आषाढी एकादशीचा सोहळा दूरदर्शन वर घर बसल्या बघताना इतके रमून जातो की नकळत आपण ही त्या पालखी सोहळ्यात पोहचतो.
या पालखी सोहळ्यात जायचे हे अनेक वर्ष मनात होते. संसार काही सुटत नव्हता त्यामुळे माऊलीही भेटत नव्हती. अखेर या वर्षी माऊलीचा सांगावा आला आणि मित्र, मैत्रीण सह सासवड ते जेजुरी या १७ किलोमिटर अंतराच्या पालखी सोहळ्यात माझा सहभाग झाला.

काय वर्णावा हा सोहळा, भक्ती मावेना डोळा. वारक-यां मधली समुह भक्तीची साक्षात जिवंत प्रचिती आली. अनेक वर्षांपासून वारी करणारे वारकरी भेटले. त्यांच्या मनातली माऊलींची ओढ जाणवली. इथे जातीभेद, वर्णभेद, स्त्री पुरूष भेद अजिबात नव्हता. एकमेकांना मदत करणे, काळजी घेणे हा भाव प्रत्येकाच्या मनात रुजलेला. भक्ती आणि बंधुभाव याचा जणू संगमच.

अंतरिची ही निरपेक्ष संवेदनशीलता हाच माऊलीचा साक्षात्कार. वारकरी संप्रदाय म्हणजे संघटन शक्तीचा कळस. वारकरी संप्रदाय एक वैचारिक अधिष्ठान आहे. निर्गुण निराकार परमेश्वर सर्वत्र आहे हा विचार ज्ञानदेवांनी दिला. तर सगुण साकारामध्ये ओतप्रोत प्रेम कसे भरले आहे हा विचार नामदेवांनी दिला. तुकोबा, मुक्ताई, नामदेव, सोपान, निवृत्ती, जनाबाई यांच्या अभंगातून भक्ती म्हणजे शुध्द प्रेम हा संदेश दिला आहे.
टाळ मृदुंगाच्या साथीने ज्ञानोबा तुकारामाचा जयघोष कानी पडतो तेंव्हा रोमरोमातून विठ्ठल नामाचा जयघोष जाणवतो. तुकोबा ज्ञानोबांची पालखी ज्या गावातून जाते, ज्या गावात विसावते, ज्या गावात मुक्काम करते ते प्रत्येक गाव भक्तिरसात न्हालेले असते. हा पालखी सोहळ्या म्हणजे दोन संतांची यात्रा नसते तर ती संपूर्ण वारकरी विश्वाची एकात्मता असते.

पालखी म्हणजे भक्तिरसाचा महासागर. पालखी जेजुरीला आली, विसावली. सगळे जण ज्ञानोबाच्या पादुकांचे दर्शन घेवून पुढे जावू लागले. ज्या वेळेला मी प्रत्यक्ष पादुकांना स्पर्श केला तेव्हा नकळत डोळे पाणावले. “भक्तीचा, एकात्मतेचा दिप उजळला तना मनात” माऊलीचा हा नादब्रह्म चिरंतन ह्दयाच्या गाभाऱ्यात निनादत आहे. म्हणूनच म्हणावेसे वाटते, एकदा तरी वारी अनुभवावी !
— लेखन : शुभदा डावरे चिंधडे. ठाणे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800