दरवर्षी २३ एप्रिल हा जागतिक पुस्तकदिन म्हणून साजरा केला जातो.
छत्रपती संभाजीनगर शहरात सुरू असलेल्या मरियम मिर्झा मोहल्ला मोहल्ला बाल पुस्तकालय अभियानांतर्गत डॉ. ए पी जे अब्दुल कलाम मोहल्ला बालवाचनालय येथे हा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी मुलांना ३०० पुस्तके मोफत वाटण्यात आली.
रीड अँड लीड फाउंडेशनचे अध्यक्ष मिर्झा अब्दुल कय्युम नदवी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
मिर्झा मरियम यांनी विद्यार्थ्यांना जागतिक पुस्तकदिन आणि त्याचे महत्त्व सविस्तरपणे सांगितले. त्या म्हणाल्या की, जगात वाचन करणारे आणि पुस्तकांशी मैत्री करणाऱ्यांकडे सर्व लोक आदराच्या भावनेने पाहतात. त्यामुळे प्रत्येकाने रोज वाचनाची सवय लावून घ्यावी.
हा कार्यक्रम मिर्झा निशात तरन्नुम आणि मोहल्ला लायब्ररीच्या प्रेरणास्रोत मिर्झा मरियम जमीला यांच्या देखरेखेखाली आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमात अलहुदा उर्दू शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांनी भाग घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी दिल्ली येथून प्रकाशित होणारे उर्दू मासिक ‘उमंग’ आणि राष्ट्रीय उर्दू भाषा विकास परिषद, दिल्ली येथून प्रकाशित होणारे मुलांचे लोकप्रिय मासिक ‘माहनामा बच्चों की दुनिया’ तसेच ‘तअलीमी इंकलाब’ हे अंक मुलांना भेट देण्यात आले.

रीड अँड लीड फाउंडेशनचे अध्यक्ष मिर्झा अब्दुल कय्युम नदवी यांच्या मार्गदर्शनाखाली मोहल्ला लायब्ररी चळवळ चालवली जात असून आतापर्यंत मुलांसाठी ३६ मोहल्ला लायब्रऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. हे बालवाचनालय शहर आणि परिसरातील गरीब वस्ती तसेच कामगारांच्या वस्त्यांमध्ये सुरू करण्यात आले आहेत. ह्या मोहल्ला बाल पुस्तकालयांचा हजारो मुलांना लाभ होत आहे.
फाउंडेशनचे सदस्य मिर्झा अबुल हसन अली यांनी सांगितले की, गेल्या दहा वर्षांपासून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी फाउंडेशनचे अध्यक्ष मिर्झा अब्दुल कय्युम नदवी प्रयत्नशील असून त्यांनी आतापर्यंत शेकडो कार्यक्रमांमध्ये हजारो पुस्तके मुलांच्या घरी जाऊन वितरित केली आहेत. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये विद्यार्थ्यांना पुस्तकांचे मित्र बनवायचे आहे. यासाठी “पुस्तकांचा परिचय, विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यक्तींवर लिहिलेली पुस्तके वाचायला देणे आणि त्यांच्याकडून निबंध लिहून घेणे” इत्यादी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
ही मोहीम २३ एप्रिल पासून ते १ मे महाराष्ट्रदिनापर्यंत पुस्तक जागृती मोहीम म्हणून चालवली जाईल, अशी माहिती मिर्झा मरियम जमीला यांनी दिली आहे.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800