दूर- दुर्गम डोंगर दऱ्यात राहणारा आदिवासी बांधव हा आजही मोठ्या प्रमाणात वंचित आणि उपेक्षितच आहे. त्यांना त्यांच्या सोयी सुविधांची वाणवा ही आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर जाणवते. आज पण ते आपल्या प्रामुख्यानं शिक्षण, आरोग्य व्यवस्थेपासून ते दळण- वळणाच्या सोयी सुविधा आणि रोजच्या प्रवासाकरीता योग्य रस्ते, ह्या मूलभूत गोष्टींची वाणवा असलेल्या ह्या समाजाला, आज मुख्य प्रवाहात आणण्याकरीता बरीच मंडळी आज आपलं सामाजिक दायित्व जपत, मोठ्या मनानं ह्या बांधवांकरीता समाज कार्य करतं आपलं योगदान देत आहेत त्यातलंच एक नावं म्हणजे केअर ऑफ़ नेचर सामाजिक संस्था आणि त्या संस्थेचे संस्थापक श्री राजू मुंबईकर.
असं म्हणतात कि “स्वहितासाठी आपण जे मिळवतो, कमावतो त्यातील थोड्या प्रमाणात आपण इतरांना देऊ शकलो तर ते कार्य एका वेगळ्याच आनंदाची अनुभूती देते आणि तेच कार्य आज राजू मुंबईकर यांच्या औदार्यातून साकार झालेय.
उरण रानसई येथील आदिवासी वाडीवरील मार्गाची वाडी ते ट्रान्सफार्मरपर्यंतचा तब्बल १५० मीटरचा संपूर्ण रस्ता स्वतःच्या खर्चाने, सिमेंट काँक्रीटनं, अगदी भक्कम पद्धतीने नवीन बांधण्यात आला.
या आधी ह्या रस्त्याची दूरावस्था येवढी भयानक होती कि अक्षरशः एक एक फुटाचे खड्डे पडलेल्या त्या रस्त्यात अनेक दुचाकीस्वार खाली पडून जखमी झालेत तर ह्या कोरोनाच्या काळात वाडीवरून कामानिमित्त मजुरीसाठी जाणाऱ्या आदिवासी बांधवांच्यां टेम्पोचा अपघात होऊन अक्षरशः टेम्पो वीस ते तीस फूट रस्त्याच्या बाजूला खोल खड्ड्यात जाऊन आदळला आणि त्यातील सात आठ आदिवासी बांधव गंभीररीत्या जखमी झाले.
ह्या खराब रस्त्यामुळे कामानिमित्त बाहेर जाणारा आदिवासी बांधव, महिला वर्ग आणि शाळा कॉलेज मध्ये जाणारे विद्यार्थी तरुण तरुणी यांची होणारी गैरसोय आणि त्यांना सहन करावा लागणारा त्रास हा या आदिवासी बंधावांच्या जिवाच्या मैतोराला म्हणजेच राजू मुंबईकर यांना पाहावलां नाही.
खरं म्हणजे त्यांना ह्या विचारांनी स्वस्थ झोपुच दिलं नाही, असं म्हटलं तर वावगं ठरणारं नाही. आणि त्यांनी त्या आदिवासी बांधवांना मागच्या वर्षी आदिवासी मेळाव्यात दिलेला शब्द पूर्ण केलाच. हा दीडशे मीटरचा रस्ता बनवत असताना त्याला लागणारं सामान म्हणजे सिमेंट, खडी, ग्रीट्स, दगड, चिपळी पाण्याचा टँकर, सिमेंट मिक्सर, जेसीबी यांचं पूर्ण नियोजन करणं आणि ते पण ह्या दुर्गम वाडी वस्तीवर वाहून नेणं म्हणजे एक दिव्यच होतं आणि ते शिवधनुष्य अगदी लिलया उचलत ह्या आदिवासी बांधवांचा जीवनप्रवास सुखकर व्हावा म्हणून सतत प्रामाणिक प्रयत्न करणारे आपल्या शब्दाला जागले ते राजू मुंबईकर.
ह्या सुखद रस्त्याच्या बांधकामा करीता रानसई येथील चार आदिवासी वाड्यातील सर्व आदिवासी बांधवांना राजू मुंबईकर यांनी एक आवाहन केलं होतं कि “आपणांस असेल वेळ थोडा तर श्रमदाना करीता जोडा” आणि या आवाहनाला अगदी उदंड प्रतिसाद देत किमान अडीचशे ते तीनशे आदिवासी बंधाव आपली औजारे, कुदळ, फावडे, घमेलं, थापी, लाकडी रंधा घेऊन सकाळी ठीक आठ वाजता कामाच्या ठिकाणी प्रामाणिक पणे हजर झाले आणि खऱ्या अर्थाने आदिवासी बांधवांच्या श्रमदानातुन आणि राजू मुंबईकरांच्या औदार्यातुन सुरू झालेलं हे पवित्रकार्य. संध्याकाळी सात वाजेपर्यंत न थांबता, न थकता अखंडित पणे सुरु ठेऊन पूर्णत्वास नेलं ते ह्या आदिवासी बांधवानी आणि त्यांच्या जिवाच्या मैतोराने राजू मुंबईकरानीं !
ह्या आदिवासी बांधवांच्यां सुखाचा प्रवासाकरीता बांधण्यात येणार्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यासाठी विशेष सहकार्य केलं ते जे.एम.म्हात्रे ट्रस्ट पनवेल आणि पी. पी. खारपाटील ट्रस्ट चिरनेर यांनी.
आज ह्या कामाच्या ठिकाणी म्हणजेच रानसई मार्गाची वाडी येथे राजू मुंबईकरांच्या प्रेमापोटी आपल्या कामाच्या व्यस्त शेड्यूल मधून खास वेळ काढून आवर्जून हजर राहिले ते सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय श्री संतोष जी. पवार आणि त्याच्या सोबतीला होते ते अनुज पाटील आणि सोबतच राजू मुंबईकरांच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांच्या सहचारिणी, रोटरीयन.. सौ.राणी ताई मुंबईकर, व्हाईस चेअरमन उरण, पनवेल, कर्जत शिक्षक पतपेढी सोबत त्यांच्या दोन कन्या … वैष्णवी आणि सृष्टी मुंबईकर, नितेश मुंबईकर, कॉंन संस्थेचे सेक्रेटरी महेश पाटील तसेच त्यांचे सहकरी गोल्डन ज्युबली मंडळ सारडेचे अध्यक्ष श्री नवनीत पाटील, श्री अनिल घरत, सोबत सारडे विकास मंचचे उपाध्यक्ष श्री संपेश पाटील, खजिनदार श्री रोशन पाटील यांनी सुद्धा आवर्जून हजर राहून ह्या श्रमदानात आपलं अमूल्य योगदान दिलं.

हा सिमेंट काँक्रीटचा नवीन रस्ता बांधल्यामुळे इथले आदिवासी बांधव इतके खुश झाले कि त्यांनी कामाच्या ठिकाणी अक्षरशः नाचून आणि गाणी गाऊन आपला आनंद व्यक्त केला आणि हा रस्ता ज्यांच्या माध्यमातून, औदार्यातून बांधून दिला त्या श्री राजू मुंबईकर यांचे अगदी मनाच्या अंतःकरणा पासून आभार व्यक्त केले.

– लेखन : अनिल घरत.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.
सामाजिक बांधिलकी मनात रुजवून गोर गरीब जनतेची सेवा करणाऱ्या श्री राजू मुंबईकर यांचे प्रथम अंतःकरणा पासून आभार.
रस्ता तयार केल्या मुळे भविष्यात होणारे अपघात टळतील आणि कित्येक जणांचे प्राण वाचतील त्याबद्दल श्री राजू मुंबईकर यांना धन्यवाद 🙏