“वेचलेले क्षण” भाग : १
“वेचलेले क्षण” हे वा. गो. मायदेव यांचे आत्मचरित्र. व्हीनस प्रकाशनने १९६२ मध्ये प्रकाशित केले. ३१७ पृष्ठांच्या या पुस्तकाची किंमत तेव्हा आठ रुपये इतकी होती. वा. गो. मायदेव यांनी हे पुस्तक गुरुवर्य डॉ महर्षि अण्णासाहेब कर्वे यांना समर्पण केले आहे. बालपण, पुण्यात पदार्पण, उच्च शिक्षण, सेवेचा प्रारंभ, बरेवाईट प्रसंग, अकल्पित घटना, नवे उद्योग व उपद्व्याप, प्राध्यपकाचा प्रचारक बनलो, गोडकडू अनुभव, आश्रम निवृत्तीनंतरचे कांही, तीन महत्त्वपूर्ण घटना, पुन्हा प्राध्यापक, गेली चार वर्षे व उपसंहार अशा १४ प्रकरणांमध्ये हे आत्मचरित्र आहे.

“वेचलेले क्षण” या पुस्तकाचे बालपण, पुण्यात पदार्पण, उच्च शिक्षण या प्रकरणाचे परीक्षण भाग क्र. १ मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.
बालपण
वा गो मायदेव यांचा जन्म २६ जुलै, १८९४ रोजी त्यांच्या आजोळी रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वराजवळ अर्ध्या मैलावर असलेल्या माभळे या गावी झाला. त्यांच्या लहानपणची अगदी पहिली आठवण विजापूर जिल्ह्यातील ‘इंडी’ ची आहे. ते बिल्लू नावाच्या मुसलमान गड्याच्या खांद्यावर बसून फिरायला जात . त्याच्याजवळ बंदूक असे. तो हरणे मारी. त्याच्या घरात मायदेव यांचा वावर असे. तेव्हा दोरीवर मांसाचे लहान लहान तुकडे वाळत टाकलेले असायचे. वडील तेव्हा हाॅस्पिटल असिस्टंट म्हणून होते आणि दवाखान्यात तेव्हा बिल्लू शिपाई म्हणून होता.
१८९७ ची दुसरी आठवण आईच्या पाठीशी निजले याची आहे. त्यांची आई तापाने आजारी असे. आईच्या पुढ्यात त्यांची धाकटी बहीण निजलेली असे. आई अंगावरुन हात फिरवे तेव्हा ते खूष होत.
एक आठवण म्हणजे उन्हाळ्यातील शेवटी वारा जोराने सुटला व परसांतला झाडावरचा एक मोठा आंबा त्यांच्या डोक्यावर दाणदिशी पडला होता. चार वर्षाचे असताना त्यांची आई देवाघरी जाते तेव्हा मायदेव यांना विठ्ठलाच्या देवळात नेण्यात येते. त्यांचे आजोबा व मामा कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध होते. नदीला पूर आला तेव्हा मामांनी त्यांना मोठ्या होडग्यांत बसवून काठाकाठाने नदीतून नेलेले त्यांना आठवते.
१८९८ मधील एक आठवण. उन्हाळ्यात धाकट्या मामांबरोबर ते गुरांमागे नदीवर गेले होते. पाण्यात हळूहळू चालले होते. मामा वासरे व म्हशी धूत होते. तिथे ते गटांगळ्या खाऊ लागले तसे मामाने काठावर आणून उभे केले.
विठोबाच्या देवळात त्याना नाटकातील एकेक सोंगे आठवतात. गोकुळ अष्टमीचा काला आठवतो. होळी आठवते. त्यांचा धाकटा मामा अंघोळ करीत होता. थोरली मामी जवळच धुणे धूत होती. लहानग्या ६ वर्षाच्या मायदेवांच्या काय मनात आले कुणाला ठाऊक. गंमत करावी म्हणून त्यांनी चुलीतले लाकूड काढले आणि खोपट्यालाच लावले. ‘खोपटं पेटवलंन् गो !’ म्हणून मामी ओरडली. सर्वांचे लाडके व घरात लहान तेच. त्यांना कोणी मारले नाही वा रागावलेही नाही. या त्यांच्या आजोळच्या आठवणी.
१८९९ मध्ये त्यांच्या वडीलांबरोबर म्हणजे अण्णांबरोबर माभळ्याहून बैलगाडीने निघाले त्या आठवणी. संगमेश्वरचा तळ, परशुराम, कर्हाडजवळचे मसूर स्टेशन असा बैलगाडीने केलेल्या प्रवासाच्या आठवणी. तेथून आगगाडीने मिरज पर्यंत प्रवास. मिरजेचा दवाखाना. तिथे मुलांबरोबर वाळूत खेळणं पळणं शिवणं. तिथे अण्णांनी त्यांना अक्षरे शिकवली. नव्या आईला ते वहिनी म्हणत. १९०१ मध्ये त्यांच्या वडीलांची बदली धारवाड जिल्ह्यात गुडगेरी रेल्वे स्टेशनपासून ८ मैलावरील लक्ष्मेश्वर या गावी झाली. त्यांचे वडील डॉ गोविंद जनार्दन मायदेव यांना तेव्हा ३० रुपये पगार होता. रहायला स्वतंत्र छोटा बंगला होता. दवाखान्याच्या आवारात एक विहीर होती. त्यावर मोट चाले. बंगल्यासमोर सुंदर बाग होती. गुलमोहराला ओल्या शेंगा आल्या की त्याचा तलवारीसारखा खेळायला उपयोग होई. त्यांच्या अभ्यासावर वडिलांची करडी नजर असे. प्रथम त्यांना प्राथमिक शिक्षणासाठी कानडी शाळेत घातले होते. ती शाळा मैलभर दूर होती.
शाळेतील आठवणी.
पुढे नवव्या वर्षापासून ते घरीच मराठीतून शिकू लागले.शाळेत मार खाल्ला. कानपिचक्या, अंगठे धरुन उभे राहणे या शिक्षा झाल्या. तर्खडकरांच्या भाषांतर पाठमालेतील एक धडा करताना ते चुकले तर अण्णांनी त्यांना चिंचेच्या फोकाने बदडले. अशा कितीतरी १९०३ मधील आठवणी आहेत. अण्णा केसरी घेत त्याचे ते वाचन करीत. त्यांच्याकडून रामविजय व हरिविजय वाचून घेत. त्यांचा गळा बरा होता. ती पदे म्हणत. त्याच वेळी त्यांनी कानडी शारदा नाटक पाहिले गद्य कानडीत. पदे मात्र मराठीत. कानडीतील दोडुआटा खेळ त्यांना आठवतो.
१९०४ मध्ये त्यांचे चुलते लक्ष्मेश्वरास रहावयास आले. तेव्हाच्या आठवणी. आजोबा भयंकर तामसी व हट्टी स्वभावाचे. त्यांनी काकूला मारायला सांगितले. त्यावरुन आजोबांशी त्यांचा किती दिवस अबोला होता. आजोबांची एकदा बुध्दिबळावरुन महाबळांशी पैज ठरते. डावात ते हरतात पण ठरलेला रुपया काही देत नाही. तेव्हा आजोबा तडक मामलतदारांच्या कचेरीत जातात व रुपया वसलून द्या म्हणून मागणी करतात.
वहिनींबद्दल ते लिहितात, की ते सहा वर्षांचे होते तर वहिनी तेरा वर्षांची. अण्णा मिरजेला साक्षीला गेले तेव्हा ते बैलगाडीमागे पळत गेले. रडले. तेव्हा वहिनींनी त्यांना कडेवर घेऊन घरी आणले होते. तिची एक चंदनी पेटी होती. ती तिने त्यांना खेळायला दिली होती व त्यांचे रडे थांबवले होते. सावत्र भाऊ नाना याचा जन्म २० डिसेंबर, १९०३ ला झाला. काठीवरचा घोडा खेळताना पायर्या उतरताना त्यांच्या हातून तो दाणदिशी पडतो पण वहिनींनी त्यांना मारले नाही. त्यांच्या विषमज्वरात वहिनींनी त्यांचे पथ्यपाणी केले होते. त्यांच्या मुंजीत तिने बेसनाचे लाडू करविले होते. त्यांच्या आवडीची साबुदाण्याची खीर वेळी अवेळी भरपूर करुन देई. त्यांना मग आपल्या आईची आठवण येई. पांढर्या ढगावर चढून स्वर्गात गेलो की आई भेटेल का ? असा त्यांच्या बालमनाला प्रश्न पडे. अण्णांचे स्वदेशीचे व्रत कडक असे.
गणपतीच्या दिवसात त्यांनी एक पैशाला लवंगी फटाक्याची माळ आणली होती. विदेशी वस्तू विकत घ्यायची नाही म्हणून अण्णांनी त्यांना खूप मारले होते. घरी स्वदेशी साखर नसताना ते गुळावरच भागवत असत. लक्ष्मेश्वरास असताना कितीदा तरी प्लेग झाला.दवाखान्यांत लहानमोठी आॅपरेशन्स होत. ती ते न घाबरता पहात असत. १९०४ मध्ये आॅक्टोबर – नोव्हेंबर मध्ये त्यांचे चुलत भाऊ यांनी त्यांना पुण्यास शिकावयास नेण्याचे ठरविले व नेले . त्या दिवसात अति स्वस्ताई होती. एक रुपयाला पक्के आठ शेर दूध मिळे.
पुण्यात पदार्पण
पुण्याच्या स्टेशनवर उतरुन ते टांग्यात बसले व गावाकडे टांगा हाकला. तेव्हा पुष्कळ रस्त्यांवर दाराशी प्रेत बांधत असलेले लोक त्यांना दिसले. त्यावेळी त्यांना कारण कळले नव्हते पण त्यावेळी पुण्यात प्लेग होता. ते सदाशिव पेठेत लोणी विके दामले यांच्या आळीत एका जुन्या मोठ्या वाड्यात उतरले. तेथे भाऊकाकांचे वर्गमित्र नारायण चिंतामण बापट होते. आंघोळ करुन ते खानावळीत जेवले. काकांनी त्यांना गावाबाहेर भांडारकर इन्स्टिट्यूटजवळ वाहणाऱ्या कालव्याजवळ नेले. तेथे त्रिंबकराव खरे यांच्याकडे ते राहिले. तिथेच कृष्णाजी पांडुरंग लिमये नावाचे मास्तर राहात. त्यांच्याबरोबर ते फर्ग्युसन कॉलेजात गेले. तिथे इंग्रजी तिसऱ्या इयत्तेत ते दाखल झाले. त्यांचे वर्गशिक्षक सुप्रसिद्ध मल्ल वझे मास्तर होते. पहिल्याच महिन्यात त्यांचा पाचवा नंबर आला. त्यांच्या वर्गात न्या. महादेव गोविंद रानडे यांचा दत्तक मुलगा, वझे मास्तरांचा मुलगा वगैरे मुले असत.
आठ दिवसात एक विचित्र घटना होते. कोकणात काकू प्लेगने गेल्याचे त्यांना कळते. त्या काकूंवर त्यांचे फार प्रेम होते. लौकरच प्लेग ओसरला व ते नारायण पेठेत मातीच्या गणपतीजवळ श्री गोखले यांच्या वाड्यात रहावयास येतात. त्या वाड्यातच लिमये मास्तरही राहात. ते वरच्या वर्गांना संस्कृत शिकवत. मायदेव यांना संस्कृत श्लोक पाठ येतात हे त्यांना कळले नव्हते. त्यांचे वर्ग होळकरवाड्यात भरत. त्याच वाड्यात त्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राहावयास आले होते, पण त्यांची ओळख झाली नाही, पण त्यांनी जी विलायती कापडाची होळी लकडी पुलाच्या पलीकडे गणेशोत्सवात केली त्या सभेला त्यांनी आपली टोपी गमावून हजर होते.
गोखल्यांच्या वाड्यात माडीवर शिवाजीची आरती होत असे. चौथ्या इयत्तेत ते शनिवार पेठेत श्री गणेशभटजी जोगळेकर यांच्याकडे राहावयास गेले. ते त्यांचे मावसचुलते. गद्रे वाड्यात त्यांचे वर्ग भरत. देव मास्तर त्यांना बीजगणित शिकवीत असत. केशवराव साने इंग्रजी घेत. त्यावेळी त्यांनी रमाबाई रानडे यांना पाहिले होते पण त्यांची महती त्यावेळी कळली नव्हती. एकदा बगीमागे ते पळत पळत जात असल्याचे देव मास्तरांनी पाहिले तेव्हा असे करु नको नाहीतर पडशील असे देव मास्तरांनी सांगितले. चौथ्या इयत्तेत त्यांना We Are Seven ही वर्डस्वर्थ यांची कविता होती. ती त्यांनी चांगली पाठ केली होती. त्यावेळी जगद्धितेच्छू प्रेसच्या मालकाने ती म्हणून घेतली व एक आणा बक्षीस दिला होता.
त्याचवेळी पायात जोडा हवा म्हणून त्यांनी काकांजवळ हट्ट धरला. तो त्यांनी घेऊन दिला पण पहिल्याच दिवशी ते तो जोडा कुठेतरी विसरले. ते खेळायला कबूतरखान्यांत जात असत. तेथे ते आट्यापाट्या खेळत. ते काकांकडे ४ वर्षे होते. काकांना त्यांचे वडील दरमहा १० रुपये पाठवत त्यातून फी जेवणखर्च वगैरे होत. चहा ठाऊक नव्हता. पेढेबर्फीचा हट्ट नव्हता. भात आमटी बाजरीची भाकर व पातळ ताक असे जेवण असे. काका भिक्षुक असल्याने त्यांना सहस्रभोजनाचे पासेस मिळत. ते राजमाचीकरांकडे राहत असताना एक गंमत झाली. काकांना त्यांनी एकदा रामनवमीचा उपवास करु का म्हणून विचारले. त्यांनी नको म्हणून सांगितले. बुधवारात त्यांना खानावळ नेमून दिली होती. रामभक्ती तीव्र असल्याने ते काही न खाता त्यांनी उपवास केला. रात्री ८ वाजता त्यांना माडीवरुन खाली बोलावून काकांनी विचारले ‘तू जेवून आलास का ?’ त्यांनी खोटेच हो म्हणून सांगितले. त्या खानावळाचे दिवाळे निघाल्याने ती दुपारपासून बंद केल्याचे काकांनी पाहिले होते. त्यांचे गौप्य उघडकीस आले व त्यांना उपास करु दिला गेला नाही.
त्यांचा कान थोरल्या वहिनीबाईंनी हौसेने टोचला पण तो ठणकू लागला व उजव्या कानाची पाळी सुजली. ती वडीलांनी कापली. तेव्हापासून ही कुरुपता आली. तेव्हा ते इंग्रजी सहाव्या इयत्तेत होते. प्लेगनंतर ते पेंडसे यांच्या वाड्यात राहायला आले. तिथेच नानासाहेब दाते यांची पुतणी दुर्गाबाई जोशी यांच्याशी ओळख झाली. त्या विधवा होत्या. सकेशा होत्या. त्यांना ते इंग्रजी शिकवू लागले. १९०८ मधील उन्हाळ्यात कीचकवध नाटक लागले होते. अबू, बाळू, दत्तू व त्यांच्या मित्रांनी नाटकाला चोरुन जायचे त्यांनी ठरविले. त्यात मायदेव यांनाही घेतले. ६-६ आण्याची तिकिटे काढली. ते नाटक पाहून त्यांच्या मनावर विलक्षण परिणाम झाला. त्या वेळी कृष्णराव वैष्णव त्यांचे मित्र झाले. मधुकरीत जेवीत जा असे त्यांनी सांगितले तरीही ते चुलते गणेशभटजींकडेच जेवत राहिले. त्यावेळी शाळेत त्यांची यथातथाच प्रगती होती. तेथील आठवणी नमूद केल्या आहेत.
प्रा. शंकर रामचंद्र कानिटकरांबरोबर त्यांची आतेबहिण बनुबाई हिचे लग्न जुळवले ती आठवण नमूद केली आहे. मारकुटे पटवर्धन मास्तरांनी लांब वेताची छडी मागवून सेक्रेटरीला त्रास देणार्यांपैकी पहिल्या गोखल्यांनी हातावर मारायला सुरुवात केली. ते हात खाली घेईना. ६४ व्या माराच्या वेळी छडी तुटली. वर्ग सुटल्यावर सर्वांनी गोखल्यांना मिठ्या मारल्या. सांत्वन केले. १९०८ मध्ये टिळकांना शिक्षा झाली. तेव्हा सर्व मुले शाळेत गैरहजर राहिले. तेव्हा पालकांकडून चिठ्ठी आणायला सांगितले होते. फक्त एकानेच चिठ्ठी आणली. तेव्हा वर्गशिक्षकांनी हात पुढे करायला सांगितले. हाताला वेताची छडी नुसती लावून ‘पुन्हा असे करु नको हं’ असे सांगितले. एकदा सहावीच्या मुलांनी देहूला पायी जाण्याचे ठरविले होते.शेलारवाडीवरुन आगगाडीने जावे लागले तो अनुभव कथन केला आहे. १९०९ मध्ये ते मॅट्रिकच्या वर्गात आले पण १६ वर्षे पूर्ण नसल्याने परीक्षेला बसू दिले नव्हते. नंतर ते स्वतंत्र राहू लागले. सुटीतील वर्गात त्यांनी शाकुंतल व विक्रमोर्वशीय नाटकांचा आस्वाद घेतला. त्या वेळी ते कसबा पेठेतील गुंडाचे गणपतीस दर्शनास रोज जात असत. १९१० मध्ये ते मॅट्रिक पास झाले.
उच्च शिक्षण
पुढच्या शिक्षणासाठी काही करता येणार नाही असे वडिलांनी लिहिले तेव्हा ते कोकणातून पुण्यास आले. त्यावेळी त्यांचा मित्र कुळकर्णी याचे प्लेगने निधन झाले. नागोपंत पटवर्धन वकीलाकडे दोन्ही वेळेस पंक्तीला जेवून त्यांच्या मुलाचा गणित विषय करुन घेण्याचे काम त्यांच्याकडे सोपविले. तेथील आठवणी नमूद केल्या आहेत. यशवंत रामचंद्र गोखले उत्तम तालीमबाज होते. लक्ष्मणराव पाळंदे पोहण्यात पटाईत होते. या सर्वांशी ओळखी झाल्या. लोकमान्य टिळक पुण्यात वावरत असताना यशवंत रामचंद्र गोखले त्यांचे शरीरसंरक्षकासारखे स्वयंसेवकाचे काम करीत. केशवराव देशमुखांच्या प्रवचनांमुळे त्यांना ज्ञानेश्वरीची गोडी लागली. महाविद्यालयीन जीवनातील आठवणी नमूद केल्या आहेत.
टेल ऑफ टू सिटीज हे पुस्तक त्यांना इंग्रजी गद्यासाठी होते. सर वाल्टर स्काॅटची लेडी आॅफ दी लेक ही कविता होती. रँग्लर परांजपे त्यांना शिकवत व ते प्रिन्सिपॉलही होते. नंतर अप्पासाहेब गद्रे यांना वर्तमानपत्रे वाचून दाखवायची व दोन वेळा जेवायचे असे ठरले. त्यांना फ्रीशिप मिळाली.त्या वेळी त्यांना काव्याची गोडी लागली. त्यांना स्वतःला काही ओळी रचाव्या असे वाटू लागले. त्यांनी Wordsworth च्या We Are Seven चे भाषांतर केले. Goldsmith कवीच्या Hermit कवितेचेही त्यांनी भाषांतर करुन पाहिले. फर्ग्युसन कॉलेजच्या जिमखान्यात ते तालीम करीत. त्यावेळी अंजीर चार आणे शेर असत ते घेत. दुपारी झोप व वाचन. वसंत व्याख्यानमाला त्यांनी कधी चुकवली नाही. त्यावेळच्या अनेक आठवणी त्यांनी सांगितल्या आहेत.
दादासाहेबांच्या आईच्या आठवणी त्यांनी सांगितल्या आहेत. दादासाहेबाचे धाकटे भाऊ अण्णासाहेब राजमाचीकर यांचा किस्सा सांगितला आहे. मुंबईला ते परीक्षेला गेले व तेथून यवतमाळला गेले. ते इंटरमीजिएटची परीक्षा नापास झाले. तेथून ते नागपूरला निघून गेले. तेथे त्रिंबक रामकृष्ण गद्रे यांच्याकडे उतरले. तेथे त्यांनी नोकरीसाठी खटपट सुरु केली. Post & Telegraphs मध्ये त्यांना ३० रुपयांवर नेमणूक मिळाली. त्यांना इंग्रजी कादंबरीकार डिकन्स फार आवडे. एकदा ते भंडारा हायस्कूलचे मास्तर बेहरे यांच्याकडे गेले होते. ते बाहेर गेलेले होते व त्यांची पत्नी कविता म्हणत केर काढत होती. ती ऐकून त्यांना वर्डस्वर्थच्या ‘साॅलिटरी रीपर’ या भावगीताची आठवण झाली. बेहरे बाहेरुन आल्यावर त्यांनी त्यांच्या छापून आलेल्या कविता वाचून दाखवल्या. आपणहि कविता लिहिल्या पाहिजे असे त्यामुळे त्यांना वाटू लागले. एक नवीन प्रकारची स्फूर्ति घेऊन ते भंडार्याहून नागपूरास आले. तेथील काशीबाबू मुकर्जींच्या आठवणी त्यांनी सांगितल्या आहेत.
त्यांच्या विचारांचा त्यांच्यावर फार परिणाम झाला. त्या वेळी त्यांनी वर्डस्वर्थच्या एका कवितेचे भाषांतर केले ते विविध ज्ञान विस्तारमध्ये छापून आले. आनंदराव टेकाडेंची ओळख झाली. तेथे आॅफिसमधील लोकांबरोबर त्यांनी एकदा भांग घेतली. तेलिनखेडी तलावावर ते गेले तेव्हा सुंद झाले. त्यांना पोहता येत होते पण त्यांची त्रेधा उडाली होती. तेव्हापासून त्यांनी मादक पेयाला शिवायचे नाही असा निर्धार केला. नागपूरचा १९१२ चा उन्हाळा भयंकर होता. प्रा पांडुरंग गुणे हे जर्मनीहून डाॅक्टर पदवी घेऊन पुण्यात परतले. ते फर्ग्युसन कॉलेज मध्ये येतील म्हणून ते पुन्हा पुण्यात परतले. इंटरमीजिएटची परीक्षा पास झाले. नंतर ते यवतमाळला गेले व पुन्हा पुण्यात परतले. त्यांनी ऐच्छिक संस्कृत घेतले.
Browning, Keats, Shelley, Marlowe वगैरेंचे समग्र काव्यग्रंथ त्यांनी ऐपत नसताना विकत घेतले. Hood या कवीची Bridge of Sighes ही कविता त्यांनी वाचली त्याचे भाषांतर त्यांनी ‘हुंदक्यांचा पूल’ म्हणून केले. ते फर्ग्युसन कॉलेजच्या मासिकात छापून आले त्यामुळे वनमाली या टोपणनावाने ते ओळखले जाऊ लागले. यावेळी ते टेनिस खेळायला शिकले. सायकलिंगही शिकले. १९१३ च्या नोव्हेंबरमध्ये ते इंटरमीजिएटची परीक्षा पास झाले. त्यांचे स्नेही श्रीधर बाळकृष्ण रानडे यांचे द्वारकाबाई हिवरगावकर यांच्याशी प्रेम जमले. त्यांचा विवाह झाला. एका सुंदर चौकटीत त्यांनी एक पद्याला बसवून ती भेट दिली.ते भावनाशील असल्याने एका मुलीच्या प्रेमपाशात सापडले. त्यांचे अभ्यासात लक्ष लागेना. परीक्षेची भीति वाटू लागली. आॅनर्सचे अभ्यास करणे सोडले. परीक्षेस कसेबसे बसले व पास झाले. एके दिवशी डॉ गुणे यांच्याकडे प्रा. धोंडो केशव कर्वे आले व आश्रमात शिकविण्यासाठी पदवीधर हवा आहे म्हणाले व असल्यास त्याला हिंगणे येथे पाठवा म्हणाले. त्यांनी हिंगण्यास नोकरी पत्करली.
“वेचलेले क्षण” पुस्तकातील पुढील परीक्षण भाग : २ मध्ये वाचावे….
क्रमशः

— परीक्षण : विलास कुडके
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800