योग्य व्यक्तीला योग्य पुरस्कार मिळाला की, आपल्याला साहजिकच आनंद होतो. तसाच आनंद मला झाला, जेव्हा मला हे कळाले की, शिवतुतारी प्रतिष्ठानचा तिसरा जीवनगौरव पुरस्कार मित्रवर्य, राजेंद्र घरत यांना मिळाला तेव्हा आणि झरझर माझ्या डोळ्यांपुढे त्यांचा जीवन प्रवास दिसू लागला.

मी २६ जून १९९८ रोजी कोकण विभागीय माहिती उपसंचालक म्हणून कोकण भवनात रुजू झालो. काही दिवसातच राजेंद्र घरत यांची आणि माझी ओळख झाली. कळत नकळत या कामापुरत्या झालेल्या ओळखीचे रूपांतर स्नेहपूर्ण संबंधात बदलत गेले आणि ते वृद्धिंगत होत गेले, ते आजतागायात !
राजेंद्र घरत यांच्या पत्रकारितेला ३० वर्षे पूर्ण झाली आहेत. या ३० वर्षांपैकी मी त्यांच्या २७ वर्षांच्या पत्रकारितेचा साक्षीदार, साथीदार राहिलो आहे. आतापर्यंत तुम्ही किती लेख, बातम्या लिहिल्या असतील ? असे घरत साहेबांना विचारल्यावर त्यांनी सांगितलेल्या आकडेवारीने मी अचंभित झालो ! दै.लोकसत्ता, दै, महाराष्ट्र टाईम्स, दै.सकाळ, दै. पुण्यनगरी, दै. गांवकरी, दै. ठाणे वैभव, नवी मुंबईतील साप्ताहिके, मुंबई, नवी मुंबईतील दिवाळी अंक यांमधून त्यांनी विपुल लेखन केले आहे.

त्याशिवाय त्यांनी १५०० हून अधिक मुलाखती घेतल्या आहेत. नवी मुंबईतील “नवे शहर” मधून “मुशाफिरी” हे साप्ताहिक सदर नोव्हेंबर १९९९ पासून अखंडपणे आजतागायत अखंडपणे सुरू आहे. स्वतःचे “वार्तादीप” हे साप्ताहिकही २००५ ते २०१९ दरम्यान चालवले आहे. एखादी व्यक्ती मोठी पत्रकार झाली की, ती सहसा “वाचकांची पत्रे” या सदरासाठी काही लिहित नाही. पण घरत साहेबांचा मोठेपणा असा की, ते अजूनही “वाचकांची पत्रे” या सदरासाठी पत्राद्वारे काही ना काही समस्यांना वाचा फोडण्याचे काम करीत असतात.

घरत साहेब ऑगस्ट २०१९ पासून दै. आपलं नवे शहर या वर्तमानपत्रात उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. या बरोबरच त्यांनी या वर्तमानपत्राच्या युट्युब वाहिनीसाठी ३२५ हुन अधिक नामवंत-गुणवंत व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या आहेत.
पत्रकारितेबरोबरच घरत साहेब अंधश्रध्दा निर्मुलन, सर्पमैत्री, वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, व्यसनमुक्ती, अंधशाळा, अनाथ मुलांसाठी चालवल्या जाणाऱ्या संस्था अशांना मदत करण्यासाठी सक्रिय सहभाग घेत असतात. त्यांच्यामुळे, त्यांच्याबरोबर मलाही काही उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली. त्यातील एक अविस्मरणीय आठवण म्हणजे, कोकणातील दृष्टिहीन मुले आणि मुलींची पहिली निवासी शाळा असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील घराडी येथील स्नेहज्योती संस्थेला दिलेली भेट होय. दिवसभर त्या मुलांच्या सहवासात राहून माझे डोळे चांगलेच उघडले ! या भेटीला जोडूनच आम्ही तिथून जवळच असलेल्या आंबावडे या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावाला, तेथील स्मारकाला भेट देऊ शकलो. सामाजिक जाणिवेचे वकील योगेश मोरे साहेब हे ही आमच्यासोबत होते. खरोखरच एक अविस्मरणीय अशी ती भेट ठरली.
पत्रकारिता करीत असतानाच घरत साहेब प्रकाशन व्यवसायातही सक्रीय आहेत. माझे पहिलेवहिले “भावलेली व्यक्तिमत्वे” हे पुस्तक त्यांच्या सृजन प्रकाशन संस्थेतर्फेच प्रसिद्ध झाले आहे. अशा इतर पुस्तकांशिवाय त्यांनी अंध मुलांसाठी ब्रेल लिपीमध्ये २८ पुस्तके प्रकाशित केली. तर ६ पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. ब्रेल लिपीतील पुस्तकांसंदर्भातील त्यांचे काम पाहुन आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीने त्यांची मुलाखत प्रक्षेपित केली आहे.
विविध गुणीजनांच्या घेतलेल्या मुलाखतींवर आधारित असलेल्या त्यांच्या ‘अनोखी व्यक्तीमत्व’ या पुस्तकाचे प्रकाशन तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते सह्याद्री अतिथी गृहात संपन्न झाले होते.

नवी मुंबई महानगरपालिकेची महापौर गणेश दर्शन स्पर्धा, लोकसत्ता गणेश दर्शन स्पर्धा, डॉ डी वाय पाटील महाविद्यालयाची वक्तृत्व स्पर्धा, मराठी भाषा संवर्धनदिन या निमित्त आयोजित स्पर्धांचा परीक्षक म्हणूनही घरत साहेबांनी काम पाहिले आहे.
घरत साहेबांना आतापर्यंत तंबाखू विरोधी घोषवाक्य स्पर्धा, व्यसनमुक्तीपर घोषवाक्य स्पर्धा, स्तंभलेख स्पर्धा यात अनेक पारितोषिकेही प्राप्त झाली आहेत. याशिवाय मुंबई मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई, ठाणे जिल्हा वृत्तपत्र लेखक संघ, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघ, आनंद चॅरिटेबल ट्रस्ट, ठाणे या व अशा विविध संस्थांकडून विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
मुंबई विद्यापीठातून बी.ए. (मानसशास्त्र), एम.ए. (मराठी साहित्य) या पदव्या संपादन केलेल्या घरत साहेबांनी पत्रकारितेत येण्यापूर्वी लंडन पिल्सनर या बिअर कंपनीत काही वर्षे काम केले आहे. पण त्यांचे करावे तितके कौतुक कमीच ठरेल, ते यासाठी की खुद्द बिअर कंपनीत काम करताना आणि नंतरही आजतागायत ते बिअर, दारू, धूम्रपान, तंबाखू अशा सर्व प्रकाराच्या व्यसनांपासून निर्धारपूर्वक दूर राहिलेले आहेत.
घरत साहेबांना त्यांच्या सर्व प्रकारच्या कार्यामध्ये, उपक्रमांमध्ये घरून पूर्ण साथ मिळत आली आहे. समाजाच्या कल्याणासाठी आपली वाणी, लेखणी, शक्ती झिजविणाऱ्या घरत साहेबांना दीर्घायुष्य लाभो, या हार्दिक शुभेच्छा.

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800