Tuesday, June 17, 2025
Homeसाहित्यकथा : वेगळी वाट

कथा : वेगळी वाट

वेगळी वाटलाल मातीच्या कच्च्या रस्त्यावरून मागे धूळ उडवत आमची कार परत शहराला निघाली. मी माझे डोळे बंद करून सीटवर मान टेकली आणि चार दिवसापूर्वी घडलेले सारे काही माझ्या डोळ्यासमोर येऊ लागले.

सकाळची सात साडेसातची वेळ होती. रोजच्या सारखी माझी जिम मधली कसरत संपवून मी घरी आले. फुल फ्यान चालू करून सोया मिल्कचा ग्लास तोंडाला लावतेय नाही तो फोन वाजला. एव्हढ्या सकाळी आईचा गावाहून फोन येणार नाही. मग कोण असावे असा विचार करीत फोन कानाला लावला.

फोनवर नंदू होता- माझा सहकारी.

” सानिया, शरणपूर गावात एक हेड लाईन आहे. एकदम धीन्च्याक बातमी आहे. अर्ध्या तासात मी पोचतोय तू तयार राहा.”असे म्हणून नंदूने फोन कट केला. त्याची ही नेहमीची स्टाइल. थोडी हटके. मी उडी मारली. बातमी मिळणार ह्या कल्पनेने एकदम एक्साईट झाले. पटापट शावर घेऊन ब्याग पॅक करून तयार झाले . ‘पुढारी ‘ची चीफ रिपोर्टर ची माझी कार्डस,लॅपटॉप ,मोठा कॅमेरा, रेकॉर्डर,बॅटरी आणि माझे काही कपडे घेतले. शरणपूर सारख्या लहान गावात इंटरनेट मिळेल की नाही अशी शंका होती. पण गावात जायचे म्हणजे कसल्याही परिस्थितीत राहायची तयारी ठेवावी लागे. मिळेल त्या जेवणाची आणि खायची प्यायची मला आता सवय झालीच होती. माझ्यासाठी ‘ बातमी मिळवणे ‘सर्वात आनंदाची गोष्ट होती.महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन जगण्यासाठी नेहमीपेक्षा वेगळी वाट धरलेल्या लोकांना शोधून काढायचे आणि त्यांचे काम लोकांसमोर आणायचे हे माझे काम होते. सामान्य परिस्थितीतून पुढे येऊन त्यांनी मिळवलेले यश प्रेरणा घेण्यासारखे होते आणि त्यामुळेच हे लोक आपल्या समाजासाठी एक आदर्श होते. त्यांच्याकडून आपल्याला खूप काही शिकण्यासारखे होते.

नंदू माझा सहकारी. आम्ही दोघे हे काम तन, मन आणि कधी मधी स्वतःचे धन अर्पून करत होतो. अशा लोकांना भेटले की मनाला एक समाधान मिळत असे. त्यांचे कर्तुत्व बघितले की मनाला उभारी मिळत असे. एकंदर मला माझा जॉब खूप आवडत होता. मी लाईफ एन्जॉय करत होते.

मी आईला फोन लावला. तिचा आवाज कानावर पडला आणि खूप छान वाटले. तिला आमच्या नवीन कामगिरीविषयी सांगितले.

” ज्या कामासाठी निघाली आहेस ते काम खूप मन लावून कर. माझी काळजी करू नको. सवड मिळाली की मला फोन कर .”

“ हो आई ” आनंदाने माझ्या डोळ्यात एक चुकार अश्रू उभा राहिला.मोजून दहा मिनिटांनी मी माझी आय ट्वेंटी चालवत शरणपूर च्या दिशेने निघाले होते.बाहेर कमालीचा उष्मा होता जो गाडीतल्या ए सी मुळे जाणवत नव्हता.रस्त्यात कमरेवर, डोक्यावर कळशा घेऊन चाललेल्या बायका दिसत होत्या. मी विचार करू लागले की आपण शहरात खुशाल नळ सोडून पाणी वाया घालवतो आणि या बायका मैल मैल चालतात कळशीभर पाण्यासाठी. खरंच. याला जीवन ऐसे नाव.

नंदुकडे गावाचा नकाशा होता. शरणपूर यायला अर्धा तास बाकी होता. वाटेत एका टपरीवर कडक चहा घेऊन आम्ही फ्रेश झालो.गाडीतला ए.सी. बंद करून काचा उघडल्या.

” आपण सरपंचांकडे प्रथम जाऊया. नंतर भीमा बाईला भेटायला जाऊया”मी नंदूला सांगितले.

.सरपंचांचे घर सापडायला पाचच मिनिटे लागली.

” नमस्कार. मी नंदू . ‘पुढारीचा ‘ रिपोर्टर. ही माझी वरिष्ठ सहकारी सानिया .” आमची ओळख करून देत नंदू म्हणाला.आम्ही शरणपुरला येण्याचे प्रयोजन सांगितले. सरपंच ‘ विलासराव भांबुरे’ समंजस, पोक्त आणि चांगली आसामी वाटली. गावात त्यांचा दरारा होता. त्यांच्या शिस्तीमुळे आणि नियोजनामुळे गावात स्वच्छता , पाण्याची व्यवस्था , शाळा आणि आरोग्य केंद्राची सोय होती.त्यांनी भीमा बाईंचा विषय काढला आणि आम्ही लक्ष देऊन ऐकू लागलो.

‘भीमा बाई लहाने ‘ वयाची साठी ओलांडलेली . नावाने लहाने पण आचाराने महान . तिने असे कोणते महान काम केले होते? मी लक्ष देऊन ऐकू लागले आणि नोट्स काढू लागले.

३५ -४० वर्षापूर्वीची गोष्ट. शरणपूर त्यावेळी पंचवीस तीस घरांचे गाव होते. भीमाबाई शरणपुरची सासुरवाशीण. गावातील एकुलत्या एक नामदेव न्हाव्याची सून. गावात कुंभार आळी, ब्राम्हण आळी, कायस्थ आळी, तांबट आळी अशा वेगवेगळ्या गल्ल्या. त्या त्या आळीतील माणसे समाजाने ठरवून दिलेली कामे करत. पूर्वापार चालत असलेला न्हाव्याचा व्यवसाय भीमाबाईचा सासरा करत होता.त्या काळी घरातील सुना घराचा उंबरठा ओलांडून बाहेर पडत नसत. कुटुंबाचे जेवणखाण, घरकाम आणि सासूला मदत करणे ह्या रामरगाड्यात भीमाचा दिवस जात असे.भीमाचा नवरा श्रीपती मधून मधून बापाबरोबर सरपंचाकडे जात असे. हजामत करणे, बाप्यांचे केस कापणे ही कामे तो बापाच्या हाताखाली शिकत होता.सध्याचे सरपंच विलासराव भांबुरे हे त्या वेळी श्रीपतीच्याच वयाचे. त्यावेळी शिकायला तालुक्याला राहायचे. सुट्टीत गावी यायचे मग श्रीपती त्यांचे केस कापत असे.

तालुक्याला केसांची फॅशन वेगळी असे. श्रीपतीला त्यांनी हळूहळू नवीन पद्धतीने केस कापायला शिकवलेलं . त्यामुळे गावातील तरणे गडी श्रीपतीकडे केस कापायला जाऊ लागलेले. बऱ्यापैकी पैसा मिळू लागलेला. तोपर्यंत श्रीपतीच्या संसाराचा पसारा वाढलेला. पाच वर्षात तीन मुलींचे आगमन झालेले. आता श्रीपतिचा लहान भाऊ सुद्धा त्याला धंद्यात मदत करायला लागलेला. भीमा सुखी होती. कष्ट करून संसाराचा गाडा व्यवस्थित ढकलीत होती. पण म्हणतात नं ‘ आयुष्य सरळ रेषेत चालू राहिले तर ते आयुष्य कसले ?’

श्रीपतीचा लहान भाऊ अचानक तापाचे निमित्त होऊन वारला. उतार वयातील हा धक्का श्रीपतीचे वडील सहन करू शकले नाहीत. दोन महिन्यात तेही त्याला भेटायला वर गेले.

सरपंच सांगत होते आणि आम्ही सामान्य माणसाच्या आयुष्यात येणाऱ्या ह्या अजब घडामोडींशी ओळख करून घेत होतो. आजवर मी अनेक लोकांना भेटले होते. आयुष्यात त्यांच्या वाट्याला आलेले कठीण प्रसंग ते मला सांगत. त्यातून ते धीराने तोंड देऊन कसे बाहेर पडले हे कळले की अभिमानाने उर भरून येत असे. आपल्या समोर त्यांचा मार्ग आदर्श ठरेल असे प्रसंग , अशा व्यक्ती आम्ही समाजा समोर आणायची पराकाष्टा करत असू. ज्या व्यक्ती अतिशय खडतर परिस्थितीतून जाऊन यशस्वी झाल्या आहेत अशा व्यक्तीच्या कामाला प्रसिद्धी देऊन समाज प्रबोधन करण्याचा खारीचा वाटा उचलण्याचा आमचा प्रयत्न असे.असो.

घरातील अचानक बदललेल्या परिस्थितीशी श्रीपती आणि भीमा बाई दटून सामना करत होते आणि अचानक श्रीपतीला लकवा झाला. त्याचा उजवा हात , उजवे अंग पूर्ण निकामी झाले. नियतीच्या ह्या क्रूर चेष्टेने भीमाबाई दुःखी झाली. पण हतबल , निराश झाली नाही. तीन मुली, सासू ह्यांची जबाबदारी तिने उचलली. छोटी मोठी कामे शोधू लागली. पण या छोट्या गावात कोणी काम देईना. बाई माणसाला काम देण्याची आमच्या गावात त्यावेळी प्रथा नव्हती. भीमा बाई च्या घरातील भांडी कुंडी कमी होऊ लागली. दागिने गहाण पडले. बाईच्या गळ्यात फक्त एक पोत उरली. माझ्या वडिलांनी तिला काही पैसे देऊ केले पण ही स्वाभिमानी बाई कामाशिवाय पैसे घेईना. गरिबी आणि शिक्षणाचा अभाव पण स्वाभिमान आणि जिद्द या बाईत पुरेपूर भरून उरलेली. आलेल्या बिकट परिस्थितीशी लढायला भीमा बाई मोठ्या हिम्मतीने उभी राहिली. स्वामी विवेकानंदाचे विचार ह्या अडाणी बाईने आपल्या वर्तनाने खरे करून दाखवले.

” मनाचे सामर्थ्य हे सूर्याच्या किरणा प्रमाणे असते. ते जर एकवटले तर आत्म्याचा गाभारा ज्ञान प्रकाशाने उजळल्या शिवाय राहत नाही. ”

” माफ करा ह्यापुढील घटना मला भीमा बाईंच्या तोंडून ऐकायला आवडेल.” मी विलास रावांना म्हणाले.

” मग असं करा. दोन दिवस आमचा पाहुणचार घ्या. आमच्या गावात फेरफटका मारा. आमचा गणेश तुम्हाला भीमा बाईना भेटायला घेऊन जाईल. ” आम्हाला सरपंचांचा आग्रह मोडवेना. सरपंचीण बाईंच्या मोकळ्या आणि प्रेमळ स्वभावामुळे आम्हाला त्यांच्याकडे राहायला संकोच वाटला नाही. रात्री त्यांनी केलेले चवदार जेवण जेवून, अंगणात टाकलेल्या खाटांवर मस्त चांदण्यात झोपलो. सकाळी फ्रेश होऊन आम्ही भीमाबाई कडे जायला तयार झालो. गावातील स्वच्छ हवा आणि हिरवीगार झाडी मनाला वेड लावीत होती.

विलासरावांनी दिलेल्या गाडीतून त्यांच्या माणसाबरोबर आम्ही भीमा बाईंकडे गेलो. पोचायला दहा मिनिटे लागली. छोटंसं लाल लाल विटांचे ,सुबक कौलारू घर दिसले. अंगण सारवलेले होते. थंड सावलीने अंगणाला कुशीत घेतले होते. तुळशी वृंदावना जवळ एक बाकडे आणि चार खुर्च्या होत्या. आम्हाला बसायला सांगून गणेश भीमा बाई ला बोलवायला गेला. दुसऱ्याच मिनिटाला आमच्या समोर अंजिरी रंगाचे इरकली लुगडे नेसलेली,कोपऱ्यापर्यंत बाह्यांचे पोलके घातलेली भीमाबाई उभी ठाकली. डोक्यावरून पदर घेतलेला हसरा गोलसर चेहरा आणि अनेक उन्हाळे पावसाळे बघितलेले अनुभवी डोळे. कपाळावर आणि हनुवटीवर हिरवे गोंदण दिसले. दोन्ही हातात लालसर रंगाच्या काचेच्या बांगड्या. गळ्यात सोन्याची बोरमाळ आणि कानात सोन्याची मोठाली कर्णफुले. म्हातारपणात माणसाने कसे टवटवीत राहावे हे भीमा बाई कडे बघून शिकावे. वृद्धत्व असेच पिकलेल्या फळा प्रमाणे असावे. गोड , खाल्ल्यावर जिभेवर अवीट गोडी रेंगाळायला लावणारे.

” नमस्कार. पोरानो. इथे कसे येणं केलंत आमच्या गावात?” दोन्ही हात जोडत भीमा बाई म्हणाली.

” बाई, आम्ही तुम्हाला भेटायला आलो आहोत”,

आम्ही येण्याचे कारण सांगितले आणि भीमा बाई फक्त हसली.

” असं काय केलं मी जगा वेगळे.? अहो माझ्या जागी दुसरी कोणतीही पतिवर प्रेम करणारी आणि तीन मुली पदरात असलेली स्त्री हेच करेल आपल्या माणसाना जगवण्यासाठी. ”

“ असुदे. असुदे. तुम्ही इतक्या लांब आलात माझ्यासाठी तर सांगतेच तुम्हाला माझी कर्म कहाणी”असे म्हणत तिने आत कुणालातरी चहा आणायला सांगितले. बाईना मध्ये मध्ये “असुदे असुदे ” म्हणायची सवय होती.

” पोरानो, ते दिवस लई वाईट होते. आभाळ फुटीच झाली होती म्हणाना सगळीकडून. पोरांच्या बापाचा उजवा हातच निकामी झालेला. धड उभे राहता येईना , तर काम करणे दूरच. गावात एकच न्हावी. तोही असा बीमार. लोक येत चौकशी करून जात. त्यांची हालत बघून चुकचुकत. पण माझी हालत तर फारच वाईट होती.पोरांची सुकलेली तोंडे बघून माझ्या काळजाला घरे पडत. दवापाणी, करायला पैसे लागत. सासू म्हातारी. तिच्याकडे पोरीना ठेवून शेतीची , मजदुरीची कामे शोधू लागले. कधी मधी कामे मिळू लागली. पण संसाराला अजून पैशाची गरज होती. मी हिम्मत हरली नाही. ह्यांच्या कडे बघून मनाशी ठरवले. काहीतरी करायचे आणि आपल्या कुटुंबाला ह्यातून बाहेर काढायचे. त्यांची अशी अवस्था झाली असली तरी ते आमच्याबरोबर आहेत ह्यातच मी खुश होते. विचार करता करता एकदम ह्यांच्या हजामतिच्या सामानावर नजर पडली. डोक्यात काहीतरी चमकले. पिढ्यानपिढ्या चालत आलेला आमचा धंदा , आमची लक्ष्मी अशी कोपऱ्यात टाकून मी पाप करत होते. ती हत्यारे हातात घेऊन बघितली. वस्तऱ्या वरून हात फिरवून बघितला.

आयुष्यात पहिल्यांदाच हातात घेत होते असले सामान. हेच सामान मला, माझ्या परिवाराला कठीण परिस्थितीतून वाचवणार होते. मनाचा निर्धार केला की घराण्याचा व्यवसाय आपणच पुढे चालवायचा. पण कसा ? हे काई डोक्यात येत नव्हते. माझ्याकडून हजामत करायला कोण येणार ? बाप्यांचे केस कापायला कसं जमणार ? अंगात आलेलं बळ सुई लावून फुग्यातील हवा काढावी तसं गायब झालं.

पण पडत्या काळात शेजारची म्हातारी बकुळाबाई पाठीशी गंभीरपणे उभी राहिली.तिचे तीन तरणे पोरगे शेतात काम करायचे. अंगाने तगडे आणि बारीक केस ठेवणारे. म्हातारीने तिन्ही पोरांना माझ्यासमोर बशिवले .

” हा चालव कैची ह्यांच्या केसांवर” म्हातारी आरसा घेऊन मागे उभी राहिली.

” माझे हात थरथरू लागले. कसाबसा धीर गोळा करून समोर चित्र ठेवून कापू लागले केस.पोरे खो खो हसत होती. मी आणखी घाबरत होते.

“मावशी,अगं केस कापायचे आहेत , गळा नाही कापायचा कोणाचा. ”

” गप रे पोरा. आता केस वाढले की मावशीला सांगायचे . ती कापून दिल शान. ”

मी कसनुसा हसले. कपाळावरचा घाम टिपला. अशा तऱ्हेने म्हातारीची पोरे माझी पहिली कस्टमर झाली. त्यानंतर बापे येऊ लागले पण चोरून. मला सुरुवातीला लाज वाटायची , पण नंतर विचार केला काम करतेय मी माझं, त्यात शरम कसली.

हाताची थरथर थांबली. तीनचे पाच गिऱ्हाईक जमले. माझे भाऊ , ह्यांचे मित्र गुपचूप हजामत करायला येऊ लागले. उघड उघड एका बाई कडून केस कापून घ्यायला आणि हजामत करायला लोकांना लाज वाटत असे. मलाही कधी मधी वाटायचे बाप्यांपुढे बसून असे कसले काम करतोय आपण.. मग हे मला जवळ बसवून नुसत्या नजरेनेच धीर द्यायचे. मुली कुशीत शिरायच्या . आये म्हणून गळ्यात पडायच्या. त्यांच्याकडे बघून काम करायला हुरूप येऊ लागला. मग कुणा कुणाच्या ओळखीने कामे येऊ लागली. पण सगळे चोरीचा मामला. एक दिवस सरपंचांच्या कानावर बातमी गेलीच. त्यावेळचे सरपंच म्हणजे विलासरावांचे वडील. कडक, शिस्तीचे पण सज्जन माणूस. गावाची शिस्त आणि नियम त्यांनी काटेकोरपणे जपलेले. एक दिवस ते स्वतः घरी आले आमच्या.

“भीमा बाई मी ऐकलेय ते खरे आहे का ? ”

मी तर बावरूनच गेले. हिम्मत करून त्यांना बसायला सांगितले. घराची अवस्था त्यांच्या लक्षात आली असावी.

” होय. पोटापाण्या साठी घराचा व्यवसाय चालवते आहे. घरचा गडी अंथरुणात बसल्यावर काय करणार? तेंही तीन मुली पदरात असल्यावर. कष्ट करून इज्जतीचा पैसा कमावतेय. गावात न्हावि नव्हता मी न्हावीण बाई होऊन गावाला नवा न्हावी दिलाय. काही चुकले असेल तर माफी असावी” मी धीर एकवटून बोलले.

आतून ह्यांनीही माझ्या म्हणन्याला खुणेने दुजोरा दिला. माझ्या सासूने सरपंचाना चहा आणून दिला. शेजारीची पण ठाम सोबत मिळाली.त्यानंतर फारसे न बोलता ते परत गेले.

रात्रभर झोप लागली नाही. डोक्यात विचारांचे वादळ घोंगावत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी अंग मोडून आले होते. तशीच कामाला लागले. सासूचा , ह्यांचा चहा , पोरांची खाणी ….हात चालवत होते..पण वाटले आपले काम सरपंचानी थांबवले तर हे सगळे खटले कसे चालणार? दाराची कडी वाजली म्हणून दार उघडायला गेले. दारात सरपंचांचा माणूस सांगावा घेऊन.

” तुम्हास्नी बोलावलंय .सरपंचांच्या धाकट्या मुलाचे केस कापायला.उशीर करू नका”त्यावेळचा आनंद कसा सांगू तुम्हाला?

धावत जाऊन देवापुढे लोटांगण घातले. माझ्या श्रद्धेला आणि कष्टाला गोड फळ आली. नंतर कित्येक वर्षे मी आमचा केशकर्तनाचा व्यवसाय चालवला.मुलींना मोठे केले. शिकवलं, शहाणं केलं. मोठ्या मुलीचे

लग्न केले बाजूच्या गावातील महीपत न्हाव्ह्याशी. दोघांनी मिळून आमचे ” श्रद्धा” केश कर्तनालय चालवायला घेतले आहे.

मी फकस्त जाऊन आता देखरेख करते. माझी लेक मधून मधून केस कापते पण बायांचे. हल्ली इकडे बायासुद्धा केस कापतात. तालुक्याच्या ठिकाणी अनेक बायांनी हा व्यवसाय सुरु केला. सरकारने माझ्या कामाची दखल घेतली.मला एव्हढी बक्षीस दिली. मग इकडे वाचनालय चालू केले.दोन विहिरी काढल्या. तर अशी ही माझी कहाणी ! पोरानो मी तुम्हाला इतकेच सांगेन…

की स्वतः वर विश्वास ठेवा. स्वतःशीच प्रामाणिक राहा. कोणत्याही संकटात हिम्मत हारू नका.कसलेच काम लहान मोठे नसते. कोणत्याही कामाची लाज बाळगू नका. कामावर श्रद्धा ठेवा ”

भीमा बाईची कहाणी इथे संपली नाही. तिची कहाणी ऐकून अनेक जणींच्या हृदयात आशेच्या आणि हिम्मतिच्या ज्योती उजळल्या याची मला खात्री आहे.

( शांताबाई यादव या महाराष्ट्रातील एकमेव महिला केश कर्तनकार यांच्या कार्याला समर्पित )

 

लेखिका

मोहना कारखानीस , सिंगापूर .

(पैंजण या कथा संग्रहातून )

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

उज्ज्वला केळकर on पाऊस : काही कविता…
उज्ज्वला केळकर on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on कथा
सौ. सुनीता फडणीस on विमान “अपघात” की “घातपात” ?
सौ. सुनीता फडणीस on हे असं कां होतं ?