वासुदेव अनंत खारकर म्हणजेच माझ्या वडिलांची, दादांची ओळख कट्टर स्वातंत्र्यसैनिक आणि एक करडे महसूल अधिकारी अशी असली तरी एक पिता म्हणून माझ्या मनात त्यांची खूप वेगळी प्रतिमा आहे.
दादा काळेसावळे, मध्यम उंचीचे, घनदाट; पण विस्कटलेल्या केसांचे, बारीक डोळे आणि चेह-यावर वरवर कडक वाटणारा पण अंतरंगी मिश्कील भाव असणारे होते. तसे ते फार शिस्तीचे होते. त्यांच्या फिलिप्स सायकलवरून ते ऑफिसला जायचे. ऑफिसच्या कामासाठी ऑफिसच्या गाडीने दौरे करायचे. घरी येताना पुन्हा सायकलवरून घरी यायचे. त्यांना नाटक आणि गाण्याची फार आवड होती. शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम ऐकण्यासाठी ते वसमतहून नांदेडला जात. आम्हालाही त्यांनी गाण्याच्या क्लासला घातले होते. आमच्याबरोबर गावातल्या 10-20 मुलांना ते दरवर्षी नांदेडला परीक्षेला घेऊन जात. ते उत्तम बासरी वाजवायचे. दादा शाळकरी वयात फार हूड होते, असे आजोबा सांगत. एकदा त्यांच्या आवडत्या शिक्षकाची बदली झाली व न आवडणारे शिक्षक त्यांच्या जागी आले.
Click here to readCOL आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शिक्षिका स्वाती वानखेडे
निरोप समारंभाच्या भाषणात ते म्हणाले,
गुल गये गुलशन गये,
अब नसीब में हमारे,
धत्तुरे के फूल आये…
शाळेत एकदा स्नेहसंमेलनाच्या नाटकात त्यांना हनुमानाची भूमिका देण्यात आली होती. तेव्हा त्यांच्या शेपटीला आग लावली गेली. लंकादहनाचा सीन होता. आगीमुळे त्यांचे पाय पोळू लागले. मास्तरांनी त्यांना धीर धरायला सांगितले. तेव्हा त्यांनी रागावून गावभर उड्या मारून हैदोस घातला, अशी आठवण आजी सांगायची.
दादांचे आयुष्य त्यांच्या शिस्तीमुळे खडतरच गेले. कॉलेजच्या पहिल्या वर्षातच गांधीजींच्या भाषणाने प्रभावित होऊन ते स्वातंत्र्य चळवळीत उतरले. शिक्षण सुटले. त्यांना तीन वर्षांची सक्तमजुरी झाली. गावामध्ये दहशत पसरावी म्हणून त्यांच्या हातात बेड्या घालून गावभर त्यांची मिरवणूक काढण्यात आली. दिवसभर त्यांना सश्रम कारावास होता. भाकरीत वाळू मिसळलेली असे. मग ते एका वाटीत पाणी घालून भाकरी भिजवत ठेवत. प्रचंड श्रमाने कडाक्याची भूक लागलेली असे. थोड्या वेळाने वाळू खाली बसे आणि वरचा लगदा ते खात. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्यांची सुटका झाली. मग ते सरकारी नोकरीत आले.
Click here to readजयंती विशेष: भूदान चळवळीचे प्रवर्तक:आचार्य विनोबा भावे
दादा आयुष्यभर कष्टात आणि काटकसरीने राहिले. मुलांनी वाचावे, शिकावे असे त्यांना खूप वाटत असे. 50 वर्षांपूर्वीच्या काळात आमच्या घरात दोन वृत्तपत्रे येत असत. मराठवाडा आणि लोकसत्ता. मुलांसाठी ‘चांदोबा’ आणि ‘फुलबाग’ही येत असे. स्वत:साठी ते ‘माणूस’आणि ‘विचित्र विश्व’ घेत असत.
त्यांचे व्यक्तिगत आयुष्य अत्यंत दु:खाचे होते. माझी आई जवळपास 10 वर्षे खूप आजारी होती. त्यातच तिचे निधन झाले. त्या वेळी ते पन्नाशीचे होते. आम्हा बहिणींच्या लग्नानंतर तर त्यांना एकाकीच आयुष्य काढावे लागले.
मात्र, दु:खाचे त्यांनी कधी भांडवल वा प्रदर्शनही केले नाही. त्यांची अनेक मोठ्या लोकांशी ओळख होती; पण स्वत:च्या स्वार्थासाठी त्यांनी कधी तिचा फायदा घेतला नाही. त्यांना कधी खोटे बोलता यायचे नाही. कधी कधी कुणाला कटवायचे असेल तर आम्ही सांगायचो, की दादा ‘ मी घरी नाही ’ असे सांगा. त्यावर समोरच्या व्यक्तीला ते म्हणायचे, ती घरात आहे पण तिने मी घरी नाही असे मला सांगायला सांगितले आहे. त्यांच्या भावना त्यांना व्यक्त करता यायच्या नाहीत. ते कधीच तोंडावर आमचे कौतुक करत नसत. एकदा मी खूप हिंमत करून त्यांना विचारले की, दादा, एरवी तर सगळ्या मराठवाड्यात माझ्याबद्दल चांगलं सांगत असता; मग तुम्ही तोंडावर माझं कौतुक का करत नाही ? त्यावर ते म्हणाले, लेकरांचं कौतुक तोंडावर करायचं नसतं. नाहीतर ते डोक्यावर चढतात. आता पुरे ! ‘पुरे’ म्हटल्यावर पुढे बोलण्याची आमची प्राज्ञा नव्हती.
कपडे धुणे, त्यांच्या घड्या घालणे, स्वयंपाक करणे सर्व काही ते स्वत: करत असत. कुणी आपली सेवा करावी असे त्यांना उतारवयातही वाटले नाही. त्यांचा मृत्यू माझ्या डोळ्यांदेखत झाला. बोलता बोलता ते गेले. नंतर आवरासावर करताना त्यांचे धुतलेले कपडे नीट घडी घालून ठेवलेले सापडले. त्यांच्या अंत्यविधीसाठी 1422 रुपये खर्च आला. काही दिवसांनंतर मी त्यांचे पाकीट उघडून बघितले. त्यांच्या सवयीनुसार प्लास्टिकच्या कागदात गुंडाळलेले 1422 रुपये नेमके त्यात होते ! माझ्या वडिलांना आम्ही 3 मुलीच होतो. 50 वर्षांपूर्वीही आमच्या आई-वडिलांनी याचे वैषम्य मानले नाही. त्यांना नावे ठेवणा-यांना, ‘माझ्या मुली मुलांपेक्षाही कर्तबगार निघतील’ असे म्हणून आमच्यात आत्मविश्वास निर्माण केला. ही गोष्ट मला फार मोलाची वाटते.
Click here to readकथा : वेगळी वाट
स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कारावास पत्करणारे, स्वच्छ चारित्र्याचे, वरकरणी कठीण वाटणारे; पण मृदू हृदयाचे व निरागस मनाच्या वडिलांची मी मुलगी आहे याचा मला सार्थ अभिमान वाटतो ! आजही जुन्या फोटोंचे अल्बम काढले की अशा आठवणी दाटून येतात आणि मन भरून येते.
– श्रद्धा बेलसरे.