लेखिका सौ.राधिका भांडारकर यांच्या नीहारा प्रकाशन ने प्रकाशित केलेल्या “जीजी” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच गुणवंतांच्या उपस्थितीत सुरेख पद्धतीने संपन्न झाला.
अवघ्या ८८ पृष्ठांचे हे पुस्तक जसजशी वाचत गेले तसतशी त्यांत मनाने पार डुंबून गेले, शेवटचे पान वाचेपर्यंत एका जागेवर या पुस्तकाने खिळवून ठेवले. एका आजीची ही कहाणी अत्यंत ह्रदयद्रावक आणि कुठेतरी भेदून जाणारी…! जीजीचे संपूर्ण चरित्र यात रेखाटले असले तरी ते आत्मचरित्र नाही, किंवा चरित्र या साहित्यप्रकारातही मोडणारे नाही असे मला वाटते.
हे पुस्तक म्हणजे जीजीने स्वतः लिहीलेली तिची कहाणी वाचताना लेखिकेच्या भावनांचा झालेला हा कल्लोळ आहे. त्यामुळे पुस्तकातील एकेक शब्द, एकेक ओळ वाचकाच्या ह्रदयाला जाऊन भिडते.
अत्यंत सुस्थितीत वाढलेली, सधन कुटुंबात विवाह होऊन आलेल्या जीजीला तिच्या पुढील आयुष्यात नशीबाने अल्पवयात वैधव्य आल्याने, तिने समाजाशी धीराने आणि आत्मविश्वासाने कसा लढा दिला, तिच्या एकमेव पुत्राला उत्तम प्रकारे कसे घडविले हे वाचताना डोळ्यातील आसवे थांबत नाहीत.
अतिशय प्रभावी शब्दांकन…..! अगदी तिर्हाईत, अपरिचित वाचकाच्या नजरेसमोरही ही जीजी उभी रहाते.
सुरवातीलाच राधिकाताई लिहितात, “एक व्यक्ती म्हणून तिला वाचायचं होतं, तिचा शोध घ्यायचा होता. तिच्यातलं स्त्रीत्व जाणायचं होतं. तिच्यातली शक्ती जाणायची होती. आमच्या व्यतिरिक्त तिच्या शब्दातून बघायचं होतं.”
“खरंच बोराच्या झाडासारखंच होतं ना तिचं आयुष्य ! काटेरी रक्तबंबाळ करणारं ! पण तिने मात्र रुतलेल्या काट्याचा विचार न करता गोड बोरांचाच आनंद उपभोगला.”

ह्या अशाप्रकारच्या लेखनाने ‘जीजी’ वाचायची वाचकांची उत्सुकता ताणते. त्यामुळे पुस्तक खाली ठेवावेसे वाटत नाही.
‘जीजी’ची कहाणी सांगत असताना राधिकाताईंचा जीजी सोबतचा वास आणि घेतलेले अनुभव ह्यामुळे वर्तमान काळात वावरल्यासारखे वाटते. आजही जीजी सोबत आहे असा विचार मनात येऊन काहीतरी आत्मीक बळ आल्यासारखे वाटते.
जीजीचे तिच्या पाचही नातींवरचे नितांत प्रेम हे लेखिकेने स्वानुभवावरून फार समर्थ शब्दात प्रदर्शीत केले आहे. प्रत्येकच वाचकाला जीजी वाचत असताना स्वतःची आजी कोणत्या ना कोणत्या रूपात दिसल्याशिवाय रहाणार नाही हे निश्चित ! त्यामुळे ह्या पुस्तकाविषयी कुठेतरी आत्मीयता वाटते.
१०० वर्षापूर्वीच्या काळातील जीजी आणि तिने दिलेले आधुनिक संस्कार या विषयी राधिकाताई सांगतात, “मुलीच्या जातीला हे शोभत नाही बरे ? असा पळपुटा, मळकट, कडू संस्कार मात्र तिने आमच्यावर कधीही केला नाही. आयुष्यात अनेक चढउतार आले, रस्ते काही नेहमीच गुळगुळीत नव्हते, दगड, खडे, काटे सारे टोचले. अपरंपार अश्रू गाळले पण कणा नाही मोडला, “जीजीने तिच्या कुटुंबाला (मुलगा/सून आणि पाच नाती) समर्थ बनविले.
राधिकाताईंच्या प्रभावी लेखनशैलीमुळे जीजी प्रत्येकाला आपली वाटते हेच या व्यक्तीचित्रणाचे यश आहे.
सर्वांनी वाचावे आणि जीवनात सकारात्मकतेचा बोध घ्यावा असे हे पुस्तक “जीजी”.
पुस्तकाच्या मुखपृष्ठासंबंधी थोडेसे~~~ मुखपृष्ठावर ज्या काही ओळी छापलेल्या दिसतात ते जीजीचे हस्ताक्षर आहे आणि तिच्या फोटोचे स्केच तिची सगळ्यात धाकटी नात, जिचे तीन महिन्यापूर्वीच निधन झाले ती उषा ढगे हिने केले आहे.
जीजीच्या बाकीच्या चार नातींनीही त्यांच्या व जीजीच्या एकत्रीत सहवासाचे विविध अनुभव लिहीले आहेत.
राधिकाताईंची ही वाटचाल अशीच सतत चालत राहो आणि त्यांची विविध विषयावरील पुस्तके झपाट्याने प्रकाशित होवोत ह्या माझ्या त्यांना शुभेच्छा !

– परीक्षण : अरूणा मुल्हेरकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
खूप खूप सुंदर आहे वाचून बौद्धिक पौष्टिक आहार