Thursday, June 19, 2025
Homeसाहित्य'कुटुंब रंगलंय काव्यात' ( २६ )

‘कुटुंब रंगलंय काव्यात’ ( २६ )

संगितकार मित्र वसंत कापसे, भुते मॅडम, भगवान ठग या समूहाबरोबर मी वर्धा शहरापासून जवळच असलेल्या सेवाग्राम येथील “बापू कुटीत” पोहोचलो. मराठीतील कांही कलावंत, कांही कवी व लेखकांचे दोन दिवसांचे‌ एक शिबीर महाराष्ट्र शासनाच्या वतीने बापू कुटीत आयोजित करण्यात आले होते.

शिबिराच्या पहिल्या रात्री झालेल्या कवी संमेलनात अनेक कवींची भेट झाली. ज्यांची कविता मी ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ या माझ्या एकपात्री कार्यक्रमात सादर करायचो त्या देगलूर (जि. नांदेड) येथील प्रा.लक्ष्मीकांत तांबोळी यांची प्रत्यक्ष भेट हा माझ्यादृष्टीने चांगला योग होता. “सर, आपली ‘धरती’ ही कविता मी माझ्या एकपात्री कार्यक्रमात आपल्या नावासह साभिनय सादर करतो, आणि उद्या सकाळी येथील प्रयोगात ती सादर करणार आहे.” असे सांगून मी तांबोळी सरांना माझा परिचय करून दिला. यावर सर माझ्यावर खूप खूष झाले…. इतकेच नव्हे तर त्या रात्री बापू कुटी समोरच्या अंगणात… कंदिलाच्या प्रकाशात…कवी संमेलनानंतर लक्ष्मीकांतजींनी पहाटे पर्यंत आपल्या अनेक कविता ऐकवल्या आणि मला लिहूनही दिल्या. बापू कुटीतील ती रात्र मी कधीही विसरू शकणार नाही.

दुसऱ्या दिवशी सकाळी सादर केलेल्या माझ्या एकपात्री कार्यक्रमाला सगळेच दर्दी ‌रसिक लाभल्याने कार्यक्रम रंगत चालला होता, त्याचवेळी मी तांबोळी सरांची ‘धरती’ ही कविता सादर केली. कविता सादर करून झाली आणि भारावलेल्या सरांनी मंचावर येऊन मला कडकडून मिठी मारली.
चालू असलेल्या कार्यक्रमात तांबोळी सर मंचावर आल्यामुळे सर्व रसिक अचंबित झाले होते. संपूर्ण कार्यक्रम झाल्यानंतर सर मला म्हणाले, “विसुभाऊ तुझा कार्यक्रम फारच चांगला झाला. माझी कविता तू सादर केलीस ती मला विशेष भावली, पण धरती कविता सादर करण्यापूर्वी सादर करायला मी तुला दोन ओळी देतोय त्या ऐकवून मग कविता घ्यावीस.
‘कधीही नं संपणारं दुःख दिलंस याचं दुःख नाही,
पण ते साठवायला फक्त दोनच डोळे दिलेस
याचं दुःख आहे.!’ यामुळे कवितेचे वजन वाढेल.

बापू कुटीतील या बैठकीनंतर तांबोळी सरांच्या मुलाच्या लग्नात ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ हा माझा एकपात्री कार्यक्रम देगलूरच्या रसिकांसाठी आयोजित केला होता, हे विशेष.!

‘सार्वजनिक बांधकाम विभाग, वर्धा’ येथील इंजिनिअर श्री.अनंत भीमनवार या कवीची भेटही वर्धा शहरात झाली होती.”सरी आल्या,सरी आल्या सरी आल्या गं, खेळायाला आभाळाच्या पोरी आल्या गं || ही भीमनवारांची कविता ऐकल्यावर
‘तू माझी कविता पुढे नेशील, यांची मला खात्री वाटते,’ असे म्हणून स्वतः बा.भ. बोरकरांनी कवी अनंतरावांची पाठ थोपटली होती. त्यांच्या अनेक कविता त्यांनी मला लिहून दिल्या आहेत. त्यांच्या एका कवितेची त्यांनी सांगितलेली जन्मकथा आणि त्यांची कविता रसिकांना निश्चितपणे आवडेल.

या कवितेबद्दल बोलताना अनंतराव मला म्हणाले, “मी सार्वजनिक बांधकाम विभागात काम करणारा इंजिनिअर.! एकदा मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात वर्धा ते देवळी या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम मी करीत होतो. अचानक आकाशात काळे ढग जमून आले आणि वळीवाचा पाऊस सुरू झाला. सर्व कामगार निवारा शोधून बाजूला उभे राहिले. मी मात्र पावसांत भिजत होतो आणि कविता येत होती.
‘काजळ काळ्या मेण्यामधुनी,आली वर्षाराणी गं,
झुरुमुरु झुरुमुरू झेलू धारा, नाचू गाऊ गाणी गं ||
चोर शिपाई खेळुन घेतो, कळ्याफुलांशी वारा गं,
घसरंडीवर कौलारूंच्या घसरुन घेती धारा गं,
वळणीखाली उंच उडीचा, खेळ खेळते पाणी गं ||
नजरा चुकवून जुन्या वह्यांची, चोरुन पाने काढू गं
अंगणातल्या पाण्यामधुनी, नाजुक होड्या सोडू गं
होडीमधुनी खड्यांचीच पण, ठेवू राजा राणी गं ||
झुरुमुरू झुरुमुरू झेलू धारा, नाचू गाऊ गाणी गं ||
क्रमशः

विसुभाऊ बापट

– लेखन : विसुभाऊ बापट, मुंबई
(सादरकर्ते- कुटुंब रंगलंय काव्यात)
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अजित महाडकर, ठाणे on जिचे तिचे आकाश… १२
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on आपण जागे कधी होऊ ?
शितल अहेर on पुस्तक म्हणाले…
सौ. सुनीता फडणीस on पुस्तक म्हणाले…
श्रीकांत पेटकर on जिचे तिचे आकाश… १२
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on राजमाता माँ जिजाऊ
उज्ज्वला केळकर on पाऊस : काही कविता…