भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त बौध्द साहित्य प्रसार संस्था केंद्रीय कार्यकारणी संचलित महाराष्ट्र समितीव्दारा आयोजित “मानवतेचा प्रकाश” या काव्य संग्रहाचे प्रकाशन नुकतेच कळवा येथील नालंदा बुध्दविहारात मोठ्या दिमाखात आणि जल्लोषात झाले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलताना ज्येष्ठ साहित्यिक प्रा. शुक्राचार्य गायकवाड म्हणाले की “मानवतेचा प्रकाश” हा काव्य संग्रह आशावादी व मानवाच्या हितासाठी असून समाजाला प्रकाशमान करील. हा काव्यसंग्रह प्रकाशीत करताना मला जो आनंद झाला आहे तो मी शब्दात व्यक्त करू शकत नाही”. असेही प्रतिपादन त्यांनी केले.
यावेळी प्रमुख पाहुणे राजरत्न अडसुळ यांनी, “नवोदीत कविंना मिळालेला एक प्लॅटफॉर्म प्रा. शुक्राचार्य गायकवाड सरांनी बौध्द साहित्य प्रसार संस्थेच्या माध्यमातून निर्माण केल्याने त्याची एक प्रचिती म्हणजेच “मानवतेचा प्रकाश” हा काव्यसंग्रह होय” असे मत व्यक्त केले.
प्रमुख वक्ते म्हणून ॲड धम्मकिरण चन्ने व भीमराव रायभोळे यांनी या पुस्तकावर आपले मोलाचे विचार मांडले.
“मानवतेचा प्रकाश” या काव्यसंग्रहाची प्रकाशक म्हणून भूमिका मांडताना भटू जगदेव यांनी, “पैसे नसल्याने जे पुस्तक काढू शकत नाहीत त्यांच्यासाठी अनित्य प्रकाशन मार्फत “ना नफा न तोटा”, या तत्त्वावर पुस्तक छापण्याचे ठरविले आहे ” असे सांगितले .
तर संपादकीय भूमिका मांडताना नवनाथ आनंदा रणखांबे, “लिहित्या हाताला प्रेरणा, प्रोत्साहन आणि बळ देण्यासाठी साहित्यिकांची नवी पिढी घडवण्याचे आणि मराठी साहित्य विश्व समृद्ध करण्यासाठी “मानवतेचा प्रकाश” या पुस्तकाची निर्मिती केली असल्याचे सांगून जास्तीत जास्त नवोदित आणि ज्येष्ठांच्या साहित्याला विनामूल्य “मानवतेचा प्रकाश” या काव्यसंग्रह ग्रंथाच्या रूपाने संधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे , असे मत व्यक्त केले.
या प्रसंगी मान्यवरांचा सन्मानपत्र, शाल, पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
समाजातील सर्व स्तरावरील मान्यवरांसहित बौध्द साहित्य प्रसार संस्था पदाधिकारी, कार्यकर्ते, कवी यांनी नालंदा बुध्द विहार खच्चुन भरला होता.
या सोहळ्याचे सूत्रसंचलन आशा नवनाथ रणखांबे यांनी केले तर आभार प्रदर्शन शाम बैसाणे यांनी मानले.
दुसऱ्या सत्रात “संविधान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर” या विषयावर कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यात ४७ कवींनी सहभाग घेतला घेतला. या सर्वांनी आंबेडकरी मूल्ये जपणाऱ्या कविता, गझल सादर केल्या. सर्व कवींना सन्मानपत्र, ग्रंथ आणि गुलाब पुष्प देऊन गौरवण्यात आले. कविसंमेलनाच्या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रविकिरण मस्के यांनी केले तर आभार मनिषा मेश्राम यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बौध्द साहित्य प्रसार संस्था व बौध्द विकास मंडळांनी अथक परिश्रम घेतले.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800