श्री. देवेंद्रजी भुजबळसाहेब, आपला “माणूसकी हाच परमार्थ” हा लेख वाचून माझ्याही मनात काही विचार आले. ते मी पुढील लेखात मांडत आहे.
माणसामाणसात मीपणा व अहंकार एवढा वाढला आहे की मानवाची वाटचाल सुखापेक्षा दुःखा कडेच जास्त होत आहे. माणसाला जीवन सुंदर व सुखी करायचे असेल तर माणसाने माणुसकी जपत एकमेकांच्या जवळ येणे अधिक गरजेचे आहे.
माणसं जोडताना एक लक्षात असू द्या, प्रत्येक झाडाने फळ दिलंच पाहिजे असे नाही तर काही झाडं ही सावली साठी राखून ठेवावी लागतात.
या दुनियेत एकही असा माणूस नाही ज्याच्या जीवनात दुःख, अडचणी नाहीत. आपण साधारण मनुष्य आहोत. सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या घडतील ही समजूत दुःखाला कारणीभूत ठरते. जे आपण पेरतो तेच उगवत असतं. गहु पेरला तर ज्वारी उगवणार नाही की बाजरी, तर गहूच उगवणार. म्हणून चांगल्या गोष्टींचा पुरस्कार करा. आपण चांगले तर जग चांगले. म्हणूनच चांगले वागा.
गेली दोन वर्षे सगळं जग करोना ने आस्थिर झाले आहे. सर्वत्र एकच धुमाकूळ घातलाय. माणूस माणुसकी विसरत आहे. जगामध्ये सर्वत्र अंधाधुंदी आहे. कोणी कोणास विचारत नाही. कोणी कोणाच्या उपयोगी पडत नाही. पडलाच तर काही स्वार्थ पोटी उपयोगी पडतो.
आजच्या या आधुनिक युगात तर माणसे एवढी प्रचंड वेगवान झाली आहेत की त्यांच्या जवळ दुसऱ्या साठी सोडाच परुंतू स्वतः साठी देखील वेळ नाही आणि एवढं सगळं असून ही तो सुखी नाही. आज लोकांना काहीही न करता पैसा हवा, काहीही न करता मौज मजा तर हवीच पण तितकीच प्रसिध्दी हवी आहे, या मधे एवढी प्रचंड स्पर्धा आहे केवळ प्रसिध्दी साठी आपल्या विचारांना आणि कृतीला तिलांजली देऊन वाट्टेल त्या मार्गाने प्रसिध्दीचं वलय निर्माण करतात आणि मी हे केले, मी ते केले असा “मी पणा” सांगावा लागतो येथेच माणसाची खरी हार होते. अशी माणसे जीवनात फारशी यशस्वी होत नाहीत. अशी माणसे कोणाच्या अडीअडचणीस उपयोगी पडत नाहीत. परंतू आव असा आणतात की हे झाले, ते झाले माझ्या मुळेच. प्रत्यक्षात त्यांचा काडीचा संबंध नसतो.
अशी माणसे समाजात, मित्रामित्रात आपलेपणा न ठेवता मीपणा निर्माण करतात. वॉट्सॲपवर सुंदर सुंदर पोस्ट फॉरवर्ड करतात पण कृती शून्य ! केवळ आले म्हणून पुढे सरकवले असे करणारे कमी नाहीत.
अरे आज आपण आपल्या चांगल्या गोष्टींचा पुरस्कार करणार आहोत की नाही ? आज जगाने एवढी मोठी प्रगती केली, विज्ञान व तंत्रज्ञान पुढे गेले पण माणूस मात्र माणुसकी विसरत आहे. एकमेकापासून दूर गेला आहे. सुखाच्या शोधात धावत आहे. पण ते कसे मिळणार ? आयुष्यात खूप काही जुळवण्या कराव्या लागतात. मनासारखं मनातील प्रत्येक गोष्ट सांगण्याचे एकमेकांना सुख दुःख व्यक्त होण्याचं एकच ठिकाण ते म्हणजे जवळचा मित्र ! त्यामुळे अशा माणसाबरोबर रहा जे आपल्या वेगळ्या कल्पना आणि केवळ आपल्या ध्येया बदलच बोलत असतात जे निस्वार्थीपणेन वागतात. अशा माणसा बरोबर नको की जे इतर माणसाबद्दल नकारात्मक बोलत असतात.
जपणं आणि साठवण यात फरक आहे. साठवली जाते ती दोलत आणि जपली जातात ती चांगली माणसं. केवळ अहंकार व मीपणा यात एवढाच फरक आहे की मीपणा, अहंकार नेहमी इतरांना झुकवण्यात आनंद मानतो आणि जो मीपणा सोडून नेहमी स्वतः झुकून इतरांना मोठेपणा देण्यात आनंद मानतो त्याचं नाव संस्कार.
होय, जागे व्हा. अजूनही वेळ गेलेली नाही. एकमेकांच्या अंगावर धाऊन न जाता प्रेमाने जवळ या. मीपणा सोडून एकमेकांच्या उपयोगी पडा. चांगल्या विचारांनी प्रेरित होऊन चांगले जग निर्माण करा. निशित्तच सुखी व्हाल. आपल्या मनात इतरा विषयी चांगले विचार, चांगल्या भावना ठेवल्या तर इतरांच्या मनात आपण घर करू. इतरांच्या ह्रुदयात स्थान मिळवू. क्षणाला क्षण अन दिवसाला दिवस आयुष्य पुढे सरकत असते. कधी तरी कुठे तरी, केव्हा तरी असा क्षण येतो, जो आपले अख्खं आयुष्य बदलून टाकतो, फक्त तो ओळखता आला पाहिजे आणि तो क्षण स्वीकारण्याची आपली मानसिकता ठेवली पाहिजे.
सुख ही एक मानसिक सवय आहे. ती लावून घेणं आपल्याच हातात आहे. तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकं च तुम्हीच सुखी राहाल तुमच्या सुखी राहण्यावर केवळ तुमचाच अधिकार असतो इतर लोक तुम्हाला दुःख देऊच शकत नाही ही गोष्ट एकदा काय लक्षात आली की तुमचं जगणं अधिक सोपं होईल. यालाच आयुष्य जगणे म्हणतात. म्हणूनच मनाचा मीपणा सोडून मन मनमोकळे आणि स्वच्छ ठेवा आनंदी रहा निरोगी राहा नक्कीच तुमचे जगणे सुंदर होईल.

– लेखन : दीपक जवकर.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800