Wednesday, June 18, 2025
Homeलेखरक्तदान : जीवनदान...

रक्तदान : जीवनदान…

आपल्या संस्कृतीत दानाचे अनन्य साधारण महत्व आहे. अन्नदान, वस्त्रदान, जलदान या सर्व दानधर्म आचरणामुळे पुण्य तर मिळतेच परंतु जोपर्यंत आपण जगत आहोत तोपर्यंत या जगात या आचरणामुळे आपण माणुसकीचा धर्म जोपासत राहतो. या सर्व दान कर्मात सर्वश्रेष्ठ असे एक दान म्हणजे ‘रक्तदान‘ होय !

रक्तदानामुळे परिचित असो वा अपरिचित, कोणाही गरजवंत रुग्णाला जीवनदान मिळते. त्यामुळे ‘रक्तदान हे जीवनदान’, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मात्र, आजही समाजात रक्तदान करणाऱ्यांची संख्या कमी आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन रक्तदात्याना रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने व नियमित रक्तदात्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी २००४ पासून जागतिक आरोग्य संघटना १४ जून रोजी जागतिक रक्तदाता दिवस साजरा करीत आहे. ए-बी-ओ या रक्तगटांचा शोध लावणारे आणि रक्तदान संकल्पनेला अधिक शास्त्रशुद्ध पद्धतीने मांडणारे ऑस्ट्रियाचे नोबेल विजेते प्राप्त डॉ. कार्ल लॅन्डस्टेनर यांच्या जन्मदिनानिमित्त हा दिवस जागतिक रक्तदान दिन म्हणून ओळखला जातो.

दरवर्षी एका नव्या थीमवर जागतिक रक्तदाता दिवस साजरा केला जातो. त्यानुसार यंदाची थीम ‘Donating Blood is an act of solidarity, join the effort and save lives‘ म्हणजेच ‘रक्तदान करणे हे एकजुटीने करण्याचे कार्य आहे, या कार्यात सहभागी व्हा आणि अमूल्य जीवन वाचवा ‘. रक्तदान हे सर्व श्रेष्ठ दान आहे. अनेकदा अपघातात जखमी झालेल्यांना किंवा इतर आजारी रुग्णांना वेळेवर रक्त मिळणे गरजेचे असते. वेळेवर रक्त न मिळाल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. रक्ताची गरज आणि महत्त्व लोकांना कळावे यासाठी दरवर्षी जागतिक रक्तदाता दिवस साजरा केला जातो.

रक्तदान ही रक्तदात्याने स्वेच्छेने अंगातून रक्त काढून देण्याची क्रिया आहे. असे रक्त रोग्याच्या शरीरात चढवण्यापूर्वी बायोफार्मास्युटिकल प्रक्रियेद्वारे त्याचे विभाजन केले जाते व संपूर्ण रक्त किंवा रक्ताचा आवश्यक तोच घटक रोग्याच्या शरीरात इंजेक्ट केला जातो. रक्त संकलन प्रक्रियेत रक्त बँकांचा सहभाग असतो. बहुतेक रक्तदाते स्वखुशीने अणि विनामोबदला रक्तदान करतात.

काही देशांमध्ये, रक्ताचा पुरवठा मर्यादित आहे, कारण देणगीदार फक्त नातेवाईकांसाठी किंवा मित्रांसाठीच रक्तदान करतात. रक्तदानासाठी आस्थापना शाखेत कामकाजावरून मोकळा वेळ दिला जातो.

मानवाच्या शरीरामधे साडेचार ते पाच लिटर रक्त असते. रक्तदानाच्या वेळी केवळ ३०० मिली. रक्त काढले जाते. प्रत्येक रक्तदानानंतर साधारण ३६ तासांमधे शरीरात रक्ताची पातळी पूर्ववत होते. तसेच साधारण २ ते ३ आठवड्यांमधे रक्तपेशीही पूर्ववत होतात. रक्तदान केल्याने कोणताही त्रास किंवा इजा होत नाही.

रक्तदानासाठी नियम :
वयाच्या १८ वर्षानंतर (६५ वर्षापर्यंत) वजन ४५ कि.ग्रॅ. च्या वर असणे आवश्यक आहे
रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमीत कमी १२.५ ग्रॅम असल्यास, रक्तदाता पूर्णपणे असणे आवश्यक आहे.
निरोगी माणसाला दर ३ महिन्यांनी जवळच्या रक्तपेढीत किंवा कोठेही आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात रक्तदान करता येते.

रक्तदान कोण करू शकत नाही :
रक्तदात्याने रक्तदान करण्याच्या तीन दिवसापूर्वी कोणतेही प्रतिजैविक औषध घेतले असल्यास;

मागील तीन महिन्यात मलेरिया झाला असल्यास;.

मागील एका वर्षात विषमज्वर, कावीळ, कोणताही गंभीर आजार किंवा श्वानदंश होऊन त्याने रेबीजची लस घेतली असल्यास, मोठी शस्त्रक्रिया झाली असल्यास, गर्भवती महिला, महिलेला एक वर्षाखालील मूळ असल्यास किंवा तिचा सहा महिन्यापूर्वी गर्भपात झाला असल्यास.

रक्तदानापूर्वी काय काळजी घ्यावी ?
पुरुषांसाठी तीन महिने आणि महिलांसाठी चार महिन्यांनी रक्तदान करता येते. रक्तदान उपाशीपोटी करू नये. रक्तदानापूर्वी हलका नाश्ता करावा. भरपूर पाणी प्यावे. आरामदायक कपडे परिधान करावेत. पुरेशी झोप घ्यावी. रक्तदान करण्यापूर्वी तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची प्रामाणिकपणे उत्तरे द्यावीत. रक्तदानापूर्वी वजन, हिमोग्लोबीन, नाडी, रक्तदाब व इतर महत्त्वाच्या वैद्यकीय तपासण्या डॉक्टरांकडून करून घेणे आवश्यक आहे.

युवक-युवतींनी रक्तदानाचे महत्त्व समजून घेऊन मोठ्या प्रमाणात या सामाजिक उपक्रमात सहभाग घेऊन रक्तदान केले पाहिजे.

प्रज्ञा पंडित

– लेखन : प्रज्ञा पंडित. ठाणे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on राजमाता माँ जिजाऊ
उज्ज्वला केळकर on पाऊस : काही कविता…
उज्ज्वला केळकर on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on कथा
सौ. सुनीता फडणीस on विमान “अपघात” की “घातपात” ?
सौ. सुनीता फडणीस on हे असं कां होतं ?