महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार वितरण सोहळा नुकताच पुणे येथे संपन्न झाला. या सोहळ्यास समक्ष उपस्थित राहून मेघना साने यांनी पुरस्कार विजेत्यांच्या योगदानाचे वृत्तान्त २ भागात लिहिले आहेत. त्यापैकी आजचा हा पहिला भाग….
– संपादक
महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार वितरण सोहळा हा सुनील देशमुख यांच्याशिवाय कधी झालाच नव्हता. सुनील देशमुख पुरस्कार सोहळ्याला प्रत्येक वेळी उपस्थित तर राहायचेच शिवाय पुरस्कारप्राप्त माननीय व्यक्तींना फोन करून त्यांच्या कामाचे कौतुकही करायचे. आज त्यांची अनुपस्थिती सर्वांना जाणवत होती. वरकरणी सर्व आयोजक व पुरस्कार घेणारे आनंदात दिसत असले तरी सर्वांच्या मनात एक सन्नाटा पसरला होता. ज्यांच्यामुळे हे महाराष्ठ्र फाउंडेशनचे पुरस्कार सुरु झाले ते काही दिवसांपूर्वीच अनंतात विलीन झाले होते. त्यांची आठवण म्हणून व्यासपीठावरच त्यांचे एक प्रसन्न असे कटाऊट लावले होते.
सुनील देशमुख या अमेरिकेत स्थायिक झालेल्या महाराष्ट्रीयन इंजिनियर माणसाने १९९४ व १९९६ साली आपल्या उत्पन्नातील एकूण दोन कोटी रक्कम महाराष्ट्र फाऊंडेशनला देऊन महाराष्ट्रातील लेखक व सामाजिक कार्यकर्त्यांना पुरस्कार मिळावे अशी योजना करण्याची विनंती केली. त्याप्रमाणे गेली २८ वर्षे साहित्यिकांना आणि २६ वर्षे सामाजिक कार्यकर्त्यांना नियमितपणे पुरस्कार दिले जात आहेत.
या पुरस्कारांसाठी अमेरिकेत एक निवड समिती असते. भारतातील निवड समितीकडून त्यांच्याकडे नांवे जातात. त्यापैकी अंतिम निवड अमेरिकेतच होत असते. निवड करताना समाजाला पुढे घेऊन जाणाऱ्या विचारांना प्राध्यान्य असते.
यंदाचे पुरस्कार दि. २८ जानेवारी २०२३ रोजी टिळक स्मारक मंदिर, पुणे येथे दिले गेले.
ही तारीख जपून ठेवून मी मुंबईहून पुण्याला जाऊन या समारंभाला उपस्थित राहिले. बरोब्बर ५ वाजता मी सभागृहात शिरले तेव्हा सभागृह अर्धे पाऊण भरलेलेच होते. काही क्षणातच ते खच्चून भरले. पुण्यातले अनेक मान्यवर लेखक तसेच साहित्य रसिक कार्यक्रम सुरु होण्याची वाट पहात होते. आणि तो अगदी वेळेवर सुरु झाला देखील.
व्यासपीठावर अमेरिकेतील शोभा चित्रे, विख्यात लेखक भालचंद्र नेमाडे, महाराष्ट्र फाउंडेशनचे अध्यक्ष
श्री. राजीव भालेराव, साधना प्रकाशनचे श्री. विनोद शिरसाट आणि पुरस्काराचे मानकरी विराजमान होते.
हा कार्यक्रम महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळ (मासूम – MASUM) आणि महाराष्ट्र फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला होता. अर्थात ‘साधना ट्रस्ट’चे ही योगदान होतेच. ‘मासूम’ संस्थेच्या डॉ. मनीषा गुप्ते यांनी प्रास्ताविक केले.

जीवन गौरव पुरस्कार
कथा-कादंबरीच्या क्षेत्रात लक्षणीय आणि विपुल कामगिरी बजावलेले रंगनाथ पाठारे यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. १९९४ साली महाराष्ट्र फाऊंडेशनचे पुरस्कार सुरु झाले. त्या पहिल्याच वर्षी रंगनाथ पाठारे यांच्या ‘ताम्रपट’ ला पुरस्कार मिळाला होता. ‘दिवे गेलेले दिवस’ ते ‘सातपाटी कुलवृत्तांत’ (२०१९) अशा एकूण चौदा कादंबऱ्यांतून मराठी कादंबरी लेखनाचा बहुस्तरीय अवकाश व्यापणारा हा लेखक! ‘कथा असो की कादंबरी किंवा वैचारिक लेखन, पाठारेंनी अंतरप्रवाही पद्धतीत काळाच्या स्थिती गतीला कायमच आव्हान केले’ असे, लेखक श्रीकांत देशमुख यांनी पाठाऱ्यांवरील आपल्या एका लेखात म्हटले आहे. पाठारेंचे लेखन हे आशय, विषय आणि अविष्कार या तिन्ही अंगांनी केलेले सर्जनशील लेखन असते. आणि ते वेगळ्या स्वरूपाचे व मराठी साहित्याला अर्थपूर्ण योगदान करणारे आहे.
रंगनाथ पाठारे यांना हा पुरस्कार विख्यात लेखक भालचंद्र नेमाडे यांच्या हस्ते देण्यात आला. दोन लाख रुपये व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

वाङ्मयप्रकार पुरस्कार (कथा-कादंबरी)
वाङ्मयप्रकार पुरस्कार
हा राजन गवस यांना जाहीर झाला. ‘राजन गवस यांचे समग्र साहित्य हे कृषी संस्कृतीत असणाऱ्या समष्टीकेंद्रित जीवनदृष्टीने प्रभावित आहे.’ असे अशोक बापट यांनी म्हटले आहे. राजन गवस यांच्या बहुतेक कथा भारतीय स्त्रीवादी आहेत. कृषी संस्कृतीमधील स्त्रियांचे जगणे, त्यांचे प्रश्न, समस्या, कुटुंब व्यवस्थेतील त्यांचं स्थान याबद्दल या कथा बोलतात. देवदासींच्या समस्या विचारात घेऊन त्यांनी लेखन केलेच आहे. पण त्यासाठी संवेदनशीलतेने प्रचंड पायपीट करून खूप मेहनत घेऊन चळवळ पुढे नेण्यासाठीही प्रयत्न केले आहेत. रणधीर शिंदे यांच्या म्हणण्यानुसार राजन गवस यांनी कादंबऱ्यांतून समस्या प्रधानतेबरोबर एक विचारविश्वही उभे केले आहे. आज ते मराठी साहित्यातील आघाडीचे कथाकार आणि कादंबरीकार म्हणून ओळखले जातात.
नाट्यलेखन पुरस्कार
संदेश कुलकर्णी यांना रा. शं. दातार नाट्यलेखन पुरस्कार ‘पुनश्च हनिमून’ या नाटकाच्या लेखनासाठी देण्यात आला. माणसाला आजच्या काळात पडणारे प्रश्न, त्याचे तेवढ्याच संवेदनशील मनाने केलेले नाट्यलेखन, त्याचा ताकदीनं उभा केलेला प्रयोग, त्यातील संदेश कुलकर्णी आणि अमृता सुभाष यांचा सकस अभिनय तसेच नाटकाच्या स्वभावप्रवृत्तीला साजेसे नेपथ्य या साऱ्या गोष्टी या नाटकात अगदी जमून आल्या आहेत. ‘हे नाटक बदलाचे नाटक आहे’ असं मनस्विनी रवींद्र जोशी यांनी म्हटले आहे.
यापूर्वी संदेश यांना त्यांच्या ‘मॉटुकले दिवस’ या कादंबरीला राज्य शासनाचा बालवाङ्मयाचा पुरस्कार (२०१९) मधे मिळाला होता.

ललितसाठी ग्रंथ पुरस्कार
अनिल साबळे यांना ललितसाठी ग्रंथ पुरस्कार जाहीर झाला. ‘पिवळा पिवळा पाचोळा’ हे पुस्तक आता चर्चेत आहे. जंगलात रहाणारी, शिकार करून खाणारी, मासेमारी करणारी अशी कष्टाळू आदिवासी माणसे आणि त्यांचे जग मराठी साहित्यात पहिल्यांदाच इतक्या जिवंतपणे मांडले गेले आहे. पपायरस प्रकाशनाने ते अतिशय देखण्या स्वरूपात प्रकाशित केले आहे.
जुन्नर तालुक्यातील मुथाळणे या डोंगरी गावातील आश्रमशाळेत अनिल स्वयंपाकी म्हणून काम करतो आहे. कवी, कथाकार, शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ता अशी अनिलची ओळख आहे. यापूर्वी ‘टाहोरा’ हा त्याचा कवितासंग्रह प्रकाशित झाला होता. जंगलझाडीतल्या माणसांच्या सुखदुःखांच्या कविता त्यात आहेत.
‘पिवळा पिवळा पाचोळा’ या कथासंग्रहात रानशिवाराचे वर्णन आहे. या कथासंग्रहाचा आस्वाद घेताना रणधीर शिंदे म्हणतात, “अनिल साबळे याच्या कथेचा लक्षणीय विशेष म्हणजे रानशिवारातील सजीव सृष्टीचे केलेले अनोखे चित्रण किंबहुना रानशिवाराचे इतक्या खच्चून माहितीचे कथेतील सादरीकरण अभिनव असे आहे.” तसेच रानवीदा म्हणूनही या कथाचित्रणाला विशेष महत्व आहे.

अपारंपरिक ग्रंथपुरस्कार
शरद बाविस्कर यांना त्यांच्या ‘भुरा’ या आत्मकथनासाठी अपारंपरिक ग्रंथपुरस्कार देण्यात आला. ‘भुरा’ या आत्मकथनं मराठी साहित्यात अचंबित करणारं यश मिळवलं आहे. अल्पावधीत या पुस्तकाच्या नऊ आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या आहेत. रावेरला जन्मलेला हा मुलगा धुळे येथील जयहिंद महाविद्यालयातून इंग्रजी भाषेत पदवीधर झाला. पुढे लखनौला इंग्रजी भाषा व साहित्याचं पदव्युत्तर शिक्षण घेऊन, फ्रेंच भाषा, साहित्य आणि तत्वज्ञानाकडे वळला. मग पुढे इटली, फ्रांस व इंग्लंड येथील नामांकित विद्यापीठांतून त्याने वेगवेगळ्या विषयांतील पदव्युत्तर शिक्षण घेतलं आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून फ्रेंच तत्वज्ञानात पीएच. डी. केली. ‘त्याचं अप्रूप यासाठी आहे की आंतरराष्ट्रीय विद्यापीठांच्या पदव्या घेतल्यानंतरही त्याची धडपड आंतरराष्ट्रीय होण्यासाठी नाही तर वैश्विक होण्यासाठी आहे. मानवी जीवनाचं इतकं बहुस्तरीय आकलन मराठी लेखनात अपवादानेच दिसतं.’ असं दिलीप चव्हाण यांनी ‘भुरा’ या आत्मकथनाबद्दल म्हटलेलं आहे.

विशेष साहित्य पुरस्कार
सोनाली नवांगुळ यांना विशेष साहित्य पुरस्कार देण्यात आला. यापूर्वी सलमाच्या ‘अवर पास्ट मिडनाईट’ या कादंबरीचा अनुवाद करून तिचे ‘मध्यरात्रीनंतरचे तास’ पुस्तक प्रकाशित झाले आहे. २०२० मधे साहित्य अकादमीचा अनुवादासाठी असलेला पुरस्कार तिला मिळाला. मेधा पाटकर यांचं चरित्रही तिने लिहिलेलं आहे. आणि ‘जॉयस्टिक’ हे बालसाहित्याची पुस्तक प्रकाशित झाले आहे. ‘प्रेमाचा वसा’, ‘स्वच्छंद’ ही पुस्तकं प्रकाशित आहेत. स्वतःची आणि अनुवादाची मिळून तिची आठ पुस्तकं प्रकाशित झाली आहेत.
कोवळ्या वयातील ११ वर्षे सोनालीने घरात बसून काढली. बैलगाडीचा जू पाठीवर पडल्याने वयाच्या नवव्या वार्षिक तिला अपंगत्व आलं. पण तरुणपणी तिने ‘दिव्यांग’ हा शिक्का घेऊन जगायचं नाकारलं. स्वतंत्र राहून स्वतःच्या हिमतीवर ती जगली आहे. एक सामान्य माणूस म्हणून तिला जगायचं होतं. तशी जगली. लहानपणी एकांतात राहून केलेल्या पुस्तकांच्या अफाट वाचनाने ती घडली आहे. पत्रकारितेतून तिला स्वतःची वाट सापडली आहे. मनाच्या खिडक्या उघड्या ठेवून तीन जगाचं उत्तम निरीक्षण केलं आहे. त्यामुळे तिच्या लेखनात वैविध्य आहे.
महाराष्ट्र फाउंडेशनचे हे पुरस्कार १ लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असे होते. टाळ्या वाजवून गौरव करताना रसिक प्रेक्षकांचे डोळे पाण्याने भरून येत होते. या लेखकांना प्रत्यक्ष पाहिले आणि त्यांचे भाषण ऐकले या समाधानात लोक बाहेर पडत होते.
साधना प्रकाशनचे संवादक विनोद शिरसाट यांचे निवेदन ऐकणे म्हणजे पर्वणीच होती.
क्रमशः

– लेखन : मेघना साने
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
पुरस्कार प्राप्त साहित्याविषयी खूप छान ओळख आपण करून दिलीत खूप खूप धन्यवाद
धन्यवाद प्रज्ञा!
उत्कृष्ट माहिती मेघना