संत आक्काबाई
संत अक्काबाई ह्या चाफळ येथील संत रामदास स्वामीच्या मठात राहत होत्या.
संत अक्काबाईं यांनी पत्तीस वर्षे समर्थांच्या हयातीत चाफळचा कारभार सांभाळला. शिवाय समर्थांच्या पश्चात अडोतीस वर्षे सज्जनगडचा कारभार सांभाळला. बाराव्या वर्षापासून पंच्याएंशी वर्षांपर्यंत रामरायाची सेवा करून त्या कृतार्थ झाल्या.
औरंगजेबाच्या आक्रमणाच्या वेळी संत अक्काबाई यांनी गडावरील राम पंचायतन वाघापूरला नेऊन रामनवमी साजरी केली.
संत आक्काबाई त्यांची समाधी सज्जनगडावर आहे. त्यांना अक्कास्वामी असे म्हटले जाई.
संत वेणाबाई या संत समर्थ रामदास स्वामींच्या शिष्या व संत कवयित्री होत्या. त्यांना आदराने वेणास्वामी असे म्हटले जाते.
समर्थ संप्रदायामध्ये ज्या कवयित्री झाल्या त्यामध्ये ‘”वेणाबाई'” यांचा प्रामुख्यानं उल्लेख केला जातो.
त्यांनी समर्थ रामदासांचे शिष्यत्व स्वीकारले. नंतर त्या मिरज येथे परत आल्या. समर्थांनी त्यांना कीर्तन करण्याची अनुमती दिली होती. त्या मध्ययुगीन काळात विधवा स्त्रीने कीर्तन करणे ही एक क्रांतीच होती.
समाजाच्या उद्धारासाठी क्रांतिकारक पाऊल उचलणाऱ्या सर्वच संतांना जन निंन्देला सामोरे जावे लागते. समर्थ रामदास त्याला अपवाद नव्हते… वेणाबाई, अक्काबाई, अंबिकाबाई या स्त्रियांना त्यांनी अभ्यासास प्रवृत्त केले. वेणाबाईंना तर खूप त्रास सहन करावा लागला. त्यांचे समर्पण म्हणजे एक कसोटीच होती..
रामदास स्वामींच्या भेटीचा त्यांच्या बोलण्याचा वेणाबाईंच्या मनावर खूप परिणाम झाला. हेच आपले गुरु आहेत, त्यांच्याकडून उपदेश घ्यावा व त्यांची सेवा करीत जीवन घालवावे असे त्यांना वाटू लागले. रात्रंदिवस वेणाबाई त्यांचाच विचार करीत “देह माझे मन माझे, सर्व नेले गुरुराजे” अशी त्यांची अवस्था झाली ..
संत वेणाबाईंचा मुळात वाचन-व्यासंग अभ्यास झालेला होता.. रामायण महाभारत, भागवत संत चरित्रं त्यांनी वाचली होती..
समर्थाच्या सहवासात वेणाबाईंचे लेखन-वाचन वाढले फुलले इतकचं नाही तर समर्थाच्या मठात त्याचं लेखनही बहरलं.. एवढेच नव्हे तर समर्थाच्या शैलीतला जोरकसपणा, यमक अनुयायांचा प्रवाहीपणा, थेट नेमका आशय मांडण्याचा धीटपणा असे अनेक गुण उचलले संत वेणाबाईंच्या शैलीनं…
त्या गोड गळयानं गात सुद्धा असतं..
‘दासविश्रामधाम’या ग्रंथाचे कर्ते आत्मारामबुवा वेणाबाईंचे वर्णन फार छान करतात… ते म्हणतात.
!! धन्य वेणाई वेणुमोहित
वेणुविण गाय सप्रेमयुक्त
वेणुधर हरि होय तटस्थ
वेणांकधरवाणी मोहळे !!
संत वेणाबाई यांनी अनेक ग्रंथरचना केल्या.. त्यात उपदेशरहस्य, पंचीकरण, रामायणाची कांडे, सीतास्वयंवर, रामगुहक संवाद तसेच कित्येक अभंग पदे, आरत्या याबरोबरच कौल –सव्वीस, आणि चव्वेचाळीस श्लोकांचा श्री रामगृह संवाद ही दोन प्रकरणे विशेष आहेत…
कौल म्हणजे राम वनवासातून परत आल्यावर प्रजा त्याच्याकडे एक एक मागणे मागते आणि राम ते लक्ष्मणास लिहून ठेवायला सांगतो. असा हृद्य प्रसंग मोठया विस्तारानं वेणाबाईंनी रंगवला आहे..
वेणाबाईनं म्हणतात..
!! बहू कष्टलो पातलो जी स्वदेशा
प्रजा बोलती कौल दे राघवेशा
भूमीने कदा पीक सांडू नये रे
वदे राम लक्ष्मुणा हे लिही रे !!
वेणाबाईच्या काव्यप्रतिभेचं रसाळपणाचं, साधेपणाचं आणि बारकावे टिपण्याचं सामर्थ्य ‘”सीता स्वयंवरात’”आपल्या प्रत्ययाला येतं..
वेणाबाईंनी ही रचना ओवीबद्ध केलेली आहे. फार प्रतिभासंपन्न-ज्ञानसंपन्न असं हे काव्य नाही. पण वाचकांना खिळवून ठेवण्याचं सामर्थ्य त्यांच्या शैलीत आहे..विश्वामित्रांबरोबर श्रीराम यागरक्षणासाठी निघाले असता ते कौसल्येचा निरोप घ्यायला गेले… वेणाबाई लिहितात…
!! नमस्कारिली निजजननी उभा
राहिला चापपाणी
वदे माते ये क्षणी आज्ञा दिली
पाहिजे
मुख न्याहाळी सुंदरा
पंकजनयना मनोहरा
प्राणाच्या प्राणा रघुवीरा माझ्या
कोठे जातोस !!
आणि कौसल्येची अवस्था बघा त्यामुळे त्या म्हणातात..
!! पाहता रूपाचे बरवेपण कोटी
मदनाचे निंबलोण
मी वोवाळीन आपुले प्राण
दृष्टी घाली सुंदरा.. !!
स्वत: प्रापंचिक आयुष्य न
अनुभवलेल्या वेणाबाईंनी आईच्या भावना किती उत्कटपणे टिपल्या आहेत..
वेणाबाईंची समाधी सज्जनगड येथे आहे. रामदासस्वामींनी बांधलेला वेणाबाईंचा मठ मिरज येथे आहे.
!! धन्य वेणाई वेणुमोहित
वेणुविण गाय सप्रेमयुक्त !!

– लेखन : संगीता कुलकर्णी
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800