प्रदेशातील हरिसिंग गौर विद्यापीठ नाट्यशास्त्र विभागाच्या सल्लागार समितीचे सदस्य, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड विभागाच्या नाट्यशास्त्र विभाग सल्लागार समितीचे सदस्य, बोर्ड ऑफ स्टडीज, लोककला अकादमी मुंबई विद्यापीठ सदस्य, सहाय्यक अधिष्ठाता परफॉर्मिंग अँड फाइन आर्ट्स मुंबई विद्यापीठ, सल्लागार सदस्य, मराठी भाषा समिती महाराष्ट्र शासन सदस्य म्हणून योगदान देत आहेत.

अध्ययन, अध्यापन, संशोधन या बरोबरच चंदनशिवे सरांची व्यावसायिक कामगिरी खूप लक्षणीय आहे. “गर्जा महाराष्ट्र माझा” हा माहितीपट, “ढोलकीच्या तालावर” हा ई .टीव्ही वाहिनी वर रियालिटी शो, मराठी जागर देवीचा – आयबीएन लोकमत, हसत खेळत सिरीयल, सह्याद्री वाहिनीच्या डीडी १० वर धिना धिन मुलाखत, अनुराग कश्यप दिग्दर्शित हिंदी चित्रपट “शैतान” मध्ये “पिंट्याची हंडी फुटली” हे गाणे, संजय लीला भंसाली दिग्दर्शित “बाजीराव मस्तानी” चित्रपटातील गाणे त्यांनी गायले आहे. बाळकडू, शौर्य, मस्का, बया रुद्र या चित्रपटांसाठी पार्श्वगायन, हृदयनाथ चित्रपटासाठी गोंधळ गीत, शंकर महादेवन यांच्या समवेत अल्बम, झाकीर हुसेन आणि शंकर महादेवन यांच्यासमवेत संगीत मैफल, तोफिक कुरेशी द फॉरेस्ट अल्बम मध्ये सहभाग, तत्कालीन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या उपस्थितीत झालेल्या आठव्या आंतरराष्ट्रीय रंगमंच ऑलम्पिक मध्ये लाल किल्ल्यावर लोककला सादरीकरण, एबीपी माझा वाहिनीच्या माझा कट्टा या कार्यक्रमात एक तासाची प्रकट मुलाखत, जय महाराष्ट्र वाहिनीवर मुलाखत, कलर्स मराठी वाहिनीवरील अस्सल पाहुणे- इरसाल नमुने या मालिकेत प्रकट मुलाखत, “चला हवा येऊ द्या” या झी मराठी वाहिनीवर महाराष्ट्राची लोककला हा कार्यक्रम, भारत सरकारच्या संस्थेद्वारे संजारी फेस्टिवल मध्ये महाराष्ट्राच्या लोक परंपरेवर सांस्कृतिक कार्यक्रम असा त्यांचा फार मोठा आविष्कार आहे.विच्छा माझी पुरी करा, गाढवाचे लग्न,तीन पैशाचा तमाशा, जांभूळ आख्यान, खंडोबाचे लगीन, गोष्ट अकलेची, पुढारी पाहिजे, गावची जत्रा पुढारी सतरा या मराठी लोक नाट्यात त्यांचा सहभाग राहिला आहे.

चंदनशिवे सरांनी एआययु द्वारे जबलपूर येथे विनोदी अभिनय या कला प्रकारात सहभाग घेऊन सुवर्णपदक प्राप्त केले आहे. राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तुळजापूर महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि दिग्दर्शक पुरस्कार,राज्यस्तरीय कंटक सेवाभावी संस्था परभणी, कलारत्न पुरस्कार, राज्यस्तरीय शाहू फुले आंबेडकर जयंती उत्सव समिती जाफराबादतर्फे समाजभूषण पुरस्कार, भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमीचा राष्ट्रीय पातळीवरील उस्ताद बिस्मिल्लाह खान युवा पुरस्कार, अखिल भारतीय नाट्य परिषद बोरीवली कलारंग पुरस्कार, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे फाउंडेशन पुणे द्वारा कलारत्न पुरस्कार, राज्यस्तरीय बालगंधर्व परिवार पुणे द्वारा लोक गंधर्व पुरस्कार, अण्णाभाऊ साठे संयुक्त जयंती उत्सव समिती कल्याण द्वारा साहित्य रत्न पुरस्कार, एकता कल्चरल फाउंडेशनचा विठ्ठल उमप स्मृति लोकरंग पुरस्कार, यशवंत प्रतिष्ठान, अंबड जालना येथील राज्यस्तरीय यशवंत पुरस्कार असे विविध पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. आपल्या या नेत्रदीपक वाटचालीचे श्रेय चंदनशिवे सर त्यांचे आईवडील, सर्व गुरुजन, सहकलाकार आणि त्यांच्या पत्नीला देतात.

स्वतः पुरतंच जगण्याच्या आजच्या काळात प्राध्यापक डॉक्टर गणेश चंदनशिवे सर लोक कला, लोक कलाकार यांच्या प्रगतीसाठी झटत आहेत, हे त्यांचं अतिशय महत्त्वाचं योगदान आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा.

देवेंद्र भुजबळ

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

उज्ज्वला केळकर on पाऊस : काही कविता…
उज्ज्वला केळकर on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on कथा
सौ. सुनीता फडणीस on विमान “अपघात” की “घातपात” ?
सौ. सुनीता फडणीस on हे असं कां होतं ?