Tuesday, June 17, 2025
Homeसाहित्यवर्धा साहित्य संमेलन : ११

वर्धा साहित्य संमेलन : ११

संमेलन वर्ध्याला घ्यावे हा साहित्य महामंडळाचा निर्णय योग्य होता. आपल्या शताब्दी वर्षांत हे शिवधनुष्य विदर्भ साहित्य संघाने प्रयत्नपूर्वक पेलले. संमेलन सर्वांना माहित व्हावे, स्थान माहित व्हावे, स्थानिकांनी संमेलनाला यावे यासाठी त्यांनी काही संमेलन पूर्व कार्यक्रम ठेवले होते. त्यात एक सत्यपाल महाराजांचे खंजिरी भजन-प्रबोधन असा एक कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला पूर्ण वर्धा लोटले होते.

परंतु परिसंवादाच्या विषयानुरूप लोकांचे गट संमेलन स्थळी आणण्यात प्रयत्न थोडे कमी पडले.
अर्थात प्रत्येक मंडपात वेगवेगळे कार्यक्रम एकाचवेळी सुरू असतांना मुख्य मंडप कायम भरलेला दिसेल ही अपेक्षा करणेही चूक आहे.

व्यवस्थांसाठी सर्व महाविद्यालयांच्या एन.एस.एस च्या विद्यार्थ्यांची जोड मिळाली असती तर बरे झाले असते.

परिसंवादाच्या कार्यक्रमाला रसिकांची कमी उपस्थिती हा एक भाग सोडला तर संमेलन पूर्ण यशस्वी झाले असे म्हणता येईल.

अ.भा. मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषाताई तांबे, कार्यवाहीका उज्वला मेहेंदळे, कोषाध्यक्ष प्रकाश पागे, समन्वयक प्रा. नरेंद्र पाठक, मा. रविंद्र शोभणे, मा. संजय इंगळे तिगावकर, संमेलनाचे कार्याध्यक्ष प्रदीप दाते व त्यांची सर्व टीम यांना या यशस्वीतेचे श्रेय जाते.

संमेलन संपले पण कार्य संपलेले नाही. अध्यक्षीय भाषणात, परिसंवादात, इतर कार्यक्रमात सर्व विद्वानांनी मांडलेल्या विषयांवर योग्य विचार व्हायला हवा.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा अजून मिळालेला नाही. त्यासाठी महाराष्ट्रातील सर्व खासदारांची बैठक घेवून दिल्लीत हा प्रश्न धसास लावायला हवा.
मराठी भाषेत अभ्यासक्रम सुरू होवू लागले आहेत. त्यासाठी प्रवेश घेण्यासाठी मराठी मुलांना प्रोत्साहन द्यायची गरज आहे.

अध्यक्षीय भाषणावर परिसंवादात भाग घेतांना लेखिका व किर्ती महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख मा. प्रतिभा बिश्वास यांनी मराठी भाषा ज्ञान भाषा होण्यासाठी ती समृद्ध करणे आवश्यक आहे असे सांगितले. आज विज्ञान पुढे जात आहे. अंतरिक्ष शास्त्रा सारखे, जीव विज्ञानाचे अनेक अभ्यासक्रम तयार होत आहेत. अशा वेळी या प्रत्येक शास्त्रासाठी मराठी पर्यायी शब्द शोधून काढणे आवश्यक आहे. त्यासाठी योजना व्हायला हवी. साहित्य संमेलनात या विषयावर विद्वानांचे मार्गदर्शन व्हावे. या विषयाला गती मिळावी.
उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस म्हणाले की, मराठी ही व्यवहाराची भाषा झाली पाहिजे.
त्याची सुरवात मंत्रालयातून झाली पाहीजे. मराठीतील अभ्यासक्रमांच्या पुस्तकांना सहाय्य मिळायला हवे. मराठीतून आपला अभ्यासक्रम पुरा करणाऱ्यांना फी सवलत व यशस्वी स्तानकांना नोकरी-धंद्यासाठी प्रोत्साहन मिळायला हवे.
संस्कारक्षम बाल साहित्य निर्माण करणाऱ्या साहित्यिकांसाठी काही खास योजना राबवायला हव्यात.
मराठी पुस्तके दुसर्‍या भाषेत अनुवाद करणाऱ्यांना, अर्थ विषयक, धोरण विषयक पुस्तके लिहीणार्‍यांना साहित्यिक क्षेत्रात प्रतिष्ठा प्राप्त करून द्यायला हवी.

बोलीभाषेच्या विकासासाठी केवळ ठराव करून भागणार नाही तर त्यासाठी व इतर ठरावांसाठी सरकार दरबारी ठोस पाठपुरावा आवश्यक आहे.
मराठी भाषेविषयीच्या अनेक मुद्यांवर या साहित्य संमेलनात चर्चा झाली त्यावर कृती होईल तो सुदिन.
या संमेलनात भाग घेण्याचे, विचार ऐकण्याचे, पुस्तक प्रकाशन करण्याचे, भारतभरच्या मराठी साहित्यिकांना भेटण्याचे, मुख्य मंचावरून माझी कविता सादर करण्याचे भाग्य मला मिळाले यासाठी मी अखिल भारतीय मराठी महामंडळ व विदर्भ साहित्य संघाचा ऋणी आहे.
येथेच मी माझ्या या लेखमालेला विराम देतो.

ही लेखमाला, या पोर्टलवर प्रसिध्द झाल्या नंतर वाचकांच्या अनेक प्रतिक्रिया प्राप्त झाल्या, त्या उद्याच्या भागात देत आहे.
धन्यवाद.

प्रवीण देशमुख

– लेखन : प्रवीण देशमुख
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments