समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध माध्यमांतून सतत संवाद साधणार्या व्यक्तींच्या प्रेरणादायी जीवन कथा असलेले; देवेंद्र भुजबळ लिखित, ग्रंथाली निर्मित आणि न्यूज स्टोरी टुडे प्रकाशित, “संवादभूषण” हे पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे. ह्या पुस्तकातील एक कथा नायक, पत्रकार श्री नारायण जाधव यांनी या पुस्तकाला दिलेली दाद आज वाचू या. आणखीही काही दिलखुलास प्रतिक्रिया मिळाल्या आहेत आणि मिळत आहेत. त्याही यथावकाश वाचू या.
श्री नारायण जाधव यांचे मनःपूर्वक आभार.
– संपादक
भुजबळ सर,
पुस्तक अतिशय छान झाले आहे. इतक्या मोठ्या मान्यवरांत आपण मला स्थान दिले त्याबद्दल आभार. पुस्तकातील सर्व मान्यवरांची नावे, त्यांचे कार्य पाहिले तर त्यात, मी म्हणजे “किस खेत मे कलबला.”!
पुस्तकातील सर्व मान्यवरांच्या कथा, कार्य, त्यांनी घेतलेले परिश्रम, सोसलेल्या अडचणी व त्यावर केलेली मात वाचल्यावर खूपच प्रेरणा मिळाली. शिवाय पुस्तक वाचून अद्याप आपल्याला खूप काही करायचे आहे, मान्यवरांचे काम पाहिले तर त्यात मी म्हणजे नुकतेच अंकुर फुटलेले इवलेशे रोपटे आहे, याची जाणीव झाली.
पुस्तकाची मांडणी, कागद, मुखपृष्ठाची कल्पना खूपच भन्नाट आहे. ३४ मान्यवरांना एकत्र आणून त्यांचे कार्य संवादभूषणद्वारे समाजासमोर आणण्यासाठी आपण जी मेहनत घेतली तिला सलाम.
दुपारी घरी आल्यावर पहिल्या दोन तासांतच संध्याताई अमृतें पर्यंत संपवले होते. नंतर आता दीड तासात उर्वरित पुस्तक वाचून संपवले. प्रत्येक व्यक्तिमत्त्व प्रेरणादायी आहे. त्यातील महेंद्र कोंडे, राजू घरत, सुभाष कुलकर्णी यांना ३०\३५ वर्षांपासून ओळखत असूनही तिघांचा वेगळा पैलू आपण मांडला आहे.
अशोक नायगांवकर, अशोक बागवे, सर यांच्या अनेक कविता विविध कार्यक्रमात ऐकल्या. मारुती विश्वासरावांना प्रेस नोटच्या माध्यमातून तर शिबानी जोशींना दूरदर्शनवरील कार्यक्रमातून ओळख असली तरी या पुस्तकातून दुसरी बाजू समजली.
अशोक डुंबरे, खंडू, वीणा गावडे, राम खाकाळ, संध्याताई अमृते, मनोज भोयर, नरेशचंद्र काठोळे सर, नितिन केळकर सर, कुमार कदम, नरसिंग पोतकंठी, लता गुठे, कांचन कंदले, मरियम मिर्झा, विलास सरोदे, मधुसुदन आडे, मदन लाठी, किरण बोळे, सतीश शिरसाठ, वैशाली आहेर, बबन जोगदंड, विजय होकर्णे, मधुकर घोडविंदे, बाबासाहेब काझी, अनिल शाह, सी. के. सुब्रमण्यम या सर्वांचे कार्य वाचून आपल्याला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे, याची प्रेरणा मिळाली.

पत्रकारितेच्या भाषेत सांगायचं झाल्यास संवाद ही केवळ माहिती देण्याची प्रक्रिया नसून विश्वास निर्माण करण्याची कला आहे, याचा प्रत्यय संवादभूषण या पुस्तकातून येतो.
या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे आपण केवळ सैद्धांतिक मांडणी न करता प्रत्यक्ष कार्यातून उभे राहिलेले अनुभव मांडले आहेत. प्रशासन, सामाजिक क्षेत्र, माध्यमे आणि सार्वजनिक जीवनात कार्यरत असलेल्या व्यक्तींनी संवाद कसा साधला, संकटाच्या काळात जनतेशी नाते कसे टिकवले, तसेच विश्वासार्हता कशी निर्माण केली, याची उदाहरणे या लेखसंग्रहातून समोर येतात.
सर आपण निवडलेल्या ३४ मान्यवरांमध्ये विविध क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या मान्यवरांमध्ये माध्यम क्षेत्रात काम करणाऱ्या प्रतिनिधींचाही समावेश असून त्यांच्या कार्यातून स्थानिक ते राज्यस्तरावरील प्रश्नांना आवाज कसा मिळतो, याचेही चित्रण करण्यात आले आहे. या अनुषंगाने पत्रकारितेतील संवादशैली आणि जनतेशी असलेले नाते यालाही या पुस्तकात स्थान मिळाले आहे, पत्रकारांवर कुणी लिहित नाही. लिहिले तर चांगले लिहित नाही. स्वतः पत्रकार एकमेकांच्या बातम्यासुद्धा देत नाही, हा अनुभव आहे. असे असताना आपण पत्रकारांना आपल्या पुस्तकात स्थान दिले आहे. याचे विशेष कौतुक वाटले. त्याबद्दल आपले पुन्हा एकदा विशेष आभार
इतक्या मोठ्या माणसांत माझ्या सारख्या नुकतेच अंकुर फुटलेल्या माणसाला स्थान देवून नवी उमेद दिवसाबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.
आपला विश्वासू
नारायण जाधव.

— संपादन : देवेंद्र भुजबळ
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

Good account of personalities given Cover Coverage
खरोखर सर आपली प्रतिभा, आपले ज्ञान सर्वाना देण्याची वृत्ती, दुसर्यातील गुण हेरून ते शब्दबद्ध करून प्रकाशित केलेली व सातासमुद्रापार पोहचलेली आपली प्रतीभा. मी धन्य आहे सर कि,आपल्या सारखे सृजनशिल गुरू लाभले. सलाम आपल्या व्यक्तिमत्त्वाला.