“वेचलेले क्षण” भाग : २
“वेचलेले क्षण” हे वा. गो. मायदेव यांचे आत्मचरित्र. व्हीनस प्रकाशनने १९६२ मध्ये प्रकाशित केले. ३१७ पृष्ठांच्या या पुस्तकाची किंमत तेव्हा आठ रुपये इतकी होती. वा. गो. मायदेव यांनी हे पुस्तक गुरुवर्य डॉ महर्षि अण्णासाहेब कर्वे यांना समर्पण केले आहे. बालपण, पुण्यात पदार्पण, उच्च शिक्षण, सेवेचा प्रारंभ, बरेवाईट प्रसंग, अकल्पित घटना, नवे उद्योग व उपद्व्याप, प्राध्यपकाचा प्रचारक बनलो, गोडकडू अनुभव, आश्रम. निवृत्तीनंतरचे कांही, तीन महत्त्वपूर्ण घटना, पुन्हा प्राध्यापक,गेली चार वर्षे व उपसंहार अशा १४ प्रकरणांमध्ये हे आत्मचरित्र आहे.

वेचलेले क्षण” या पुस्तकातील सेवेचा प्रारंभ, बरेवाईट प्रसंग, अकल्पित घटना याचे परीक्षण भाग क्र.२ मध्ये केले आहे.
सेवेचा प्रारंभ
६ जून, १९१७ रोजी त्यांचे लग्न झाले. वडील मोडलिंब येथे सब असिस्टंट सर्जन म्हणून होते. २८ मे ला वेळ अशी आली की मायदेवांनाच सौभाग्यवतीची बाळंतपणातून सुटका करावी लागली. त्यांना मुलगी झाली. तिचे नाव सिंधू ठेवले. त्यांच्या सर्व जीवनात अतिशय आणीबाणीचा असा तो प्रसंग होता असे ते नमूद करतात. त्याहून भयंकर घटना १५ मे, १९१९ मध्ये घडली. त्यांची बहिण गोंदणी येथील रामकृष्णपंत हरिभाऊ आठवले यांना दिली होती. त्यांनी विहिरीत उडी टाकून जीव दिल्याची वार्ता आली. या आघाताचा एवढा परिणाम झाला की पुढे जवळ जवळ १० वर्षे ते कोणाच्या शुभकार्याला हजर राहिले नाही. त्या दरम्यान त्यांनी एम ए करायचा प्रयत्न केला. ३० आॅक्टोबर, १९२० रोजी हिंगणे येथे त्यांना मुलगा झाला. त्याचे नाव सुधाकर ठेवले.
जून १९१६ पासून हिंगणे येथील अनाथ बालिकाश्रमांत त्यांचे शिक्षक म्हणून जाण्याचे ठरले. १९ एप्रिल, १९१७ मध्ये ते अनाथ बालिकाश्रम या संस्थेचे आजन्मसेवक झाले. इंग्रजी व मराठी शिकवण्याचे काम त्यांच्याकडे होते. त्याचवेळी ते एम ए चा अभ्यासही करत होते. त्या काळात त्यांनी आधुनिक कवींची ओळख करुन घेतली. १९१९ मध्ये ते कविवर्य भास्कर रामचंद्र तांबे ज्या संस्थानात होते तेथे संस्थेकरता मदत घेण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांनी इंग्रजीत भाषण केले. संस्थेला त्यामुळे थोडी द्रव्यप्राप्ती झाली. हाच त्यांच्या प्रचारकार्याचा आरंभ होता. १९२० मध्ये श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी यांचे नाव देण्यासाठी देणगी मिळाली. १९१८ च्या उत्तरार्धात अनेक साहित्यिकांशी त्यांचा पत्रव्यवहार झाला. त्यामध्ये भा रा तांबे, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचा समावेश होता. त्या काळात भा. रा तांबे यांच्या कवितांच्या वह्या गहाळ झाल्या होत्या. मायदेव यांनी त्या कविता मिळवून पुन्हा उतरवल्या व तो संग्रह २० डिसेंबर, १९२० रोजी छापवला.
बरेवाईट प्रसंग
१९२१ च्या प्रारंभी त्यांना एम ए चा अभ्यास करायचा असल्याने त्यांनी त्यांच्या पत्नीला व मुलांना बडोद्यास पाठवून दिले. परीक्षा आटपतांच त्यांना हिंगण्यास घेऊन गेले. त्या दरम्यान मोडलिंबला त्यांची वहिनी नवज्वराने गेली. ती त्या गावाला अतिशय प्रिय होती. १९२१ च्या अखेरीस डॉ गुणे सांगलीत आजारी पडून कालवश झाले. १९२३ मध्ये श्रीमती ताई ठाकरसी महिला विद्यापीठाची एन्ट्रान्स परीक्षा पास झाली. याच वर्षी मायदेव यांचे “काव्यमकरंद” हे मराठी कवितांच्या वेच्यांचे पुस्तक मुंबई विद्यापीठाच्या मॅट्रिक परीक्षेला लावण्यात आले. त्यात मिळालेले हजार बाराशे रुपये त्यांनी नानांच्या इंजिनिअरिंगच्या शिक्षणाला लावले. १९२१ च्या सुमारास त्यांनी लांब पारशी कोट व रुमाल किंवा काळी घडीची टोपी असा पोषाख करु लागले. त्या दरम्यान त्यांनी आश्रम व विद्यापीठासाठी वर्गणीचे काम केले. आजन्म सेवक या नात्याने त्यांच्याकडे आरोग्यखातेही होते. १९२२ मध्ये आश्रमासाठी देणगीचे काम थोडेसे झाले पण महिला विद्यापीठासाठी त्यांनी ठळक अशी देणगी मिळवली. मूळराजशेठ यांनी एरंडवणे महिला पाठशाळेच्या विद्यार्थिनींच्या वसतिगृहासाठी ३५००० ची देणगी दिली.
आश्रमातील विद्यार्थिनींसाठी त्यांनी “आश्रमास” हे गीत २७/८/१९२३ रोजी लिहिले.१५/२/ १९२४ रोजी लाला लजपत राय यांनी आश्रमास पूर्वसूचना न देता भेट दिली. १९२१ मध्ये त्यांनी श्री अनंततनय यांच्या मदतीने श्रीमहाराष्ट्रमंदिर नावाची संस्था स्थापन केली. कवि यशवंत यांचे एकदा तेथे कवितागायन झाले होते. २६/१०/१९२१ रोजी प्रा वासुदेव बळवंत पटवर्धन यांचे निधन झाले. भावतरंग या कवितासंग्रहात ‘आला कठिण समय तुजवरी’ यातून त्यांनी पटवर्धन यांच्याबद्दलचा आदर व्यक्त केला आहे. २५ते २८ नोव्हेंबरला बडोद्यास मराठी साहित्य संमेलन भरले. त्यात त्यांनी ‘भृंगा ! हदय न मम कळले’ ही कविता म्हटली. १९२५ मध्ये त्यांना इतिहास संशोधक श्री विश्वनाथ काशिनाथ राजवाडे यांच्याबरोबर काम करण्याचा योग आला. त्यांचे स्वभावविशेष पाहता आले.
अकल्पित घटना
१९२६ मध्ये नानांना भाटघरचे धरण बांधत होते तिथे सरकारने नोकरीत घेतले. ११ ऑगस्ट कुंद्याचा जन्म झाला. १९२७ मध्ये नानांचे केशवराव जोशी यांची कन्या सखूबाई यांच्याशी लग्न झाले. डेक्कन जिमखान्यावर २८ नंबरचा बंगल्याचा प्लाॅट त्यांनी रु ४५०० देऊन विकत घेतला. सहासात महिन्यात सुमारे रु १८५०० मध्ये बंगला बांधून झाला. १९२८ मध्ये त्यांनी हिंगण्याच्या आश्रमास लागून असलेले २ जमिनीचे तुकडे रु ८०० ला घेतले. तिथे त्यांनी पत्र्याची दोन खोल्यांची झोपडी बांधली. तिथे ते शेतीकाम करवून घेत. दिवाळीच्या सुट्टीत एक भयंकर घटना घडली. त्यांची मुलगी सिंधू म्हणजेच बबन व कुंदाभाऊ हे शाळेच्या इमारतीजवळ पाण्याच्या डबक्यापर्यंत बरोबर होती. बबनला फुलांचे वेड. कुंद्याचा एकटे सोडून ती बुचाची फुले वेचू लागली. भाऊ कुंद्या कुठे म्हणून ती डबक्यापाशी आली तर तो निपचित पडलेला दिसला. तिने त्याला ओढून डबक्याबाहेर काढले. ताई जी. ए. झाली. १९२९ मध्ये ताईने पुनर्विवाहाचा विचार कबूल केला व वर शोधण्याचे काम सोपवले. त्यांचा पुनर्विवाह श्री दत्तोपंत भागवतांशी झाला. ती दोघे रंगूनला गेली. नोव्हेंबर १९२९ मध्ये त्यांचा मुलगा कुंदाभाऊ हा मेनिंजायटिसने गेला. आश्रमात शिकत असलेल्या एका हुशार विधवा विद्यार्थिनीचा पुनर्विवाह त्यांनी घडवून आणला.
१९२६ मध्ये छत्रपति शिवाजी महाराजांचा त्रिशताब्दीजन्मोत्सव रायगडावर साजरा करण्याचे ठरवले तेव्हा मायदेव हिंगणेहून त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर तेथे दोन दिवस पायी प्रवास करुन गेले.त्याचे त्यांनी थरारक वर्णन केले आहे. जिथे त्यांना रायगडावर पटांगणात चौथर्यावर जागा मिळाली होती तिथेच त्यांना ६-७ इंचाची इंगळी दिसली होती. २५ मे, १९२६ रोजी पुण्यात बुधवार पेठेत किबे वाड्याला आग लागली. त्यात आर्यभूषण व ज्ञानप्रकाश छापखान्याची सर्व मालमत्ता जळून खाक झाली. तेव्हा ते ना. म. जोशी यांना भेटले. स्वतः २५ रुपये दिले व विनंती पत्र काढवून एक लाखाहून अधिक मदत भारत सेवक समाजास मिळाली व फर्ग्युसन रस्त्यावर आर्यभूषण प्रेस नव्याने उभा राहिला.
“वेचलेले क्षण” पुस्तकातील पुढील परीक्षण भाग : ३ वाचावे….
क्रमशः

परीक्षण: विलास कुडके
संपादन:देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800