“तार“
“भांडारकर गल्ली, सखाराम वाडी जवळ, अमळनेर.” येथील भल्या मोठ्या घरात आयुष्याच्या एका नव्या टप्प्यात मी स्वतःला सामावून घेण्याचा प्रयत्न करत होते. “प्रयत्न” हा शब्द मी अशासाठी वापरला की कुठलाही बदल, कुठलेही नवीन वातावरण, भोवतालची नव्या नात्याने जोडली गेलेली माणसं यांच्याशी जुळवून घेताना मनात काहीशी घालमेल होणे हे स्वाभाविकच असते आणि आपल्या कुटुंबात येणाऱ्या नव्या व्यक्तीला सांभाळून घेण्याचं त्यांनाही काहीसं आव्हानात्मकच असतं. एक अवघड वळण असतं सर्वांसाठीच. या सुरुवातीच्या वळणावर आयुष्याची पुढची योग्य दिशा ठरत असावी. स्वभाव, संस्कृती आणि संस्कार यांच्या प्रात्यक्षिकाची एक कठीण परीक्षा असते असं म्हटलं तर गैर ठरु नये.
एक दिवस याच वरील पत्त्यावर एक तार आली. तार म्हणजे आणीबाणीच. शक्यतो तारेतला मजकूर हा सुखद नसतोच. त्यामुळे घरात पोस्टमन तार घेऊन आल्यामुळे संपूर्ण खेळीमेळीच्या वातावरणात एक तणाव निर्माण झाला. बैठकीच्या खोलीत नित्यनियमित कामकाजात व्यग्र असणाऱ्या आबांनी (माझे सासरे) जडावलेल्या हाताने पोस्टमन कडून तार घेतली आणि बाहेरूनच त्यांनी माझ्या सासूबाईंना हाक मारली. ”माई ठाण्याहून ढग्यांची तार आली आहे ग.!”
हातातलं काम सोडून आई उंबरठे ओलांडत बैठकीच्या खोलीत पटपट आल्या. त्यांच्याबरोबर आम्ही सारेच जे घरात होतो तेव्हढे.
आई आबांना म्हणाल्या, ”उघडा तरी. वाचल्याशिवाय कसं कळेल ?”
त्यांनी लगेच माझाही हात धरला. मी खूप घाबरले असणार असे समजून, मला धीर देण्यासाठी. मी घाबरले होतेच मनातून. “पप्पांनी तार का केली असेल ? जीजी बरी असेल ना ?”
आबांनी तार उघडली आणि मोठ्याने वाचूनही दाखवली.
तारेत लिहिलं होतं, ”बाबी ! इथे पाऊस सुरू झालाय आणि तू लावलेल्या सोनटक्क्यांच्या रोपांना खूप फुले आली आहेत. त्या दरवळणाऱ्या सुगंधात तूच आहेस असं वाटतं.”
तारेतला मजकूर ऐकल्यानंतर क्षणभर सारे स्तब्ध झाले. हायसंही वाटलं आणि दुसऱ्याच क्षणी सगळ्यांना हसूही आले. मला आता आठवत नाही पण त्या गमतीच्या आणि हास्यभरल्या वातावरणात माझे डोळे ओलसर झालेच असणार.
“किती गं घाबरवलं तुझ्या पप्पांनी.” असं म्हणत सासूबाई परत घरात वळल्या.
पण त्यानंतर माझ्या सासरच्या लोकांना पप्पांच्या तारांची सवय झाली. विचार करा .. त्यावेळी टेलिफोन सुद्धा घरोघरी नसत. संपर्क यंत्रणा खूपच दुर्बल होती. पत्र पोहोचायलाही तीन-चार दिवस लागत मग दूरच्या व्यक्तीला मनातलं ताबडतोब पोहोचवण्याचं एकमेव साधन म्हणजे तार.
पप्पांच्या त्यानंतर आलेल्या तारा मात्र आबा थेट मलाच देत. ”वाच” म्हणत, पप्पांच्या तारांत काय असायचं ?
“आज अनुराधा अंकात तुझी कथा आली आहे तुला अंक पाठवायची व्यवस्था करतो.”
“आज मासळी बाजारात तुला खास आवडणारी अगदी ताजी तडफडीत जिताडी आणि शेताडी कोलंबी मिळाली.”
“आज निचुकलीने (धाकटी बहीण) तुझ्यासारखी खांडवी करायचा प्रयत्न केला. तिला सांगू नकोस पण नाही जमली तिला.”
अशा अनेक तारा! आज वाटतं मी त्या का नाही जपून ठेवल्या? तार पाठवताना पप्पांनी कधी शब्दसंख्या, त्यांना लागणारे पैसे याचा विचारही केला नसावा. सासरी गेलेली आपली मुलगी आनंदात आहे ना यासाठी लेकीच्या बापाचा जीव किती तळमळतो याचा तो एक हृद्य अनुभव होता. कदाचित त्यांच्या मनात माझ्या विषयीच्या प्राथमिक शंकाही असतील. अत्यंत मुक्त, स्वतंत्र वातावरणात वाढलेली, काहीशी उद्धट, बंडखोर, पटकन मत देऊन मोकळी होणारी आपली ही कन्या तिथल्या शांतताप्रिय, मितभाषी, विविध नात्यांच्या गोतावळ्यात रमेल का ?
माझी पाठवणी करताना पप्पांनी विलासना एका कोपऱ्यात नेऊन सांगितलं होतं, ”माझं हे मौल्यवान रत्न आहे. तुम्ही काळजीपूर्वक सांभाळाल, त्याचा मान राखाल याचा मला विश्वास आहे.”
“स्त्री” म्हणजे काय असं जर मला कोणी विचारलं ना तर मी म्हणेन ”सासर आणि माहेर यात भिन्नपणे विभागले गेलेले एक संतुलित व्यक्तिमत्त्व. सून आणि कन्या यातली सूक्ष्म रेषा ओळखणारी, जाणणारी एक समंजस व्यक्ती.”
आणखी एक. पप्पा एक प्रेमळ पिता तर होतेच पण सासरी गेलेली आपली कन्या म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत “आपली जबाबदारी” हे मानणारे होते तिच्या आयुष्यात जर काही उलट सुलट घडलेच तर तिच्या पाठीशी उभं राहणं हे “त्यांचं कर्तव्य” असे मानणारे होते. ही पिता म्हणून त्यांची भूमिका होती. पप्पा म्हणजे नेहमीच आमच्यासाठी एक अभेद्य सुरक्षा कवच होतं हे नक्कीच.
आज मागे वळून पाहताना आणि वैष्णवी सारख्या अभागी मुलींच्या बाबतीत घडणाऱ्या घटना वाचल्या की मनात विचार येतो विवाह म्हणजे एक “अंधारातील उडी आहे” त्याबाबतीत मी किती भाग्यवान ठरले ! सुदैवाने अशा कुठल्याही माणसातलं माणूसपण हरवल्याचा अनुभव देणाऱ्या घटनांना सामोरे जाण्याची कधीही वेळ आली नाही. अत्यंत साध्या, सुसंस्कृत, सुंदर विचारसरणीच्या कुटुंबात माझं भविष्य आणि आयुष्य नेहमीच सुरक्षित राहिलं. माझ्यातल्या “मीपणालाही” कधीही धक्का पोहोचला नाही.
मी नेहमीच म्हणते जडणघडणीची प्रक्रिया ही कधी संपत नाही. केवळ धर्माने जुळली गेलेली ही “आपली माणसं” ..यांनीही मला जीवन जगण्याची कलात्मक टिपणं नेहमी दिली हे निश्चित.

— लेखन : राधिका भांडारकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800