उरळी कांचन येथील निसर्गोपचार आश्रमात सध्या निसर्गोपचार आश्रम आणि न्यूज स्टोरी टुडे यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष निसर्गोपचार शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरा दरम्यान आशी नाईक यांचा परिचय झाला. त्या वाणिज्य शाखेच्या पदवीधर असूनही भाषा आणि साहित्य विषयी विशेष आवड असल्याने त्यांनी जर्मन भाषेत पदव्युत्तर शिक्षण घेतले. तसेच गेली १५ वर्षे त्या जर्मन भाषेचे प्रशिक्षण देत आहेत. संस्कृत भाषेत देखील त्यांनी पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. त्यांना वाचनाची गोडी लहानपणापासूनच आहे. त्या लेख, कविता आणि भाषांतर करत असतात.
भाषा आणि साहित्य या खेरीज योग, अध्यात्म आणि भारतीय संस्कृती हे त्यांचे जिव्हाळ्याचे विषय आहेत. न्यूज स्टोरी टुडे परिवारात त्यांचे हार्दिक स्वागत आहे.
– संपादक
आदर्श आणि दिनचर्या हे दोन शब्द एकत्र ? एक क्षण थांबून तिने स्वतः ला चिमटा काढून पाहिला की ती स्वप्नात तर नाही ना… ?
अगदी शांतपणे ७ तास निद्रादेवीच्या अधीन झाल्यानंतर पहाटे ५.३० ला उठून एक तासभर आसने करणे स्वप्नात नाही खरीखुरी आसने, शिक्षकांच्या सूचना पाळून.. किती सुंदर सुरुवात दिवसाची. शरीरालाच नाही तर मनाला देखील लवचिक बनवणारी आसने, जी करून आपले ऋषी शब्दशः शतायुषी झाले ती आसने.

चहा किंवा कॉफी पिऊन नाही तर काढा पिऊन शरीर रुपी रथाला लगाम लावणे आणि लगबगीने पुढच्या कार्यक्रमासाठी पळणे, पुढे काय तर निवांतआडवे होऊन मालिश करून घेणे, त्यानंतर पांढऱ्या शुभ्र वाफेने भरलेल्या खोलीत काही मिनिटे शरीरशुद्धी करणे, मग शेतातल्या मातीचा लेप पोटावर लावून उष्णता कमी करणे आणि त्या बरोबरच बाकी शरीरशुद्धी क्रिया करणे अशी ही इथली सकाळची लगबग. हे होते न होते तोच सूर्य डोक्यावर यायच्या आधी सात्विक भोजनाचा आस्वाद घेत, भोजन गृहातील आहार विषयक फलक वाचणे म्हणजे ज्ञानात भरच की. कमी तिखट, कमी मीठ असलेले रसाळ म्हणजे सूप आणि पातळ भाजी असलेले जेवण काही लोकं कपाळावर आठ्या आणून, तर काही दुसऱ्यांच्या तोंडाकडे बघून घशाखाली घालतात तर काही अशा सपक अन्नाचे दूरगामी फायदे लक्षात घेऊन प्रत्येक घास कृतज्ञतापूर्वक चवीचवीने आहुती दिल्यासारखा खातात. जठराग्नी शांत झाला की लगेच थंडगार मातीची पट्टी डोळ्यावर ठेऊन किंचित आराम … वामकुक्षी सारखे सुख नाही हो जगात.
ऊन डोक्यावर असताना दुखऱ्या भागावर वाफ, कटीस्नान वगैरे म्हणजे पर्वणीच नाही का…? त्यात भरीस भर म्हणून फळ किंवा भाज्यांचा रस अगदी तिथेच तयार असतो. शरीरशुद्धी क्रिया करून ज्ञान वर्धक, माहितीपर व्याख्याने आयोजित केलेली असतात तिथे जाऊन विज्ञानमय कोषाची शुद्धी होण्याची सोय आहे.
आश्रमाची परिक्रमा पूर्ण करताना निसर्गरम्य परिसरात फेरफटका मारताना रेल्वे चा भोंगा ऐकत सूर्य नारायणाचा निरोप घेता येतो. सूर्यास्त होईतोच संध्याकाळची न्याहारी करण्याची वेळ होते आणि परत तेच चेहरे पाहून भोजन पूर्ण होते.
लहानपणीची आठवण यावी इतकी नेटकेपणाने प्रार्थना, स्तोत्र पठण आणि भजन संध्या ह्याचा आनंद घेत अनेक लोकांना आयते श्रोते मिळतात आणि मन शांत होऊन कृतज्ञतेने भरून येते ते वेगळेच.
दिवस पूर्णत्वाला जावा अशी जणू ईश्वराची इच्छा असल्याप्रमाणे ध्यान किंवा योग निद्रा किंवा त्राटक असे आनंदाची अनुभूती देणारे काहीतरी पूर्ण करून इथला दिवस पूर्ण होतो.
नैसर्गिक वातावरणात नैसर्गिक पद्धतीने दिनचर्या असेल तर शरीर आणि मन स्वास्थ्य तर मिळणारच.
पंचमहाभूतांवर आधारित चिकित्सा आणि पंचकोषांची शुद्धी करत उदात्त हेतूने अविरतपणें चालू असलेली रुग्ण सेवा महात्म्यांच्या दूरदृष्टीने आणि महान आत्म्याच्या सेवा कार्यामुळेच शक्य आहे.

— लेखन : आशीं नाईक. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती: अलका भुजबळ. ☎️ 9869484800