पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची आज २९६ वी जयंती. या जयंतीच्या विशेषाने राजमातेच्या गौरवार्थ लेखिका मुक्ता केणेकर, यांच्या ‘लोकराज्ञी अहिल्याबाई होळकर’ या पुस्तकाचा परिचय करून देत आहेत, मुख्याध्यापक कचरू चांभारे.
समाजाचं तोंड कुणीकडं फिरवायचं ? याचे सर्वस्वी अधिकार पुरूष सत्तेकडे असलेल्या कालखंडात काही स्त्रीयांनी काळाच्या पलीकडे रेघोटी ओढणारा पराक्रम केलेला आहे. राजमाता जिजाऊ माँसाहेब, भद्रकाली ताराराणी, लोकमाता अहिल्या, क्रांतीज्योती सावित्रीमाई, डॉ.आनंदीबाई जोशी ही उदाहरणे म्हणजे काळाला भेदून काळावर चितारलेली कायमची चित्रे आहेत.
अराजकतेची तोंडं तलवारीनं बंद करायच्या कालखंडात, ज्या मातोश्रीनं समता व न्याय बुद्धीने राज्य कारभार केला, त्या लोकमातेची आज जयंती.अंगच्या गुणावरच माणुस मोठा होत असतो पण प्रारब्धाचीही योग्य जोड असावी लागतेच, तरच हे शक्य होतं. मी दैववादी आहे म्हणून असं विधान करत नाही, सा-याच थोर नर नारी नारायणांचा इतिहास वाचला तर एक गोष्ट ध्यानी येतेच ती म्हणजे लोकोत्तर ऐतिहासिक पात्रांच्या अलौकिक यशात त्यांच्या भोवतालच्या इतर पात्रांचा, सामाजिक व भौगौलिक परिस्थितीचा खूप मोठा वाटा आहे.
लोकमाता अहिल्यामाईंचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील चोंडी या एका छोट्या गावातला. पण त्यांच्या कर्तृत्वाची मशाल देदिप्यमान झाली ती नर्मदेच्या तीरावरील इंदूर महेश्वरी नगरीत.
पुण्यश्लोक या शब्दाने अहिल्यामाईंचा गौरव केला जातो. पुराणातल्या अर्थानुसार पुण्यश्लोक म्हणजे पवित्र व चरित्रसंपन्न व्यक्ती. आपल्या पुण्यकर्माने जनहित साधणारी व्यक्ती. पुण्यश्लोक म्हणून पुराणात सीतामाईचे तात राजा जनक, धर्मभास्कर राजा पांडव युधिष्ठिर, परम भगवान विष्णू, पराक्रमी राजा नल यांचा उल्लेख आलेला आहे.
इतिहासात मात्र पुण्यश्लोक हे विशेषण एकट्या अहिल्यामाईंसाठी वापरले जाते. त्यांच्या थोरवीसाठी पुण्यश्लोक व लोकमाता हे दोन शब्द पुरेसे आहेत. ही दोन विशेषणं अहिल्यामाईंसाठी कशी आली ? हे जाणुन घ्यायचं असेल तर माईंची गाथा वाचावीच लागेल.
परंपरेनुसार वंशिक सरदारकीचा वरदहस्त नसलेला धनगर समाजातील एक तरूण केवळ तलवारीच्या पातीवर व बुद्धी चातुर्याच्या जोरावर आपलं स्थान निर्मितो, तो तलवार बहाद्दर म्हणजे होळकरशाहीचे संस्थापक सुभेदार मल्हारराव होळकर व होळकरशाहीची पताका आसेतुहिमाचल कीर्तीवंत ठेवली ती कर्तबगार व्यक्ती म्हणजे लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकर.
शासन यंत्रणा राबविणं म्हणजे भोग नसून एक योग आहे, साधना आहे. ही बांधीलकी मानूनच अहिल्यामाईंनी राज्य कारभार केला.
पराक्रमाचं शिवतेज असलेल्या खुद्द बाजीराव पेशव्यांनी सुभेदार मल्हाररावांच्या चिरंजीवांशी म्हणजे खंडेराव होळकरांशी अहिल्यामाईंचा विवाह घडवून आणला. त्या काळात भारतभर दरारा असलेलं राज्य म्हणजे मराठेशाही व मराठेशाहीचे कर्तेकरविते होते थोरले बाजीराव पेशवे. बाजीरावांची राजधानी नुकतीच शनिवारवाड्यात आली होती. या वास्तुत खुद्द बाजीराव पेशव्यांनी अहिल्या-खंडेराव विवाह घडवून आणला होता.
सुन मुखाच्यावेळी मल्हारबाबांनी एका मांडीवर सुनेला व एका मांडीवर मुलाला घेतलं होतं नंतर हीच कृती खुद्द बाजीराव पेशव्यांनी करून पितृत्वाचा हात डोई फिरवला होता. चार दिवसाच्या शाही सोहळ्यानंतर अहिल्यामाई इंदूरला आल्या.
शिंदे-होळकर-पवार म्हणजे पेशवाईचे खांबच. इंदूरचा परगणा होळकरांकडे तर उज्जैन प्रांत शिंदेंकडे. धारची सुभेदारी पवारांकडे. उत्तरेतल्या सा-या राजकारणाची भिस्त या तिन्ही खांबावरच. मल्हारबाबा आपल्या सुनेस मुलांप्रमाणेच वागवत.
कारकुनी कारभार (मुलकी प्रशासन) व मैदानी कारभार असे राज्य कारभाराचे ठळक दोन भाग पडतात. दोन्ही विभागाचा समन्वय साधूनच काम करावे लागते. मल्हारबाबांनी राज्य कारभाराची धडे गिरवून घेतली होती. इंदूरची होळकरशाही सुवर्णयुगाच्या शिखरी असतानाच तिला पहिला तडाखा बसतो, तो खंडेरावांच्या मृत्यूने.
कुंभेरीच्या लढाईत जाटाकडून होळकरशाहीचा एकुलता एक वारसदार धारातीर्थी पडतो. होळकरशाहीवर हा खूप मोठा आघात असतो. अहिल्येसाठी तर आभाळ कोसळणं व धरणी दुभंगणं एकच. रीतीप्रमाणे सती जाण्यास निघालेल्या अहिल्यामाईस मल्हारबाबाने अडवलं. गेली ती अहिल्या व राहिला तो खंडू. तूच माझा पुत्र खंडेराव आहेस. तू थांबलंच पाहिजेस. मल्हारबाबांचे ऐकून सती जाणारी आहिल्यादेवी थांबली पण रक्तातल्या जवळच्या अठ्ठावीस मृत्यूंनी ती रोजच सती गेली होती.
होळकरशाहीचा कारकुनी कारभार पूर्णपणे अहिल्यामाई पाहत होत्या. वात्सल्याने परिस्थिती हाताळणा-या मातोश्री, वेळप्रसंगी कठोरही होत असत. खंडेरावांच्या पहिल्या वर्ष श्राद्धाचं प्रकरण खूप बोलकं आहे.
खंडेरावांसोबत त्यांच्या अकरा स्त्रीया सती गेल्या होत्या, त्यात दोघी मुसलमान होत्या. सती गेलेल्या स्त्रीयांस त्यांचं नाव घेऊन विधिवत पाणी सोडायचं असतं. इतर स्त्रीयांची नावं ब्राम्हण पुजा-यांनी घेतली पण मुस्लीम स्त्रीयांच्या नावे श्राद्ध करण्यास त्यांनी नकार दिला. दुःखात असूनही आहिल्या कडाडल्या .. शास्त्र आपण माणसांनीच निर्माण केलं आहेत, ते आपण तोडलंही पाहिजे. मुस्लीम आहे म्हणून श्राद्ध करता येत नसेल तर मग कोण्या शास्त्राने त्यांना सती जाऊ दिलं ते सांगा ?
ज्यांनी आमच्या स्वारीसाठी जिंदगी वेचली त्यांच्या नावाने पळीभर पाणी ओतण्यास इतराजी असेल तर आम्हाला विधीच मान्य नाही. असं खडसावताच श्राद्ध विधी करावाच लागला. धर्म परंपरेचं जोखड भिरकावून द्यायला खूप मोठी ताकद लागते, ती त्यांच्यात होतीच.
पेंढा-यांचा बंदोबस्त ….
चोर, लुटारू, पेंढा-यांनी इंदूर संस्थानात उच्छाद मांडला होता. जो कोणी या पेंढा-यांचा बंदोबस्त करील, त्याचा विवाह माझ्या मुलीशी मुक्ताशी लावून देईन. असा शब्द भर दरबारात माईंनी उच्चारला होता. लढवय्या काटक उमदा तरूण यशवंत फणसे यांनी पेंढा-यांचे मत परिवर्तन केले. संस्थानातली वाटमारी थांबली, चोरी डकैती थांबली. दिल्या शब्दाप्रमाणे लोकमातेने लाडक्या मुक्ताचा विवाह यशवंतरावांशी लावून दिले.
माईंचे राज्य न्यायप्रिय होते. शेजारी राज्यांशी मैत्रीपूर्ण संबंध असल्यामुळे शांततेचं राज्य होतं. भारतातल्या सर्वच प्रमुख देवस्थानातली बांधकामं अहिल्यामाईंनी करवून घेतली. देवाच्या नावानं छन्नी हातोडा चालवणारी लोकमाता स्वतः तलवार बहाद्दर व मुत्सद्दी होती.
राघो पेशव्याच्या निमित्तानं हे इतिहासानं अनुभवलं आहे. ज्या शिंदे होळकरांच्या जीवावर अटकेपर्यंत राघोनं भरारी घेतली, याच दादासाहेबांनं शिंदे होळकरांचा घात केला व पेशवाईलाही नख लावलं. माधवराव पेशव्यांसारख्या शूराला राघोदादाची साथ लाभते तर पेशवाई निशाण अजून निखारलं असतं. राघोला करारी जबाब देणा-या माता, पुढं राघो कैदेत असताना वणवण भटकणा-या आनंदी बाईला राघोदादाच्या बायकोला आर्थिक मदत करतात.
न्याय निवाड्याचे काही प्रसंग पुस्तकात आलेले आहेत. सुनावणीस आलेल्या प्रकरणाची खास गुप्तहेरांकडून शहानिशा करून घेण्याची माईंची पद्धत होती. संस्थानिकांनाही आर्थिक मदत देण्याचे काम होळकरशाहीने केले. खुद्द माधवराव पेशवे अडचणीत असताना त्यांनी अहिल्यामाईकडे पन्नास हजाराची मदत मागितली होती. तेव्हा खास दुतासोबत बंदोबस्त देऊन पाच लाख रूपये व माता रमाईसाठी सौभाग्याचे अलंकार पाठविले होते.
मदतीमागचं कारण सांगाताना अहिल्यामाईचा जवाब सुवर्ण अक्षरात लिहिण्यासारखा आहे, त्या म्हणतात “पेशवे याचक नाहीत, ते स्वामी आहेत आपले. आपलं दैवत जेजुरी असलं तरी मार्तंड पेशवा आहे. पेशवे मसनदीसं इमान राखणं आपलं कर्तव्य आहे”.
साध्या घोंगडीवर बसून तब्बल चाळीस वर्षे राज्यकारभार करताना, माईंनी प्रजेला पुत्रवत सांभाळलं. त्या म्हणायच्या, रयत राखली की राज्य विनासायास राखता येतं. अहिल्यामाईंचा उपदेश फार प्रभावी असायचा.
उत्तर पेशवाईच्या काळात अनंतफंदी हे थोर कवी होऊन गेले. मराठी व्याकरणातलं शार्दुलविक्रिडीत व शिखारिणी वृत्ताची निर्मिती अनंत फंदी यांच्याकडे जाते. फटका हा लावणी काव्यप्रकारही त्यांचाच. स्त्रीयांवर शृंगारिक लावण्या रचणं हा अनंत फंदीचा आवडता काव्य विषय होता. महेश्वर संस्थानात त्यांचा एक कार्यक्रम झाला. बिदागीही त्यांना मिळाली. निरोपावेळी ते मातोश्रींच्या दर्शनाला आले. त्यावेळी मातोश्री त्यांना कौतुकवजा उपदेश मिश्रणात बोलल्या …”आपण ज्या कविता करता, गायन करता. त्यावरून आपण थोर प्रतिभेचे आहात, पण हेच काव्य ईश्वर स्तवनासाठी वापरले तर तुमच्या वाणीचे सोने होईल”. झालं तिथंच अनंत फंदीतला शृंगारिक कवी लोप पावला व त्याच गर्भातून उदयाला आला एक प्रसिद्ध कीर्तनकार. पुढं फंदीची मुलंही कीर्तनकार झाली.
लोकमातेचा आदर्श, न्यायी कारभार समजून घेण्यासारखा आहे. होळकरशाहीचं निशाण लहरतं ठेवताना अश्रूंनी लोकमातेची पाठ कधीच सोडली नाही. ऐन वैभवात असताना पती खंडेरावांचा मृत्यू, पतीसोबत सती गेलेल्या अकरा स्त्रीया, पुत्र वियोगानं हताश झालेल्या मातृछत्र सासू गौतमाबाईचा मृत्यू, मल्हारबाबांचा मृत्यू. मल्हारबाबांचा मृत्युयोग तर किती कष्टप्रद असेल याची कल्पनाही करवत नाही.
आईच्या डोळ्यादेखत मुलाचा मृत्यू ? यापेक्षा भयंकर अजून काही असू शकतं का ? मालेराव या पुत्राच्या सरणावर सती गेलेल्या दोन सुना, त्या तर अर्धवट फुललेल्या फुलाप्रमाणे होत्या. मृत पुत्राच्या शेजारी दोन जिवंत मरणं लोकमातेनं कशी पेलली असतील ? होळकर वंशात आता लेकीचा वंश तेवढा वाढत होता. लाडका नातू नथोबाही एका आजाराने गिळला. पुत्र वियोगानं यशवंत फणसे यांनी हाय खाल्ली व ते ही गेले. यशवंतासोबत लेक मुक्ता सती गेली. लेकीचं सती जाणं म्हाता-या आईला रोखता आलं नाही.
धरणीमाय दुभंगलेली व आभाळ कोसळलेलं अशी म्हातारपणी लोकमातेची अवस्था होती. मनाची कणखरता दाखवायलाही शेवटी मर्यादा असतेच.
पुण्यश्लोक लोकमातेने लाडक्या मुक्ताच्या मृत्यूनंतर अंथरूण धरले. साल होतं १७९५ व मास होता श्रावण. पुण्य दान आदान प्रदानाचा पवित्र मास म्हणजे श्रावण मास. याच महिन्यात लोकमातेने शरीरातला प्राण काढून घेतला.
अशी ही थोर माता व तिची थोर कहाणी.

– लेखन : कचरू चांभारे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800