अष्टपैलू व्यक्तिमत्त्व लाभलेल्या सुरेखा गावंडे हिची यशकथा...
नोकरदार गृहिणी ते कवयित्री, लेखिका, गीतकार, अभिनेत्री, गिर्यारोहक, समाजसेविका असा यशस्वी प्रवास करणाऱ्या सुरेखा गावंडे कल्याण पूर्व मध्ये गेल्या ३६ वर्षांपासून वास्तव्यास आहे.
घरातील काम करून नोकरीसाठी करावा लागणारा प्रवास त्यातून वेळ काढत ती आपल्या कवितेचं प्रेम जपत आहे. कल्याण ते छत्रपती महाराज शिवाजी टर्मिनस या लोकल ट्रेन मधील प्रवासातच तिला निसर्ग कविता तर मुलीच्या जन्मानंतर बाल कविता सुचत गेल्या आणि या आपल्या कविता संग्रहात छानपैकी उतरवल्या.
सुरेखाचं बालपण मुंबईत गिरगावातील दिव्याची चाळीत गेले, तर काळबादेवी शाळा आणि शिरोडकर हायस्कूल चिकित्सक शाळेत तिचे शिक्षण झाले.
श्री अशोक गावंडे यांच्याबरोबर १९८४ साली तिचा विवाह झाला आणि ही मुंबईची पोर कल्याणची सून झाली. संसार थाटला. मुलं मोठी झाली. त्यानंतर तिने आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
सुरेखाने ३७ वर्ष महानगर टेलिफोन निगम लिमिटेड मध्ये नोकरी करत आपल्या कविता फुलवल्या. कार्यालयीन कामकाज सांभाळता सांभाळता कविता लेखन म्हणजे तारेवरची कसरत होती. ऑफिसच्या संचार कार्यक्रमात कविता सादर करता करता आंतरराष्ट्रीय कवी संमेलनापर्यंत तिने मजल मारली.
महाराष्ट्र शासनाच्या सुगम भारती इयत्ता आठवीच्या पाठयपुस्तकात “कोळ्याची पोर” ही तिची कविता समाविष्ट करण्यात आली आहे.
“पहिला पाऊस, पहिलं प्रेम” या मराठी गाण्यांचा अल्बममध्ये गीत लिहिण्यापासून, अभिनयापर्यंत तिने काम केले. “संजलची दंगल”, “सवंगडी” हे तिचे बाल काव्यसंग्रह “सांजवेळ”, “साक्षी” हे कवितासंग्रह तर “सह्याद्रीची लेख हिमालयाच्या कुशीत” हे प्रवासवर्णन ही तिची साहित्य निर्मिती उल्लेखनीय आहे.
सवंगडी या बालकाव्य संग्रहातील गीते आकाशवाणीच्या अस्मिता आणि गंमत जंमत चॅनेलवर प्रसारित झाली आहेत.
सुरेखा आठ ते दहा वर्षापासून नाट्यसृष्टीत कार्यरत आहे, तर आकाशवाणी, दूरदर्शनवर तिचे कथावाचन, काव्यवाचन झाले आहे. अनेक नियतकालिके, दिवाळी अंक, वर्तमानपत्रामधून तिचे लेख प्रकाशित झाले आहेत.
तिने मराठी चित्रपटासाठी गीतलेखनही केले आहे .
सुरेखाच्या उल्लेखनीय कार्याबद्दल अनेक संस्थांनी तिचा गौरव केला आहे. त्यातील काही ठळक पुरस्कार म्हणजे नवी दिल्ली येथे “राष्ट्रीय साहित्य गौरव पुरस्कार” , शिर्डी येथे “जीवनगौरव पुरस्कार”, मुंबई येथे “नेल्सन मंडेला राष्ट्रीय पुरस्कार”, पुणे येथे “महाराष्ट्र साहित्य भूषण शिवरत्न पुरस्कार” मुंबई येथे “सुजन साहित्य पुरस्कार”, कल्याण येथे “सलाम संविधान पुरस्कार”, पुणे येथे “साहित्यरत्न पुरस्कार” इंदापूर येथे “राष्ट्र शाहीर अमर शेख पुरस्कार” हे होत. महाराष्ट्रात तसेच देशाच्या राजधानीत या कवियत्रीच्या कवितांचा सन्मान झाला आहे.

सुरेखा कुटुंबीय आणि वरिष्ठ, सहकारी यांनी केलेल्या सहकार्याचा कृतज्ञतेने उल्लेख करते. आपल्या साहित्याच्या माध्यमातून निसर्गावर प्रेम करण्याचा, माणुसकी जपण्याचा संदेश देणाऱ्या सुरेखाच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
– लेखन : अलका भुजबळ. 9869484800.
अप्रतिम काव्यलेखन केले आहे तुम्ही तुमच्या काव्यातून, मला संजलची दंगल हा कविता संग्रह लहानपणा पासूनच खूप आवडतो. खूप साऱ्या आमच्या बळवायातल्या भावना व्यक्त केल्या जाणाऱ्या काव्य त्यात मांडले आहे..
खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आत्या भावी जीवनाबद्दल, अशीच उत्तुंग झेप घेत रहा आणि यशाला गवसणी घालत रहा..