मनोजवं मारुत् तुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्
वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ।।
या एका श्लोकात मारुतीरायाचे वर्णन केले आहे. खरेतर श्रीरामाच्याच वंशातील म्हणावा असा मारुती. दशरथ राजाला मुल होत नसल्याने त्याने पुत्रकामेष्टी यज्ञ केला. त्यानंतर यज्ञकुंडातून प्रकट झालेल्या अग्निदेवाने दिलेल्या पायसातून एक भाग घारीने पळवून नेला तो अंजनीच्या हातात पडला. तो तिने ग्रहण केला व तिच्या पोटी मारुतीची निर्मिती झाली. ही कथा सर्वानाच माहिती आहे.
मरुताचा म्हणजे वायूदेवाचा पुत्र म्हणून मारुती.
हा मारुतीराया कसा आहे हे या श्लोकात वर्णन केले आहे. मनोजवं म्हणजे मनावर विजय मिळविणारा. मनाला कह्यात ठेवणारा तो मारुती. हा मारुती चपळ तर होताच. परंतु तो वाऱ्याला म्हणजे पवनाला मागे टाकणारा होता. त्याचे रुप महाकाय तर होते परंतु बुद्धीही तितकीच मोठी होती. बुद्धिमंतांमध्ये तो वरिष्ठ होता. बलिष्ठ होता. तो जितेंद्रिय म्हणजे इंद्रियावर विजय मिळविणारा होता. तो वानर दळाचा मुख्य म्हणजे सेनापती असलेला तो महान योद्धा होता. अशा श्रीरामाच्या दुताला मी वंदन करतो. असे या श्लोकात म्हटले आहे.
मनावर ताबा असलेल्या मारुतीने आयुष्यात खूप पराक्रम केला आहे. सीतेच्या शोधासाठी लीलया समुद्र पार करणारा असलेल्या मारुतीने आपल्या बुद्धीच्या बळावर रावणाबरोबर युक्तिवाद केला. त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. रावण त्याला बधला नाही ही गोष्ट वेगळी. स्वतः समुद्र तरून जाणाऱ्या मारुतीला रामाचे सैन्य समुद्रापार नेता आले असते, नाही असे नाही. परंतु सेतुबंधनाची कल्पना करून त्याने आपल्या वानर सैन्याच्या मदतीने तो तयार केला. नील आणि जांबुवंत या आर्किटेक्ट (त्या काळी ही संकल्पना नव्हती किंवा संबोधन नव्हते) असलेल्या सहकाऱ्यांच्या मदतीने राम सेतू बांधला. कारण आपण या कलेतही मागे नाहीत हे त्याला दाखवून द्यायचे होते.
श्रीरामाचे नाम गात या श्रीरामाला पार करू या त्या नावाड्याच्या मतांप्रमाणेच मारुतीरायाने श्रीरामाला दर्यापार नेले. श्रीरामाचेच नाव का ? तर या भवसागरातून तरून जाण्यासाठी श्रीरामाचे नावच कामी येणार हे त्या बुद्धिमतां वरिष्ठाला माहीत होते. श्रीरामाचे नाव नसलेल्या शिला तरून जाणार नाहीत, हे त्याला माहीत होते म्हणून तो बुद्धिमतांमध्ये वरिष्ठ. त्याने जाणीवपूर्वक तसे केले कारण श्रीराम तत्त्व सर्वांत महान आहे हे त्याला दाखवून द्यायचे होते. आपल्या तनामनात श्रीराम आहे हे त्याने सीतामाईला कृतीने दाखवून दिले होते. ज्याचे आयुष्यच श्रीराममय आहे, हे सीतामाईला माहीत नसणार काय ? परंतु जगासाठी हे करावेच लागले होते त्याला.
आपल्या ताब्यात दहाही इंद्रिये ठेवणारा हनुमान मारुती मरुत म्हणजे पवनाचा पुत्र होता. म्हणून श्री समर्थ रामदास स्वामी आपल्या मारुती स्तोत्रात त्याची महती गाताना कोटिच्या कोटी उड्डाणे झेपावे असा उल्लेख करतात.
आता श्रीराम आणि मारुतीच्या वयात पंधरा दिवसांचा फरक का याचे उत्तर सरळ आहे ती घार आपल्या पंखांनी झेपावत जाईपर्यंत तिला पंधरा दिवसांचा काळ लागला असणार. मारुतीचा हा गर्भ घारीने पंधरा दिवस सांभाळला म्हणूनही त्याला वेगवान होता आले असावे. स्वतः घारीने पायस गिळले नाही तर सांभाळून ठेवले त्या पायसाची महती तिला माहीत असावी. तो अंजनी नावाच्या वानरीला द्यायचा होता. ते तिचे नियत कार्य होते. त्यामुळे मारुती अति वेगवान, अतिशय तीक्ष्ण नजरेचा होता. घारीची दृष्टी तीक्ष्ण असते. आकाशात विहरताना तिला जमिनीवरचे दिसते. तसेच मारुतीरायाचेही होते. पुढे श्रीराम वनवासी झाल्यावर त्यांची आणि मारुतीची भेट काही योगायोगाची गोष्ट नव्हती तर त्याचा आणि श्रीरामाचा आंतरिक स्नेह तर होताच परंतु एकाच पायसामुळे त्यांची निर्मिती झाल्यामुळेही कदाचित श्रीराम आणि मारुती यांचा दृढ स्नेह जुळला असावा.
रामायणातील सर्व घटना आधी लिहून ठेवल्या होत्या असे म्हणतात. वाल्मिकी ऋषींनी आधी रामायण लिहिले असल्याने त्या तशा घडत गेल्या असे सांगितले जाते.
वाराच त्याचा पिता असल्याने बापसे बेटा सवाई या नात्याने त्याचा वेग हा मनापेक्षाही अधिक होता. तो वानर सेनेचे नियंत्रण करू शकत होता हे त्याला माहीत होते यासाठीच सुग्रीवाने त्याची नियुक्ती सेनाप्रमुख पदी केली होती.
वानर सेनेचा प्रमुख सेनापती असलेल्या या श्रीरामाच्या भक्ताला आपण शरण जाऊन भवसागर पार करू ही खात्री या श्लोकाने दिली आहे. श्रीरामचंद्रांचेही स्तवन या श्लोकाने केले आहे. श्रीरामाच्या या दुताने आपल्याला शरण दिली आश्रय दिला तर आपण देखील भवसागरातून पार जाऊ असा विश्वास या श्लोकात दिला आहे. जो श्रीरामाला शरण जातो त्याचे कल्याण होते असे उदाहरण मारुतीरायाने घालून दिल्याने हा स्तुत्य मारुती आहे. त्याला आपणही शरण जाऊ या. त्याचे सद्गुण आत्मसात करून आपल्या अतराम्याला पाहू या. आत्माराम जाणून घेऊ या.

– लेखन : प्रकाश क्षीरसागर. गोवा
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800