जीवन आहे म्हणून मृत्यू आहे
हेच तर जीवनाचे सत्य आहे
मृत्यू नंतरही जी जीवंत आहे
तीच व्यक्ती महान आहे !!
मरण आले जरी मला ते
बोलता – चालता यावे
भार्या-मुले मित्र परिवारही
आश्चर्याने थक्क व्हावे !!
आई बापूंच्या पुण्याईने
जे मिळाले ते पावन झाले
कर्ता, कर्म अन् क्रियापदही
गंगेला जाऊन मिळाले !!
जीवन प्रवासात माझ्या
दिलदार साथी भेटत गेले
काट्या-कुट्याच्या रस्त्यावरही
चालणे सुखकर झाले !!
ना खेद ना खंत मनात
कोणाबद्दलही उरली नाही
मान अपमान सारे पचवत
जीवन जगलो शाही
सत्ता, संपत्तीचा मोह
धरला कधी ना मनी
मरणानंतर ते का सोबत येते?
चित्त ठेवले समाधानी !!
मृत्यूला सामोरे जाता जाता
माझे एकच आहे मागणे
या दुनियेच्या बाजारात
सोपे करावे जगणे !!

— रचना : राजाराम जाधव. नवी मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
