सुरेश देशपांडे आणि मी सकाळी लौकरच चंद्रपूर मधून निघालो आणि १० घ्या सुमारास आलापल्लीला पोहोचलो. तेथील कांहीं मित्रांबरोबर चहाच्या टपरीवर गप्पा मारत चहा घेणे चालले असतानाच अहेरी-भामरागड बस आणि बल्लारपूर पेपर मिलचा (बिल्टचा) एक ट्रक नाक्यावर येवून उभा राहिला.
त्या ट्रक मधून उतरलेला एक इसम टपरीकडे येत सुरेशला म्हणाला, ‘अरे सुरेश कहॉं प्रकाश आमटेजीके यहॉं जा रहा है ? मैं बास लेने कुवाकुडी जा रहा हूॅं, हेमलकसा-भामरागडसे लाहेरी होकर सामने जाऊंगा | चलो हमारेसाथ, गप्पे लडाते आरामसे जायेंगे |’ सुरेशने माझा त्यांच्या बरोबर परिचय करून दिला, आम्ही बस सोडून दिली आणि ट्रकच्या केबीनमध्ये जाऊन बसलो. गप्पा मारत आमचा प्रवास सुरू झाला. आलापल्ली सोडताच जंगल सुरू झाले.
आम्ही ज्या व्यक्तीबरोबर निघालो त्यांचे नाव होते ‘शेरू’! ते बिल्टचे डीएफ्ओ तर होतेच शिवाय बिल्टचे ट्रान्सपोर्ट मॅनेजर म्हणून काम करीत होते. चंद्रपूरच्या सर्वच जंगलात त्यांना सातत्याने फिरावे लागत असल्याने हिंदी प्रमाणे आदिवासींच्या माडिया व गोंडी या दोन्ही भाषा शेरूना चांगल्याप्रकारे अवगत होत्या. त्यामुळे ते सर्वच आदिवासीं बरोबर सहज संवाद साधू शकत होते. आलापल्ली ते भामरागड प्रवासात शेरूसाहेब माहिती सांगत होते, “आलापल्लीच्या या जंगलाला ‘ग्लोरी ऑफ आलापल्ली’ म्हणून ओळखले जाते. फक्त सागवानाच्या झाडांचे आशिया खंडातील हे एकमेव मोठे जंगल आहे.
या जंगलातील झाडे तोडून रस्ता करायला वन-विभाग परवानगी देत नसल्याने येथे रस्ता होऊ शकत नाही. शिवाय रस्ता करायला इथले आदिवासी प्रचंड विरोध करतात. त्यामुळे वृक्षा-वृक्षांमधून असा फुफाट्याचा व वळणा-वळणांचा रस्ता आमच्या वाहनांमुळे दरवर्षी तयार होतो, त्यामुळे वाहन चालकांची खरी कसोटी अनुभवायला मिळते. (आज हा संपूर्ण रस्ता तयार झाला आहे.) अक्षरशः होडी सारख्याच चालणाऱ्या आमच्या ट्रकचा अनुभव आम्हाला मिळत होता.
या जंगलाच्या मध्यभागी सहा चौरस किलोमीटरच्या भागात ११५ ते १२० फूट उंचीचे सागवानाचे सरळसोट अनेक वृक्ष आहेत. तेथे ट्रक थांबवून आम्ही ते वृक्ष जवळ जाऊन बघितले. दोघा-तीघांनी कडे करून सुद्धा त्या वृक्षांचे खोड कवेत येत नव्हते. येथे राहणाऱ्या आदिवासींनी तिथले सर्व पक्षी मारून खाल्ले असल्याने त्या जंगलात कावळा सुद्धा दिसत नाही.
आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र या तीन राज्यांनी एकत्र खर्च करून “इंचमपल्ली व भोपालपट्टणम्” अशी दोन धरणे याभागात बांधण्याचा घाट घातला आहे. ही धरणे झाली तर त्यांच्या पाण्याचा फायदा आंध्र व मध्यप्रदेशाला होईल, पण त्यांचे ‘बॅक वॉटर’ (साठा) मात्र महाराष्ट्राच्या या जंगल परिसरात साठवले जाईल, आणि “ग्लोरी ऑफ आलापल्लीचे हे संपूर्ण जंगल व इथली आदिवासी जमात पूर्ण नष्ट होईल.
त्यामुळेच या जंगलाला वाचविण्यासाठी मा. बाबा आमटे यांनी “चिपको आंदोलन” करायचे ठरविले आहे. हेमलकसा येथील आदिवासी मेळाव्याला येणारा आदिवासी बांधव, ‘आम्ही चिपको आंदोलन करून हा परिसर वाचवू.!’ अशी शपथ घेऊन बाबा आमटे यांच्या आंदोलनात सहभागी होणार आहेत. ही माहिती सुरेश आणि शेरू यांच्या गप्पांमधून मला मिळाली. नंतर आमटेंनी चिपको आंदोलन यशस्वी केले आणि परिणामी इंचमपल्ली व भोपालपट्टणम् ही दोन धरणे बांधायची नाहीत, असा शासनाने निर्णय घेतला. धरणे झाली नाहीत, आणि ग्लोरी ऑफ आलापल्ली व तेथील आदिवासी जमात वाचली ती बाबा आमटे यांच्या “चिपको आंदोलनामुळे.!’
आमचा प्रवास चालू असतानाच एका आदिवासी पाड्याजवळ चार-पाच सशस्त्र नक्षलवादींनी आमचा ट्रक थांबवला. आम्ही दोघे खूप घाबरलो, पण शेरूसाहेब मात्र सराईतपणे खाली उतरले, त्यांच्या बरोबर कांहीं बोलणी करून परत आले, आमचा प्रवास पुन्हा सुरू झाला. आम्ही बस ऐवजी बिल्टच्या ट्रकने निघालो त्यामुळेच आम्ही सशस्त्र नक्षलवादी पाहू शकलो.. .. त्यांची भाषा अवगत असलेल्या शेरूसाहेबांमुळेच आम्ही तिथून सुखरूप निसटलो. मात्र एक थरारक अनुभव आम्ही अनुभवला.

– लेखन : प्रा.विसुभाऊ बापट. दादर, मुंबई.
(सादरकर्ते – कुटुंब रंगलंय काव्यात)
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
कसला थरारक अनुभव लिहिला आहेत आपण! कुटुंब रंगलंय काव्यात या कार्यक्रमाच्या निमित्ताने अशा सर्व अनुभवांनी आपले आयुष्य समृद्ध झाले आहे! चिपको आंदोलनाबाबत अशा पडद्या मागे घडलेल्या गोष्टी पण तुमच्यामुळे समजल्या! मस्त लेख!👌👌
खुप थरारक अनुभव ,,लिहिला आहे गडचिरोलीच्या शक्षलवाद्यांना जवळून पाहने म्हणजे एक दिव्यचं
मस्त लेख 👌👌👌👌
🌹सुंदर लेख, सहज मन मोकळे पणाने लिहिले आहे.
गडचिरोली, भामरागड याची माहिती मिळाली. आपण महाराष्ट्र मध्ये राहतो परंतु तिकडे सहसा कोणी फ़िरकत पण नाही 🌹
🌹धन्यवाद सर 🌹