“गृहिणी”
संसार म्हणजे परिकथा नव्हे. ते एक भरभक्कम आव्हानच आहे. एका साहित्यिक कुटुंबातून सधन शेतकरी कुटुंबातली माझी वाटचाल तशी बहुरूपीच होती, मनोरंजकही होती. आत्तापर्यंतचे माझे शेतीविषयक ज्ञान हे केवळ पुस्तकी होते. त्या पाठीमागची मेहनत, तळमळ, सिद्धता, मानसिक चढ-उतार जवळून अनुभवताना मी वेळोवेळी थक्क होत होते. आतापर्यंत पाऊस म्हणजे न सुकणारे कपडे, रस्त्यात साचलेली तळी, छत्री, रेनकोट आणि आनंदाने मुक्त भिजणे याच व्याख्येत होता. पण पाऊस म्हणजे जीवन आणि आस्मानी सुलतानीमुळे बळीराजाची होणारी तगमग जेव्हा मी प्रत्यक्ष अनुभवू लागले तेव्हा पाऊस या संज्ञेतला जीवनावश्यक अर्थ कळू लागला. आभाळ भरून आलं की आई (सासूबाई) गच्चीवर जाऊन ढगांना साकडं घालत, ”पड रे बाबा! इतकं सारं पेरलंय उगवू दे.” कधी मनासारखा पाऊस कोसळायचाही. तर कधी अंधारलेलं आभाळ क्षणात मोकळ व्हायचं. एखादी हलकी सर येऊन जायची. अशावेळी त्या नाराजीने म्हणायच्या “हा कसला पाऊस? नुसतं फडकं पडलं !”
सुरुवातीला मला “फडकं पडलं” याचा अर्थच लागायचा नाही. नंतर कळलं असा एकसरी पाऊस म्हणजे बिनकामाचा, एखाद्या लहानशा फडक्या सारखाच.
शेतीचा पसारा म्हणजे काय हेही मी अनुभवत होते. घरात धान्याच्या गोण्या लावलेल्या असत. मोठमोठ्या पत्र्यांच्या कोठ्यांतून निवडलेलं, न निवडलेलं, चाळलेलं, न चाळलेलं असं धान्य भरलेलं असायचं. बायांच्या मदतीने आईंचं सतत निवडणं, भरडणं, पाखडणं, वाळवणं, उपसणं, भरणं चालूच असायचं. शेतातून सुकवून आलेली तूर, मूग तेल लावून भिजवायची, वाळवायची. उखळीत अलगद त्यावर घाव घालून उपसायची आणि पाखडून त्याची डाळ बनवायची. शेंगा फोडून त्यातून शेंगदाणे काढायचे. एक ना दोन अनेक कामं. खरं म्हणजे हा एक मोठा गृह उद्योगच वाटायचा मला आणि तो फार आनंदाने पार पडत असायचा. हे सारं करणाऱ्या बायांचं एकमेकातलं बोलणं मला फार आवडायचं. उखळ, मुसळ, जातं,सुपं यांच्याशी त्यांचं नातं जमलेलं असायचं. गावभर घडणाऱ्या गोष्टी अशावेळी त्यांच्या बोलण्यात असायच्या. त्यांच्या भाषेतला गोडवा ठसका औरच होता.
“आई बाई नडणी कानबाई घडणी”
“ईसगाव तिसगाव भिकारीने चाईसगाव”
“भरमना भोपया चारी पाय मोकया”
अशा म्हणी त्यांच्या बोलण्यात जागोजाग पेरलेल्या असायच्या.
त्यांच्या बोलण्यात जागोजाग पेरलेल्या असायच्या. मला बऱ्याच वेळा अर्थ लागायचे नाहीत मग मी त्यांनाच विचारायची. ही एवढी शहरात राहणारी, शिकलेली बाय आपल्याला अर्थ विचारते याचंच त्यांना कौतुक वाटायचं.
आईचं आणि त्यांचं एक गोड नातं होतं. काम वेळेत व्हावं म्हणून आईंचं रागावणं, दटावणं असायचं आणि त्याच वेळी एखादीला त्या म्हणत, “कलाबाई जानं शे का तुले ? जाय मग. काले करजो.” नकळतच मी सगळं टिपत होते. माझ्यासाठी हे सगळं जगच खूप वेगळं होतं.
आमच्याकडे विमल नावाची एक बाई यायची. तिला “मेळवाली म्हणायचे.” म्हणजे शेतीच्या कामासाठी लागणाऱ्या मजुर बायका ती गोळा करायची.त्यांना काम द्यायची. थोडक्यात ती ठेकेदार होती. तकतकीत कृष्णकांती, मध्यम उंची, घट्ट नेसलेलं लुगडं, तशी भरदार पण अगदी बारीक लवचिक कंबर, हातभर बांगड्या पायात जड चांदीचे तोडे…..अशी विमल म्हणजे मला एखाद्या कलात्मक मराठी चित्रपटातील नायिकाच वाटायची. सकाळची वेळ असायची. आबा (माझे सासरे) बंगळीवर (झोपाळा) बसलेले असायचे. विमल दाराच्या चौकटीत उंबरठ्यावर उभी असायची. इतक्या अंतरावरून त्यांचा संवाद चालायचा.
“ येव बाई विमल”
“ हाव आबा“
आज कितल्या बाया लागवशे? कपाशी येचनी शेना ?”
“पंधरा एक बाया लागतील आबा.”
“ पंधरा जास्त वहीतना. दहा पुरे.”
“नाही ना आबा. वावर आज पुरं नाही वहाउ आख्खो. कालदिन जानं पडीन.” विमलच्या डोळ्यात विलक्षण चमक असायची. थोडं थांबून ती आबांना म्हणाली.
“आबा बाया नाही म्हनी राहीनात.त्यास्नी रोज वाढई द्या.समदादूर बायांना रोज वाढेलशे. पंधरा रुपया नाही पुरत.”
“बरं देखसुत पगारना दिन. तू कामतर पुरं कर.”
“नाही आबा.बाया नाय म्हनत”
मग थोड्या घासाघासी नंतर जे हवं ते साध्य झाल्यावर विमल परतायची. त्या क्षणी विमल मला एक समर्थ स्त्री वाटायची. तिच्या क्षेत्रातील ती एक नंबरची वाटायची. काहीशी धूर्त, धोरणी आणि चतुर. तेव्हा जाणवायचं स्त्रीचं कर्तुत्व हे काही शिक्षण, पदव्यानेच नाही सिद्ध होत. त्या त्या क्षेत्रातील सखोल ज्ञान, नेतृत्व, गरज, एम्प्लॉयर आणि एम्प्लॉयी मधला एक दुवा सामर्थ्याने सांभाळणं हेच कौशल्य असतं. विमल मध्ये हे गुण उपजतच असावेत. विमल आमच्या घरातल्या बहुतेक सर्व कार्यात सहभागी असायची. आमची दोघींची हळूहळू मैत्री होऊ लागली होती. आमच्या खूप गप्पा रंगायच्या. मग शेवटी ती म्हणायची, “काय वहिनीबाय ? मजा घेई राह्यले माझी” ? मनमोकळी हसायची. माझी मासळी खाण्याची आवड समजून ती कधीकधी माझ्यासाठी नदीतल्या मास्यांचे लालभडक कालवणही प्रेमाने घेऊन यायची.
एकंदरीतच सर्वांशी छान स्नेहसंबध जुळत होते. नणंदाशी दीरांशी, परिवारातले चुलत, आतेमामे सार्यांशीच. खूप वेळा मला परिवारातल्या एकेका व्यक्तीबद्दल कुतुहल वाटायचे. तरीसुद्धा “आहे मनोहर तरी गमते उदास मजला” याचा अर्थ मनाला भिडत होता. बँक ऑफ इंडियात मी अजून राजीनामा दिला नव्हता पण “विदाऊट पे वर” किती दिवस रजा घेणार ? शिवाय अमळनेरला अथवा जवळपास कुठेच बँक ऑफ इंडियाची शाखा नव्हती. भविष्यात होण्याची शक्यताही अधांतरीच होती. कधीतरी मला राजीनामा द्यावा लागणारच होता. मग पुढे काय ?..
“सुनबाई, वहिनीबाई” ही नव्याने मिळालेली बिरुदं अगदी मोरपिसासारखी असली तरी जीवनभर मी याच भावनिकतेत तरंगत राहू शकेन का हे प्रश्नचिन्ह दिवसेंदिवस मोठं होत होतं. या सगळ्या वातावरणात अदृश्यपणे मी माझं जगणं शोधत होते. हे जग कितीही चांगलं असलं तरी माझ्यासाठी ते पुरेसं नव्हतं. रोमँटिक या शब्दाभोवती मी थांबले होते. “रोमँटिक आयुष्य” म्हणजे नक्की काय हे कळत नव्हतं. उंबरठ्यात नवऱ्याची वाट पाहणारी आणि नवऱ्याने केळीच्या पानात गुंडाळलेला गजरा केसात माळल्यावर सुखावणारी या चौकटीतली ओळख मला नक्कीच नको होती.
मला माझे ऑफिस आठवायचे. माझा सोशल ग्रुप आठवायचा. नऊ आठ च्या गाडीची आठवण यायची. अगदी साधना बरोबर एखाद्या भटक्या संध्याकाळी मोकॅम्बो मध्ये खाल्लेल्या चिकन लिव्हर मसाल्याची तोंडाला पाणी सुटणारी आठवण व्हायची. अंजू बरोबरचे भटकणे आठवायचे. हँडलूम हाऊस, स्वदेशी भांडार मधली मुक्त खरेदी आठवायची. आशाबरोबर पाहिलेली नाटके , चित्रपट आठवायचे. विठ्ठल भेळवाला ही आठवायचा. विशेषत: या सर्वातला निर्बंधपणा ..याची उणीव मला कुठेतरी जाणवायची. पुन्हा त्याच साऱ्या वातावरणाचा भाग व्हावे असे वाटत नसले तरी “गृहिणी” हा शब्द मला फार भेडसावत होता. तमाम गृहिणींशी आणि त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा आदर राखून मला सांगावेसे वाटते की कुठल्याच दृष्टीने मला “गृहिणी” होणं हा विचार झेपत नव्हता. मला विंदा करंदीकर यांची एक कविता आठवायची,
“कर कर करा मर मर मरा
दळ दळ दळा मळ मळ मळा
तळ तळ तळा आणि जळा..”
गृहिणीच्या कामातला तोचतोच पणा जाणवून देणारी कविता आठवली आणि मी अक्षरश: भेदरले. मला या पायरीवर थांबायचं नव्हतं. मला माझी ओळख हवीच होती आणि ती कुणालाही न दुखवता, कुणाच्याही मनात गैरसमज निर्माण न करता.. कसे ते अजून ठरायचे होते पण कुणाची मनं न मोडता, आश्वासक आणि प्रामाणिक पद्धतीने माझ्या मनातल्या वादळाची उकल मला करायची होती. काही काळ जावा लागेल. वाट पहावी लागेल. अखेर या विचारापाशी एक दिवस येऊन मी स्थिरावले. शिवाय आमचं कुटुंब हे सामाजिकदृष्ट्या पुढारलेलं होतं. अमळनेरमधली पहिली कन्या शाळा द्रौ. रा.; द्रौपदा रामचंद्र भांडारकर कन्या शाळा. हे भांडारकरांचे भूषण होतं. आहे.
त्यामुळेच मी पूर्ण निश्चिंत होते.
क्रमशः

— लेखन : राधिका भांडारकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800