मी मुंबई दूरदर्शन केंद्रात असताना, आमचे वरिष्ठ अधिकारी राहिलेले निर्माते श्री अशोक डुंबरे साहेब, जे पुढे संचालक म्हणून निवृत्त झाले, त्यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी जागवलेल्या आठवणींचे शब्दांकन केले आहे, आमचे सहकारी तथा एकपात्री कलाकार जयंत ओक यांनी. विशेष म्हणजे, श्री डुंबरे साहेब आजही समाज माध्यमे, विविध प्रकारच्या उपक्रमात सक्रिय सहभागी असतात. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
– संपादक
आज ३० मार्च. माझा ८४ वा वाढदिवस. या निमित्ताने माझ्या कारकीर्दीचा हा लेखा जोखा …..
माझा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ओतूर येथे ३० मार्च १९३९ रोजी, शेतकरी कुटुंबात आणि शिक्षकाच्या घरात झाला. त्यामुळे संस्कारही चांगले झाले.
ओतुर इथेच तुकाराम महाराजांनी संन्यास घेवून श्री बाबाजी चैतन्य यांनी मंत्र देवून गुरुपद स्वीकारले.
माझे प्राथमिक शिक्षण जुन्नर, नारायणगाव येथे झाले. १९६४ साली कृषी महाविद्यालय, पुणे येथून मी पदवी घेतली. सुरुवातीच्या काळात, १९६८ ते १९७० पर्यंत मी कृषी खात्यात नोकरी केली. नंतर माझी पुणे आकाशवाणी केंद्रात निवड झाली.
त्या काळात श्री व्यंकटेश माडगूळकर, जयराम कुलकर्णी यांच्या समवेत काम करण्याचा मी अनुभव घेतला. “आमची माती, आमची माणसं” या कार्यक्रमाचे नावं माडगूळकर यांनी सुचविले आणि महाराष्ट्राच्या जनमानसात कायमचे रुजविले हे नक्कीच !
१९७२ साली माझी मुंबई दूरदर्शन केंद्रात निर्माता म्हणून नेमणुक झाली. दिल्ली येथे सहा महिन्याचे प्रशिक्षण घेतल्यानंतर मुंबई येथे कारकीर्द सुरू झाली. ऑक्टोबर १९७३ ला बालगंधर्व रंगमंदिरात कै. यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन झाले. पुणे येथील सिंहगड येथून थेट प्रक्षेपण सुरू झाले. आणि खऱ्या अर्थाने ग्रामीण भागात टीव्हीचे कार्यक्रम सुरू झाले.
“आमची माती, आमची माणसं” हा कार्यक्रम आठवड्यातून दोन दिवस मंगळवार व शुक्रवार असा तीस मिनिटांचा होत असे. कालांतराने आठवड्यातून पाच दिवस कार्यक्रम आयोजित केले गेले. सुरुवातीला शेतीतील कार्यक्रम फिल्म बेस होते. शेती, संस्कार, सिंचन, मच्छीमारी, फलोत्पादन, शेतकऱ्यांच्या यशोगाथा या विषयांचा समावेश असायचा. तज्ञांच्या मदतीने शेतकऱ्यांना सोप्या भाषेत समजतील अशा भाषेत कार्यक्रम केले. जास्तीत जास्त दृष्य वापरण्याचा प्रयत्न केला. कॅमेरामन, साऊंड रेकॉर्डिस्ट, लायटिंग असिस्टंट, निर्माता अशी टीम असायची. भरपुर सामान आणि वाहनांची कमतरता अशा परिस्थितीत काम केले. बैलगाडी, ट्रॅक्टर, जीप, बस हाही प्रवास अनुभवला. कुणीही कधीच कुरकुर केली नाही. एक कुटुंब म्हणून वातावरण होते. मी स्वतः कॅमेराने शुटींग करायला शिकलो. रेकॉर्डीस्ट नसेल तर त्याचेही काम केले.
आम्ही सूर्यप्रकाशात चित्रीकरण करायचो. दुपारी चेहऱ्यावर सावली यायची म्हणून रिफ्लेक्टर धरायचेही काम केले. अण्णा हजारे यांच्या राळेगण सिद्धी येथील कार्यक्रम सुंदर झाला होता. विजय परुळकर माझे मित्र. तेही बरोबर होते. राळेगण येथे प्रकल्प पाहिला. त्यामुळे खुप लोकांशी संपर्क आला. पुरंदर तालुक्यातील श्री. विलास साळुंके यांच्या पाणी पंचायत “समान पाणी” वाटपाचा कार्यक्रम प्रेक्षकांना खुप आवडला.
कोल्हापूरचे सुपुत्र डॉक्टर पांडुरंग उर्फ पी. सी. पाटील हे भारतातील पुणे कृषी महाविद्यालयाचे पहिले भारतीय प्राचार्य झाले होते. ते १०२ वर्षे जगले. त्यांची मुलाखत घेण्याचे भाग्य मला लाभले. त्यांचा कार्यक्रम ही सुंदर झाला. कार्यक्रम प्रसारीत झाल्यावर त्यांचे चिरंजीव लेफ्टनंट जनरल शंकरराव थोरात यांनी माझी पुण्यात भेट घेवून कौतुक केले.
त्यावेळी फिल्म बेस कार्यक्रमाचे वेळापत्रक व्यवस्थित मुंबईला पाठवावे लागायचे. त्यावेळी संकलनाचे काम चंद्रकांत कामुलकर तसेच राजन वाघधरे, विद्याधर पाठारे, श्रीकृष्ण साने, सावंत करायचे. सुरुवातीला दोन वर्षे विनय धुमाळे यांनी माझे साहाय्यक म्हणून उत्तम काम केले. नंतर शशीकांत भोसले आले.कार्यक्रमाचे निवेदन प्रदीप भिडे, विनय आपटे, अजित देशपांडे, सुहासिनी मुळगावकर, स्मिता पाटील, पौर्णिमा पाटील, विश्वास मेहेंदळे हे करीत असत. मंत्री, कुलगुरू अशा अनेक मुलाखती मी घेतल्या. महिन्यातून एकदा कृषीवृत्त, विशेष बातम्याचा आढावा असे कार्यक्रम करीतच होतो. त्याचे निवेदन मानसिंग पवार करीत असत.
महाराष्ट्रातील लोकांना कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची भवानी माता, वणीची देवी यांचे चित्रीकरण करून नवरात्रात घर बसल्या देवींचे दर्शन प्रेक्षकांना घडवता आले. पुण्यातील गणेशोत्सव जगभरात प्रसिद्ध आहे.१९७४ ते १९९० या काळात दहा दिवसांत निवडक गणपती, आरास, विद्युत रोषणाई, मिरवणूक असा तीस मिनिटांचा कार्यक्रम संकलित करून प्रसारित होत असे. तसेच लोकसंगीताचे कार्यक्रम ही केले.
गीत रामायणाला २५ वर्षे पूर्ण झाली म्हणुन सुधीर फडके यांचा लाईव्ह कार्यक्रमही सादर केला होता. पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी, मोरारजी देसाई, विविध राष्ट्रपती यांचे दौरेही कव्हर केले.

मुंबई दूरदर्शनच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त मुंबई मराठी पत्रकार संघात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सत्कार…
माझा तीस वर्षाच्या दूरदर्शन कारकिर्दीचा लेखाजोख तीस ओळीत लिहिणं खरंच कठीण आहे. हे म्हणजे पाच दिवसाच्या कसोटी मॅचचा वृत्तांत अर्ध्या तासात दाखवतात तसा प्रकार आहे. असो…
३० सप्टेंबर १९९९ रोजी मी दूरदर्शन सेवेतून निवृत्त झालो. या निमित्ताने जुन्या स्मृतींना उजाळा म्हणून लिहीले !

– लेखन : अशोक डुंबरे
– शब्दांकन : जयंत ओक
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
अशोक डुंबरे सामाजिक बांधीलकी जपणारे अधिकारी.दिलदार माणूस. ग्रामीण महाराष्ट्राचे सुरेख चित्रण त्यांनी केले.