मेलडी क्वीन आशा भोसले
आशा भोसले म्हणजे मंगेशकर कुटुंबातील असे रत्न आहे, जिने शास्त्रीय संगीतापासून कॅब्रे, डिस्को पर्यंत अनेक गाणी आपल्या गायकीने समृद्ध केली आहेत.
भारताच्या प्रत्येक प्रादेशिक भाषेत गायलेल्या आशा भोसले यांचा जन्म 8 सप्टेंबर 1933 रोजी सांगली येथे झाला. त्या केवळ 9 वर्षांच्या असताना त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर यांचे निधन झाले. तेव्हा मंगेशकर कुटुंब मुंबईला आले.
घरात संगीताचे वातावरण असल्याने आशाजीना बालपणापासून गाण्याची आवड होती. लता आणि ह्रदयनाथ यांच्याकडून त्यांना नेहमी मार्गदर्शन मिळत असे. त्या काळी लता मंगेशकर, शमशाद बेगम, गीता बाली अशा गायिकांचे वर्चस्व होते. त्यामुळे आशाजींना संधी मिळणे कठिणच होते. संगीतकार सजाद हुसेन यांना आशाजी बोलल्या, “मला काही गाता येत नाही. तुम्ही जे शिकवाल तेच मी गाईन” असे म्हणून त्यांनी आपल्या गायनाला सुरुवात केली. त्याच वेळी बिमल रॉय नि परिणिता आणि राज कपूर ने त्यांना बूटपॉलिश या चित्रपटात गाण्याची संधी दिली.
1943 मध्ये त्यांनी गायनाला सुरवात केली. 1948 मध्ये चुनरिया या चित्रपटातुन संगीतकार हंसराज बहाल यांनी सावन आया या गाण्यासाठी सर्वप्रथम संधी दिली. सुरुवातीला शमशाद बेगम, गीता बाली आणि मोठी बहीण लता मंगेशकर यांचा दबदबा असल्याने त्यानी नाकारलेली किंवा सह अभिनेत्री साठी किंवा आयटम सॉंग साठीच त्यांचा आवाज वापरला जायचा. तरी पण जे गाणे मिळेल, ते त्या गात असत. कारण 16 व्या वर्षी त्यांनी प्रेमविवाह केला होता. त्यानंतर त्यांच्या आवाजात जी विविधता आली त्यामुळे त्यांनी परत कधीच मागे वळून पाहिले नाही.
मधूबाला ,आशा पारेख, रेखा ,नूतन ,हेमामालिनी पासून उर्मिला ,तबु अशा सर्व जुन्या ,नव्या नायिका कशा बोलतात, कशा हसतात हे पाहून त्यांचा अभिनय गायकीत उतरवला आणि सर्व गाणी हिट होत गेली . मधूबाला साठी आईये मेहेरबान, हाल कैसा है जनाब का, नूतन साठी छोड दो आचल जमाना क्या कहेगा, आशा पारेख साठी ओ हसीना जुल्फो वाली, जाइये आप कहा जायेगे, ओ मेरे सोना रे दे दूनगी जान जुदा मत होना रे ,रेखा साठी मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है, खाली हाथ शाम आई, दिवंगत परवीन बाबी साठी प्यार करनेवाले प्यार करते है शान से प्यार मे दिल पे मार दे गोली ले ले मेरी जाण, उर्मिला साठी तन्हा तन्हा यहा पे जिना रंगिला रे अशी अनेक गाणी आहेत ही यादी वाढतच जाईल.
लता मंगेशकर ची बहीण असूनही आशाजीनी कधी त्यांची नक्कल केली नाही. आपला वेगळेपणा सिद्ध केला. आशाजीना कधीही काही अडचण आली तर लतादीदीची मदत घेतली. या दोघींनी 1985 च्या उत्सव साठी ‘मन क्यू बहका रे बहका आधी रात को’ हे द्वंद गीत गायले जे खूप गाजले .
आशाजी त्यांच्या गायनाबाबत म्हणतात, शरीराचे तारुण्य संपेल पण मनाचे तारुण्य संपायला नको. जे काम कराल ते मेहनतीने, आळस न करता करायचे. मनापासूनच गाणे गायचे हे त्यांनी आजपर्यंत जपले आहे. म्हणूनच या वयात पण त्यांचा आवाज तरुण आहे.
आशाजीनी त्यांच्या करिअर मध्ये जुन्या, नवीन सर्वच संगीतकारांसमवेत गाणी गायली. त्यातील काही निवडक अशी आहेत:
1. ओ पी नयर जाईये आप कहा जायेगे ये नजर लौट के फिर आईगी । आवो हुझुर तुमको सितारो पे ले चलू । ये है रेशमी जुल्फो का अंधेरा ।
2. लक्ष्मीकांत प्यारेलाल एक हसीना था एक दिवाना था । ढल गया दिन हो गयी शाम ।
3. कल्याणजी आनंदजी आखो आखो मे हम तुम हो गये दिवाने । और इस दिल मे क्या रखा है।
4. बप्पी लहरी जवानी जाणेमण हसिन दिलरुबा । इमतेहा हो गयी इंतजार की। रात बाकी बात बाकी।
5. शंकर जयकिशन जिदगी एक सफर है सुहाना।
6. राजेश रोशन जब छाये मेरा जादू । तौबा तौबा क्या होता है जो।
आर डी बर्मन आणि अशाजीनी 1980 च्या अगोदरपासूनच जबरदस्त गाणी दिलीत. 1970 च्या कारवा तील पिया तू अब तो आजा । अपना देश मधील दुनिया मे लोगो को धोका कभी हो जाता है । यादो की बारात 1973 त्यातील किशोरदा बरोबर मेरी सोनी मेरी तमना झूठ नही है मेरा प्यार । चुरा लिया है तुम ने जो दिल को नजर नही चुराणा सनम। 1973 च्या हरे राम हरे कृष्णा तील दम मारो दम यासाठी तर त्यांना अवॉर्ड मिळाले होते. सीता और गीता चे हवा के साथ साथ घटा के संग संग। 1977 चा हम किसींसे कम नही हमको तो यारा ‘तेरी यारी जाण से प्यारी । मिल गया हमको साथी मिल गया। 1972 च्या जवानी दिवाणी तील किशोरदा समवेत सर्व गाणी हिट होती. त्यातील जाने जा धुंडता फिर राहा ।असे एक ना अनेक1980 च्या सुरवातीला शान मधील जीते है शान से, मरते है शान से हे गाणे आशा -पंचम मुळें आजही फ्रेश वाटते. 1982 चे सनम ‘तेरी कसंम कितने भी तू करले । निशा निशा जाणे जा ओ मेरी जाणे जा । 1983 चा पुकार यातील बच के रहना रे बाबा तुझं पे नजर हे पंचम आणि किशोरदा समवेतचे गाणे खूप गाजले .1982 मध्ये आलेल्या नासिर हुसेन यांच्या जमाने को दिखाना है यातील बोलो बोलो कुछ तो बोलो । पुछो ना यार क्या हुवा। 1985 चा सागर यातील ओ मारिया , तसेच शैलेंद्र सिंग बरोबर जाणे दो ना पास आवो ना। 1986 इजाजत तील मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है। यासाठी तर आशाजींना नॅशनल अवॉर्ड मिळाले. अशी आशा -पंचम यांची जादुई जोडी होती जी आर डी च्या निधनापर्यंत म्हणजेच, 1994 पर्यंत राहिली.
याच बरोबर नवीन पिढी तील जतीन ललित, आनंद मिलिंद, अनु मलीक, आर रहमान अशा सर्वच संगीतकारांनी आशाजी कडून छान गाऊन घेतले. जागेअभावी त्या गाण्यांचा येथे समावेश केला नाही. पण तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकता।
ज्यावेळी 1984 मध्ये 16 वर्षांच्या नीलम साठी, तू रुठा तो मै रोउगी सनम हे कोणत्या मुलीने गायले अशी विचारणा करण्यात आली, तेव्हा 52 वर्षांच्या आशा भोसले यांचा तो आवाज आहे, हे समजले तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटले .तसेच 22 वर्षांच्या आमिषा पटेल साठी 1999 तील कहो ना प्यार है साठी 66 वर्षांच्या या गायिकेने गाणे गायले. मित्रानो, दोन्ही गाणी ऐकल्यावर त्याचा फ्रेशनेस लक्षात येतो, इतका तरुण आवाज आशाजीचाच आहे.
आशाजीनी मराठीत पण खूपच सुंदर गीते गायली आहेत. जसे धुंदी कळ्याना, धुंदी फुलांना शब्द रूप आले ।, दिस जातील दिस येतील।, रेश्माच्या रेघांनी।, बुगडी माझी सांडली ग जाता साताऱ्याला।, नाच रे मोरा।, गोरी गोरी पान फुलसारखी छान।
या भावगितांबरोबर त्यांनी प्रणय गीते, तमाशा गीते अशी सर्व प्रकारची गाणी गायली आहेत.
आशाजींना 1979 मध्ये 7 वे फिल्मफेअर अवॉर्ड ये मेरा दिल यार का दिवाना या डॉन च्या गाण्यासाठी मिळाले .त्यावेळी यापुढे नवीन गायकांना संधी देण्यात यावी असे त्यांनी सांगितले. त्यामुळे फिल्मफेअर ने 1996 मध्ये रंगिला साठी त्यांना स्पेशल अवॉर्ड दिले . या शिवाय 1981 च्या उमराव जान साठी दिल चीज क्या है आप मेरी आणि 1986 च्या इजाजत मधील मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च असा भारत सरकारचा दादासाहेब फाळके पुरस्कार त्यांना 2000 साली प्रदान करण्यात आला. तर 2008 मध्ये पद्मविभूषण देऊन त्यांना गौरविण्यात आले. 2011साली गिनीज बुक मध्ये त्यांची नोंद झाली .1997 ला ग्रामी पुरस्कार मिळालेल्या आशा भोसले पहिल्या भारतीय महिला ठरल्या.
त्यांनी 25000 हुन अधिक गाणी गायली आहेत. त्यांच्या बरोबरचे मुकेश, रफी, किशोर, मनाडे ,सुरेश वाडकर, शबीर कुमार, मो अजीज पासून कुमार सानू, उदित नारायण, अभिजीत, विनोद राठोड, बाबूल सुप्रियो यांच्या समवेत पण गाणी गायली आहेत.
आशाजींचा सर्वात आवडता गायक किशोर कुमार होता. त्याच्या समवेत 1972 चे जवानी दिवानी तील जाने जा धुंडता फिर राहा हु तुमहे रात दिन मै यहा से वहा हे गीत आशाजी स्टेज वर बाबूल सुप्रियो समवेत गातात व या वयातही आपण मनाने किती तरुण आहोत हे दाखवतात.
आशा भोसले हे असे व्यक्तिमत्व आहे की, त्यांच्याबद्दल कितीही लिहिले तरी कमीच आहे. तरी मी माझ्या पध्दतीने आशाजीचा जीवन प्रवास आपल्यासमोर मांडला आहे. आशाजी येत्या 8 सप्टेंबर ला वयाची 89 वर्ष पूर्ण करून 90 व्या वर्षात पदार्पण करत आहे.त्या बोलल्याप्रमाणे त्यांचा आवाज असाच राहो आणि माझ्या सारख्या सर्व संगीत रसिकांकडून त्यांना दीर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छा आणि प्रार्थना आहे.

– लेखन : संदिप भुजबळ
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
Khupach sundar