शताब्दी वर्षाच्या निमित्ताने…….
हरि:ओम…..! नर्मदे हर…..!
सुप्रभात, सादर स्नेह वंदन….!
सुजनहो आज दिनांक 21 जून………
आजचा दिवस गेल्या काही वर्षापासून म्हणजेच, प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी माँ भारती चे प्रधानमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारल्यापासून संपूर्ण विश्वाने आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करावयास सुरुवात केली आहे.आपणा सर्वास आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…….!
त्याचबरोबर आज दिनांक 21 जून म्हणजे माँ भारतीच्या सेवेसाठी आजन्म कटिबद्ध असलेल्या ” राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ” या जगातील एकमेव राष्ट्र समर्पित व स्वार्थ विरहित संघटनेचे संस्थापक ” परमपूजनीय डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार ” यांची पुण्यतिथि …….!
इमेसादरंत्वां…….
पूजनीय डॉक्टरांचे संपूर्ण आयुष्य हे राष्ट्र समर्पित जीवनाचे एक अत्यंत आदर्श उदाहरण आहे. राष्ट्र निर्मितीचे ध्येय उरी जपणाऱ्या महापुरुषाची दृष्टी किती सूक्ष्म, उत्तुंग, व्यापक, सर्वगामी, स्वार्थ विरहित, दूरगामी व संस्कार संपन्न असते हे बघायचे असेल तर पूजनीय डॉक्टरांच्या जीवनासारखा दुसरा उत्तम मार्गदर्शक दीपस्तंभ नाही. हे मी केवळ पूजनीय डॉक्टरांबद्दल वाटणाऱ्या श्रद्धेतून, आदरापोटी बोलत नसून,आज ” राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ” आपल्या निरलस, नि:स्वार्थ व राष्ट्र समर्पित सेवा भावनेने विश्व पटलावर जे स्थान निर्माण केलेले आहे त्याचा मागोवा घेणाऱ्या प्रत्येक विचारवंताचे, अभ्यासकाचे हे अनुभवसिद्ध मत आहे.
परमपूजनीय डॉक्टरांनी 1925 मधे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. अवघ्या एका शतकाच्या आतच भारतीय संस्कृती, भारतीय दर्शन, भारतीय विचार व भारतीय समाज धारणा यांचा ध्यास घेऊन त्याचा सर्वंकष अभ्यास करून त्यातील गुणदोषांचा सम्यक विचार करून दोष विरहित, गुणसंपन्न, बलसंपन्न व ध्येय समर्पित कार्यकर्त्यांची एक देवदुर्लभ मांदियाळी पूजनीय डॉक्टरांनी उभारली, हेच त्यांचे अलौकिक वैशिष्ट्य आहे.

सुरुवातीच्या काळात दुर्लक्ष, नंतर उपेक्षा, नंतर उपहास व अस्तित्व निर्माण झाल्यानंतर झाल्यानंतर जमेल तेव्हढा अपमान,या चारही अवस्थातून ” राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ” व पर्यायाने ” संघ स्वयंसेवकही ” गेले आहेत. या चारही स्थितीमध्ये त्यांनी आपली ” मनोवस्था ” व ” समाज भान ” अंगीकृत सिद्धांताशी तडजोड न करता डळमळित होऊ न दिल्यामुळे, पुरून उरले आहेत.
सर्वेशां_अविरोधेन……
आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा आर.एस.एस. हे नाव माहीत नाही असा केवळ भारतातच काय तर जवळपास जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात कोणीही सुबुद्ध नागरिक असणे शक्यच नाही. ज्यांना संघाचा विचार, संघाची कार्यप्रणाली, संघाचा सेवाभाव व संघाचे संघटन आवडते अशा विचारवंतांच्या हृदयात संघाचे स्थान हृदयातील श्वासाइतकेच ” अनिवार्य व अढळ ” आहे. तसेच ज्यांना संघाची कार्यपद्धती डोळ्यात सलते परंतु त्याला पर्याय निर्माण करणे शक्य होत नाही असे लोकं आजही मात्र उपहास, विरोध व टिंगल टवाळी करण्यातच धन्यता मान्यता आहेत. प्रेमाने अथवा विरोधाने का होईना पण संघ या सगळ्यांच्या ह्रदयात आणि मेंदूत जाऊन बसला आहे हे मात्र नक्की. आणि हेच संघाच्या विजयाचे, सार्वत्रिक, व्यापक, मूलगामी व विश्वविजयी परिमाण आहे असे मला वाटते. सगळेच स्वयंसेवक याच्याशी सहमत होतीलच असेहि नाही. संघाचे ध्येय हे निश्चित व निर्विरोधपणे चिंतनातून स्विकारलेले सत्य असले तरी विचार तोच ठेवून व त्याचा अंगीकार करून व्यवहारातील मोकळेपणा व वैविध्य मात्र संघाने स्वीकारला आहे.”सर्वेशां अविरोधेन राष्ट्र कार्य समारभेत” हाच संघाचा मूल स्थाई भाव आहे.
राष्ट्राय_स्वाहा…….
थोडक्यात सांगायचे झाले तर संघाचा विचार जरी ” स्थिर व एकच ” असला तरी त्या विचारानुरूप स्वयंसेवकांनी केलेला आचार हा वेगवेगळा व संघसेवकाच्या शक्ती, वृत्ती व आकलना नुसार भिन्न आहे. ” भिन्न व्यवहारातही अभिन्न विचाराची बांधिलकी ” हेच संघाचे, माझ्या मते एक ” विश्वा वेगळे,अनन्यसाधारण व दुर्लक्षित न करता येण्यासारखे ” सौंदर्य व वैशिष्ट्य ” आहे. कारण संघ हा अनंत पैलू असलेला एक विशाल, स्वयंपूर्ण, स्वयंभू व दैदिप्यमान हिरा आहे. त्यामुळे मानवी वृत्तीनुसार ज्यास ज्या प्रकारचे कार्य आवडते त्या प्रकारच्या सेवाकार्यात तो समाविष्ट होतो. म्हणूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने निर्माण केलेल्या शेकडो संस्था आज विविध आयामाने आपल्या शक्ती, वृत्ती, रुची व क्षमतेनुसार देव, देश, धर्म, राष्ट्र व विश्व सेवेच्या कार्यात अव्याहतपणे समर्पित आहेत.
अन्यथा संस्था किंवा संघटना निर्माण करणाऱ्या महापुरुषाचा देहांत झाल्यानंतर ती संस्था किंवा संघटना लयाला जाते, नामशेष होते, आपल्या मूळ विचारापासून भरकटते हा सार्वत्रिक अनुभव आपणास बघावयास मिळतो. तथापि पूजनीय डॉक्टरांनी निर्माण केलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मूळ स्त्रोत ” इदं न मम,राष्ट्राय स्वाहा ” हा असल्यामुळे सर्वप्रथम राष्ट्राचा विचार ,नंतर पक्षाचा/संघटनेचा विचार आणि नंतर माझा विचार हा राष्ट्र केंद्रित, किंबहुना विश्व केंद्रित सुखाचा शाश्वत मार्ग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रुपाने, आज सर्व राष्ट्र सेवा करू इच्छिणाऱ्या नव तरुणांसाठी उपलब्ध आहे.
शतकीय_वाटचाल…….
हे वर्ष संघाच्या स्थापनेचे शताब्दी वर्ष(२०२५) आहे. म्हणून संघ अधिक मोठा वा अधिक व्यापक व्हावा, त्याचं स्वतःचं एक स्थान असावं, त्याच्या वाचून समाजाचे पान हलू नये पदोपदी समाजकार्य आडावे असा संघाचा विचार आहे का? तर मुळीच नाही…!
परमपूजनीय डॉक्टर म्हणायचे की, एखाद्या व्यक्तीस वैद्याची किंवा डॉक्टरची गरज असणे हे त्याच्या अनारोग्याचे लक्षण आहे. आरोग्य सुदृढ असले आणि उत्तम असले तर जसे व्यक्तीला डॉक्टर कडे, चिकित्सकाकडे किंवा वैद्याकडे जावे लागत नाही तसाच समाज संस्कार संपन्न, बलसंपन्न, संघटित व राष्ट्र विचाराने भरलेला असला तर त्याच्या संघटनासाठी एखाद्या संस्थेची गरज भासत नाही. म्हणूनच पूजनीय डॉक्टरांनी संघाला अपेक्षित असलेले कार्य करणाऱ्या ईश्वरनिष्ठ कार्यकर्त्यांची देवदुर्लभ मांदियाळी समाज जीवनात निर्माण व्हावी व राष्ट्रभावना ही समाजाची ” स्वयंप्रेरणा ” व्हावी या मूलभूत धारणेतून संघ लवकरात लवकर विसर्जित होऊन त्याचे काम थांबावे अशी डॉक्टरांची मनीषा होती.
वसुधैव_कुटुंबकं……..
पूजनीय डॉक्टरांच्या जन्मदिवशी व संघाच्या शताब्दी वर्षांमध्ये तरी आपण सारे आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करून माँ भारतीस
” विश्वगुरू ” बनवू या. कोणत्याही संघटनेशिवाय व बाह्य साधनाशिवाय हा हिंदू समाज दोषरहित, बलसंपन्न व राष्ट्र समर्पित जीवन जगू शकतो हा एक नवा विश्वास विश्वामध्ये निर्माण करुया.
केवळ माँ भारतीचीच सेवा करणे ही संघाची कल्पना नसून संपूर्ण विश्व हे आपले कुटुंब समजुन श्रेष्ठ मानव समाज निर्मितीसाठी आपण कटिबद्ध असावे असे डॉक्टरांचे स्वप्न होते.” क्रुण्वंतो विश्वमार्यंच ” या धारणेतून संघ कार्य सुरू झालेले आहे.
नवीक्षितीजेनव_आव्हाने….
शतकीय वाटचाल करणाऱ्या संघापुढे केवळ हिंदू संघटन एवढेच मर्यादित ध्येय नव्हते तर तदनुषंगिक “बलसंपन्न राष्ट्र निर्मिती व राष्ट्रीय विचारांची रुजवण” करणे हेही अंगभूत ध्येय होतेच.तथापि हिंदू संघटित झाल्यावर पुढील सर्व ध्येय सिद्धी त्यातून साकारण्याचा मूळ विचार घेवूनच संघ कार्य करीत आहे. विघटित व विविध संप्रदाय व जातीत विभागलेल्या हिंदू समाजाचे संघटन हे जेवढे कठीण कार्य होते/आहे, तेवढेच गेल्या 75 वर्षात निर्माण झालेल्या काही भ्रामक समजुती पुसुन काढणे हेही एक प्रमुख आव्हान आहेच. जोडीला प्रांतवाद, भाषावाद, वंशवाद,प्रादेशिकता, शहरी नक्षलवाद व गुंडांचे राजकीयीकरण याही समस्या आता संघापुढे/ पर्यायाने हिंदू समाजापुढे निर्माण झाल्या आहेत. तथापि या सगळ्यांपासून अलिप्त न राहता या समाजात समरस होऊन या सगळ्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी संघ व संघ परिवाराने आपले आयाम अनेक अर्थाने वाढविले आहेत. म्हणूनच “संघ परिवार” म्हणून कार्यरत असलेल्या एका विशाल वटवृक्षाने आज शेकडो शाखांमध्ये आपला कार्य विस्तार केल्याचे ध्यानात येईल.तरीही पूजनीय डॉक्टरांना अपेक्षित असलेले समाज समर्पित कार्यकर्त्यांचे प्रमाण आजही आपण गाठू शकत नाही आहोत ही खंत उरी घेऊनच संघ कार्यकर्ता कार्य करीत आहे.
अशा या दिव्य, अलौकिक, स्वार्थ विरहित व देवदुर्लभ राष्ट्र भक्तांच्या संघटनेच्या क्रांत दृष्ट्या निर्मात्या युगपुरुषास आजच्या दिनी मानाचा मुजरा……..!
त्यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या ध्येय पथावरील, त्यांच्या पाऊल ठशांचा मागोवा घेत, त्यांनी आखून दिलेल्या मार्गाने मार्गक्रमण करत, इच्छित ध्येय प्राप्त करणे हीच खऱ्या अर्थाने त्यांना वाहिलेली आदरांजली होईल.
अशी कर्मयुक्त आदरांजली वाहण्याची सर्वार्थाने क्षमता काया, वाचा, मने आम्हां सर्वांमध्ये निर्माण होवो अशी विश्वनियंत्याचे चरणी प्रार्थना …….!
परम पूजनीय डॉक्टरांचे पुण्य पावन स्मृतीस पुनश्च एकदा श्रद्धापूर्ण आदरांजली……!
कळावे, बहुत काय लिहिणे….?
………पायीची वहाण पायी बरी।।
आमुचे आगत्य असो द्यावे.

— लेखन : योगेश्वर उपासनी. अमळनेर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800