अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेनंतर दूरचित्रवाणी वाहिन्यांनी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांच्या, नातेवाईकांच्या, परिचितांच्या मुलाखती ज्या प्रकारे घेऊन त्या प्रसारित केल्या आहेत आणि करीत आहेत, त्यामुळे प्रेक्षकांमध्ये सार्वत्रिक संतापाची लाट उसळली आहे. या निमित्ताने २१ व २२ मार्च २०२२ रोजी फलटण येथे झालेल्या विभागीय साहित्य संमेलनाच्या एका परिसंवादाचा वृत्तांत पुन्हा पुढे देण्यात येत आहे. वाचकांच्या प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.
— संपादक
आजच्या घडीला प्रसारमाध्यमे वाचक आणि प्रेक्षकांकडे मोठया प्रमाणात “ग्राहक” म्हणूनच बघत आहेत. त्यामुळे आचार्य बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ बाबासाहेब आंबेडकर आदींनी पत्रकारितेच्या माध्यमातून विचारपूर्वक केलेल्या प्रबोधनाची अपेक्षा न करता काय वाचावे, काय पाहावे याचा निरक्षिर बुद्धीने आपणच विचार केला पाहिजे, असे परखड प्रतिपादन न्यूज स्टोरी टुडे पोर्टलचे संपादक देवेंद्र भुजबळ यांनी केले.
महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे व या परिषदेच्या फलटण शाखेच्या वतीने श्री सद्गुरु प्रतिष्ठान व श्रीराम एज्युकेशन सोसायटी यांच्या सहकार्याने फलटण येथे नुकत्याच पार पडलेल्या २७ व्या विभागीय मराठी साहित्य संमेलनात ‘महाराष्ट्रातील प्रसार माध्यमे व साहित्यिक सद्यस्थितीत समाज प्रबोधनात कमी पडत आहेत कां ?’ या परिसंवादात ते बोलत होते. श्री भुजबळ पुढे म्हणाले, प्रसार माध्यमांनी बातमी छापतांना किंवा दाखविताना समाज मन दुभंगणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. प्रसार माध्यमातून आणि साहित्यातून सर्व सामान्य माणसाला जगण्याची उमेद मिळाली पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री हरिष पाटणे यावेळी बोलताना म्हणाले, प्रसारमाध्यमांनी एकांगीपणे न जाता चोहोबाजूंचा विचार करुन बातमीची मांडणी केली पाहिजे. प्रसारमाध्यमे व साहित्यिक समाज प्रबोधनात कमी पडत नसून काळानुरुप बदलत्या परिस्थितीशी ते सामना करीत आहेत. यातून चांगल्या विचारांचे मंथन होणे गरजेचे आहे. इलेक्ट्रॉनिक मिडीयाद्वारे वारंवार त्याच त्या बातम्या दाखवल्याने लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचे बोलले जाते. परंतु ती बातमी बिंबवून समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्याचे काम केले जाते, असे सांगून त्यांनी साहित्यिकांनी व्यावसायिक न होता सकस व समाजाला दिशा देणारे साहित्य निर्माण केले तर निश्चितच समाज प्रबोधन घडून येईल, असेही स्पष्ट केले.
भारती विद्यापीठाचे प्रा.डॉ.वैभव ढमाळ म्हणाले, अलिकडच्या काळातील साहित्य संमेलनांमध्ये असे वास्तववादी विषय परिसंवादामध्ये घेतले जात नाहीत. सत्याला सत्य म्हणण्याची मानसिकता बदलत चालली की काय ? अशी अवस्था आहे. त्यामुळे प्रसारमाध्यमांनी आपली भूमिका ठाम ठेवून समाज प्रबोधनात आघाडीवर असले पाहिजे. पत्रकार हा दैनंदिन साहित्यिक असतो. साहित्यिकांनी समाजामध्ये घडणार्या घटनांचे संवेदनशील वृत्तीने लिखाण केले पाहिजे. पूर्वीचे साहित्यिक आणि अलिकडच्या काळातील साहित्यिक यांच्यामध्ये दरी दिसून येते. यासाठी वाचन संस्कृती वाढणे काळाची गरज आहे. साहित्यिक व प्रसारमाध्यमे हे दोन्हीही घटक महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारे आहेत. त्यामुळे त्यांची भूमिका समाज प्रबोधनात महत्त्वाची आहे.
परिसंवादाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ, यांनी प्रसारमाध्यमे व साहित्यिक हे समाजातील महत्त्वाचे घटक असून त्यांची भूमिका ही सकारात्मक असावी. जे समोर दिसते त्याचे योग्य पद्धतीने विवेचन केले तर समाजमनाचा आरसा सर्वांसमोर येतो. त्यामुळे साहित्यिक व प्रसारमाध्यमे यांनी समाजभान राखणे काळाची गरज आहे, असे मत व्यक्त केले.

श्री बेडकिहाळ पुढे म्हणाले, अलिकडच्या काळातील प्रसारमाध्यमे ही व्यावसायिक बनू पाहत आहेत. त्यामुळे खरे चित्रण पुढे येताना अडचणी निर्माण झाल्याचे दिसते. त्यासाठी व्यावसायिकेतेबरोबर मानवी मूल्यांची जपणूक होणेही गरजेचे आहे. मानवी मूल्ये जपायची असतील तर पत्रकार व साहित्यिकांनी नि:पक्षपातीपणे लेखन केले पाहिजे.
परिसंवादाचे प्रास्ताविक व स्वागत प्राचार्य शांताराम आवटे यांनी केले. सूत्रसंचालन मसापच्या फलटण शाखेचे कार्यवाह ताराचंद्र आवळे यांनी केले. आभार कार्याध्यक्ष महादेव गुंजवटे यांनी मानले.

यावेळी संमेलनाध्यक्ष सुधीर गाडगीळ, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्षा सुनीताराजे पवार, सातारा जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकिहाळ, संमेलन कार्याध्यक्ष डॉ.सचिन सूर्यवंशी बेडके आदींसह साहित्यिक, पत्रकार, रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
— लेखन : अमर शेंडे. फलटण
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800