Sunday, June 29, 2025
Homeसंस्कृतीअधिक महिना.

अधिक महिना.

चंद्रास पृथ्वी प्रदक्षिणा घालण्यास प्रतिपदेपासून अमावास्येपर्यंत २८ ते तीस दिवस लागतात. चंद्राच्या प्रदक्षिणेनुसार होणाऱ्या महिन्यास म्हणतात “चांद्र मास”! चांद्र वर्ष असते ३५४ दिवसांचे! पृथ्वी ३६५.२५ दिवसात सूर्य प्रदक्षिणा पूर्ण करते. त्यास म्हणतात सौर वर्ष! प्रत्येक वर्षी या कालगणनेत सुमारे ११ दिवसांचा फरक पडतो. तो फरक भरून काढण्यास प्राचीन शास्त्रज्ञांनी हिशेब करून ३२ महिने आणि १५ दिवसांनी चांद्र मास अधिक धरला. आणि त्यास पुढील चांद्र मासाचे नाव दिले ! एका चांद्र मासापूर्वी अधिक मास आला की तसाच पुन्हा येण्यास १९ वर्षे लागतात. चैत्र ते अश्विन आणि फाल्गुन मासापूर्वी अधिक मास येऊ शकतो. कारण तेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यास सूर्य ३० दिवसांहून कमी वेळ घेतो. तेराव्या चांद्र मासात सूर्य संक्रमण करत नाही. म्हणून अधिक महिन्यास काही लोक “मल मास” म्हणतात. अधिक मासाचा स्वामी श्रीकृष्ण! श्री विष्णु! म्हणून त्यास “पुरुषोत्तम मासही” म्हणतात. अश्विन महिना अधिक आला असताना कार्तिक अधिक येईल तेव्हा दिवाळी महिनाभर असेल, असे समजून आम्ही भावंडे नाचत होतो. तेव्हा माझ्या आईने कार्तिक मास कधीच अधिक नसतो, याचे कारण समजावून सांगीतले. ते समजावताना तिने एक लोभस अख्यायिका सांगीतली.

एकदा चांद्र मासांनी सभा ठरवली. पण अधिक मासास निमंत्रण दिले नाही. गडबडीत राहिले असेल, असे समजून भोळा अधिक मास सभेस गेला. सर्वांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. पण अधिक मासास हा अपमान कळला नाही. सभा सुरू झाल्यावर चर्चेत सहभागी होण्यास त्याने तोंड उघडले. पण साऱ्यांनी त्याला तुच्छ लेखत “मलमास” म्हटले. आपापल्या मासातील सण नि व्रत वैकल्य सांगून टेंभा मिरवला. कुणी त्यास वेगळे नाव नाही म्हणजे स्वतःचे अस्तित्व नाही, असे म्हणत त्यास पुढील मासाच्या नावाचा आधार घेऊन कसाबसा उभा राहणारा पांगळा म्हटले. तर कुणी पुढच्या महिन्याच्या कुबड्या घेऊन चालणारा लंगडा म्हटले. सहस्त्र चंद्र दर्शनाचा सोहळा करताना मल मासातील पौर्णिमा जमेस धरत नाहीत, हे सांगून त्याचा पाणउतारा केला. सारे हसू लागले. त्यात कुणी मल शब्दाचा अर्थ सांगून नाक मुरडले. सारे हसू लागले. बिचारा अधिक मास दुखावला. उगीच आपण सभेस आलो, असे झाले त्यास.
 
घटना जुनी झाली तरी तो हा अपमान विसरू शकला नाही. त्यामुळे तो खंगू लागला. त्याची रया गेली, हे श्रीकृष्णास जाणवले. म्हणून त्यांनी काळजी व्यक्त करत त्यास रोड होण्याचे कारण विचारले. अधिक मासाचे डोळे पाणावले. भगवान श्रीकृष्णाच्या नजरेत प्रश्न पाहून अधिक मास बोलू लागला…

“प्रभू मला नाव नाही. माझा उल्लेख ज्या मासात मी येतो त्या मासाच्या नावास अधिक ही उपाधी जोडून करतात. मूळ मास मात्र निज ठरतो. ‘अधिक’ ही उपाधी मला अपमान सूचक “उपाधी” वाटते. कारण सारे मला पुढच्या मासाचा आधार घेऊन उभा राहणारा लंगडा. माझ्या काळात ना सण की व्रते! ‘मल’ शब्दाचा अर्थ सांगून मला हीन लेखतात. ते सहन होत नाही. मला जीव देण्याची इच्छा होते! पण ईश्वर इच्छेविना ते होणार नाही. आता नाही सहन होत हे! तुम्हाला कळत नाही की कळत असून माझी टर उडवण्यास मला रोड होण्याचे कारण विचारत आहात, याचा मला उमज पडत नाही. म्हणून मी अधिक हिरमुसलो आहे. माझ्या मनोवेदनेचा विचार करून मला रोड होण्याचे कारण विचारा! कृपया यास आपला अवमान समजू नका. हा आहे माझ्या घायाळ मनाचा आक्रोश !!”

हा आक्रोश भगवंताच्या काळजास घरे पाडत होता. तो बोलायचा थांबताच ते आश्वासक स्वरात बोलू लागले, “वत्सा, तुझे अस्तित्व हा तुझा दोष नाही. तो आहे चंद्र-पृथ्वी-सूर्य यांच्या क्षमतेतील फरक! त्यामुळे ते नष्ट नाही होऊ शकणार ! पण तुला स्वतंत्र ओळख देणे मी करीन. मग सर्व मासांची सभा घेईन. तेव्हा सर्वांच्या उपस्थितित तुझा चंद्र-पृथ्वी-सूर्य यांच्या वर्तनामुळे चुकलेले दिवसांचे गणित सुधारणारा मास, असा गौरव करीन. मग कुणी तुला हीन समजणार नाही. सहस्त्र चंद्र दर्शनाचा सोहळा करणारे सामान्य क्षमता असलेले लोक कोणत्याही पौर्णिमेस चंद्र दर्शन घेण्याची तसदी घेत नाहीत. त्यांनी तुला हिशेबात घेतले नाही तरी तू हिरमुसू नको ! तुझा प्रत्येक दिवस आगळा ठरणार आहे. म्हणून खंगणे संपव !“

वचन दिल्याप्रमाणे श्री हरीने काही दिवसांनी सभा बोलावली. अधिक मास आलेले पाहून सारे त्याची टर उडवण्यास सज्ज झाले. लगेच ते त्यास लोचट, निर्लज्ज वगैरे म्हणू लागले. पण अधिक मासावर परिणाम झाला नाही. म्हणून ते त्यास कोडगा म्हणून चिडवू लागले. तरी अधिक मास स्वस्थ! सर्वांना नवल वाटत असताना भगवान श्रीकृष्ण येत असलेले दिसले. म्हणून सारे स्वस्थानी स्थानापन्न झाले. श्री हरीने प्रथम सभेचा हेतू विशद केला. अधिक मासाचे महत्व सांगण्यास चंद्र-पृथ्वी-सूर्य यांच्या क्षमतेतील फरकामुळे हिशेबात होणारी चूक कथन केली. ही चूक अधिक मासाच्या मदतीविना सुधारता येणार नव्हती असे सांगून त्यांनी अधिक मासाच्या क्षमतेचा गौरव केला. सारे स्तब्ध झालेअसताना भगवान श्रीकृष्ण अधिक सविस्तर सांगू लागले…

“तुम्हाला अधिक मासाची क्षमता कळत नाही, हे जाणवल्याने मला ही सभा बोलवणे भाग पडले. नाही त्याला वापरायला लावणार आता तुमच्या नावाच्या कुबड्या! त्यास माझे नाव देऊन मी त्याचा गौरव करणार आहे. तुम्हा सर्वांहून तो अधिक समर्थ असून तो अभिमानी नाही! याचे कौतुक करण्यास मी त्यास विशेष बक्षीस देणार आहे. पुरुषोत्तम – माझे नाव धारण करणाऱ्या या मासातील सारे दिवस पवित्र असतील! प्रत्येक दिवस पुण्य संचय करण्यास समर्थ असेल !“

भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून उमटणारे बोल ऐकताना अधिक मासाची मुद्रा आगळ्या तेजाने झळाळत होती. तो नतमस्तक होऊन तो श्री कृपा आत्मसात करत होता. म्हणून भगवंताने निरहंकारी अधिक मासाचे पुन्हा कौतुक केले. मानवी मनातील अहंकार गळावा या हेतुने अधिक मासात सच्छिद्र खाद्य पदार्थाचे दान करण्याचे महत्व त्यांनी विस्तारपूर्वक कथन केले.

सभा सुरू होण्यापूर्वी आपण टोमणे मारत असूनही अधिक मासाच्या स्मित हास्यावर चरा का उमटला नाही, ते सर्वांना कळले. भगवंताचा विचार ऐकून ते खजील झाले. संकोचाच्या आहारी न जाता त्यांनी अधिक मासाच्या क्षमतेसाठी आदर व्यक्त केला. तेव्हा पासून सुजाण लोक अधिक मासास पुरुषोत्तम मास म्हणू लागले. तोवर ते म्हणत…
जमाता जठरं जाया, जातवेदा जलाशयः
पूरिता नैव जठरं पूर्यंते जकारा पञ्च दुर्भराः

म्हणजे जामात, जठराग्नि, जाया (पत्नी) जातवेदा (ज्योतिषी) जलाशयः (समुद्र) हे पाच जकार आहेत. त्यांना कितीही अर्पण केले तरी त्यांची भूक भागत नाही.

म्हणून लोक जावयास जठराची उपमा देत. कारण जठरात कितीही अन्न घातले तरी काही वेळाने ते रिक्त होऊन अन्नाची मागणी करते. तसे जावयास कितीही भेटी  दिल्या तरी तो तृप्त होत नाही. बहुतेक जावयात अहंकाराचे प्राबल्य असे. त्यामुळे लोक जावयास दशम ग्रह म्हणत. तो अहंकारवश होऊन सन्मानाच्या लोभात पत्नी आणि तिच्या पित्यास बोटावर नाचवत असे. अधिक मासास भगवंताचे नाव प्राप्त झाल्याने, सर्वांना जणू जावयाच्या अहंकारावर उपाय सापडला. त्यास दशम ग्रह न म्हणता ते लाडक्या लेकीचा रमण म्हणू लागले. त्यास विष्णुचे रूप समजून सच्छिद्र पदार्थ (३० अधिक ३ असे ३३ अनारसे वा म्हैसूर पाकाच्या वड्या वा तत्सम काही) देऊ लागले. त्या छिद्रातून जावयाचा अहंकार गळावा आणि वर्तन पुत्रवत् व्हावे, अशी ही प्रार्थना आहे.  

कथन संपवून आईने सांगीतले की, मानवाने विविध संप्रदायाच्या भिंती बांधल्या. विष्णुचे भक्त बनले वैष्णव नि शिव भक्त बनले शैव! वैष्णव आणि शैव बनले एकमेकांचे वैरी! विष्णू आणि शिव यांच्यात प्रेम नि सामंजस्य असून! लंकेस जाण्यापूर्वी श्रीरामाने (विष्णू) रामेश्वर क्षेत्री शिव पूजन केले. तिथे रामेश्वर मंदिर झाले. देव, दानव आणि मानव यात रामरक्षेचे समान विभाजन करताना राम ही दोन अक्षरे उरली. ती शंकराने स्वतः ठेऊन घेतली. तरी माहितीचा अभाव असलेले लोक हा श्लोक विसरतात….
‘शिवस्य ह्रदयम् विष्णुः विष्णोः ह्रदयम् शिवः।
ईषदप्यन्तरं कृत्त्वा रौरवं नरकं व्रजेत।
दीव्यति प्रकाशतः इति देवः।।‘

म्हणजे शिवाच्या ह्रदयात विष्णू आणि विष्णुच्या ह्रदयात शिव निवास करत असूनही या दोघात फरक मानणारा मानव रौरव नरकात पडेल. दीव्यति प्रकाशतः इति देवः।। अशी देवाची व्याख्या आहे, हे सांगून समापन करताना ती म्हणाली, “अख्यायिका पूर्णसत्य नसते. तरी पूर्ण असत्यही नसते. तिच्यात तथ्य असतेच. हुकूम वा आदेश दिल्यागत काही सांगीतले तर ते पचत वा रुचत नाही. म्हणून त्याचा योग्य परिणाम होत नाही. कारण सहसा कुणी आदेश आनंदाने अंमलात आणत नाही. पण कथा-कहाण्या श्रोते रसिकतेने ऐकतात. म्हणून त्या परिणामकारक ठरतात. मानवी मानसिकता विचारात घेऊन आपल्या पूर्वजांनी अनेक तथ्य अख्यायिकेच्या रूपात गुंफण्याचे चातुर्य दाखवले !“

अशा विविध कहाण्या, दंतकथा आणि अख्यायिका यांचे गूढार्थ समजून घेऊन आपल्या चतुर पूर्वजांना अभिवादन कर. आपले जीवन परिपक्व व्हावे यासाठी प्रार्थना करू !

स्मिता भागवत

— लेखन : स्मिता भागवत. कॅनडा
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

33 COMMENTS

  1. खूप छान माहिती दिली आहे. माझ्या महिला मंडळात अधिक मासा निमित्त कार्यक्रम होता तेथे मी हीच माहिती सांगितली. सभासदांना ती आवडली.गोष्टी रुपात पूर्वी माहिती सांगितली जात असे. पण इतक्या वर्षात सामान्य जनता त्याचा अर्थ समजावून शकत नसल्याने त्या चे कर्मकांडात रूपांतर झाले .अधिक महिना जाव ई आणि अनारसे एव्हढेच सर्वांच्या लक्षात राहिले. त्यातले शासत्र विसरले मे

    • छान वाटले वाचून. अशा आख्यायिका कम लेखांचे संकलन करण्याचा विचार मनात आला. तो योग्य आहे की नाही ते कळत नव्हते. पोर्टल वरील विविध प्रतिक्रिया वाचून हुरूप येत असताना महिला मंडळात वाचन केले हे कळले नि उत्साहात भर पडली. 🤔👌🙏

  2. अधिकमासाची शास्त्रीय माहिती आणि गोष्टीरुपाने बालसुलभ व रंजक विश्लेषण भावले. अभिनंदन ! असेच आणखी लिहिल्यास त्याचे स्वागतच होईल.

    • आपल्या पिढीतील अशी माहिती असलेल्या साहित्य प्रेमी व्यक्तिच्या प्रतिक्रियेस आगळे वजन असते. म्हणून तुझी प्रतिक्रिया पाहून बरे वाटले. 🤔👌🙏

  3. आपण खूप संग्राह्य माहिती दिलीत जी आजकाल माहित नसते . आख्यायिका म्हटले तरी ती जनामनात पोहोचायला हवी. एक तर भाषा रसाळ आणि प्रवाही असल्याने आकलनास अगदी सोपी वाटली. भर्रकन वाचता आली. लक्षातही राहिली .
    खूप छान 👍

    • 👌नमस्कार.
      साहित्यिक व्यक्तींकडून मिळणारी दाद खूप सुखद वाटते. मन:पूर्वक आभार. लवकरच या पोर्टलवर तुमचा लेख लिहावा, अशी इच्छा बाळगते. 🤔❤️🙏

  4. आख्यायिकांचा असा सांस्कृतिक ठेवा पूर्वी एका व्यक्तीकडून
    दुस-या व्यक्तीकडे मौखिक रीत्या पोहोचविला जात असे. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अशी महत्त्वपूर्ण माहिती नव्या पिढीतील अनेक जिज्ञासूंना पुरविण्याचे कार्य स्मिता भागवत ह्यांनी कुशलतेने केले आहे. अभिनंदन.

    • थोडक्यात आणि छान प्रतिसाद दिला आहे तुम्ही. त्या बद्दल आभार नाही मानत. कारण नवनव्या पिढीतील क्वचित कुणाला ठाऊक असलेली ही माहिती आपल्या पिढीतील बहुतेकांना ठाऊक आहे. पाऊण शतक झाल्यानंतर आता स्वतःची नातवंडे तरूण ़आली आहेत त्यांना असं काही नाही सांगितल्याची घटना जुनी झाली आहे. खरोखर आपली पिढी फार भाग्यवान! आपण हे मोती वेचले आणि नवं तंत्रज्ञान विकसित झालेलं नि आत्मसात करू शकलो. म्हणून पार्थिव सोडण्यापूर्वी पृथ्वीवर वेचले ते मोती – माहिती पतवंडासाठी संगणकावर टाकण्याचा विचार मनात आला. म्हणून हे संकलन करायला घेतलं. त्या भावी संकलनातील हे एक प्रकरण! ते माझ्या पिढीतील तुम्हाला आवडलं याचा आनंद आहे. 🤔❤️🙏

    • खूप सुंदर आणि मुद्दे मांडणी खूप अप्रतिम आहे.
      अधिक महिना येतो दर ३ वर्षांनी येतो आणि का येतो हे माहित होते, पण पुरुषोत्तम मास हे नाव का पडले ते आज कळले.
      तुमचा लेख वाचताना आजीची आठवण झाली . मनापासून खूप धन्यवाद 🙏

  5. किशोर गजानन प्रभुदेसाई (गिरगांव गायवाडी मुंबई ४) किशोर गजानन प्रभुदेसाई (गिरगांव गायवाडी मुंबई ४)

    अतिशय उत्तम माहिती या निमित्ताने वाचावयास मिळाली त्याबद्दल आपले मनापासून आभार.

  6. Khup Chan Lihilai. Adhik Maas Mhatal ki Faqt Anarase and Javai evdh mahiti hot. pan hya lekhana mule khara arth kalala.

  7. अतिशय सुंदर कथा व विवेचन..
    अधिक मासाची उत्पत्ती, गरज ,महत्व समजावून सांगताना त्यास मानवी रूप , भावना देऊन सोप्या व लक्षात राहील अशी विषय-आशय याची मांडणी आवडली.. लहान मुलांना गोष्ट सांगून अन्न पोटी घालावे तसेच काहीसे सर्व सामन्यास जड शास्त्र अलगद डोकी भरावयाचे ही एक कला आहे. त्यासाठी केलेल्या ह्या लेखाचे व लेखिकेचे करावे तेव्हडे कौतुक थोडे आहे. आपल्या पौराणिक कथांचे जतन, संवर्धन व प्रसारण ह्यामुळे मिळणारे पुण्य हे अधिक समजावे..

    • अतिशय सविस्तर प्रतिक्रिया लिहिण्यासाठी मनापासून आभार. बालपणी वेचले होती स्वतःच्या भाषेत सांगण्याचा मला छंद आहे. कुणी सविस्तर उत्तर दिले तर ते वाचण्याचा ही! पुनश्च आभार. 🙏

    • अतिशय सविस्तर प्रतिक्रिया लिहिण्यासाठी मनापासून आभार. बालपणी वेचले होती स्वतःच्या भाषेत सांगण्याचा मला छंद आहे. कुणी सविस्तर उत्तर दिले तर ते वाचण्याचा ही! पुनश्च आभार. 🙏 आभा

    • सविस्तर प्रतिक्रिया लिहिण्यासाठी मनापासून आभार. बालपणी वेचले ते ते मोती स्वत:घ्या शैलीत लिहिण्याचा मला छंद आहे. त्यांचे सविस्तर उत्तर आले की ती माहिती रुजल्याचा आनंद व्यक्त करण्याचाही! तो आनंद तुमच्या प्रतिक्रियेने दिला. आभार.

  8. अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण लेख. ओघवते लिखाण!
    खूप खूप शुभेच्छा 🕉️

  9. Very informative. I knew some but was not aware of many things mentioned in the article. Nicely written. Thank you for so much

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Dr.Satish Shirsath on अणिबाणी
सौ. सुनीता फडणीस on अष्टपैलू सुचिता पाटील
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माझी जडण घडण : ५४
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on ज्येष्ठांनो, छळवाद विषयक कायदा समजून घ्या ! – प्रमोद ढोकले
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on अष्टपैलू सुचिता पाटील
अविनाश ब.हळबे. on अष्टपैलू सुचिता पाटील