आम्ही सिद्ध लेखिका ठाणे विभागातर्फे मराठी भाषा गौरव दिन आणि जागतिक महिला दिनाचा संयुक्त कार्यक्रम नुकताच जेष्ठांचं नंदनवन लुईस वाडी येथील सभागृहात अत्यंत उत्साहात संपन्न झाला.
यावेळी महिला दिनाच्या निमित्ताने बुद्धी आणि सुगरणता या स्त्रीमधील महत्त्वाच्या गुणांचा कस लावणाऱ्या दोन विशेष स्पर्धा म्हणजेच ‘उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धा’ व ‘पाककला स्पर्धा’ यांचे आयोजन करण्यात आले. याशिवाय सह्याद्री वाहिनीवरच्या वृत्त निवेदिका मा. दिपाली केळकर यांचे ‘स्त्रीधन स्त्रीशक्ती’ यावरील व्याख्यान आणि ‘ केवलप्रयोगी’ अनघा तांबोळी यांचा कवितेवरील एक आगळावेगळा कार्यक्रम असे दोन कार्यक्रम सादर करण्यात आले.

दीपप्रज्वलन व गणेश वंदनेने कार्यक्रमाला प्रारंभ करीत साक्षी डिंगणकर हिने सुरेख नृत्य सादर केले. यानंतर कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून आलेल्या मेधाज किचनच्या मेधाताई देशपांडे यांनी उद्घाटनपर भाषण करून कार्यक्रमाचे उद्घाटन केल्याचं जाहीर केलं.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून आलेल्या लुईस वाडीच्या नगरसेविका मा. नम्रता भोसले यांनी महिला कशा सक्षम आहेत व त्यांनी काय करायला हवे यावर उद्बोधक विचार मांडले. मा. रूपाली रेपाळे यांनीही महिला सशक्तिकरण आणि संस्थेसाठी आम्ही नेहमीच सहकार्य करू हा विश्वास दिला.

यानंतर संस्थेच्या कार्याध्यक्ष शुभांगी गान यांनी संस्थेची पाच वर्षाची वाटचाल संस्थेची ध्येय उद्दिष्टे आणि संस्थेच्या अध्यक्ष मा.प्रा. पद्माताई हुशिंग यांच्या नेतृत्वात संस्थेने साहित्य क्षेत्रात केलेली वाटचाल याचा लेखाजोखा मांडला. याशिवाय पाच वर्षात संस्थेने केलेली चार साहित्य संमेलन ही सुद्धा संस्थेची जमेची बाजू याचा उल्लेख केला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने वक्ता म्हणून आलेल्या सह्याद्री वाहिनीवरच्या वृत्त निवेदिका माननीय दिपाली केळकर यांचे ‘स्त्रीधन व स्त्री शक्ती’ यावरचे अतिशय सुंदर असे विचार त्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले. त्यांचा या विषयावरचा अभ्यास खरोखर वाखाणण्याजोगा होता. स्त्रिया फार पूर्वी शिकल्या नव्हत्या किंवा काही लिहीतही नव्हत्या पण ओव्यांच्या माध्यमातून त्यांनी आपल्यातल्या गुणांचं आपल्या संसाराचं एक सुरेख चित्र रेखाटलं होतं. जात्यावरील ओव्या, नैमित्तिक ओव्या विविध प्रसंगाचे उखाणे असा प्रसंगाप्रसंगांनी आपला संसार आपले घर यावर विचार व्यक्त करणाऱ्या या सगळ्या खरंतर साहित्याच्या धनी होत्या. त्यांनी उखाण्यांचे विविध प्रकार, ओव्या, सभासदांना टाकलेली कोडी आणि अस्खलित पाठांतर यांनी हा स्त्रीधनाचा स्त्री शक्तीचा प्रवास अत्यंत रोचक केला.
मध्यंतरात सौ. मीना घोडविंदे यांच्या “मीनाक्षरी दोन “या काव्यसंग्रहाचे प्रकाशन ही करण्यात आलं.

यानंतर “केवलप्रयोगी” अनघा तांबोळी यांनी कवितांचा आणि संगीताचा बहारदार कार्यक्रम गायक संगीतकार किल्लेदार यांच्या सोबतीने अतिशय दिमाखात साजरा केला. यात आजच्या अनेक समस्यांवरच्या कविता, काही विनोदी कविता तर मधून मधून रोचक माहिती देत एक सुंदर कार्यक्रम सादर केला.
नंतर उस्फूर्त वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येऊन पाककला आणि वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. या पाककलेचे परीक्षण मा. मेधाताई देशपांडे व मा. कल्पना नायर यांनी केले होते. तर वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण संस्थेच्या विश्वस्त मा. मेधाताई सोमण व मा.ज्योती टिपणीस यांनी केले.मा. वासंतीताई वर्तक यांनी पाककला स्पर्धा का घेण्यात आली यावर उत्तम विवेचन केलं. ठाणे विभागाच्या खजिनदार प्रतिभा चांदुरकर यांनी आभार प्रदर्शन केल्यावर कार्यक्रमाची सांगता केली.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी चौधरी हीने केले तर पाहुण्यांची ओळख अस्मिता चौधरी, स्वाती दोंदे, किरण बर्डे, अलका दुर्गे यांनी करून दिली.
या कार्यक्रमासाठी आम्ही सिद्ध लेखिका या संस्थेच्या अध्यक्ष, सचिव, कार्याध्यक्ष, कार्यवाह, सर्व समिती सदस्य, विश्वस्त, सल्लागार आणि मोठ्या संख्येने संस्थेच्या सभासद सख्या उपस्थित होत्या.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
