थोर साहित्यिक, पद्मश्री, भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तिशी अतिशय स्नेहाने, आपुलकीने वागणारे सर्व स्नेही, परिचित यांच्या मध्ये मधुभाई म्हणून प्रिय असलेले मधू मंगेश कर्णिक यांचा आज वाढदिवस आहे. कितवा वाढदिवस आहे, याचा मुद्दामच उल्लेख केला नाही, कारण काही व्यक्ती या वयातीत असतात, तसे मधुभाई आहेत.
मधुभाईना बहुतेक जण साहित्यिक आणि विशेषतः कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक, मालगुंड येथील सुंदर अशा कवी केशवसुत स्मारकाचे निर्माणकर्ते म्हणून जरी ओळखतात. तरी माझ्यासाठी त्यांची खास ओळख आहे आणि ती म्हणजे दूरदर्शन मधील माझी सहकारी अनुजा देशपांडे हिचे ते वडील होत. गंमत म्हणजे या दोघांच्याही व्यक्तिमत्वात इतका फरक आहे की, मधुभाई गंभीर स्वभावाचे, तर या उलट अनुजा एक मिनिट ही गप्प न बसता स्वतः काही ना काही विनोद करून, काही किस्से सांगून दूरदर्शन मधील कामाचा ताण तणाव सहजपणे दूर ठेवणारी. तिच्या व्यक्तिमत्वाचा आणखी एक गुण म्हणजे मी मधू मंगेश कर्णिक यांची मुलगी आहे, असे तिने कधी मिरवले नाही किंवा त्याचा कधीही, कोणत्याही प्रकारे लाभ ही घेतला नाही. आपण बघतो की, अनेक विवाहित महिला वडिलांच्या नावाचा वापर करण्यासाठी विवाहानंतर एक तर पूर्वीचेच आडनाव कायम ठेवतात किंवा काही लग्नापूर्वीचे आणि लग्नानंतरचे अशी दोन्ही आडनावे लावतात. पण अजित देशपांडे यांच्याशी अनुजाचे लग्न झाले आणि तिने तेव्हापासून सरळ अनुजा देशपांडे नाव धारण केले. हा तिचा स्वाभिमान मात्र तिला मधुभाईंकडून मिळालेला आहे. कारण बऱ्याच जणांना हे माहीत नसेल की मधुभाई महाराष्ट्र राज्य लघु उद्योग महामंडळाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी असताना, तेव्हाच्या महामंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याशी झालेल्या मतभेदांमुळे जेव्हा आपल्याला लेखणीशी तडजोड करावी लागेल असे त्यांना दिसले तेव्हा त्यांनी आपली मुले लहान आहेत, त्यांचे कसे होईल, आपले कसे होईल असा काही एक विचार न करता तडकाफडकी नोकरीचा राजीनामा दिला आणि ते नोकरीच्या बंधनातून स्वतंत्र झाले.
मधुभाई, मला आपले वाटण्याचे आणखी एक कारण म्हणजे ते मुळात माध्यम क्षेत्रातील आहेत. ते महाराष्ट्र राज्य लघु उद्योग महामंडळाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी होते, हा उल्लेख तर वर आला आहेच पण ते मुख्यमंत्री पदी वसंतराव नाईक असताना त्यांचे दीर्घकाळ जनसंपर्क अधिकारी होते. गोवा सरकारचा जनसंपर्क देखील त्यांनी काही काळ बघितला आहे.
आठ वर्षांपूर्वी मी आणि भरारी प्रकाशनाच्या लता गुठे २६ महिलांच्या यश कथा असलेल्या माझ्या गगनभरारी पुस्तकासाठी मधुभाईंनी प्रस्तावना लिहावी म्हणून त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेलो होतो, तेव्हा मी अनुजा चा दूरदर्शन मधील सहकारी आहे आणि त्यात परत माहिती खात्यात संचालक म्हणून काम करतोय, हे कळल्यावर त्यांना फार आनंद झाला होता.अर्थात मलाच काय, इतराना देखील ते सहजासहजी प्रस्तावना देत आले आहेत. जे जे शक्य असेल ते ते मार्गदर्शन करीत आले आहेत, करीत असतात आणि करीत राहतील.
मधुभाईंनी गगनभरारी पुस्तकासाठी लिहिलेली सुंदर प्रस्तावना पुढे देत आहे…
प्रस्तावना –
महाराष्ट्र शासनाच्या ‘माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयातील संचालक पदावरील ज्येष्ठ श्रेणीचे अधिकारी श्री. देवेंद्र भुजबळ यांनी ‘गगन भरारी’ या अर्थपूर्ण नावाचे हे पुस्तक वाचकाना सादर केले आहे. आशयाने खूप मोठ्या असलेल्या या पुस्तकामध्ये, परिस्थितीवर, संकटांवर मात करून आयुष्याला नवा अर्थ प्राप्त करून देणाऱ्या अनेक महिलांचे परिचय त्यांनी करून दिले आहेत. परिस्थितीच्या प्रतिकूलतेमुळे केवळ जमिनीवरच खुरडत राहणे शक्य असलेल्या सर्वसामान्य महिलांनी, मनोबळावर, परिश्रमावर आणि आकांक्षेच्या जोरावर आकाशात उंच भरारी कशी घेतली याचे प्रत्ययकारी चित्रण श्री. देवेंद्र भुजबळ यांनी केलेले आहे; त्यासाठी त्यांनी निवडलेल्या स्त्रियासुद्धा आपापल्या परीने वैशिष्ट्यपूर्ण आहेत व त्यांचे जीवनातील अनुभव तर त्याहून वैशिष्ट्यपूर्ण व अचंबित करणारे आहेत.

मुख्य म्हणजे श्री. भुजबळ यांनी गगनभरारी घेऊ पाहणाऱ्या वा घेतलेल्या ज्या स्त्रियांचे शब्दचित्र या पुस्तकात केले आहे, त्यातील अनेक महिला निरनिराळ्या संकटांशी मुकाबला करून यशस्वी आयुष्य व्यतीत करताना दिसत आहेत. समाजाला प्रेरणा देणारी ही छोटी पण अर्थशः मोठी चरित्रे, पुस्तक रुपात वाचकांसमोर सादर करून श्री. देवेंद्र भुजबळ व प्रकाशक लता गुठे यांनी मोठीच समाजसेवा पार पाडली आहे.
प्रसारमाध्यमामध्ये कार्यरत असताना समाजाचे बाह्यरंग व अंतरंग न्याहाळण्याची संधी प्राप्त होते. त्या संधीचे सोने करणे थोड्यानाच जमते.
श्री. देवेंद्र भुजबळ यांनी पाहिलेल्या व भेट घेतलेल्या या सर्व महिला म्हणजे समाजाचे अलक्षित असे अंतरंग आहे. ते पाहताना, वाचताना अनेक ठिकाणी वाचक हरखून, भारावून जातो. विशेषतः बेबीताई गायकवाड, सुजाता नायकुडे, सुजाता कोंडिकिरे, सुशीलाबाई साबळे, आशाताई कामत व प्रतिभा सेन गुप्ता, वासंती वर्तक या भगिनींच्या जीवन कथा व व्यथा वाचताना मनात अनुकंपेऐवजी सहभावना निर्माण होतात. त्यांच्या जीवनकथेशी सहृदय वाचक एकरूप होऊन जातात.
या पुस्तकात समावेश असलेल्या लता गुठे, वासंती वर्तक व किरण चित्रे ही नावे माझ्या चांगल्या परिचयातील असली तरी त्यांच्यातील अपरिचीत असे अनेक लक्षवेधी पैलू नव्याने उमगले आणि त्यांचे व्यक्तिचित्र अधिकच आकर्षक व अती गुणवान वाटू लागले.
समाजाला प्रेरणा देणारे हे पुस्तक लिहिल्याबद्दल श्री. देवेंद्र भुजबळ यांना धन्यवाद दिले पाहिजेत; आणि असे मोलाचे पुस्तक प्रकाशित करणाऱ्या ध्येयवादी प्रकाशिका लता गुठे यांचेही अभिनंदन केले पाहिजे. त्या दोघांनाही माझ्या शुभेच्छा !
मधु मंगेश कर्णिक
मुंबई ४०००५३
२८ एप्रिल २०१७
पुढे भरारी प्रकाशनानेच माझे “स्वातंत्र्यवीर सावरकरांची जाज्वल्य पत्रकारिता” हे पुस्तक प्रकाशित केले. प्रकाशिका लता गुठे यांनी मधुभाईना घरी जाऊन हे पुस्तक भेट दिले. त्यावेळी पुस्तक चाळून “एका अतिशय महत्वाच्या विषयावर पुस्तक लिहिले” असे सांगून माझे कौतुक केले.

मधुभाईंच्या साहित्य कृती, साहित्य विषयक राबविलेले विविध उपक्रम, चित्रपट, दूरदर्शन मालिकाकांसाठी केलेले लिखाण, त्यांना मिळालेले शेकडो पुरस्कार हे सर्व लिहायचे झाले तर एकेका पैलूवर एकेक स्वतंत्र लेख होईल. अर्थात काही जणांनी त्यांच्यावर पुस्तके लिहिली आहेत, त्यांच्या साहित्याचा धांडोळा घेतला आहेच म्हणा. असो….
मधुभाईना वाढदिवसाच्या पुन्हा एकदा मनःपूर्वक शुभेच्छा. त्यांचा १०० वा वाढदिवस थाटामाटात, चाहत्यांच्या उपस्थितीत भरभरून आनंदाने साजरा होईल आणि त्यावेळी तुम्ही आम्ही सर्वजण उपस्थित राहू, अशी आशा व्यक्त करतो.

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800