संसाराच्या वाटेवर
चूक, विसरभोळेपणा, धांदरटपणा या गोष्टी कौतुकाच्या कशा होतील ? फार तर कोणी काही बोलणार नाही पण नजरेतल्या प्रतिक्रिया स्वत:ला लज्जित करण्याकरता पुरेशा नक्कीच असतात.
एक दिवस मी भाजीत कोथिंबीर घालून नीट सजवायला विसरले. एक दिवस गॅसवर तापवायला दूध ठेवलं आणि वाचनाच्या नादात ते संपूर्ण उतू गेलं. भांड्याचा जळका वास आला तेव्हा घरातले सगळेच तिकडे जमले शिवाय संपूर्ण ओट्यावर दूधच दूध. ते निपटायलाच कितीतरी वेळ आणि पाणीही खर्च झाले आणि पुन्हा दूध आणण्यासाठी दिराची धावपळ झाली ती वेगळीच.
खाद्य संस्कृतीतले फरक हाही एक भेदाचा विषय. वास्तविक या इथे मला “आमच्याकडे” या शब्दरचनेला कोणता पर्याय आहे का हे शोधावेसे वाटते. जीवनामध्ये सासर आणि माहेर असे दोन विभाग करणे मला मनापासून टाळायचे आहे पण अगदी आतून हळुवारपणे स्पर्शत गेलेली एक कोवळी भावना. माहेर या विषयावर खूप कथा, कविता, ओव्या वाचल्या आहेत पण माहेर या शब्दात असलेला मऊ-मृदु अर्थ तेव्हाच जाणवतो जेव्हा स्त्री सासरी येते. संपूर्ण वेगळ्या वातावरणात आणि अनोळखी माणसात ती असते. ही माणसंही, प्रेमळ, सांभाळून घेणारी असली तरी धागे अजून विणले गेलेले नाहीत असेच वाटते.
खानदेशात घोसाळ्याला “गिलकी” म्हणतात. हिरवीगार, कोवळी, छोटी लांबट गिलकी अतिशय चवदार असतात. मला फक्त लांबट आकाराची जाडजूड घोसाळीच माहीत होती आणि आई त्यांच्या चकत्या करून कुरकुरीत खमंग भजी करायची. अहाहा ! आताही लिहिताना माझ्या तोंडाला पाणी सुटले. तर सांगत होते की या कोवळ्या गिलक्यांची भाजी करायची वेळ आली तेव्हा मी फारच गोंधळले.
मी त्यावरचे कोवळे साल खरवडून, फोडी केल्या आणि फोडणीत भाजी टाकली. हळद तिखट मीठ अंदाजाने घातले आणि झाकण ठेवले. दहा मिनिटांनी झाकण उघडले तेव्हा भाजीचे संपूर्ण गुळगुळीत अगदीच अनाकर्षक असे भरीत झाले होते. जेवताना कोणीही ताटातही ते वाढून घेतले नाही.
माझी मैत्रीण अंजू खानदेश रहिवासी होती आणि ती मला नेहमी म्हणायची “आम्हा खानदेशवासीयांचा सुरेख पोळ्या करण्यात कुणीही हात धरू शकणार नाही हे तू लक्षात ठेव,” मला फक्त सरसर लाटून गॅसवर टमाटम फुगलेले फुलकेच माहीत होते. पोळ्यांचे तंत्र अजून जमलंच नव्हतं. आई म्हणजे सासूबाई पोळ्या फार सुरेख करत. एक तर त्यांचे सोन्याच्या आणि काचेच्या बांगड्यांनी भरलेले गोरे हात पोळी लाटताना इतके लयबद्ध आणि संगीतमय असायचे की माझे लक्ष तिथेच खिळलेले राहायचे. तेल लावून घडी केलेली, मागे मागे लाटत गोल गरगरीत पोळी, काहीशी दडसच (दडस हा एक नवा शब्द) तापलेल्या तव्यावर टाकली की चारी बाजूंनी टम्म फुगून यायची. पोळी भाजतानाचा एक सुगंध दरवळायचा आणि अशी ही तव्यावरची गरम पोळी तूप लावून, अलगद झटकून टेबलावर पुरुषांच्या पंगतीत बसलेल्या माझ्या नवऱ्याच्या ताटात वाढताना त्यांचा चेहरा कौतुक आणि मायेने ओथंबलेला असायचा. तेव्हा एक संस्कारशील जबाबदारी मला जाणवायची. या नात्यात कधीही दुरावा नको निर्माण व्हायला.
जसे पोळीचे तसेच भाकरीचे. तांदळाची पाण्याच्या सहाय्याने हातावरच गोल गोल पसरत केलेली भाकरी मी आत्तापर्यंत खाल्ली होती. खाल्ली होती या म्हणण्यातच केली कधीच नव्हती हे अभिप्रेत आहे बरं का ? पण ज्वारी किंवा बाजरीच्या पिठाची अगदी छान मळून सरसरीत गोळ्याची पिठावर थापत केलेली गोल गरगरीत भाकरी हा माझ्यासाठी एक नवा धडा होता. नयना (माझी नणंद) या विषयातली माझी गुरु ठरली. अशावेळी मला लहानपणची ती कविता हमखास आठवायची.
लहान माझी बाहुली
तिची मोठी सावली
भात केला करपून गेला
पोळ्या केल्या कच्च्या झाल्या
वरण केले पातळ झाले
तूप सगळे सांडून गेले …
क्षणभर मला या कवितेतली लहान बाहुली “मीच” तर नाही ना ? असे वाटायला लागले होते. कसं असतं ना तेव्हाची ही बालगीतं आपल्याबरोबर मोठी होत वेगळ्या अर्थाने गुणगुणायला लागतात.
हिरव्या मिरचीचा खर्डा, लसणाचा ठेचा, कच्च्या मेथीचा खुडा, पातोड्या, पेंढ्यावर वाफवलेले कानवले, वेगवेगळी पीठं मिसळून केलेल्या खमंग तिखट दशम्या त्याबरोबरची दाण्याची चटणी नाहीतर गुळातल्या गोड दशम्या, शेंगदाण्याची चटणी लावून केलेल्या भाज्या वगैरे अनेक पदार्थांची यादी या पाकशास्त्राच्या अभ्यासक्रमात होती. तेव्हा माझ्या मनात विचार यायचा की वेगवेगळ्या क्षेत्रात पाऊल टाकण्यापूर्वी काही नियमबद्ध आवश्यकता असतात. वैवाहिक जीवनात यशस्वी होण्यासाठी या शास्त्रातील पदवी फार महत्त्वाची आहे हे नक्कीच.
“मग काय ? चला लागा कामाला, करा अभ्यास.” असे मी मनाला बजावूनच टाकले. वैवाहिक जीवनातला तो एक पार करायचा गोल होता.
“नववधू प्रिया मी बावरते” असं काही काव्यात्मक म्हणण्यापेक्षा मी एकच म्हणेन की अजूनही आमचं लग्न हे प्राथमिक अवस्थेतच होतं. त्याचवेळी आई-आबांनी (सासू-सासरे) हरिद्वार, ऋषिकेश, बनारसला जाण्याचा बेत रचला. ही त्यांची दोघांचीच सहल होती. त्यावेळी माझी विवाहित मोठी नणंद जिला आम्ही मंगल ताई म्हणत असू ती औरंगाबादला राहत होती. तिला दहा पंधरा दिवसांसाठी अमळनेरला बोलावून घेतलं. ताई येणार म्हणून सारं घर आनंदलं होतं. एक वेगळाच उत्साह, चैतन्य जाणवत होतं. माझी ताई सुद्धा जेव्हा आजोबांकडून ठाण्याला आमच्या धोबी गल्लीतल्या घरात भेटायला यायची तेव्हा आम्हा बहिणींनाही असाच आनंद व्हायचा. तात्पर्य अशा उत्कट भावना वर्णनातीत असतात.
सहलीला निघायच्या आदल्या दिवशी आईंनी ताईला घरातल्या अनेक कामांचे आणि ती मदतनीसांकडून करून घेण्याची यथासांग माहिती दिली. कुठे काय ठेवले आहे हे नीट समजावून सांगितलं. आबांनी घर खर्चासाठी लागणारे पैसे तिच्याजवळ दिले. जाताना तिच्या खांद्यावर हात ठेवून आई म्हणाल्या, ”तुझ्या भरवशावर हा एवढा पसारा टाकून जातोय बरं का ? ती अजून नवीनच आहे ना. सांभाळ बरं का सगळं नीट आणि निळू वैद्य कडे जाऊन तुझी तब्येत एकदा दाखवून दे. किती वाळलाय तुझा चेहरा.”
खरं म्हणजे एक साधासुधा, सर्वसाधारण, विचारपूर्वक भूमिकेतला संवाद ! पण मला किंचित वैषम्य जाणवलं. एखाद्याची पात्रता असतानाही बढती नाकारली गेली तर त्याला काय वाटेल अशी काॅर्पोरेट भावना नकळत स्पर्शून गेली. जाणवलं ते एकच की अजून आपल्या वैवाहिक कर्तबगारीवर शिक्कामोर्तब व्हायचे आहे. पापण्यांच्या आतल्या कडांवर थोडा ओलसरपणा जाणवला. मी मुळीच रडकी नव्हते. उलट वादपटू होते. समोरच्याला प्रश्न विचारणारी होते. कशाला ?… भांडखोरच होते म्हणालात तरी चालेल पण संस्कारक्षम मनात आपोआपच तयार झालेले अंतस्थ उंबरठे असतात ते ओलांडता येत नाहीत. शिवाय प्रसंग आणि वेळेचं तारतम्य हे बाळगावं लागतं. बारीक-सारीक गोष्टींचा ऊहापोह नवऱ्याजवळ करून त्याचं मन दुखावून किंवा कलुषित करणार्यातलीही मी नव्हते आणि माझ्या मनात नकळत तरंगलेल्या विचारांनाही तसा निश्चित आकार कुठे होता ? शिवाय स्वतःच्या मानसिक प्रश्नांवर समाधानकारक सिंचन कसे करायचे हे स्वतःच ठरवावे हे सूत्र माझ्या प्रवाहात मूळातच होते.
अर्थात तेव्हा जे मनात आलं ते विरूनही गेलं आणि त्याला एकमेव कारण म्हणजे ताईचा सहवास. वास्तविक आम्ही दोघी एकाच वयाच्या पण वैवाहिक अनुभवात ती माझ्यापेक्षा ज्येष्ठ होती.
लांब सडक केस, मध्यम उंची आणि चेहऱ्यावरचं मार्दव आणि सात्विकतेचं सुरेख प्रतिबिंब ! मधुर बोलणं आणि सगळ्यांना बरोबर घेऊन समानतेनं सहृदयतेनं वागणं हे तिचं वैशिष्ट्य होतं. तिच्यावर कोणीही विश्वास टाकावा असंच तिचं व्यक्तिमत्व होतं, आजही आहे. कसलाही गंड, अहंकार तिच्या वागण्यात कधीच डोकावला नाही. माझ्या मते आमच्या कुटुंबातलं अत्यंत समंजस आणि चौफेर रसिकत्व असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे मंगल ताई ! तिच्याविषयी मी एक स्वतंत्र लेख पुढे कधीतरी लिहीनच पण त्यावेळी मात्र मला तिच्यात माझ्या कुमुद आत्याचाच भास झाला. ताईच्या रूपाने मला एक आश्वासक खांदाही मिळाला.
क्रमश:

— लेखन : राधिका भांडारकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
अतिशय सुरेख लेख..वाचताना नकळत आपली नाळ लेखाशी जोडली जाऊन त्यात डोकावताना स्वतः तिथे असल्याचा भास निर्माण होतो..कदाचित प्रत्येक स्त्री वाचक हेच म्हणेल 🙏🥰
राधिका ताईंच्या जडणघडणीचे प्रत्येक भाग मी वाचत आले आहे सहवासात आलेल्या प्रत्येक माणसातला चांगले गुण राधिका ताईंचे लेखन मनाला खूपच भावते त्यांची समोरच्या व्यक्तीतील चांगलेपणा आणि गुण हेरण्याची आणि त्याचकौतुक करण्याची वृत्ती ही फारच कमी लोकांमध्ये आढळते ही त्यांच्यामध्ये आहे सगळ्याच लोकांना त्या आपलं मानून चालतात स्वतःचेही चूक असेल तर प्रामाणिकपणे कबूल करून समोरच्या च मन जिंकतात स्मरणशक्ती ही अतिशय उत्तम असल्यामुळे प्रत्येक प्रसंग आणि व्यक्ती याच्या स्वभावाची आपल्यालाही जाणीव होते आणि आपली ही उत्सुकता वाढते अतिशय सुंदर लेखन मनाला भावणार आणि प्रसन्नपणा समाधान देणार
धन्यवाद अरुणाताई
राधिकाताईंच्या जडणघडणीचा आजपर्यंतचा प्रत्येक भाग मी वाचत आले आहे. आता त्या त्यांच्या नवीन सुरू झालेल्या संसाराविषयी आणि सासरच्या माणसांसोबतचे एकेक अनुभव लिहित आहेत.
राधिकाताईंची लेखनशैली इतकी प्रभावी आहे की त्यांचे एकेक अनुभव हे आपलेही आहेत असे वाटते आणि त्यामुळेच त्यांच्या लेखाशी वाचक मनाने जोडले जातात.