गुन्हेगारी जमात म्हणून ईंग्रजांनी पारधी समाजावर मारलेला शिक्का घालवायचा असेल तर संविधान निर्माते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शिक्षणाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पारधी समाजाने आपली उन्नती करावी असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार, समाजभूषण राजू झनके यांनी केले.
नवी मुंबई महापे एम आय डी सी येथील भूतवली पारधी वाडी येथे भारताचा ७९ वा स्वातंत्र्यदिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना श्री झनके म्हणाले की, गावकुसाबाहेर राहून गुन्हेगारी जमात हा शिक्का उरावर घेऊन जगणा-या आदीवासी पारधी समाजाने निराशावादी मानसिकतेतून बाहेर यैण्याची येण्याची गरज आहे. पारतंत्र्यात असताना ईंग्रजांचा दारूगोळा पळवून तो स्वातंत्र्यवीरांना पुरविणारी ही जमात आहे. पारधी समाजाच्या या गनिमी नीतीला शह देण्यासाठी ईंग्रजांनी या जमातीला गुन्हेगार, दरोडेखोर अशी उपमा देवून त्यांना बदनाम केले. समाज देखील अजूनही त्यांना त्याच मानसिकेतून पाहत असल्याने या जमातीला गावकुसाबाहेर रहावे लागते .ही मानसिकता बदलण्याची गरज असून त्या दृष्टीने पारधी समाजानेही शिक्षणाची कास धरून आता समाजाच्या मुख्य प्रवाहात आले पाहीजे असे झनके यांनी यावेळी बोलताना सांगितले.

भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचा शिक्षणाचा आदर्श घ्या. छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज शाहू महाराज आदी महापुरूषांनी दिलेल्या विचारांचा अभ्यास करा. शासकीय योजनांचा लाभ घेत, आपल्या नवीन पिढीची उन्नती करून समाजाच्या मूळ प्रवाहात यावे असेही झनके यांनी यावेळी बोलताना सांगितले.

आदिवासी पारधी समाजाचे अध्यक्ष संतोष पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात एक वही, एक पेन अभियानांतर्गत पारधी वस्तीतील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. पारधी समाजातील विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन देखील यावेळी करण्यात आले.

समाजसेवक शरद रणपिसे, कोशिश ट्रस्टचे मोहम्मद तारीक, महादू पवार यांच्यासह मान्यवर, स्थानिक नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
