भाग १
आपले जीवन जगत असताना, ते यशस्वी होण्यासाठी आपल्या अंगी काही गुण असावे लागतात. असे गुण आपल्यात मुळातच असले तर काही प्रश्न नसतो. पण ते तसे नसतील तर मात्र ते गुण आपण अंगी बाणविण्यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजे. या साठी सुरू करण्यात आली आहे, हे एक नवे सदर, “गुण विशेष”.
आजच्या पहिल्याच भागात वाचू या सर्व “धीर” या गुणाची महती…
— संपादक.
“धीर” या गुणाचे गोडवे गाताना जितके गोड वाटते, तितकेच हा गुण अंगी बाणणे कठीण आहे. अनेक महापुरुष, संत या बद्दल खूप काही सांगून गेले आहेत तेही उदाहरणासहित.
जसे..
“धीरे धीरे रे मना,
धीरे सब कुछ होय।
माली सींचें सौ घडा ऋतू आये फल होय।।”
…….कबीर दास
धीर धरा, वेळ आली की सगळं साध्य होईल. माळी रोज, रोज झाडाला पाणी देत असतो पण त्या त्या ऋतूला वेळेवरच फळं येतात.
“धीरज का फल मीठा होता है.”
….अरस्तू
कोणतंही फळं झाडावर लागायला आणि वाढायला वेळ लागतोच. तसंच धीराचं आहे. धीर धरला की त्याचा परिणाम उत्तमच होणार.
धीर धरणे म्हणजे स्वतःचीच परीक्षा पहाणे.”
……. महात्मा गांधी
धीर धारण करणारा, धैर्यवान तर असतोच पण तो विचारशील ही असतो. माणसावर संकटं आली की तो घाबरतो, संयम सोडतो आणि चुकीचे निर्णय घेतो, जे पुढे पुन्हा त्याला संकटात लोटतात.
जगाचा नियम आहे की काही कमावण्यासाठी काही गमवावे लागते. असंच असेल तर आपण अविचारीपणा गमवून धैर्य मिळवलं तर?
कोणतीही गोष्ट, यश, मान हे एका झटक्यात कधीच मिळत नसतात. त्यासाठी वेळ जावा लागतो. धीर धरावा लागतो.
“पी हळद हो गोरी”
हे कधीच खरं होतं नाही.
एक उदाहरण देते…
माझे दीर आर्किटेक्ट होते. ते कॉलेजमध्येही शिकवत. मुलांना ते मातीच्या लहान विटा बनवायला सांगायचे.
“शंभर विटा बनवा”
कधी एकाच प्रकारचे चित्र
“शंभरदा बनवा” असं सांगायचे.
मुलं फार कंटाळायची.
“काहीही सांगतात. रटाळपणा नुसता.”
तरी आज्ञापालन करायची. नंतर त्यांच्या लक्षात आलं की शेवटची वीट किंवा शेवटचं चित्र एकदम परिपूर्ण, उत्कृष्ट तयार होतं. या कामात धीर धरणं हा सगळ्यात मोठा धडा त्यांना मिळाला. त्यांचे सर्व विद्यार्थी आज नावारूपाला आले आहेत.
धैर्य हा असा गुण आहे जो यशाच्या पायऱ्या चढून माणसाला यशाचा झेंडा फडकवायला मदत करतो. धैर्य हे अभ्यासून, शिकण्याची कला आहे म्हटलं तरी चालेल आणि ती तेव्हाच मिळवता येते जेव्हा मनुष्य आपल्या भावनांपेक्षा विचारांवर लक्ष केंद्रित करतो. जेव्हा मनुष्य भावनिक होतो तेव्हा तो तर्कसंगत विचार करू शकत नाही. जेव्हा तो काही वेळ थांबून आपल्या भावनांना नियंत्रित करतो तेव्हाच तो व्यवस्थित आणि तर्कसंगत निर्णय घेतो. असा व्यक्ती समाजात एक वेगळंच स्थान मिळवतो. लोकांचा विश्वास मिळवतो.
कोणतीही कला शिकताना धीर हा सहाय्यकाचे काम करतो. आपापल्या क्षेत्रात यश गाठणारे लोक जीवनात धीर आणि संयम ठेवूनच मोठे झाल्याचे सांगतात.गायन शिकणारे कितीतरी मोठमोठे गायक आपल्या यशाचे किस्से सांगताना धीर या गुणावर खूप भर देतात.
आशाताई भोसले सांगतात….
“मला कित्येक महिने फक्त “सा” (षड्ज) लावायला शिकवले गेले. नंतर जिभे खाली रुमाल ठेवून “सा” लावावा लागला.”
जर धीर न धरता त्यांनी हे सोडून दिले असते तर आज त्या इतक्या महान् गायिका असत्या का ? ही शंकाच आहे.
मोठमोठाले खेळाडू ही धीर आणि संयम यामुळेच नाव कमावतात. नेम लावणे, भाला फेक, उंच उडी, लांब उडी हे आणि यासारखे कित्येक खेळ किती सेकेंदाचे असतात ? पण त्यासाठी खेळाडू धैर्याने सतत मेहनत करत असतात. त्यानंतर ते मैदानावर नाव कमावतात.
साक्षात धीराचं सगळ्यात अलीकडचं उदाहरण म्हणजे सुनीता विल्यम्स. एका आठवड्याला अंतराळ गेलेल्या सुनीता यांना नऊ महिने तिथे अडकून पडावं लागलं पण धीर हाच एक दुवा हाती धरून त्या दिवस घालवत असाव्यात ज्याचा परिणाम आज त्या सुरक्षित पृथ्वीवर परत आल्या आहेत.
धीर आपल्याला, ऊर्जा, शक्ती आणि उत्साह देतो जे आपल्याला न थकता आपले लक्ष्य साध्य करण्यासाठी फार महत्त्वाचे असते. हाच गुण दूर भासणाऱ्या लक्ष्याला जवळ आणण्यास मदतगार होतो.
कोणत्याही विपरीत परिस्थितीत शांत राहणं आणि त्या विपरीत परिस्थितीतून मार्ग काढून आपलं लक्ष्य मिळवणं, हे धैर्य. कुठल्याही परिस्थितीत हार न मानता त्यावर मात करण्याची ताकद म्हणजे धीर.
लहानपणापासून आई वडील मुलांना अनेकदा सांगत असतात
“धीर धर बाळ ! सर्व ठीक होईल.”
हा धीर मुलांना, आई वडिलांच्या बोलण्याने, डोक्यावर प्रेमाचा हात फिरवल्याने मिळतो. त्यांच्या अंतरंगातील धीराला सामर्थ्यवान बनवतो आणि ते बाहेरच्या जगात वावरायला, आलेल्या परिस्थितीला तोंड द्यायला तयार होतात.
केशवसुतांनी आपल्या “सतारीचे बोल” या कवितेत म्हटलं आहे,
“धीर धरी रे धीरा पोटी, असतील मोठी फळे गोमटी.”
ते एकदम पटण्यासारखं आहे.
तुम्हाला काय वाटते ?

— लेखन : राधा गर्दे. कोल्हापूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800