प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रसेविका समिती आणि उद्यम सखी महिला संस्थेच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या स्नेह मेळाव्यात अष्टपैलू कामगिरी करीत असल्याबद्दल न्यूज स्टोरी टुडे पोर्टलच्या निर्मात्या, प्रकाशिका, मुलाखतकार, लेखिका, सामाजिक कार्यकर्त्यां सौ अलका भुजबळ यांना सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

या प्रसंगी राष्ट्र सेविका समितीच्या मुंबई जिल्हा बौद्धिक प्रमुख अश्विनी भावे म्हणाल्या की, संसाराची प्रत्येक टप्प्यावर स्त्री जशी समर्थपणे जवाबदार्या पार पाडते, तसे तिने आठवड्यातील दोन तास जरी राष्ट्र सेवेसाठी दिले तर सक्षम राष्ट्र घडण्यास निश्चितच हातभार लागेल.

प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभक्तीपर समूह गान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. परीक्षक म्हणून लाभलेल्या श्रीमती अश्विनी भिडे यांनी सांगितले की, “ही स्पर्धा महिलांनी महिलांसाठी आयोजित केली असून सर्व स्पर्धकांनी सुर, ताल आणि लय यांचा सुंदर मेळ साधत अत्यंत उत्कृष्ट सादरीकरण केले.”

यावेळी नवनिर्वाचित नगरसेविका शिल्पा ठाकूर, शैला पाटील आणि डॉ. प्रणाली पाटील यांचा शाल, श्रीफळ आणि भारतमातेची प्रतिमा देऊन गौरव करण्यात आला.

तसेच श्रीमती स्नेहल नाईक, श्रीमती अलका भुजबळ, श्रीमती प्रीती घोलपकर आणि श्रीमती आज्ञा गव्हाणे यांचा त्यांच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल साडी, श्रीफळ आणि भारतमातेची प्रतिमा देऊन नवनिर्वाचित नगरसेविकांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

समूह गान स्पर्धेत एकूण सहा गटांनी सहभाग घेतला होता. यामध्ये स्वरगंधा गटाला पहिले तर जाई-जुई मंडळाच्या योगा गटाने दुसरे पारितोषिक मिळविले.

या प्रसंगी लेखिका व कवयित्री वर्षा भाबल यांनी “सिन्दुर ची ताकद” आणि “स्त्रीच्या आयुष्याची वाटचाल” या त्यांच्या स्वरचित कविता प्रभावीपणे सादर केल्याने सर्वांचे मन भारावून गेले. काही महिलांनीही देशभक्तीपर गीते गायली.

श्रीमती मानसी जगताप यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्कृष्ट केले.

सर्व महिलांसाठी हळदीकुंकू, तिळगुळ आणि वाण देऊन, कार्यक्रमाची सांगता वंदेमातरम् या राष्ट्र गान ने झाली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उद्यमसखी नाविन्यपूर्ण महिला सेवा सहकारी संस्थेच्या उपाध्यक्षा श्रीमती अक्षया चितळे आणि राष्ट्र सेविका समितीच्या मुंबई जिल्हा सहप्रमुख सुजाता बानिक यांनी नियोजनबद्ध जबाबदारी पार पाडली.

या प्रसंगी उद्यम सखी मंडळा तर्फे ॲड.अक्षता नेहते, मनीषा म्हात्रे आणि स्वाती पांचाळ उपस्थित होत्या.
या संपूर्ण कार्यक्रमात देशभक्तीचा उत्साह, महिला सक्षमीकरणाची जाणीव आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश अधोरेखित झाला.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
