Wednesday, September 17, 2025
Homeसाहित्य'कुटुंब रंगलंय काव्यात' ( ३६ )

‘कुटुंब रंगलंय काव्यात’ ( ३६ )

गुरूवर्य सदानंद जोशी
मी अत्रे बोलतोय” हा बहारदार एकपात्री कार्यक्रम सादर करणाऱ्या प्रा.सदानंद जोशी सरांना गुरूस्थानी मानून २६ जानेवारी १९८१ रोजी ‘कुटुंब रंगलंय काव्यात‘ या माझ्या एकपात्री कार्यक्रमाला मी सुरुवात केली. त्यांच्या आशिर्वादामुळेच मी गेल्या ४० वर्षांत ३०४९ प्रयोग सादर करू शकलो आणि महाराष्ट्रात, भारत देशातच नव्हे तर सातासमुद्रापलीकडे असलेल्या मराठी रसिकांना सुद्धा मी माझ्या एकपात्री कार्यक्रमात रंगवू शकलो.

जोशी सर केवळ एकपात्री कलाकारच नव्हते तर त्यांचा एकपात्री कार्यक्रमांचा प्रचंड अभ्यासही होता. याचा प्रत्यक्ष अनुभव मी घेतलेला आहे.
१९८९ साली प्रा.रमेश चौधरी यांचा मला फोन आला. ते म्हणाले, “विसुभाऊ, महाराष्ट्र शासनाच्या कला व सांस्कृतिक संचालनालयाने कोल्हापूर जिल्ह्यातील वारणानगरला तीन दिवसांचे नवोदितांसाठी नाट्य प्रशिक्षण शिबीर आयोजित केले आहे. या शिबिरात एकपात्री या विषयावर व्याख्याने द्यायला तुम्ही याल कां ? सर्व व्यवस्था चोख होईल, तुम्ही यावं असं मला वाटतं.” क्षणाचाही विलंब न करता मी चौधरी सरांना होकार दिला ते जोशी सरांच्या भरोशावरच !

लगेचच मी जोशी सरांच्या घरी जाऊन त्यांना चौधरी सरांच्या फोन बद्दल सविस्तर सांगितले, तेंव्हा ते म्हणाले, “काळजी करू नकोस, मी तुला एकपात्री कार्यक्रमाबद्दल माहिती सांगतोच, शिवाय मी सांगतो त्या पुस्तकांचा अभ्यास मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या वाचन कक्षात बसून कर, तुझी व्याख्याने तयार होतील.”

त्यानंतर जोशी सरांनी एकपात्री बद्दल सविस्तर माहिती सांगितली. कायिक किंवा वाचिक अभिनयातून किमान दोन अथवा अनेक पात्रे एकाच अभिनेत्याने रंगमंचावर सादर करायची आणि अडीच- तीन तास रसिकांना खिळवून ठेवायचे, तोच एकपात्री कलाकार मानला जातो. असा एकपात्री करणे सोपे नाही. कारण प्रचंड वाचन, पाठांतर अभ्यास, सादरीकरण, दर्जा, हजरजबाबीपणा आणि समोरच्या रसिकांना तासनतास खिळवून ठेवायची ताकद एकपात्री कलाकारात असावी लागते.

मिमिक्री करणाराला एकपात्री कलाकार म्हणले जात नाही. जागतिक दृष्टीने पहिला एकपात्री कलाकार ‘मार्क ट्वेन’ मानला जातो. आर्थिक चणचण दूर करण्यासाठी आपल्या विनोदी कथाकथनाचा पहिला एकपात्री कार्यक्रम त्यानी सुरू केला आणि त्याला जगात मान्यता व प्रसिद्धी मिळाली.

महाराष्ट्रातील पहिल्या एकपात्री कलाकार आहेत ‘सुहासिनी मुळगावकर !’ ‘संगीत सौभद्र’ आणि ‘संगीत स्वयंवर’ ही नाटके त्यांना मुखोद्गत होती, पण कांहीं कारणाने नाटक कंपनीच्या नाटकात त्यांना संधी मिळत नव्हती. म्हणूनच सुहासिनी मुळगावकर यांनी ही नाटके एकपात्रीच्या स्वरूपात सादर करायला सुरुवात केली आणि त्यांना रसिकांनी प्रचंड दाद दिली.

सुहासिनी मुळगावकर यांच्या नंतर पु.ल. देशपांडे, सदानंद जोशी, व.पु.काळे, प्रा. लक्ष्मणराव देशपांडे, मधुकर टिल्लू, प्रा.विसुभाऊ बापट, संदीप पाठक इत्यादि कलावंतांना एकपात्री कलाकार म्हणून मराठी रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले.

जागतिक दृष्टिकोनातून ‘मार्क ट्वेन” हा पहिला एकपात्री कलाकार मानले जात असले तरी आपला पहिला एकपात्री कलाकार आहे, ‘नारदमुनी !’ त्यांच्या नंतर सर्व ह.भ.प. कीर्तनकार, राष्ट्रीय कीर्तनकार असे आपलेच पहिले ‌‌एकपात्री कलाकार आहेत, हेच सत्य आहे. प्रा.सदानंद जोशी सरांनी ही प्राथमिक माहिती दिल्यानंतर त्यांनी सांगितलेल्या पुस्तकांचा अभ्यास करून जमवलेल्या माहितीमुळे मी माझी व्याख्याने तयार केली आणि वारणानगरच्या नाट्य-प्रशिक्षण शिबिरात ती यशस्वी झाली.

मला एकपात्री कलाकार म्हणून यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या गुरूवर्य प्रा.सदानंद जोशी सरांना माझा मानाचा मुजरा.!

विसुभाऊ बापट

– लेखन : प्रा.विसुभाऊ बापट. मुंबई.
(सादरकर्ते – कुटुंब रंगलंय काव्यात)
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Balasaheb Thorat on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा
सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !