Tuesday, June 17, 2025
HomeUncategorizedपणती जपून ठेवा

पणती जपून ठेवा

सध्या आपण एका काळ्या कालखंडात जगत आहोत. आपण अजूनही प्रकाशाच्या शोधात आहोत.

मंडालेच्या तुरुंगवासात लोकमान्य टिळकांनी लिहिलेले गीतारहस्य, स्वातंत्र्यवीर सावरकरानी अंदमानला कोठडीच्या भिंतीवर लिहिलेले कमला काव्य, ब्रिटिश सरकार विरुद्ध महात्मा गांधीजींनी केलेला मिठाचा सत्याग्रह, वयाच्या १६ व्या वर्षी ज्ञानदेवांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी, तुकोबाच्या गाथा या सर्व काय सांगतात आपल्याला?

किती तरी खूप प्राणांतिक यातना, कष्टमय जीवन, हालअपेष्टा, झालेला मानसिक छळ सोसूनही यातून चार अंगुळी वर उभे राहून खुप प्रेरणादायी काम केलय या महामानवांनी. यातून आपण काहीच बोध घेऊ शकत नाही का?

कबूल आहे, आताच्या काळात अशी थोर माणसे आपल्या समोर नाहीत. पण तरीही आजूबाजूला चाललेल्या कोलाहलातुन शांतपणे, संयम ठेवून वाट आपल्याला काढायची आहे. आपली अंतर्यामीची ताकद वाढवायची आहे. कोणाच्या सांगण्यावरून बहकून जायचे नाही. हिंसेचा वापर न करता एकमेकांच्या सहकार्याने ही वाटचाल करावी लागणार.

आपण समाजात मिळून मिसळून राहणारी माणसे आहोत. भले या कोरोनामुळे सध्या अंतर ठेवून मास्कच्या मुखवट्यात वावरतोय. मात्र या परिस्थितीत आपापसात जोडून सर्वाना पुढे घेऊन जायची आपली उर्मी नाही घालवायची.

शेजारी अडचणीत असेल तर त्याला आपण मदतीचा हात तर देतोच. स्वाभाविकपणे व त्याच वेळेस आपण सुखात असल्याचे प्रदर्शनही करत नाही. आलेल्या या वादळाने आपण सर्व बावचळून गेलोय. सर्व स्तरावर आलेले आर्थिक संकट व लोकांच्या आरोग्यावर पडलेला घाला, हे सर्व सुधारणे यात खूप काळ जाणार.

सरकारने आपल्यावर घातलेली बंधने अंतिम मानून ती पूर्णपणे पाळली पाहिजेत. त्यावर टीका करण्यात वेळ घालवण्यापेक्षा, हे आपल्या सर्वांच्या हिताचे समजून त्यांच्यावर विश्वास टाकून सहकार्य केले पाहिजे.

पूर्वी चाळीत असणारा एकोपा, हा फ्लॅट/टॉवर संस्कृतीत येताना आपल्या सामानासह आपल्या बरोबर आला पाहिजे. आपले शेजारी, घरकाम करणारी बाई , सोसायटीचा स्टाफ , मुनिसिपालिटीचे स्वछता कर्मचारी यांच्या अडचणीत सहानुभूतीचा व मदतीचा धागा बांधला तर राखी पौर्णिमा वेगळी साजरी करावी लागणार नाही .

आजकाल आलेला नात्यातील दुरावा व्हाट्सएपच्या औपचारिक, कृत्रिम विचारपुसीच्या पल्याड खरीखुरी मदत करून घालवता येईल.

कोरोनाने खूप काही दिले आहे. ते बघण्याकरिता आपल्या चष्म्याच्या काचा पुसून घ्याव्या लागतील. लहानग्या चिमुकल्यानी खूप काही सोसलय. तरीही आहे त्या वातावरणात ती आनंदात वावरतात. ती निरागसता त्यांच्यात टिकून राहण्याकरिता आपल्याला मुलांचा अधिक वेळ सहवास दिलाय तो ‘वर्क फ्रॉम होम’ मुळे त्यांच्याजवळ अधिक प्रेमाने राहू शकतो.

तसेच घरातील वृद्ध व्यक्तींची देखभाल आपण अधिक व्यवस्थित, प्रेमाने, आस्थेने करू शकतो. आपण बधिरतेचे नाना मास्क लावत होतो ते आता गळून पडलेत. घरात येणाऱ्या नको त्या वस्तू व कपड्यांचे शॉपिंग थांबले. करमणुकीच्या नावावर तरुण मुलामुलींचे रात्री बेरात्री बाहेर भटकणे बंद झाले.

पूर्वीचे स्वच्छतेचे व काटकसरीचे संकेत आता आपण पाळतोय. पैशाची ताकद कळली. पण त्याचबरोबर त्याची मर्यादाही उमगली की सर्व गोष्टी पैशात विकत घेता येत नाहीत. काहींना आपण इतकी वर्षे मनाच्या तळाशी दाबून ठेवलेले छंदही पुकारू लागलेत.

कामाचा ताण व भीषण वेग यापूर्वी मनाला चक्रावत होता. त्यातून निर्माण होणारे काही आजार याला आता रोकता येते हेही लक्षात आले. एखादी गाडी जर सतत वापरात असली तरीही तिला सर्व्हिसिंग लागतेच ना? मग आपण तर माणसेच! थोडे थांबणे गरजेचे होते.

स्वतःवर कधीही हवा तसा खर्च करतो, पण कधीतरी दुसऱ्याला अगदी अनोळखी गरजूला मदत करून बघा, अधिकच आनंद होईल त्या पैशातून. कोणताही धर्म याहून वेगळे सांगत नाही.

या संकटात अगणित सोनू सूद माणुसकीचे दिवे लावत आहेत. गरिबांच्या अंधारवाटेवर कोरोनावर मात करण्यासाठी डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, पोलीस, अन्य सरकारी यंत्रणा रात्रंदिवस जीवाचे रान करून कोणी संशोधनातून, कोणी त्यागातून अपरिमित प्रयत्न करीत आहेत. हे करीत असताना त्यातील कोणाच्या हातून अति ताणामुळे काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त करण्याची संधी देऊन त्यांना सांभाळून घेतले पाहिजे.
हा सेतू पार करण्याकरिता त्यातील आपलाही खारीचा वाटा प्रत्येकाने उचलला पाहिजे ना!

कोरोना होऊ नये म्हणून जशी लस टोचून घेतो तशी ही संवेदनेची व दुसऱ्याच्या वेदना समजून घेण्याची ही लस टोचून घ्यावी. गौतम बुद्धांनी म्हटलंय “तूच तुझा दीप होणार”. आपल्या अंतःकरणातील तो दिवा प्राणपणाने जपू या. त्याचबरोबर इतरांच्या दिव्यातील काजळी दूर करण्याचा प्रयत्न करू या. अशा एकीतून स्नेहभावनेने, प्रेमाने एकमेकांचे हात मनाने घट्ट पकडून या. सत्प्रवृतीच्या आणि माणुसकीच्या साखळीतून एकमेकांना जोडून घेऊया.

हे संकट देवाने, निसर्गाने आपल्याला सुधारण्याची दिलेली संधी समजून त्याचे सोने करू या. हे जग खूप चांगल्या माणसांनी बद्ध आहे व आपण त्यातील एक छोटीशी कडी आहोत या विचाराने चालत राहू या.

लेखिका अंजली जोशी

– लेखन : अंजली जोशी.
– संपादन :  अलका भुजबळ. 9869484800.

Devendra Bhujbal
Devendra Bhujbalhttps://newsstorytoday.com
Contact Me : +919869484800 Mail Me : devendrabhujbal4760@gmail.com
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments