मी जेव्हा घराबाहेर पडते. तेव्हा मला संध्याकाळी सकाळी कामावर जाणा-या मुली दिसतात. कामावर जाताना त्या शिस्तीप्रमाणे पोषाख करतात. पण याच मुली एरवी कोणताही आणि कसाही पोषाख घालताना दिसतात कारण सुट्टीच्या दिवशी स्वतंत्र असतात. शिस्त नसते. या मुली खुप शिकलेल्या, कमावत्या, विचारी, निर्भय आहेत. पण हल्ली या स्वातंत्र्याचा अतिरेक होताना दिसतोय.
घरात जेष्ठ मंडळी, मुलं, कधी नोकर चाकर, आला गेला हे सर्व असताना इतके भडक पोषाख घालतात. अंगप्रदर्शन जेवढे होईल तेवढे करतात. प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर ठरलेल्या या हुषार मुलींना काय सांगावे मला कळत नाही. कोणाजवळ बोलावे समजत नाही. मानसिक कुचंबणा होते. हवं तसं बोलतात, वाईट सवयी असतात, सतत बाहेरचे खाणे, जागरण इ. नको त्या गोष्टी बिनधास्त करतात. स्त्री पुरूष समानता आज कायद्याने असली तरी स्त्रीला काही मर्यादा आहेत.
मातृत्व हे अनमोल देणे तिला देवाने विचार करून बहाल केलंय व तसंच तिला घडवलंय. मुल हे नक्षत्राचे देणे फार काळजीपूर्वक स्विकारावे लागते. त्यासाठी व्यसने वाटेल ते खाणे, भटकणे इ. मुळे नुकसान होऊ शकते. स्वैराचार तर खुपच वाढलाय. लग्नाआधी मुलं एकत्र रहातात. पटलं तर ठिक नाहीतर बंधनातुन बाहेर.
ह्या सगळ्यातला आनंद हा क्षणभंगूर आहे. यात गाढ विश्वास, श्रद्धा, आपुलकी, जिव्हाळा कणभरही नाही शाश्वत काहीच नाही. मग ह्याचा उपयोग काय ? आनंद कसला ?
स्त्रीचे मातृत्व, नवनिर्मिती मातृर्हुदय ही अनमोल भूषणे आहेत. त्यापासुनचा आनंद हा लग्नसंस्थेवर विश्वास ठेऊन, कुटूंबसंस्था स्विकारूनच घेतला पाहिजे कारण ते शाश्वत व चिरंतन समाधान आहे. जिव्हाळा आपलेपण आहे.

तिला कोण समजावू शकेल की, कोहिनूर हिरा येतो तिच्या पोटी…. तुझेच रक्तमास वाढते तुझ्या ओटी, “आई” ही हांक सारे विश्वदर्शनघडवते, हे किती बहुमोल आहे हे वार्धक्यात कळलं तर काय ऊपयोग. हाती नैराश्य व पश्चात्तापच येईल.
तेव्हा शालीनता, स्त्रीसुलभ लज्जा, हेच तुझे अलंकार आहेत. स्वातंत्र्य व स्वैराचारातला फरक ओळख. व्यसने म्हणजे विनाश आहे. तू शिकलीस तर घे गरुडझेप, पादाक्रांत कर यशाचे शिखर, पसर आपल्या तेजाचे वलय. समाजाला करून दे तुझी झगझगित ओळख. शिरपेंच मिळव मस्तकी.
पण म्हणुन स्त्रीत्व बळी देऊ नकोस. जरा जपून टाक पाऊल. वाटेवरती कांचा गं !

— लेखन : अनुराधा जोशी.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

खूप छान विचार आहेत.
खरेच घरात वावरतानाचे पोशाख पाहून पाहणाऱ्यांना लाज वाटावी अशी परिस्थिती आहे पण सांगावे कुणी नि कुणाला?