Saturday, June 14, 2025
Homeलेखपर्यावरण : राष्ट्रीय सायकल धोरण आवश्यक

पर्यावरण : राष्ट्रीय सायकल धोरण आवश्यक

आज, ५ जून. जागतिक पर्यावरणदिन. या निमित्ताने हा विशेष लेख. हा लेख ३ जून या जागतिक सायकल दिनाच्या निमित्ताने लिहिलेल्या लेखाचेच विस्तारित रूप आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.
— संपादक

एकीकडे प्रगत होत चाललेल्या मानवाकडूनच दिवसेंदिवस पर्यावरण धोक्यात येत चालले आहे.यामुळे केवळ अन्य जीवसृष्टीच नाही तर खुद्द मानवाच्याच अस्तित्वाचेच प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. यासाठी विविध सरकारे, संस्था, व्यक्ती आपापल्या परीने विविध उपाययोजना करीत आहेत. अनेक उपक्रम हाती घेतल्या जातात. असे असले तरीही वाढत चाललेल्या स्वयंचलित वाहनांमुळे प्रदूषणही वाढतच चालले आहे.म्हणून पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी सायकल चे असलेले महत्व ओळखून ती चालविण्यास प्रतिष्ठा मिळावी, ती लोकप्रिय व्हावी, यासाठी भारतासारख्या देशात विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे.

आजच्या काळात सायकलीचे किती महत्व वाढत आहे हे लक्षात घेऊन युनायटेड नेशन्स ने एप्रिल २०१८ मध्ये ३ जून हा जागतिक सायकल दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे. गमतीची गोष्ट म्हणजे जर्मनीतील मॅनहाइम येथील कार्ल ड्रेस यांनी १२ जून १८१७ रोजी तयार केलेली सायकल आजच्या सायकलीप्रमाणे लोखंडापासून बनवलेली नव्हती तर ती लाकडापासून बनविलेली होती. त्यात सुधारणा होत होत आज तर गिअर असलेल्या सायकली आल्या आहेत.

आपण लहानपणी सायकल चालवायला कसे शिकलो, कितीदा पडलो, एकेका तासाच्या भाड्याने सायकली आणून त्या कशा चालवल्या, याच्या खूप साऱ्या आठवणी खूप जणांच्या मनात घोळत असतात.अनेक जणांनी त्या लिहिल्या देखील आहेत. पण याच व्यक्ती पुढे “मोठ्या” झाल्यात की मात्र त्यांनाच सायकल चालविण्याची लाज वाटू लागते. असे का बरे ? कारण भारतात स्कूटर, मोटार सायकल, मोटार या स्वयंचलित वाहनांना जी अवाजवी प्रतिष्ठा लाभली आहे किंवा निर्माण केल्या गेली आहे, ती सायकलला नाहीय.

खरं म्हणजे सायकल चालविण्याचे खूप फायदे आहेत. सायकल चालविण्याने छान व्यायाम होतो. दुचाकी, चारचाकी या स्वयंचलित वाहनांमुळे जे प्रदूषण होते, तसे प्रदूषण सायकलने होत नाही. सायकल चालवताना निसर्गाशी अधिक जवळीक वाटते. स्वयंचलित वाहनांच्या तुलनेत सायकलच्या किंमती अतिशय कमी असतात. तसेच स्वयंचलित वाहनांप्रमाणे सायकलला इंधन (पेट्रोल, डिझेल, गॅस) लागत नाही. देखभालीसाठी तिला सर्विस सेंटर मध्ये न्यावे लागत नाही. तिची देखभाल आपणच करू शकतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पैसे वाचतात.

भारतात जरी सायकल वापरणे हे प्रतिष्ठेचे समजले जात नसले तरी युरोप मध्ये मात्र सायकल वापरणे हे कमीपणाचे समजले जात नाही.एखाद्या कंपनीत कामाला जाणारा कर्मचारी सायकल ने कंपनीत जात असेल तर कदाचित त्याच रस्त्याने ,त्याच्या मागेपुढे त्या कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी सुद्धा स्वतःच्या सायकलने कंपनीत जात असेल. मी स्वतः पाच वर्षांपूर्वी युरोप मध्ये त्यातही विशेषत: नेदरलँडमध्ये पाहिले आहे की, शहरांमध्ये रस्त्यांवर स्वयंचलित वाहनांपेक्षा सायकलींची संख्या खूपच जास्त असते. मोठी माणसंच नाही तर युवक, युवती सुद्धा ऐटीत, दिमाखाने सायकलीं चालवताना दिसतात. तिथे ४० टक्के नागरिक वाहतुकीचे साधन म्हणून सायकल वापरतात. सायकल चालविण्याचे महत्व, गरज, सहज उपलब्धता वाहतुकीचे नियम, पार्किंग व्यवस्था अशा अनेक गोष्टींमुळे तिथे सायकल संस्कृती चांगली रुजली आहे. एका प्रयोगानुसार २०१४ मध्ये एक किलोमीटर भर लांब रात्री चमकणार्‍या सायकल ट्रॅकची निर्मिती करण्यात आली आहे. फ्लोरोसंट रंगाचे विशिष्ट तुकडे सिमेंट-काँक्रीटमध्ये वापरण्यात आले. ते दिवसाच्या प्रकाशात ऊर्जा साठवून घेतात. रात्रीच्या अंधारात हाच रस्ता उजळून निघतो.

स्पेनमधील सॅन सबॅस्टियन या शहरात २००९ साली जुन्या रेल्वेच्या बोगद्याचे रूपांतर सायकल ट्रॅकमध्ये करण्यात आले आहे. हा जगातील सर्वात लांब सायकल बोगदा आहे. विशेष म्हणजे या बोगद्यात सायकलस्वारांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरेसुद्धा आहेत.

इतरही अनेक पाश्चात्य देशात रस्ते बांधणी करताना सायकलस्वारांचा विचार अवश्य केला जातो. त्यांच्यासाठी स्वतंत्र ट्रॅक ठेवण्यात येतात. सर्वप्रथम पादचारी, सायकलस्वार, सार्वजनिक वाहतूक आणि त्यानंतर खासगी वाहने अशा पद्धतीने रस्त्यांची आणि पार्किंगची आखणी केली जाते.

आपल्याकडे मात्र शहर नियोजनात अजूनही सायकलस्वारांचा विचारच करताना कुणी दिसत नाही. अर्थात याला कारण नागरिक अजूनही मोठ्या प्रमाणात सायकल वापरीत नाही, हेच असावे.

कोणे एकेकाळी सायकल चे शहर म्हणून ओळखले जाणारे पुणे देखील आता सायकलींपेक्षा स्वयंचलित वाहनांनील गजबजलेले दिसतेय.

सायकल च्या बाबतीत इतर काही शहरांमध्ये काही प्रयोग मात्र करण्यात आले आहेत. नवी दिल्ली येथील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सम विषम तारखांना सायकल चालविण्याचा प्रयोग करण्यात आला. नवी मुंबईत काही वर्षांपूर्वी महापालिकेतर्फे सायकली भाड्याने देण्याचा उपक्रम राबविण्यात आला होता. विशिष्ट ॲप सायकल चे बुकिंग करून सायकल अनलॉक करून इच्छित स्थळी नेता येत असे. तिथे जवळपास असलेल्या सायकल पार्किंग च्या ठिकाणी ती उभी करून लॉक करून तिथेच ठेवून देता येत असे. दुर्दैवाने आपल्या कडे त्या त्या अधिकाऱ्याची बदली झाली की,त्याने सुरू केलेले अभिनव, लोकोपयोगी उपक्रम पुढे चालू राहतीलच याची शाश्वती नसते. त्यामुळे नवी मुंबईत अस्तित्वात आलेली सायकल योजना संबंधित महापालिका आयुक्तांच्या बदलीनंतर आता दिसेनाशी झाली. पण खरं म्हणजे ही सायकल योजना सरकारने सर्व महानगरपालिका आणि इतर शहरांमध्येही लागू करण्याबाबत विचार केला पाहिजे.

सायकल वापरण्यास उत्तेजन देण्यासाठी भारत सरकारच्या काही योजना आहेत. काही राज्य सरकारे मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे यासाठी त्यांना मोफत सायकली देतात. ही एक अतिशय स्तुत्य योजना असून इतरही राज्य सरकारांनी या योजनेचे अनुकरण केले पाहिजे. तसेच केवळ मुलींसाठी असलेली ही योजना गरीब मुलांसाठी सुद्धा लागू केली पाहिजे.

एकंदरीतच पर्यावरण संवर्धन, इंधनाची बचत, शहरांमध्ये स्वयंचलित वाहनांमुळे होत असलेली वाहतूक कोंडी, लोकांची क्रय शक्ती अशा एक ना अनेक बाबी विचारात घेऊन भारत सरकारने समग्र राष्ट्रीय सायकल धोरण आखण्याची नितांत गरज आहे. देशात “सायकल युग” अवतरण्यासाठी ते एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल ठरेल.

देवेंद्र भुजबळ

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. प्रिय श्री राम भाऊ,
    आपण इतकी दिलखुलास प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. आपल्या सारख्या जाणकार, समाजासाठी सतत काही तरी करण्याचा ध्यास घेतलेल्या व्यक्ती माझे प्रेरणा स्रोत आहेत. आपला स्नेह असाच कायम असू द्या.

  2. देवेंद्र भुजबळ यांचा सायकलसाठी धोरण हवे.हा लेख सध्याच्या आणि भविष्यातील पर्यावरण,प्रदुषण आणि आरोग्याच्या वाढत्या समस्या यावर तातडीने जागरुक होऊन ज्या अनेक उपाययोजना तातडीने धोरण ठरवुन राबण्या साठीपैकी एक महत्वपूर्ण उपाय आहे.
    भविष्याचा वेध घेणारे,पुढील, 50-100 वर्षांच्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी समाज धुरीण,समाज धुरंधर अशी देवेंद्र भुजबळ सारखी तज्ञ माणसे अजुनही खुप काही चांगल्या संकल्पना राजकीय स्तरावर नेऊ शकतात ही फार महत्वाची बाब आहे.
    काळाची पाउले ओळखुन 2005 साली अनेक उत्तमोत्तम संहितापैकी ” भारत एक जागतिक महासत्ता “अशी एक अभ्यासपूर्ण संहिता मला दूरदर्शन वर माहिती पटासाठी दिली होती. देवेंद्र च्या अशा अभ्यासपूर्ण संहितामुळे मी मुंबई दूरदर्शन साठी अनेकोत्तम माहिती पट बनवु शकलो.
    देवेनसारखा एक उत्तम विचारवंत, अभ्यासु भविष्यकाळाचा अचुक वेध घेणारा,उत्तमोत्तम संकल्पना मांडणारा ,थोर विचारवंत,तज्ञ मला लाभला हे दूरदर्शनच्या प्रेक्षकांच आणि दूरदर्शन भाग्य होय. देवेंद्र च्या अफलातुन अभ्यास बुद्धी मत्तेला मानाचा मुजरा.
    राम खाकाळ निव्रुत्त निर्माता, लेखक, दिग्दर्शक.
    ( 1977-2014).

  3. आदरणीय संपादक साहेब राष्ट्रीय समस्येवर सायकलीवरचा लेख अतिशय मार्मिक मुद्द्यांवर लिहिला गेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments